Author: bittambatami.com

मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व कसं कळणार ? – उद्धव ठाकरे

नांदेड: देशाचे पंतप्रधान धार्मिक ध्रुवीकरण करीत असून खोटा प्रचार करीत आहेत. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर हिंदूच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रं जास्त मुलं असणाऱ्यांना म्हणजेच मुस्लिमांना दिली जातील, असं पंतप्रधान…

ठाणे टोल हटवा, नाहीतर मतदानावर बहिष्कार

ठाणे : ठाण्याच्या वेशीवर असणारा मुलुंड चेकनाका येथील टोलनाका रद्द करा नाहीतर मतदावर बहिष्कार टाकू अशी आक्रमक भुमिका ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी घेतली आहे. तब्बल दहा हजार…

व्हीव्हीपॅट मोजणीवरील निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स आणि व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल्स पडताळणीसंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय राखून ठेवला. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिच्या निवडणुकीच्या पद्धतीवर आपला अधिकार नसल्याच्या भूमिकेचा सुप्रीम कोर्टाने पुनरुच्चार करत आवशक्यता भासल्यास त्यात सुधारणा सुचवल्या…

पीएचडी करणाऱे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना निलंबित करणाऱ्या

टीआयएसएस प्रशासनाचा निषेध अनिल ठाणेकर ठाणे : पीएचडीसाठी अभ्यास करणारे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना दोन वर्षे निलंबित करण्याच्या व रामदास यांना टीआयएसएसच्या सर्व कॅम्पसमध्ये प्रवेशास बंदी घालण्याच्या, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस डॉ. विजू कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. रामदास हे प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) चे सरचिटणीस होते, आणि आज ते एसएफआय च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून एसएफआय च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचे सहसचिव आहेत. युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांच्या देशव्यापी मंचाचेही ते प्रतिनिधी आहेत. रामदास यांच्याविरुद्ध काढण्यात आलेला निलंबनाचा आदेश हा भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर तसेच मतस्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे जे देशव्यापी कारस्थान चालले आहे, त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. टीआयएसएस च्या प्रशासनाने या कारस्थानात सामील होऊन आणि रामदास यांच्या कृतींवर राष्ट्रविरोधी हा ठराविक शिक्का मारून लोकशाही मूल्ये आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. रामदास यांचे निलंबन हे अशा प्रकारचे एकच उदाहरण नाही. देशातील अनेक कॅम्पसवर होत असलेल्या हुकूमशाही हल्ल्यांचा तो भाग आहे. भाजप व आरएसएस यांच्या केंद्र सरकारच्या विद्यार्थीविरोधी आणि शिक्षणविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवाल तर त्याचा हाच परिणाम होईल अशी देशातील समग्र विद्यार्थी समुदायाला दिलेली ती धमकी आहे. पण विद्यार्थी समुदाय अशा हल्ल्यांचा व धमक्यांचा धैर्याने सामना करत आहे. अलीकडेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या एकजुटीने आरएसएस च्या अभाविप या विद्यार्थी संघटनेचा जो धुव्वा उडवला, त्यातून हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याची झलक पाहायला मिळते. टीआयएसएस चे विद्यार्थी सुद्धा अशा हल्ल्यांच्या प्रतिकाराच्या अग्रभागी राहतील याचा आम्हाला विश्वास आहे. रामदास यांचे निलंबन ताबडतोब मागे घ्यावे, आणि स्वातंत्र्य व लोकशाहीवरील अशा हल्ल्यांविरुद्ध विद्यार्थी, शेतकरी, आणि सर्व जनतेनेच आपला बुलंद आवाज उठवावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने डॉ. अशोक ढवळे व डॉ. विजू कृष्णन यांनी केले आहे.

वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा

रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ गावातील रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी साचत असून या पाण्यामधून नागरिकांना वाट काढत घर गाठावे लागत आहे. हे पाणी अंगावर उडाल्यास खाज येण्याचे प्रकार घडत असून यामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून रस्त्यावर वाहणारी गटारगंगा बंद करण्याची मागणी केली. ही समस्या सुटली नाहीतर, येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी यावेळी दिला. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात मोठी मोठी गृह संकुले उभी राहत असून याठिकाणी भूमिपुत्रांची गावे आहेत. वाघबीळ गावात रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याने गावकऱ्यांची वाट अडविल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर गेल्या १० वर्षांपासून सांडपाणी वाहत असून रस्त्यावर काही भागात सांडपाणी साचून तिथे मोठे डबके तयार झाले आहे. या पाण्यावर हिरवा रंगाचे हे पाणी दिसून येत असून या पाण्यामुळे गावकऱ्यांना रस्त्यावर चालणे शक्य होत नाही. रस्त्याच्या कडेने वाट करून त्यांना घरापर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यातही पाणी अंगावर उडाले तर, अंगाला खाज सुटते. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हा त्रास सहन करावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वाघबीळ गावातील सांडपाण्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ठाणे शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच वाघबीळ गावातील सांडपाणी रस्त्यावर साचण्याची समस्या आहे. या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही महापालिका प्रशासन कोणतीच पाऊले उचलत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या दिड महिनाभरात पावसाळा सुरु होत असून पावसाळ्यात येथून चालणे शक्य होणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले. रस्त्यावर वाहणारी गटारगंगा बंद करण्याची मागणी करत ही समस्या सुटली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी यावेळी दिला.

ग्रामीण रुग्‍णालयांकडे रुग्‍णांची पाठ

मुंबई : एकीकडे शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा मिळवण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठी धडपड करावी लागत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्के खाटांचाच वापर होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आरोग्य आढावा अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, डॉक्टरांसह इतर सुविधांअभावी ग्रामीण रुग्णालयांतील अशी वेळ असल्याचे समोर आले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ३६४ ग्रामीण रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी आरोग्य सेवा संचालनालयाची आहे. या ३६४ रुग्णालयांमध्ये सुमारे १० हजार खाटा आहेत. त्यापैकी केवळ ४० टक्के म्हणजेच ४ हजार खाटा रुग्णांकडून वापरल्या जात आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा अहवाल आशियाई विकास बँकेने तयार केला आहे. ग्रामीण रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. तज्ज्ञांची कमतरता आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात किमान एक एमडी मेडिसीन आणि सर्जनची नियुक्ती करावी. मात्र, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एक महिला तज्ज्ञ, एक बालरोगतज्ज्ञ आणि एक भूलतज्ज्ञ असतो. इतर सौम्य आणि गंभीर प्रकरणांसाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जाते. सुविधा वाढवली जात आहे नांदेड दुर्घटनेनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, प्राथमिक स्तरावर लोकांना संपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यास जिल्हा आणि तृतीय श्रेणी रुग्णालयांवरील भार कमी होऊ शकतो. याअंतर्गत ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याअंतर्गत येथे एमडी मेडिसीन आणि सर्जरीच्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यायला हवी, असे आरोग्य सेवा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सी-व्हिजिलवर आचारसंहितेच्या २४५ तक्रारी

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘सी विजिल’ हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात १६ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत २४५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील १३५ तक्रारींचे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे मुख्य उद्दिष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार ‘सी विजिल’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी- व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून १३५ तक्रारींचे निवारण केले. शंभर मिनिटांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत उर्वरित १८३ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदारसंघनिहाय तक्रारी अंधेरी पूर्व- १६, अंधेरी पश्चिम- ८, अणुशक्तीनगर- ७, भांडुप पश्चिम- ५, बोरिवली- १३, चांदिवली- २६, चारकोप- १४, चेंबूर- १४, दहिसर- ८, दिंडोशी- ५, घाटकोपर पूर्व- ३, घाटकोपर पश्चिम-२, गोरेगाव-१०, जोगेश्वरी पूर्व-५, कलिना-८, कांदिवली पूर्व-८, कुर्ला-५, मागठाणे-२४, मालाड पश्चिम -११, मानखुर्द शिवाजीनगर-१, मुलुंड- १६, वांद्रे पूर्व- ७, वांद्रे पश्चिम- ८, वर्सोवा- ३, विक्रोळी- १६, विलेपार्ले- ५ अशा एकूण २४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

घाटकोपरमध्ये फेरीवाल्‍यांना हटवले

पोलिस प्रशासन पालिकेची संयुक्‍त कारवाई मुंबई : मुंबईतील अनेक रस्ते अनधिकृत फेरीवाल्‍यांनी व्यापल्याने नागरिकांना चालणे खूपच कठीण झाले आहे. यासंदर्भात बेकायदा आणि विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. त्‍यामुळे पोलिस प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्‍त कारवाई करीत फेरीवाल्‍यांना हटवले. घाटकोपर पश्चिम श्रद्धानंद रोड आणि हिराचंद देसाई रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते. वारंवार कारवाई होऊनही फेरीवाले हटत नाहीत. याबाबत नागरिक सातत्याने स्‍थानिक पोलिस, पालिका विभाग कार्यालयात तक्रारी दाखल करतात. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांविरोधात नागरिकांनी एकत्र येत कारवाईसंदर्भात मोहीम सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांना फेरीवाल्यांची अडचण घाटकोपर रेल्वे प्रवासी आणि मेट्रो स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्‍थानक परिसरात अनधिकृतरीत्या बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. संध्याकाळच्या वेळेस फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना नाकीनऊ येते. मागच्या काही महिन्यांपासून पालिकेने स्‍थानक परिसरात ‘नो हॉकर्स झोन’चे फलक परिसरात लावले आहेत. तरीदेखील फेरीवाले बिनधास्त आपले बस्तान मांडून असतात. त्‍यामुळे फेरीवाल्‍यांविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. रेल्‍वे स्‍थानक परिसरात बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर संयुक्तरीत्या कारवाई करत रस्ते मोकळे केले आहेत. – शरद शेटे, पोलिस उपनिरीक्षक

वाढत्या उन्हाचा पक्ष्यांनाही फटका

वाशी –  दिवसेंदिवस वाढत्‍या उष्णतेचा त्रास अनेक नागरिकांना होत असताना, पक्ष्यांनादेखील त्‍याचा फटका बसत आहे. तापमानात वाढ होत असल्‍याने पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होत असून हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत. मागील काही दिवसांत नवी मुंबईतील तापमान ४० अंश इतके होते. त्‍यामुळे वाढत्‍या उष्मामुळे याचा अनेक नागरिकांना त्रास झाला होता, तर पक्ष्यांनादेखील या गरमीचा फटका बसत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांचे शरीर अनेक प्रकारच्या पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. गेल्‍या काही दिवसांपासून नवी मुंबईत पक्षी गळून पडण्याचे प्रमाण वाढल्‍याचे पक्षीप्रेमी विशाल मोहिते यांनी सांगितले. पशूदया महत्त्वाची पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मुर्च्छीत होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी बाल्कनी, टेरेस अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमी सागर कांबळे यांनी केले आहे.

आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा

रवी कटकधोंड, राजकीय पक्षांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील कापडणीस, सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी कटकधोंड म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. तसेच प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलिसांचीही परवानगी घ्यावी. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक असून निवडणूक अर्ज भरण्याअगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार असल्याचे कटकधोंड यांनी या वेळी सांगितले. अधिसूचना शुक्रवारी निघणार ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण १५ लाख २४ हजार ९३९ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख २७ हजार १७८, महिला मतदार ६ लाख ९७ हजार ७१८ आणि इतर ४३ मतदार आहेत; तर मतदान केंद्र १,५२७ आहेत.