Category: होम

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

मुंबई : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये  महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये  १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. स्वीप अभियान महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्‍वीप” (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे. एकूण मतदार २०१९ मध्ये  सेवा मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे-जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचनाजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या निमित्त बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.

कल्याणमधून उभे राहण्याची वल्गना करणारे गेले कुठे? : डॉ. श्रीकांत शिंदे

अंबरनाथ : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उभे राहण्याची वल्गना करणारे नेते गेले कुठे? असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना विचारलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी शनिवारी अंबरनाथच्या खेर विभागातील हेरंब मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष अभय सोमण यांनी त्यांचे स्वागत केले. कल्याण मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे निवडणुकीला उभे राहण्याची कुणाची हिम्मत झाली नाही, मतदारसंघातील नागरिक विकासकामे आणि महायुतीच्या पाठीशी उभे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वजण काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सोबतच कल्याण मतदारसंघात महायुतीमध्ये चांगले वातावरण आहे. वातावरण बिघडविण्याचे काम कुणी करत नाही आणि करत असल्यास वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांसारख्यांची नावे कल्याणमधून चर्चेत होती, मग ही नावे गेली कुठे, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, परशुराम उगले, निखिल चौधरी, विजय पाटील, मंदिराचे पदाधिकारी रत्नाकर चांदस्कर, नीलेश पाताडे उपस्थित होते.

आव्हाडांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबत्ते

ठाणे : एकीकडे भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची उमेदवार व नेत्यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाणे आणि कल्याण लोकसभेबाबत चर्चा केली. त्यानंतर श्रीकांत शिंदेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे ते कोणत्या चिन्हावर लढणार असा सवाल यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बहुचर्चित अशा कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी दुपारी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे, कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर, युवसेना सचिव वरून सरदेसाई, केदार दिघे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेल्या चर्चेत ठाणे आणि कल्याण लोकसभेची रणनिती ठरविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच कल्याणचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाण्याचा उमेदवार कोण असेल त्याला कसे सामोरे जायचे, महायुतीमधून इच्छुक असलेल्यांपैकी कोणीही आला तरी त्यासाठी कशी रणनिती आखली जाउ  शकते यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे, मला असे वाटते की मुख्यमंत्र्यांनीच टाळले असेल की, माझ्या मुलाची उमेदवारी मी का जाहीर करावी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असेल. भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, त्याचे परिणाम आजच्या घडीला सांगू शकत नाही, ४४ दिवस अजून बाकी आहेत, ४४ दिवसानंतरच भविष्य सांगणे हे कोणत्या भविष्यकारालाही जमणार नसल्याचे देखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

शिंदेंचे ७ खासदार ठाकरेंच्या संपर्कात ?

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा दावा मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना खासदारांचा पत्ता कट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली असून शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहेत…

तिकिटाची वाट न बघता उदयनराजेंचा प्रचाराचा धडाका सुरुच

सातारा : सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असतानाच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या रिंगणात कोणत्याही परिस्थितीत उतरण्याची घोषणा केली आहे. उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी निश्चित असली, तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर आज सुद्धा भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला असून लोकांशी…

रामेश्वरम कॅफे स्फोटात भाजपा कार्यकर्ता ताब्यात

काँग्रेसचा सनसनाटी दावा बंगळूरु: काँग्रेसने आज भाजपावर खळबजनक आरोप केला आहे.  तपास यंत्रेणेकडून म्हणजेच ‘एनआयए’कडून बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबतचे…

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई – राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : अशोक गायकवाड मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९९१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी ५० हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील ५ प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने पंडिता आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गायन कार्यक्रम रविवार ७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात आयोजित कऱण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आयोजित केला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर यती भागवत तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०. आपल्या सुरेल, मोकळ्या, घुमारेदार, ढंगदार आवाजाची जादू मैफलीत पसरविणाऱ्या पंडिता आरती अंकलीकर स्वरांचे सूक्ष्म दर्जेही ताकदीने ऐकवितात. बंदिशीची मांडणी त्या रेखीव आणि डौलदार करतात. या गायकीतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहे. स्वरात रमण्यापेक्षा तालक्रीडा, लयकारी, लयीच्या अंगाने रचना यांवर त्या भर देतात. अत्यंत प्रभावी, जोरकस, गणिती, अचूक, तयारीची लयकारी या गायकीत आहे. अत्यंत चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती या गाण्यात आहे. चपळ आणि सुरेल तान आहे. बंदिशींचे वैविध्य हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वाग्गेयकारांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवर्जून सादर करतात व त्यामुळे त्यांची गायकी समृद्ध झाली आहे. या गायनातून प्रखर आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, आक्रमकता प्रतीत होते. ख्यालाइतकीच ठुमरीही रंगविणाऱ्या काही गायिकांपैकी आरती अंकलीकर एक आहेत. त्यांनी सर्व गानप्रकार गाऊन विपुल यश प्राप्त केले आहे. त्यांनी पं. वसंतराव कुलकर्णी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. उल्हास कशाळकर व पं. दिनकर कायकिणी यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन घेऊन आग्रा व जयपूर परंपरेची खासियत आत्मसात केली.