Category: होम

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ

ठाणे :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, 26 जूनला होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातीलर उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.  या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, 26 जून सकाळी 8.00 ते सायं 4.00 अशी निश्चित करण्यात आली होती.  परंतू आता भारत निवडणूक आयोगाने  दिनांक 03 जून,2024 रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे.  कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून,2024 रोजी  पदवीधर व शिक्षक मतदारांनी  मोठ्या संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा  असे आवाहन उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.

२९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : सर्वोच्च न्यायालयाद्वारे विधी सेवा प्राधिकरणने सहकार्य घेत २९ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याचा नागरिकांनी लाभ…

कल्याणमधून विधानसभा निवडणूक लढवणारच

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंचा निर्धार   कल्याण : 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. परंतू त्याच चुका आता पुन्हा होणार नाहीत. कल्याण पूर्वेतून विधानसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. पक्षाने पश्चिमेचे तिकीट दिल्यास त्याची देखील तयारी आहे. 2024 च्या विधानसभेची गणिते तयार असून या निवडणूकीत पक्षाने तिकिट दिले नाही तर अपक्ष उभे राहण्याची देखील तयारी असल्याचे मत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले. कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी डोंबिवलीत करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला. या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, दहा वर्षांत पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. महाराष्ट्रात महविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येणार… काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली, त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष असून 100 ते 140 विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे. मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महविकास आघाडीचेच सरकार येणार असा ठाम विश्वास पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.

संरक्षण आस्थापनांभोवतालच्या बांधकामांना स्थगिती देण्यास पालिकेचा नकार

१० मीटर नियमावली लागू असल्याचे स्पष्ट   मुंबई : संरक्षण विभागाच्या आस्थापनांपासून १०० ते ५०० मीटरपर्यंत सुरु असलेल्या सुमारे शंभरहून अधिक बांधकामांना स्थगिती देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे तूर्तास या पट्ट्यातील बांधकामांना अभय मिळाले असले तरी अद्याप संरक्षण आस्थापनेकडून पालिकेच्या या पत्राला काहीही उत्तर पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे या बांधकामांवरील स्थगितीची टांगती तलवार कायम आहे. मात्र यावेळी पालिकेने संरक्षण आस्थापनेने स्थगिती देण्यास सांगूनही ते आदेश पाळलेले नाहीत, असे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संरक्षण आस्थापनेअंतर्गत कांदिवली व मालाड येथील ऑर्डनन्स डेपो पासून १०० ते ५०० मीटरच्या परिघात परवानगीविना बांधकामे सुरु असून या बांधकामांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी, असे पत्र कांदिवली येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला पाठविले होते. असे पत्र मिळताच पालिका तसेच तत्सम नियोजन प्राधिकरणांकडून तात्काळ स्थगिती आदेश जारी केला जात होता. यावेळी मात्र पालिकेने स्थगिती आदेश जारी करण्याऐवजी संरक्षण आस्थापनेला पत्र पाठवून अशी स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. २१ ऑक्टोबर २०१६ च्या परिपत्रकानुसार, संरक्षण आस्थापनांपासून १० मीटरनंतरच्या बांधकामांना संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे ही स्पष्ट केले आहे. सेंट्रल ऑर्डनन्स डेपोने १५ मे रोजी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला पत्र पाठवून संरक्षण आस्थापनांपासून १०० ते ५०० मीटरपर्यंत असलेल्या बांधकामांना संरक्षण विभागाचे १८ मे २०११ चे परिपत्रक नियमावली लागू असल्याचे म्हटले होते. त्यानुसार या परिघात चार मजली बांधकाम करता येते, याकडे लक्ष वेधले होते. २०१६ च्या परिपत्रकाचा फेरविचार सुरु असल्याचेही त्यात म्हटले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवालाही देण्यात आला होता. मात्र पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने २०१६ चे परिपत्रक लागू असून राज्याच्या नगरविकास विभागानेही त्या अनुषंगाने आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत नगरविकास विभागाकडून स्पष्टीकरण घ्यावे, असेही सुचविले आहे. त्यानुसार या शंभरहून अधिक बांधकामांना परवानगी देण्यात आली असून या बांधकामांना स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. संरक्षण आस्थापनांचा घोळ काय? संरक्षण आस्थापनांभोवतालच्या बांधकामांबाबत १८ मे २०११ चे परिपत्रक लागू होते. त्यानुसार १०० ते ५०० मीटरपर्यंत चार मजली इमारतीला परवानगी होती. त्यामुळे अनेक बांधकामे रखडल्यामुळे २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये परिपत्रक जारी करुन ही मर्यादा १० ते १०० मीटरपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून ती मर्यादा ५० मीटर करण्यात आली. मात्र हे परिपत्रक स्थगित करण्यात आले आहे. या घोळामुळे तूर्तास कांदिवली-मालाड परिसरातील १०० हून अधिक बांधकामांवर टांगती तलवार कायम आहे. 00000

ठाणे खाडीत दोन जणांनी घेतली उडी

पुरुषाचा मृतदेह सापडला तर महिलेचा शोध सुरू   ठाणे : मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून ठाणे खाडीत दोन जणांनी उडी मारली आहे. यातील पुरुषाचा मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला आहे. तर महिलेचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बबलू विश्वकर्मा (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वागळे इस्टेट भागात राहत होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजता साकेत पुलावरून दोनजणांनी खाडीत उड्या मारल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खाडीत शोधकार्य सुरू होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पथकांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. त्यावेळी बबलू विश्वकर्मा याचा मृतदेह पथकांना आढळून आला. तर चार तासांच्या शोध कार्यानंतरही महिलेचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे शोधकार्य तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आले आहे. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ०००००

विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार..!

अनिल ठाणेकर   ठाणे : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट आता त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत  ताटकळत  उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार  एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.  या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. ००००

 १७ कोटी ६९ लाखांची मदत, गंभीर आजारातील २५८ रुग्णांना मिळाले जीवनदान –  रामेश्वर नाईक

 राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून ठाणे : निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि – न्याय विभाग अंतर्गत विशेष राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष सुरु केले असून या कक्षाच्या माध्यमातून कॅन्सर, लिव्हर – किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट सारख्या गंभीर आजार असणाऱ्या २५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवीन जीवनदान देण्यात आले आहेत. या शस्त्रक्रियांसाठी १७ कोटी ६९ लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. निर्बल आणि दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आले असून त्या बेडवर मोफत तसेच सवलतीच्या दरात चांगले उपचार मिळावे म्हणून राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ पासून हे कक्ष सुरु झाले असून राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे.  कॅन्सर, लिव्हर – किडनी  ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन सारख्या गंभीर आजाराच्या शस्त्रक्रियासाठी लाखोंचा निधी लागतो त्यामुळे हा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर असतो. म्हणून अशा रुग्णांना पुन्हा नवीन जीवन मिळावे यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून उपचार तसेच आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या कक्षाची स्थापना झाली असून मे महिन्यांपर्यंत २५८ गंभीर आजार असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय रुग्णालय तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून या २५८ रुग्णांना १७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात, त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान असल्याचे रामेश्वर नाईक यांनी अधोरेखित केले. चौकट : महीना                      धर्मादाय रुग्णालय मदत                 खासगी ट्रस्टकडून मदत जानेवारी :                २.१६ कोटी                                        ६८ लाख फेब्रुवारी  :                ३.१५ कोटी                                         १.१४ कोटी मार्च  :                      ३.१७ कोटी                                       १.३२ कोटी एप्रिल :                    १.६१ कोटी                                         ७० लाख मे       :                   १.६७ कोटी                                         २.९ कोटी एकूण :                    १७ कोटी ६९ लाख रूपये 00000

वर्षाऋतु मधील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती

माथेरान : वर्षाऋतुमध्ये मुंबई पासून अगदी जवळ असलेल्या माथेरान सारख्या सुंदर पर्यटनस्थळाची भ्रमंती  म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते.त्यामुळे पर्यटक आवर्जुन हजेरी लावत असतात.अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत केवळ वाहतुकीची खर्चिक बाब वगळता अगदीच स्वस्त दरात राहण्याची सोय लॉजिगच्या माध्यमातून त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये होत असते. वर्षाऋतु मध्ये इथल्या नैसर्गिकरित्या साकारणा-या अदभूत निसर्गाच्या चमत्काराची सप्टेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने अनुभुती पहावयास मिळते. बारा महिन्यांतील पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात इथे निसर्ग निर्मितीचा अलौकिक आंनद आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी आणि श्रावण तापीच्या कोवळ्या उन्हात पॉईंट्सची सैर करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. सप्टेंबर महिन्यात डोंगर रांगात सभोवताली आणि पॉईंट्स परिसरात सोनकीची पिवळी फुले आच्छादलेली असतात त्यामुळे भूमातेच्या गर्भातून सोन्याचा उदय झाला आहे की काय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. चोहोबाजूंनी गर्द झाडी आणि त्यातून पायी चालत जाण्याची मजा सुध्दा काही औरच असते. पावसाळी हवामानात गर्द धुक्यातून मार्गक्रमण करतांना अगदी समोरचं दृश्य देखील दृष्टीक्षेपात येत नाही.नैसर्गिक सौंदर्य धुक्यात हरवल्यामुळे ही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील विहंगमय  दृश्ये न्याहाळण्यासाठी पर्यटक विविध पॉईंट्स वर गर्दी करतात.पॉईंट वरील हे दाट धुक्याचे नैसर्गिक आवरण मनाला मोहीत करते.धुके विरळ झाल्यावर क्वचितच इंद्रधनूची कमान धुक्या आड दिसल्यावर मन प्रसन्न होते.शारलोट लेक वरील ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आतुर झालेले असतात. महत्त्वाचे जवळपास पंधरा पॉईंट्स असून इको पॉईंट, लुईझा पॉईंट, वन ट्री हिल, लिटिल चौक पॉईंट, सनसेट, रामबाग, हनिमून पॉईंट, मलंग पॉईंट असे काही महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्यावर खरोखरच मनाला आलेली ग्लानी दूर होते निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो याचे भान रहात नाही. पावसात भिजल्यावर कुठल्या स्टॉल वर गरमागरम भजी चहाचा आस्वाद घेत तर कुठं निखार्यावर भाजलेला गरमागरम मका खाण्याचा मोह सुध्दा आवरता येत नाही. कुणी घोड्यावर तर आबालवृद्ध हातरीक्षाच्या साहाय्याने पॉईंट्स वरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी जात आहेत. एकंदरीत पूर्वीचे आणि आताचे वर्तमानातील माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवतो.तीन दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले संपूर्ण व्यवहार बंद असायचे.हॉटेल्सआणि जुन्या बंगल्याना गवताच्या झडी लावून चार महिने या सर्व वास्तू बंदिस्त असायच्या परंतु इथे वर्षाऋतुमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढू लागल्याने आता हे सुंदर स्थळ बाराही महिने पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असते. पावसाळ्यात चार महिने माथेरानची मिनिट्रेन बंद असते त्यासाठी (दस्तुरी ) अमन लॉज स्टेशन पासून गावात येण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे इथे शनिवार आणि रविवार त्याचप्रमाणे अन्य सुट्टयांच्या हंगामात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. राहण्यासाठी लॉजिंग तसेच हॉटेल्स मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याने आगाऊ बुकिंग करण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. अत्यंत स्वस्त दरात या सोयी इथे उपलब्ध आहेत. नेरळ स्टेशन वरून इथे येण्यासाठी चोवीस तास टॅक्सी सेवा उपलब्ध असते माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर उतरल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून माथेरान स्टेशन पर्यंत येण्यासाठी माफक दरात शटल सेवा सुरळीत सुरू आहे.हौशी पर्यटक घोड्यावरून येतात तर नव्याने दाखल झालेल्या पर्यावरण पूरक ई रिक्षा सुध्दा रात्री दहा वाजेपर्यंत सेवेसाठी उपलब्ध असल्याने सर्वाना उत्तम प्रकारे सेवा आणि व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग ‘बकरी ईद’साठी सज्ज

ठाणे : बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यात यावा यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ठाणे जिल्ह्यात मुब्रा, भिवंडी, ठाणे, खोणी या ठिकाणी बकरी ईद निमित्ताने कुर्बानी देण्यात येते. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद मार्फत तात्पुरत्या कत्तलखान्याला परवानगी देण्यात आली आहे. प्रादेशिक सह आयुक्त मुबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्याप्रमाणे जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे.‌ पशुसंवर्धन विभागामार्फत बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कुर्बानीसाठी आलेल्या म्हैस वर्गाचे कत्तली पूर्व तपासणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी तसेच सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईद १७ जून ते १९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत असून या सणानिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या म्हैस वर्गीय पशुधनाची खरेदी करतात. या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर ईयर टॅगिंग करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची नियुक्ती तीन दिवसांसाठी करण्यात आली आहे. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठाणे डॉ. समीर तोडणकर, सहाय्यक आयुक्त बदलापूर डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक आयुक्त जि.प.स.चि.शेलार डॉ. अजित हिरवे, सहाय्यक आयुक्त ता.ल.प.स.चि कल्याण डॉ. दीपक कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 434 शाळा…