Category: होम

जीवनदान देण्यासाठी पुढे आले ११० रक्तदाते

रमेश औताडे मुंबई : कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोपरखैरणे नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेने सलग २५ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. नवी मुंबई विभागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ११० रक्तदात्यानी  रक्तदान केले. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई सागर नाईक, विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आंनदराव कचरे, उपाध्यक्ष डी. आर. पाटील आणि सर्व संचालक व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

कृषी उद्योगातील परिवर्तनासाठी एआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज

मुंबई : भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे. एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शनासह या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन केले आहे. येत्या ३ आणि ४ मार्च २०२५ रोजी ही परिषद होईल अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजीनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते. कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसचे भारतातील कृषी- निविष्ठा (इनपुट)  उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न या परिषदेव्दारे केली जाणार आहे, ज्यामुळे जोडणी, सहयोग आणि वाढीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. हा कार्यक्रम उत्पादक, पुरवठादार, उद्योग तज्ञ आणि उद्योजकांना संधी शोधण्यासाठी,  नियामक चौकटींवर चर्चा करण्यासाठी आणि बायोस्टिम्युलंट्स, जैव कीटकनाशके आणि जैव खतांमधील नवीनतम प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आणेल. शंभर हून अधिक स्टॉल्स या परिषदेत मांडली जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक कृषी निविष्ठा (इनपुट)  उपाय, नाविन्यपूर्ण कच्चा माल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यात सादर होणार आहे. परिषद सत्रांमध्ये बायोस्टिम्युलंट नियम, कर धोरणे, उद्योग आव्हाने आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल अंतर्दृष्टी.  उद्योग नेटवर्किंग: B2B कृषी-इनपुट क्षेत्रातील प्रमुख घटकांना जोडणारे विशेष नेटवर्किंग सत्रे,  लघू आणि मध्यम उद्योजकीय क्षेत्रातील लहान आणि उदयोन्मुख व्यवसायांकडून सहभागाला प्रोत्साहन देणे. , आयात अवलंबित्व कमी करणे: आयात केलेल्या कच्च्या मालाला पर्याय म्हणून भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देणे. व्यवसाय संबंध निर्माण करण्यासाठी आणि बाजार विस्ताराच्या संधींचा शोध घेण्यासाठी या व्यासपीठाचा फायदा घेण्यासाठी देशभरातून खत तसेच शेती औषधे तसेच उत्पादन उपयुक्त मिशनरी, आधुनिक शेती तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेतील स्टॉलच्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणूनच उत्पादक, पुरवठादार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांना या परिवर्तनकारी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन धुरगूडे पाटील यांनी केले. नोंदणी, प्रायोजकत्व आणि स्टॉल बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, abc.aimassociationindia.com ला भेट द्या किंवा +९१ ९६८९१५२८३७ वर संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समीर पाठारे यांनी केले आहे. PHOTO CATION मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित अखिल भारतीय अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगूडे पाटील. सोबत सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे.

कल्याणमधील चिंचपाडा येथील बेकायदा जीन्स कारखाने जमीनदोस्त

 प्रदूषणामुळे रहिवासी होते हैराण कल्याण – कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील चिंचपाडा भागातील २२ जीन्सचे कारखाने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पोलीस बंदोबस्तात पालिका तोडकाम पथकाच्या साहाय्याने मंगळवारी जमीनदोस्त…

साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक मंत्री . आशिष शेलार यांनी मुंबईत केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व  बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या,पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मॅन, समायरा,गाभ,ह्या गोष्टीला नावच नाही,ग्लोबल आडगाव,हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी, (फोर ब्लाइंड मॅन) ओंकार बर्वे (फोर ब्लाइंड मॅन) , प्रियंकर घोष (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्ध गोडबोले, विवेक लागू,बाबासाहेब सौदागर, विजय भोपे,श् रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे १. सर्वोत्कृष्ट कथा : १.अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव) २. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मॅन) ३. सुमित तांबे (समायरा ) २. उत्कृष्ट पटकथा : १. इरावती कर्णिक (सनी) २.पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मॅन) तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी) ३. उत्कृष्ट संवाद: १. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.मकरंद माने सोयरिक ३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी) ४. उत्कृष्ट गीते: १. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव, गाणे : यल्गार होऊ दे) २.अभिषेक रवणकर (अनन्या,गाणे-ढगा आड या) ३.प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा गाणे-अलगद मन हे) ५. उत्कृष्ट संगीत : १.हितेश मोडक (हर हर महादेव) २.निहार शेंबेकर (समायरा) ३.विजय गवंडे (सोंग्या) ६. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : १.अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.हनी सातमकर (आतुर) ३.सौमिल सिध्दार्थ (सनी) ७.उत्कृष्ट पार्श्वगायक: १.मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत :भेटला विठ्ठल माझा) २.पद्मनाभ गायकवाड (गुल्हर गीत – का रे जीव जळला) ३.अजय गोगावले (चंद्रमुखी गीत : घे तुझ्यात सावलीत) ८. उत्कृष्ट पार्श्वगायिका: १.जुईली जोगळेकर (समायारा गीत – सुंदर ते ध्यान)२.आर्या आंबेकर (चंद्रमुखी गीत बाई ग कस करमत नाही) ३.अमिता घुगरी (सोयरिक गीत – तुला काय सांगु कैना) ९. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक : १.राहूल ठोंबरे-सजीव होवाळदार (टाईमपास 3 गीत : कोल्ड्रीक वाटते गार) २.उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत- आई जगदंबे) . सुजीत कुमार (सनी गीत – मी नाचणार भाई) १०.उत्कृष्ट अभिनेता:१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे )२.वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)३.ललीत प्रभाकर (सनी) ११.उत्कष्ट अभिनेत्री : १.सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)२.अमृता खानविलकर(चंद्रमुखी) ३.सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह) १२.उत्कृष्ट विनोदी अभिनेता १.मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)२.संजय नार्वेकर (टाईमपास 3) ३.भारत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर) १३. सहाय्यक अभिनेता :१. योगेश सोमण (अनन्या) २ किशोर कदम (टेरीटरी)…

केडीएमसीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

कल्याण : मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार व कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा सांगता सोहळा २८ जानेवारी रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विदयार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, म्हणी, वाकप्रचार स्पर्धा इतर महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातील विदयार्थ्यांनी पेहराव मराठी भाषा स्पर्धा, लावणी स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मराठी भाषेचे वैभव जपणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी एक झाड एक कविता, पथनाटय, सोनावणे महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी अक्षर दिंडी, मंगळागौर, प्रगती महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी शिवचरित्र असे बहारदार कार्यक्रम सादर केले. हा कार्यक्रम बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, उपआयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विदयार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी केले.

अनधिकृत इमारत उभी केल्याप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल

विकासक सलमान डोलारे अद्याप फरारच कल्याण : कल्याणमधील कुख्यात बिल्डर सलमान डोलारे यांचा अजून एक कारनामा समोर आला आहे. ९ मजली इमारत आणि एका भला मोठा बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले आहे. इमारतीमधील सर्व सदनिका आणि वाणिज्य गाळे विकून टाकल्या आहेत. यूसूफ हाईटसनंतर कल्याणमधील जे.एम. टॉवर आणि जमजम व्हीला बंगला अनधिकृत घोषित झाल्याने रहिवासी हवालदील झाले आहे. आत्ता या इमारतीवर लवकर कारवाईचा हातोडा चालविणार जाणार असल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे विकासक डोलारे याच्या विरोधात गुन्हे दाखल होऊनही त्याला पोलिस शोधू शकलेले नाहीत. महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बिल्डर डोलारे याने यूसूफ हाईटस ही इमारत उभी केली. या प्रकरणी बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याच बिल्डरने अन्सारी चौकात जे. एम. टॉवर या तळ अधिक ९ मजली इमारतीत वाढीव बांधकाम केले आहे. वाढीव बांधकामाची महापालिकेच्या नगररचना विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. याच टॉवर शेजारी १२ मीटर रुंद विकास योजनेच्या रस्त्यात बाधित असलेल्या जागेत जमजम व्हीला हा तळ अधित तीन मजली बंगल्याचे बांधकाम केले. या बंगल्याच्या वाढीव बांधकामाची बिल्डरने परवानगी घेतली नाही. या प्रकरणी बिल्डरला महापालिकेने नोटिस बजावून सुनावणीकरीता बोलावले होते. वाढीव बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. जे. एम. पावर मधील वाढीव बांधकामाची परवानगी तसेच जमजम बंगल्याच्या अधिकृततेविषयी कोणती कागदपत्रे बिल्डरने सादर केली नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम महापालिकेने अनधिकृत असल्याचे घोषित केले. हे अनधिकृत बांधकाम बिल्डरने स्वत:हून पाडावे अशी नोटिस ही महापालिकेने बिल्डरला बजावली. या नोटिसलाही बिल्डरने प्रतिसाद दिलेला नाही. अखेरीस महापालिकेच्या क प्रभागाचे अधीक्षक उमेश यमगर यांनी बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी  ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले की, संबंधितल बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी अ’क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची मदत घेऊन इमारत पाडकामाची पुढील कारवाई केली जाईल.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग शासकीय माहाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री . मुश्रीफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष  द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी,  विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, करावयाच्या सुधारणा, पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या  इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री . राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

मुंबई : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले. मंत्रालयात मंत्री . सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी  मंत्री .सावे बोलत होते. मंत्री सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री सावे यांनी सांगितले. या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड!

पुरूषांचा केरळवर तर महिलांचा पश्चिम बंगालवर विजय हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली. पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर ११ गुणांनी (४७-३६) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १० गुणांची (२४-१४) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (१.३० मि., २ मि. संरक्षण आणि २ गुण), राहूल मंडल (१.३० मि. संरक्षण व १० गुण), रामजी कश्यप (१.१० मि., १.४० मि. संरक्षण व ८ गुण), शुभम थोरात (१.४० मि., १.२५ मि. आणि २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत झालेल्या केरळकडून निखिल बी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), देवनारायण (१ मि. संरक्षण व  गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. महिलांची दमदार कामगिरी महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व ४ गुणांनी (२४-२०) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (२.१५ मि., नाबाद १.५० मि. आणि ६ गुण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण आणि ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. याचबरोबर पायल पवार (१.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.५५ मि. व १.२५ मि. संरक्षण आणि २ गुण) यांनीही दमदार कामगिरी केली. पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), दिपिका चौधरी (१.१० मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

नेमबाजीत आर्या बोरसेला पदकाची संधी, वॉटर पोलो-रग्बीत दणदणीत विजय डेहराडून  ः  उत्तराखंड येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत गाठून पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. दुसरीकडे वॉटर पोलोमध्ये पुरूषांनी, तर रग्बीमध्ये महिला संघाने जोरदार विजयी सलामी देत स्पर्धेत बुधवारचा दिवस गाजविला. डेहराडूनमधीलइ त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आज झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 634.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने 634.9 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून, सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. उद्या देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला. रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला 20-0 गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वाटर पोलो मध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबतही अचूकता दाखवित दणदणीत विजय मिळविला.