Author: bittambatami.com

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ठाणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा व केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे या शाळेने घवघवीत यश संपादन करत यशाचा चौकार लगावला आहे. शाळेचे तब्बल चार विद्यार्थी कु. हरिचंद्र रवि वाख, कु. प्राची लक्ष्मण विशे, कु. साई वाळकू झुगरे आणि कु.वैभव गुरूनाथ विशे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल दि.३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी व आष्टे शाळा तसेच शिक्षकवृंद आष्टे यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेच्या या घवघवीत यशात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ आष्टे यांचे तसेच आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व. काशिनाथ भोईरसर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

दिलीप करंगुटकर स्मृती शालेय कॅरम स्पर्धा

३८ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे क्रीडा सल्लागार स्व. दिलीप करंगुटकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ६ एप्रिलला भायखळा येथे होणाऱ्या विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत मुंबईसह विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख ३८ खेळाडूंमध्ये विजेतेपद पटकाविण्यासाठी चुरस होणार आहे. १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकेरी कॅरम स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना आकर्षक चषक-पदक व स्ट्रायकर देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाप्रेमी राजेश सुर्वे यांच्या तर बक्षीस समारंभ डॉ. विशाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे परिसर व अविनाश स्पोर्ट्स यांचे स्पर्धेला सहकार्य लाभले आहे. क्रीडा व सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक पटकाविण्यासाठी आर्यन स्कूल-पुणेचा आयुष गरुड, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, इझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा रुद्र भालेराव, एमपीएस-वरळीचा सिध्दांत मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-वरळीचा समीर खान, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्ना गोळे आदी उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. परिणामी कॅरम रसिकांना अटीतटीच्या लढती पाहण्यास मिळतील. पंचाचे कामकाज नामवंत राष्ट्रीय दर्जाचे पंच प्रणेश पवार तसेच क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत.

रविवारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा पुण्याला

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणुक ७ एप्रिल रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ७, एप्रिल रोजी ठीक १२:00 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, सभागृह, बालेवाडी पुणे आयोजित केली आहे. या विशेष सर्वसाधारण सभेत चौवार्षिक (२०२४ ते २०२८) निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. या सभेला सर्वांनी वेळेवर उपस्तीत राहण्याचे आव्हान चंद्रजीत जाधव – सहसचिव, भारतीय खो खो महासंघ व गोविंद शर्मा – सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी केले आहे. या सभेला सुधांशु मित्तल (अध्यक्ष – भारतीय खो खो महासंघ) व एम. एस. त्यागी (महासचिव – भारतीय खो खो महासंघ) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उपकार सिंग (सहसचिव, भारतीय खो खो महासंघ) व अनिल झोडगे (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन) हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘श्रीकांत शिंदेंच्या विरुद्ध नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ’

शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होते. त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत असेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिपणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी येथे केली. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केली. यावेळी उमेदवार दरेकर यांना शुभेच्छा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवा नेते सरदेसाई यांनी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी सरदेसाई यांनी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. खासदार डाॅ. शिंदे यांची उमेदवारी घोषित का केली जात नाही हे त्यांच्या पक्षाला विचारावे. पण एकंदर परिस्थिती पाहता शिंदे गटातील खासदारांची उमेदवारीसाठी नावे जाहीर होऊनही नंतर ती उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. अशा खासदारांच्या बाबतीत मतदारसंघात जे नकारात्मक वातावरण आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणातून पुढे आली असेल, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यास माघार घेतली जात असेल. असे होऊ नये, असे वाटते, अशी सूचक टिपणी सरदेसाई यांनी केली. नियतीचा खेळ योग्यवेळी बदला घेतोच, असे सांगून सरदेसाई म्हणाले, शिवसेनेतील फुटीनंतर तेरा खासदार शिंदे गटा सोबत गेले. त्यांच्यामुळे सत्ता गेली. पक्षात फूट पडली. त्या तेरापैकी पाच खासदारांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापली आहे. आता या खासदारांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आठवण येत असेल. खासदारांच्या उमेदवारी जाहीर झाली की त्यांना सन्मानाने मातोश्रीवर बोलवले जायाचे. २०१४, २०१९ मध्ये या खासदारांनी त्याचा अनुभव घेतला आहे. या उमेदवार खासदारांचे ठाकरे कुटुंबियांकडून साग्रसंगीत स्वागत केले जात होते. रश्मी ठाकरे या खासदारांना विजयासाठी औक्षण करून त्यांना आशीर्वाद द्यायच्या. मग सन्मानाने निश्चित उमेदवारांंना एबी अर्ज दिले जायाचे. आता याच खासदारांना परिस्थिती बदलल्याने शिंदे यांच्या समोर उमेदवारीसाठी दहा दहा तास प्रतीक्षा करावी लागते. आपली उमेदवारी जाहीर होते की नाही याची धाकधूक या खासदारांना आहे. मातोश्रीवरचा मान आणि शिंदे यांच्या समोरील स्थान याची अनुभती आता हे इच्छुक खासदार घेत असतील. शिवसेना आम्ही जोमाने पुढे नेणार असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारीसाठी दोन आकडी उमेदवारीसाठी जागा मिळवता येत नाहीत. उमेदवारांची घोषणा करताना, जागा मिळविताना त्यांची होणारी तगमग आता जनता पाहत आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणताही विचार न करता २१ उमेदवारांची घोषणा केली आहे, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपशहर संघटक हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, शरद पाटील, विवेक खामकर उपस्थित होते.

‘कोणतेही काम करा, आधी आयोगाची परवानगी घ्या’

मनपाकडून २२८ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आयोगाकडे मुंबई : निवडणुकीच्या काळात लोकानुनय करणारी किंबहुना लोकांना खुश करून त्यांच्यावर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत यासाठीच कोणतीही कामे करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला नियोजित कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे सदर करावे लागले आहेत. खड्डे बुजवणे, नालेसफाई आदी कामांसाठीही आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. विविध कामांचे २२८ कोटी रुपयांचे प्रस्ताव पालिकेने मंजुरीसाठी आयोगाकडे धाडले आहेत. आपत्कालीन परिस्थिती किंवा पावसाळ्यापूर्वीची कामे निवडणूक काळात पूर्ण होणे अपेक्षित असतात. खड्डे बुजवण्याच्या कामासाठीही आयोगाची परवानगी का घ्यावी लागते, अशी विचारणा पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असता, कोणती कामे निवडणूक काळात करावीत, याचे स्पष्ट निर्देश आयोगाच्या आचारसंहितेत आहेत. आपत्कालीन काळातील कामाशिवाय अन्य कामे या काळात अपेक्षित नाहीत. त्यातही अत्यावश्यक कामे कोणती, ही कामे खरोखरच अत्यावश्यक आहेत का, याची छाननी आयोगाकडून केली जाते. त्यानंतरच परवानगी दिली जाते. त्यामुळे खड्डे भरणीच्या कामासाठीही परवानगी घ्यावी लागते. खड्डे भरण्याचे काम का करावे लागणार आहे, ते किती महत्त्वाचे आहे, हे पटवून द्यावे लागते. निवडणूक काळात लोकानुनय करणारी कामे काढून लोकांवर एका अर्थाने लोकांवर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत, हे आचारसंहितेत अभिप्रेत आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हिरवा कंदील मिळाल्यानंतरच निविदा १)  पालिकेने याआधी ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, ती कामे आयोगाच्या कचाट्यातून सुटली आहेत. मात्र, यापुढे जी कामे आवश्यक असतील त्या कामांसाठी आयोगाकडे जावेच लागणार आहे. २)आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्या कामांच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर कामांना सुरुवात होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत नालेसफाई, नाल्यांतील गाळ काढणे, त्याची विल्हेवाट लावणे, गाळ वाहून नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे या कामांना वेग येईल. ३)  पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची डागडुजीही पालिका हाती घेणार आहे. त्यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

 अंधेरीतील गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी जूनअखेर

 अंतिम अहवाल रविवारपर्यंत सादर होणार मुंबई :अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पूल येत्या जूनअखेर जोडला जाणार आहे. पुलासाठी व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट मागविण्यात आला असून, येत्या रविवारपर्यंत अंतिम तो सादर होणार आहे. व्हीजेटीआयच्या अहवालाप्रमाणेच  पूल जोडणीचे काम होणार असून,  सुरक्षिततेसाठी, मजबुतीकरणासाठी आणि कमी वेळात जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी आयआयटीकडून काही पर्याय सुचविण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच काम हाती घेऊन पुढील दोन-तीन महिन्यांत गोखले पुलाचा निर्णय मार्गी लागेल, असा विश्वास मुंबई पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत, बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहू पर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र, काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयचा सल्ला मागितला होता.  व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून, तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल. पुलाचे चार स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे.  दरम्यान, पालिकेला स्वतःचा आराखडा तयार करता आला तरी तज्ज्ञांचा आणखी एक सल्ला म्हणून आयआयटीच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन यात समाविष्ट केले जाणार आहे. पुलाच्या संपूर्ण जोडणीत आयआयटी व व्हीजेटीआयचे तज्ज्ञ पाहणीसाठी उपस्थित राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. नव्याने निविदा प्रक्रिया- १) गोखले व बर्फीवाला पुलाच्या जोडणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी पालिका नव्याने निविदा करणार असून, ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जरी या कामाला सुरुवात झाली तरी जून अखेर हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मुदत दिली जाईल. ज्यामुळे नागरिकांसाठी पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. दुसऱ्या गर्डरचे कामही सुरू राहणार- २) या सगळ्यामध्ये गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरसाठीचे साहित्य पोहोचत असल्याने तेही काम सुरू राहणार आहे. दुसऱ्या बाजूच्या गर्डरसाठी लागणाऱ्या ३२ स्पॅन पैकी जवळपास ५ स्पॅन मुंबईत पोहोचले आहेत. आता त्यांचे एकत्रीकरण करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

नायर रुग्णालयात एफओटी मशीन

मुंबई : नायर रुग्णालयातील श्वसनविकार विभागाला इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सीएसआर फंडातून अत्याधुनिक फोर्स्ड ऑसिलोमेट्री (एफओटी) मशीन मिळाले आहे. या सुविधेमुळे रुग्णांच्या श्वसन कार्यक्षमतेची चाचणी करणे अधिक सोपे होणार आहे. श्वसनविकाराच्या चाचणीदरम्यान रुग्णांना फुंकर मारण्यासाठी ताकद लावावी लागते, पण वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चाचणीदरम्यान फुंकर मारण्यात तेवढी सक्षमता नसते, पण मशीनमुळे फुंकर मारल्यानंतर श्वसननलिकेत असलेल्या अडथळ्यांचे निदान करता येणार आहे. तसेच श्वसननलिकेत असलेला दाब, दाह, सूज याचेही निदान होत असल्याने रुग्णावर तात्काळ उपचार करता येणार आहेत.

राकेश कोकळे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डे भरण्यास सुरुवात

माथेरान : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्समुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले होते तर याच रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या साधनांना देखील त्रासदायक बनले होते याकामी येथील जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत माती आणि खडी मध्ये हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माथेरान मध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही याबाबत नागरिकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपात

 भिवंडीत भाजपाला वाढता प्रतिसाद भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत असून, केंद्रीय राज्यमंत्री व भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र दिपचंद्र घरत, कोमल राकेश पाटील, भाग्यश्री भारत पाटील, माजी उपसरपंच भालचंद्र शांताराम घरत, संगीता दिपचंद्र घरत, भारत गुरुनाथ पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत करून आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार केला. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती. मनसेच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. खारबावच्या उपसरपंच जयमाला पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दर्पण पाटील, घनश्याम कारभारी, अजय जाधव, मिलिंद खंडागळे यांच्यासह शेकडी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशासाठी तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाटील, विजय मुकादम, देवा पाटील, प्रफुल्ल तांगडे यांनी पुढाकार घेतला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी श्रीकांत गायकर यांचीही उपस्थिती होती.