ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या आधी हा नरेश म्हस्के गद्दारी करणार होता. त्यावेळी म्हस्के काँग्रेसमध्ये जात होता, शिवाजी मैदानमध्ये त्याचा प्रवेश होता. उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून त्याला मी थांबवलं. मी तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या. असे म्हणत ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
ठाण्यात राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी विचारपूस करण्याचे सोडून त्यांची संपत्ती कोठे आहे? याची उद्धव ठाकरे चौकशी करत होती, असा आरोप मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी केला होता. त्यानंतर राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
राजन विचारे म्हणाले, २०१४ ला यांच्या मुलासाठी संपूर्ण सैन्य घेऊन कल्याणला गेले होते. राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला गेले होते, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये बातम्याही आल्या होत्या. त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि निवडून आलो. फक्त त्यांचा मुलगा आणि ते एवढंच त्यांचं राजकारण होते. माझ्याकडे खोके नव्हते, मी पैशाच्या जीवावर निवडून आलो नाही. आनंद दिघे आणि उद्धव ठाकरेंमुळे मला सर्वकाही मिळालं.
पुढे बोलताना राजन विचारे म्हणाले, आनंद दिघे साहेबांमुळे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. मला 40 वर्ष झाले, मी आनंद दिघे सोबत होतो. यांचा उदय झाला दिघे साहेब गेल्यानंतर झाला. त्यावेळी नरेश म्हस्के कुठे होते? 66 साली सेनेची स्थापना झाली ती दिघे यांनी वाढवली. मातोश्रीवर दिघे साहेब यादी पाठवायचे आणि फायनल व्हायची आणि तिकीट फायनल व्हायचं.
माझ्याकडे पैसे नव्हते. सर्वसामान्य कर्तकर्ता म्हणून काम केलंय. सभागृह नेते पद मी यांच्यासाठी सोडलं. तुम्ही चित्रपट काढला दिघेंवर कुठे पैसा खर्च केला. मी शो घेतले कार्यकर्तांच्या पैशाने चित्रपट काढला. महापालिका ठाणेची वाट तुम्ही लावली आणि तुम्ही काय बोलताय? असा सवालही राजन विचारे यांनी केला.
