Category: होम

मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली

कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेची कामे गेल्या महिन्यांपासून सुरू झाली आहेत. या कामांमुळे मागील दोन वर्षापासून कोंडी मुक्त झालेला शिळफाटा रस्ता पुन्हा वाहन कोंडीच्या विळख्यात अडकू लागला आहे. या कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी शिळफाटा दिशेने कल्याणकडे येणारी अवजड वाहने काटई-बदलापूर रस्ता, नेवाळी चौक ते मलंग रस्त्याने, चक्कीनाका दिशेने वळविण्याच्या विषयावर पालिका, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले आहे. तसेच, शिळफाटाकडून कल्याण दिशेने येणारी डोंबिवलीतील बहुतांशी वाहने विको नाका येथे वळण घेऊन डोंबिवलीत प्रवेश करतात.या वाहनांना मानपाडा चौक येथे मज्जाव करून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात वळविण्याचाही विचार कल्याण डोंबिवली पालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक, पालिका अधिकारी उपस्थित होते. शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन न करता ही कामे सुरू करण्यात आल्याने, शिळफाटा रस्त्यावरील गोळवली, विको नाका भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली आहे. मेट्रो कामांसाठी शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी अवजड खोदकाम यंत्रणा उभी करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागात दो्न्ही बाजुने संरक्षित पत्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजुने रस्ता अरूंद झाला आहे. या अरूंद रस्त्यावरून कंटेनर, अवजड वाहने, मोटारीसह सर्व प्रकारची वाहने धावत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार, शाळकरी विद्यार्थी बसना बसू लागला आहे. या कोंडीवर उपाय करण्यासाठी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत शिळफाटा दिशेने कल्याण, डोंबिवलीकडे येणारी अवजड वाहने काटई नाका येथून बदलापूरमार्गे नेवाळी चौक, मलंग रस्ता, चक्कीनाका ते पत्रीपूल अशी वळविण्यात यावीत. किंवा काही वाहने बदलापूरमार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवलीत येणारी वाहने विको नाका भागात जाऊ न देता ती मानपाडा चौकात रोखून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात सोडण्यात यावीत यामुळे सोनारपाडा, गोळवली, विको नाका भागात डोंबिवलीतील वाहनांमुळे होणारी कोंडी कमी होईल. या रस्त्यावरून फक्त लहान वाहने कल्याणच्या दिशेने धाऊ लागली तर मेट्रो कामांच्या ठिकाणी होणारी कोंडी कमी होईल, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविणाच्या नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला केल्या आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करून या रस्त्यावरील कोंडी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डाॅ. इंदुराणी जाखड (आयुक्त)

लोकनेते जोमात पण सामान्य माणूस कोमात

जलजीवन योजनेचा फज्जा   राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड तालुक्यात जल जीवन मिशनची १८३ योजनांची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी दोन वर्षांपासून ‘जल जीवन मिशन’ ची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या वर्षी सुद्धा ४१ गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला होता. टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा नसल्याने पाणी टंचाई भासते. तालुक्यातील नागरिकांना रोज पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जलजीवन मिशन मध्ये घरात थेट नळाद्वारे पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अतिशय संथगतीने कामे सुरू आहेत. ३१ मार्च २०२४ रोजी या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. तरीही जलजीवन मिशनची एकही योजना पूर्ण झाली नसून कामे पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना अपूर्ण कामांचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली आहे. 00000

एपीएमसीतील नालेसफाईची पोलखोल, पहिल्याच पावसात बाजारात साचले पाणी

मुंबई : उपनगरांसह नवी मुंबई शहरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले होते. बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणीच पाणी झाले होते. त्याचबरोबर कांदा बटाटा बरोबर पाचही बाजारात जागोजागी पाणी साचले होते. कांदा बटाटा मोठया प्रमाणात पाणी भरल्याने पहिल्याच पावसात एपीएमसी मधील नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. एपीएमसी मधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारात व परिसरात पाणी साचले होते. एपीएमसी बाजारातील मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने हे पाणी साचले आहे. बाजारात नाल्याची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याने बाजार आवारात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. ठेकेदाराकडून दाखवण्यासाठी नालेसफाई केली जाते, चेंबर ते चेंबर सफाई होत नाही, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसी प्रशासनाकडून बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामासाठी १२ लाखांचा ठेका दिला जातो त्याच बरोबर चार महिने नाल्याची देखभालीचा समावेश आहे. मात्र ठेकेदारामार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत नसल्याने बाजारात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. 00000

ठाण्यात  मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

ठाणे : ठाण्यात  गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले होते. परंतु, जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या नागरिकांची तसेच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड, वंदना बस डेपो जवळ पाणी साचले होते. ०००००

‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’चा

ज्ञानेश्वर माऊली पालखी स्वागत सोहळा   मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने ६ जुलै २०२४ या दिवशी लोणंद (सातारा) येथे “माऊलीचे” दर्शन आणि वारकरी भक्तांना “लाडू वाटप” हा कार्यक्रम होणार आहे. तरी इच्छुकांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी आणि ठरलेल्या दिवशी सोबत येऊन या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई. ही संस्था गेले १५ वर्षे लोणंद येथे वारकऱ्यांना लाडू, पाणी, बिस्कीट आदींचे वाटप वारकऱ्यांना केले जाते. यावेळी दहा हजार लाडू वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी संपर्क शंकर पवार ९९८७१९९५६५, श्रीधर फडतरे ८००७७७९०९५, श्री.नलावडे मामा ९८६९३९७६६५. धारावी विभाग :- महेश अंकुश-कवडे ९८६७०८०२०८ (पत्रकार, ग्राहक संरक्षण कक्ष, धारावी विधानसभा उपसंघटक). ०००००

जागतिक सिकलसेल जागरूकता दिवसानिमित्त २०० रुग्णांची तपासणी

ठाणे- सिकलसेल या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना माहिती देण्यासाठी त्यांचे उपचार करून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळे आरोग्य विभागाने नेहमी सज्ज राहून काम करावे…

नवी मुंबईकरांना मिळणार मूलभूत सुविधा

खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी   नवी मुंबई,  नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तिन प्राधिकरणांमध्ये समन्वय राखला जावून मुलभूत नागरी सुविधा तातडीने नवी मुंबईकरांना मिळाव्यात, या उद्देशाने नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेत एका बैठकीचे आयोजन केले. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करत तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिले. शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. नवी मुंबई परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती देण्याचे निर्देश बैठकीच्या प्रारंभीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. नवी मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आयुक्तांना बैठकीत निवेदन सादर केले. खासदार नरेश म्हस्के यांनी याविषयी आयुक्तांशी चर्चा करत पुतळा उभारण्याबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या. नवी मुंबईमध्ये सिडकोने उभारलेल्या अति अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील सोसायटीतील रहिवाशांना नागरी सुविधा मिळतांना अडचणी येत असल्याची बाब रहिवाशांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भात चर्चा करून या सोसायट्यांमध्ये नागरि सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना दिले. नवी मुंबईतील रहिवासी परिसर आणि शाळा असलेल्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने कित्येक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन अशा ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना केली. नवी मुंबईतील बालवाडी शिक्षकांना नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबई मनपा परिवहन सेवा आणि कर्मचाऱयांच्या वेतनासंदर्भात देखिल आयुक्तांशी चर्चा करून शहरातील नागरिकांना चांगली व दर्जेदार परिवहन सेवा देण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नवी मुंबईत धोकादायक इमारतींना चांगला एफएसआय मिळतो. याचा फायदा घेऊन काही ठिकाणी दलालांच्या सांगण्यावरुन विनाकारण इमारती धोकादायक ठरवल्या जातात आणि नोटीसा दिल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरी महापालिकेने स्वत: सक्षम तांत्रिक सल्लागार नेमून अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे जेणेकरून सर्वसामान्य रहिवाश्यांना दिलासा मिळेल असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई मनपा क्षेत्रातील नागरि सुविधा देण्यासंदर्भात, मैदाने, बगिचा उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, गटई कामगारांना व्यवसाय परवाने ताबडतोब देणे, पारसिक झील शेवटच्या टोकापासून परिवहन सेवा सुरू करणे, वाशी- नवी मुंबई गणेशकृपा भाजीपाला मंडई व मच्छीमार्केट येथे सोयीसुविधा पुरविणे, निलगिरी गार्डन ते बेलापूर किल्लापर्यंत अंडरपास तयार करणे आणि त्या ठिकाणी ध्वनीनिरोधक यंत्रणा बसविणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, नवी मुंबईतील नवीन कंत्राटी ठेकेदार हे कामगार कामावर ठेवताना जुन्या कामगारांना डावलत असून त्यांना न्याय मिळवून द्यावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्रांमधील साहित्य नादुरुस्त झालेली आहेत, ती दुरुस्त करणे, पुनर्विकास योजनेसाठी एक खिडकी योजना राबविणे, स्थानिक भूमीपुत्रांच्या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती दोन महिन्यांत मिळवून देणे अशा विविध सामाजिक प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरप्रमुख विजय माने, उप जिल्हाप्रमुख रामशेठ वाघमारे, अजय सावंत, सरोज दळवी, रोहिदास पाटील, शिवराम पाटील, साईनाथ वाघमारे, संपर्कप्रमुख किशोर पाटकर, सरोज पाटील, नगरसेवक शिवराम पाटील, जगदिश गवते, सुरेश सपकाळ, रामसिंग यादव, प्रशांत पाटील, आंकाश मढवी, संजीव वाडे, युवा सेनेचे चेतन पाटील आदी उपस्थित होते. 00000

लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त…

संजय केळकर यांनी काढला कोकण पिंजून !

पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासाठी   ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन करुन केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात श्री. केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते. 0000

 दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त अशोक गायकवाड   रायगड : दुर्गराज किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळातील विविध कार्यक्रम संपन्न झाले. पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. सोहळात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते. सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. ढोल -ताशे , शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते. रायगडावर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषा, लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचं होते. या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य विभाग, एस टी महामंडळ, महावितरण विविध शासकीय विभाग यांचे सहाय्याने आरोग्य, पाणी, वाहतूक, पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती,दुर्गराज किल्ले रायगडावर सलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता. 00000