Author: bittambatami.com

मोदींच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान नाही

कल्याणमधील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा राजीनामा कल्याण : कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा पाठविला आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडे असलेले मोरे शिंदे गटात यापूर्वीच दाखल झाले होते. मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येक कार्यक्रमात ते आघाडीवर होते. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांनी राजीनामा दिल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. कल्याण-मुरबाडचे आपण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहोत. यजमान जिल्हाप्रमुख म्हणून आपणास मोदींच्या सभेच्या व्यासपीठावर स्थान पाहिजे होते. शिवसेनेच्या पक्षांतर्गत धोरणाप्रमाणे अनेक पदाधिकारी आपल्या अंतर्गत काम करत असतात. पक्ष पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी फळी आपल्या अधिकारांतर्गत काम करत असताना आपणास मोदी यांच्या सभेसाठी व्यासपीठावर डावलणे योग्य नाही, अशी नाराजी अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे. यजमान जिल्हाप्रमुख म्हणून आपणास डावलण्यात आल्याने आपण शिंदे गटाचा कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत, असे मोरे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण त्यांचा मोबाईल बंद असल्याचा संदेश येत होता.

मोदींच्या सभेसाठी रणरणत्या उन्हात कार्यकर्ते हजर

भिवंडी, कल्याण ग्रामीण भागातून सर्वाधिक गर्दी कल्याण : रणरणते ऊन, घामाच्या धारांनी हैराण झालेले असताना भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे कार्यकर्ते कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये महिला, पुरूषांचा सर्वाधिक सहभाग आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे गर्दी असुनही कोठेही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मोदी यांच्या सभेसाठी सुमारे एक लाख खुर्च्या सभा मंडपात लावण्यात आल्या आहेत. या सर्व खुर्च्या केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे भरणार नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातील सामान्य महिला, पुरूष नागरिकांना ‘बांधिव’ कार्यकर्ते म्हणून विशेष बस उपलब्ध करून सभास्थळी आणले आहे. या नागरिकांच्या गळ्यात भाजप, शिवसेनेचे झेंडे, गमछे दिसून येत आहेत. मोदी यांची सभा दुपारी दोन वाजता असल्याचा निरोप असल्याने सकाळी १० वाजल्यापासून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहरी भागात कार्यकर्त्यांनी गावच्या नाक्यावर जमा होण्यास सांगितले होते. ही सभा संध्याकाळी पाच वाजता असल्याचे समजल्यावर मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रणरणत्या उन्हात प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्यांना आच्छादित सभा मंडपामुळे दिलासा मिळत आहे. मंडपात सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही अशा पध्दतीने पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या जात आहेत. उत्साही कार्यकर्ते सभा मंडपात मोदी, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपील पाटील, कल्याणचे लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत आहेत. काही कार्यकर्ते वाजतगाजत सभास्थळी येत आहेत. भगव्या झेंडे, फलकांमुळे सभा स्थळ परिसर भगवा झाला आहे. सभा मंडपात जाण्यासाठी अतिअति महत्वाच्या व्यक्ति, अति महत्वाच्या व्यक्ति, कार्यकर्ते यांच्यासाठी तीन प्रवेशव्दारे आहेत. कल्याण शहर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. जागोजागी पोलीस जथ्थ्याने उभे आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. सुरक्षेचा त्रास नको म्हणून कल्याणमधील बहुतांशी रिक्षा चालकांनी घरी जाणे पसंत केले आहे. पंतप्रधान मोदी येणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा रस्तारोधक आणि या भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. पक्की दुकाने, बांधकामे यांच्यावर हिरव्या जाळ्या लावून ती बंदिस्त करण्यात आली आहेत. मोदींच्या मार्गाच्या दुतर्फा एकही माणूस फिरकणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. विशेष सुरक्षा पथकाचा सभा मंंडपाच्या बाहेर चार ते पाच स्तरीय वेढा आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयेाने वितरित केलेल्या प्रवेश पासाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिला अति महत्वाच्या बैठक व्यवस्थेत प्रवेश दिला जात नाही. सभा मंडपाचा परिसराचा ५०० मीटरचा परिसर, रस्ते बांबूचे अडथळे, रस्ता रोधक लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सभा स्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अर्ध्या वाटेत रिक्षा, वाहन सोडून मग घरी पायी यावे लागत आहे. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सभास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत महायुतीच्या खासदारांनी विकास कामे, नागरिकांच्या मनातील कामे करून दाखवली असती तर अशाप्रकारे मोदींच्या सभेच्या आयोजनासाठी धडपड करावी लागली नसती, असाही सूर सभा ठिकाणी आलेल्या काही कार्यकर्त्यांकडून काढला जात आहे. सेल्फी पॉईंट गर्दी सभा मंडपाच्या बाजूला राम मंदिराची प्रतिकृती, तसेच पंतप्रधान मोदी यांची उभी प्रतिमा लावण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते राम मंदिराच्या प्रतिकृती सोबत, आणि मोदी यांच्या प्रतिमेसोबत स्वतःचे मोबाईल मधून छायाचित्र काढून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत

रमेश औताडे मुंबई : भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांना श्रीमंतांची अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत ? असा सवाल मुंबईतील सामान्य नागरिक करत आहे. मुंबईतील घाटकोपर मध्ये एक विशाल बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत 88 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक आहे. मुंबई महापालिकेने या कंपनीला नोटीस बजावली आहे. 10 दिवसांच्या आत परिसरातील चार बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुंबईतील 24 नागरी प्रभागांमधील कोणत्याही होर्डिंगसाठी परवाना रद्द केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. जे होर्डिंग कोसळलं ते गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर मुंबई महानगर पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आले होते. सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने घाटकोपरच्या छेडा नगर जिमखाना, रिक्रिएशन सेंटर ३, येथील अंदाजे १२० x १२० फुट होर्डिंग्स जमिनीतून उन्मळून जवळच असणा-या पेट्रोल पंपच्या छतावर  कोसळलं . त्यावेळी जवळपास १५० वाहनं पेट्रोल पंपावर उपस्थित होती, काही पावसापासून आश्रय घेण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले होते. काही क्षणात हे होर्डिंग्स कोसळले. जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 88 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे. मृतांमध्ये पूर्णिश जाधव (वय 50),दिलीप पासवान (वय 34),बशीर अहमद (वय 52), फहिम खलील खान (वय 22),हंसनाथ गुप्ता (वय 71),सतीश सिंह (वय 52),चंद्रमनी प्रजापती (वय 45),महंमद अक्रम (वय 48),भारत राठोड (वय 24),दिनेशकुमार जैस्वार( वय 44),सचिन महेशकुमार यादव (वय 23) अशी या बारा जणांची नावे असून अन्य दोघांची अद्यापही ओळख पटलेली नाही. दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होते. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती.अशी माहिती समोर आली आहे. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. तसंच पोलिसांकडून भावेश भिंडेंचा शोध घेतला जात आहे असे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

गृहमतदानास 85 वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या गृहमतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 105 मतदारांपैकी 96 मतदारांनी मतदानाचा आज गृहमतदान केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या  सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी विविध भागातील नागरिकांकडे जाण्यासाठी एकूण 11 पथके तयार करण्यात आली होती. एका पथकात मतदान अधिकाऱी, मदतनीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी व शिपाई  व राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधीं यांचा समावेश करण्यात आला होता. 11 पथके 148 विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी नमूद केले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील 85 वर्षावरील एकूण 103 तर 2 दिव्यांग अशा एकूण 105 मतदारांनी  गृहमतदानासाठी  निवडणूक विभागाकडे अर्ज भरुन दिले होते. या सर्व मतदारांच्या घरी आज प्रशासनाच्या वतीने पथके पाठविण्यात आली होती. नागरिकांनीही गृहमतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा असा संदेश नागरिकांना दिला. नोंदणी केलेल्या 105  मतदारांपैकी एकूण 96 जणांनी गृहमतदानाचा अधिकार बजावला. तसेच निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे अंध मतदारांना घरोघरी वाटप

ठाणे : लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 148 विधानसभा मतदारसंघातील अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती  चिठ्ठीचे वाटप प्रत्यक्ष अंध मतदारांच्या निवासस्थानी जावून करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीमध्ये मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या अंतर्गत ठाणे शहरातील जास्तीत जास्त अंध मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सुलभता व्हावी, यासाठी ब्रेल लिपीमध्ये माहिती दस्तऐवज तसेच चिठ्ठी अंध मतदारांना देण्यात आली. अंध मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करता यावे यासाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन अंध मतदारांना करण्यात आले. अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी  मतदारांना प्रत्यक्ष घरी उपलब्ध करुन दिल्याबद्दल  सर्व अंध मतदारांनी भारतीय निवडणूक प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील 691 कर्मचाऱ्यांनी ठाण्यात केले टपाली मतदान

ठाणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली. 25 ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‍20 मे 2024 या ‍दिवशी मतदानादिवशी कर्तव्यावर असल्याकारणाने मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही अशा अत्यावश्यक सेवेतील एकूण 691 अधिकारी कर्मचारी यांनी आज (14 मे) टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती  25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक  निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील  “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5  या वेळेत आज टपाली मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिले होते. अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात मतदानासाठी जाणे शक्य नाही अशा अधिकारी कर्मचारी यांनी आज टपाली मतदान केले. टपाली मतदानासाठी एकूण 2949 कर्मचाऱ्यांनी नमुना 12 ड भरुन टपाली मतदानासाठी नोंदणी केली होती. आज सायंकाळी 5.00 वाजेपर्यत एकूण 691  कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दि.14/05/2024, व दि. 16/05/2024  असे दोन दिवस टपाली मतदान सुरू  राहणार असल्याची माहिती 25 – ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक  निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

नवी मुंबई : खरीप हंगामात शेतक-यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उदभवणा-या अडचणींचे निराकरण व्हावे, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभाग व प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु झाला आहे. अशी माहिती ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे  बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे. चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे. अशावेळी शेतक-यांना खरीप हंगामावेळी येणा-या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी विभागास्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेत आले आहेत. सदर नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तक्रार नोंदविल्यानंतर लगेच शेतक-यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषि निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकींगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल.  शेतक-यांना कृषि निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास पुढे दिलेल्या निविष्ठा तक्रार निवारण कक्षांशी भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेलद्वारे संपर्क साधून तत्काळ तक्रार नोंदविण्यात यावी. जिल्हा संपर्क विभागीय कार्यालय, ठाणे ८६९१०५८०९४, toqethanediv@gmail.com, ठाणे ७०३९९४४६८९. dsaothane.2021@gmail.com,      पालघर ९४२३९८४४४३, dsaopalghar@rediffmail.com, रायगड  ९५०३९७५९३४, dsaoraigad@gmail.com, रत्नागिरी ८६६८५७२५२८ dsaortn@rediffmail.com, सिंधुदुर्ग ९४२३९२२३४६, saosindhu@gmail.com या तक्रार नियत्रंण कक्षाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ठाण्याचे कोकण विभागीय कृषि सह संचालक अंकुश माने  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच या दोनही नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी रोड शो घेण्यात येणार असून त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यात आता गुरुवारी ठाण्यात सांयकाळी गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या रस्त्यावर महाविकास आघाडीची सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे आदींची देखील हजेरी लागणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाण्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे गुरुवारी दुपारी २ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विनोद तावडे घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी तावडे हे ठाण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे शनिवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंतही ठाण्यात प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो किंवा सभा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दुपारी ३ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

सर्व होर्डिंगचे होणार आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेण्यासाठी करणार तत्काळ सर्वेक्षण ठाणे : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त (जाहिरात विभाग) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान-मोठे असे २९४ स्ट्रक्चर (सांगाडे) आहेत. या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. मात्र, आता त्यांच्या मालकांनी-कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने, आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करायचे आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे. त्यात आठ दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही या बैठकीत रोडे यांनी सांगितले. तसेच, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर फलक लावण्यात आले असल्यास ती उंचीही कमी करण्यात येणार आहे. उंची वाढवण्यात आलेल्या, धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण जाहिरात विभागातर्फे करण्यात येणार आहे. त्याचवेळी, महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग असल्यास त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात, मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित काही होर्डिंग आहेत. त्यांचेही आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची प्रत (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळविण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.