Category: होम

मुंबईच्या तलावांच्या क्षेत्रात पावसाची एन्ट्री

मुंबईकरांना दिलासा !   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची एन्ट्री झाली आहे. सरासरीने अधूनमधून पाऊस पडू लागला आहे. पावसाने तलावक्षेत्रात हजेरी लावल्याने मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसात सर्वात जास्त १३५ मिमी पाऊस तुळशी तलावात, त्यापाठोपाठ विहार तलावात १३४ मिमी, भातसा तलावात ८८ मिमी, मध्य वैतरणा तलावात ७३ मिमी, मोडक सागर – ६५ मिमी, तानसा – ६४ मिमी आणि अप्पर वैतरणा तलावात सर्वात कमी म्हणजे ४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सातही तलावात गेल्या ९ जूनपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.मुंबईत यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई शहरात दरवर्षी किमान २,२०० ते २,७०० मिमी इतका पाऊस पडतो. मात्र मुंबई महापालिकेकडे या पावसाचे पाणी साठवून ठेवण्याबाबत वेगळे असे नियोजन नाही. तसेच, सन २००६ पासून राज्यात मोठ्या जागेतील इमारतीच्या ठिकाणी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग ‘ योजना राबविण्याबाबत कायदा करण्यात आलेला असताना त्याची अंमलबजावणी करण्यात पालिकेला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच पावसाचे हे पाणी मुंबईतील तुळशी आणि विहार या दोन तलावात त्यांच्या क्षमते एवढेच जमा होते. तर पवई तलावात पावसाचे पाणी काही प्रमाणात साठवले जात असले तरी या तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे त्या पाण्याचा वापर आरे कॉलनी व जवळच्या काही कंपन्यामध्ये पिण्याच्या व्यतिरिक्त पाण्याची गरज भागविण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे मुंबईत पावसाळ्याच्या चार महिन्याच्या मोसमात पडणारे जवळजवळ २२,०० ते २,७०० मिमी इतक्या पावसाचे पाणी विनावापर समुद्रात वाया जात असते. मुंबईची दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतकी आणि ठाणे, भिवंडी महापालिकेची दररोज १५० दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तहान ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा हे प्रमुख ५ तलाव भागवत असतात. त्यामुळे हे ५ प्रमुख तलाव आणि मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव असे एकूण सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरलेले (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) असणे आवश्यक असते. दरम्यान सध्या सात तलावात बुधवारी सकाळी ६ पर्यंत फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर (५.५४ टक्के) इतका म्हणजे पुढील २० दिवस १ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. सध्या सात तलावात फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर ००००

प्रशासनाच्या निष्क्रियतेची पर्यटकांना शिक्षा

माथेरान : कामाच्या अन दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दोन दिवस मनाला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून बहुतांश पर्यटक हे माथेरानला पसंती देतात. परंतु येथील सर्वच संबंधीत  प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेबाबाबत सुयोग्यपद्धतीने नियोजन नसल्याने दरवेळेस येथील घाटरस्त्यात आणि दस्तुरीच्या वाहनतळावर वाहनांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.त्यामुळे खाजगी वाहने पार्किंग अभावी घाटातून माघारी जात आहेत तर अनेकदा त्यांना आपल्या किमंती गाडया घाटातील रस्त्यावर पार्क करून दस्तुरी पर्यंत आपल्या लहान मुलांना आणि सामानाच्या बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत इथल्या निष्क्रिय प्रशासनाच्या चुकांची शिक्षा पर्यटकांना सोसावी लागत आहे. दस्तुरी पार्किंग ह्या वनखात्याच्या जागेत मोठया प्रमाणावर अतिक्रमणे झालेली असल्याने त्याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर पॅनोरमा पॉईंट्सच्या रस्त्यावर जवळपास पन्नास गाडया पार्क होऊ शकतात परंतु तेथे पोलीस प्रशासन हरकत घेत आहे असे बोलले जात आहे. दस्तुरी येथील एमपी हा प्लॉट अद्यापही नगरपरिषदेच्या ताब्यात आलेला नाही अन्यथा जवळपास दोनशे गाडयाची पार्किंगची सोय सहजपणे होऊ शकते त्याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यास प्रशासन का कमकुवत ठरत आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाटरस्ता फुल होऊन जातं आहे. येथील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील याबाबत सर्व कल्पना आहे परंतु शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यास कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माथेरान मधील काही महत्वाकांक्षी राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकवेळ या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सकारात्मक विचार केला तरच इथे पर्यटन क्रांती घडू शकते परंतु श्रेयवादाच्या लढाईत स्थानिकांना भरडले जात आहे.

हज कमिटीच्या गैर व्यवस्थापनामुळे सौदीत हज यात्रेकरूंचे हाल…

राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांचे, सीईओ लियाकत अफाकी यांच्यावर आरोप   ठाणे : भारतातुन सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे तेथे हाल सुरु आहेत. यात्रेकरूंना भोजन, प्रवासाची आणि निवासाचीही व्यवस्था नसुन याला हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच जबाबदार आहेत. असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी केला आहे. प्रत्येक यात्रेकरूकडुन साडेतीन लाख रुपये घेऊनसुद्धा काहीही सुविधा दिलेल्या नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही बबलु शेख यांनी म्हटले आहे. शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बबलु शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हालअपेष्टांचे व्हीडीओ माध्यमांसमोर दाखवले. बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख भाविक जात असतात. १५ ते १६ जून आणि नंतर दोन दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह इतर राज्यांतील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील २१ हजार भाविक यात्रेस गेले आहेत. मात्र, सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठलीच सुविधा नाही. वाहनाची, भोजनाची आणि निवासाचीही व्यवस्था नसल्याने हज यात्रेकरूचे हाल सुरु आहेत. २१ हजार लोकांसाठी केवळ ९० जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवले आहे. हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाच्या सौदी अरेबिया येथुन पाठवलेल्या चित्रफिती दाखवुन राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यात्रेकरूंनी तसेच हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतर फोनही उचलत नाहीत. लियाकत अफाकी यांनी सर्व कारभार आपल्याच हाती ठेवला असुन लाखो रुपये उकळुनही सुविधा न दिल्याने हा एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप बबलु शेख यांनी केला आहे. तेव्हा,केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी बबलु शेख यांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १ कोटी रूपयांचा गांजा जप्त

अशोक गायकवाड रायगड : आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजे, नवी मुंबई येथे पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकून कारवाई केली.आरोपींच्या ताब्यातून एकुण १ कोटी १३ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४०, तळोजे, नवी मुंबई येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठासाठा वाहतुक होणार आहे अशी कार्यालयास माहिती मिळाली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या भरारी पथक क्रमांक २, पनवेल यांनी मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकला. यावेळी एक महिन्द्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० गाडीमध्ये दोन आरोपी आरिफ जाकीर शेख वय २५ वर्षे रा. रूम नं. १२, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई व परवेझ बाबुअली शेख वय २९ वर्षे रा. रूम नं. १३, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८ कोकनी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये ४१४ किलो अं. १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. या गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून ही कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, . निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.

झोमॅटोची डिलिव्हरी आता दिव्यांग ही करु शकतील

स्नेहज्योतने मिळवून दिल्या निओमोशनच्या आधुनिक दुचाकी !   मुंबई : हल्ली घरोघरी झोमॅटो मार्फत डिलिव्हरी व्यवसाय जोरात सुरु असून आता या व्यवसायात दिव्यांग व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहेत. बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगर मध्ये कार्यालय असलेल्या  स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग पुनर्वसन कार्यासाठी समर्पित आहे. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या हिंमतीवर अर्थार्जन करून सक्षमपणे आपले आयुष्य व्यतीत करण्यासाठी दिव्यांगांना विविध कौशल्यामध्ये पारंगत करण्यापासून ते त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टींमध्ये भरभक्कम पाठिंबा उभ्या करण्यापर्यंत सर्व आवश्यक गोष्टी स्नेहज्योत तर्फे करण्यात येतात. चेन्नई स्थित निओमोशन या कंपनीने दिव्यांग व्यक्तींसाठी स्पेशली डिझाईन केलेल्या इलेक्ट्रिकल व्हेईकल वरून झोमॅटो फूड डिलिव्हरी चा व्यवसाय दिव्यांग व्यक्तींनाही करता येऊ शकतो का, याचा प्रयोग वर्षभरापूर्वी स्नेहज्योत संस्थेने केला. ज्यामध्ये निओमोशन चे सीईओ सिद्धार्थ डागा व प्रतिनिधी निरंजन जाधव यांनी मोलाचा वाटा उचलला. या पहिल्या टप्प्यामध्ये हरिशंकर शर्मा, निजामुद्दीन आणि प्रवीण शिंदे या दिव्यांग सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व अडचणींवर मात करीत आपले मासिक उत्पन्न झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून जवळजवळ 25 हजार रुपये पर्यंत नेले. त्यांच्या या स्वयंपूर्ण होण्याच्या प्रवासातून प्रेरणा घेत स्नेहज्योतने मागील आठवड्यात तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना या झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरवले आहे. यामध्ये एक दिव्यांगना शुभांगी मोधले सुद्धा आहे. जवळजवळ  1,20,000 रुपये किंमत असलेल्या या गाडीसाठी एच टी पारीख फाउंडेशनने 1,10,000 रुपयांची मदत केली व उर्वरित दहा हजाराची मदत संस्थेचे शुभचिंतक, विदुला वैद्य, सुरेश मनोहर आणि सुजय अरगडे यांनी केली. हा संपूर्ण कार्यक्रम बोरिवली पूर्व येथील चोगले हायस्कूलमध्ये संपन्न झाला.  ज्यामध्ये चोगले हायस्कूलचे कार्यवाह श्री संजय डहाळे व त्यांचे पुतणे श्री. सुमेध सुनील डहाळे यांनी अनमोल सहकार्य केले. स्नेहज्योत संस्थेच्या पुढाकाराने तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना अर्थार्जन करून स्वयंपूर्ण होण्यासाठी एक नवीन क्षेत्र खुले झाले असल्याचे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या सचिव सुधाताई अनिलकुमार वाघ यांनी सांगितले. मुंबई व्यतिरिक्त राज्यात दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या व्यवसायात यापूर्वीच उतरल्याचेही सुधाताई वाघ यांनी आवर्जून नमूद केले.

मालमत्ता कराच्या सवलतीत ठाणे महापालिकेने जाहीर केली अंतिम मुदतवाढ

दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात १० टक्के सवलत   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते ३० जून २०२४ पर्यंत पहिल्या सहामाहीच्या करासोबत दुसऱ्या सहामाहीच्या कराची  रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य कराच्या रक्कमेत थेट १०% सवलत देण्यात येणार आहे. सामान्य करातील सवलत योजेनस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच, मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे. ज्या करदात्यांनी ०१ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पहिल्या सहामाहीच्या कराच्या रक्कमेसह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केला आहे त्यांना दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेतील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलतीला करदात्याचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर, सामान्य करातील १० टक्के सवलत ३० जून २०२४ पर्वत अंतिमतः वाढविण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

छताचे प्लास्टर कोसळून तीनजण जखमी

ठाणे : कोपरी येथील मीठबंदर भागात सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप मोहीते (४६), यश मोहीते (१६) आणि निधी मोहीते (१२) अशी जखमींची नावे आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. मीठबंदर येथे सुमारे ३५ वर्ष जुनी श्रमदान ही चार मजली शासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण २० सदनिका असून १० ते १२ सदनिकांमध्ये खांबांना तडे गेले आहे. तसेच प्लास्टरही निखळले आहे. त्यामुळे ही इमारत राहण्यासाठी धोकादायक झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इमारतीतील एका सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळले. या घटनेत प्रदीप, यश आणि निधी हे तिघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदे द्या, अन्यथा विधानसभेच्या 30 जागा लढवणार – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे :  पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच, विधानसभा निवडणुकीत  आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत तर आम्ही ३० जागा लढू, असे पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पीआरपीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते. त्यावेळेस ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपील लिंगायत, एन. डी. सोनकांबळे, अनिल तुरूकमारे, विजय वाघमारे,  आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर,  रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी,  शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित  होते. प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. या सरकारने शोषित,  पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात, याचे  भान ठेवून कुणीही दुखावणार नाही, याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे म्हणत, आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे; आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात; अन्यथा, आम्ही ३० जागांवर निवडणूक लढवू, असे सांगितले. दरम्यान, संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती. त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. 000000

ग्रीन स्कूल, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, जुनी पेन्शन योजना लागू करणार – निरंजन डावखरे

कल्याणमधील शाळा-कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा अनिल ठाणेकर   ठाणे : कोकणातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करणार, स्पर्धा परिक्षेसाठी उत्तम व नेमके मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रयत्‍न करणार, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, असे वचन कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना दिले. व्हिजन डाॅक्युमेंट अंतर्गत मिशन एज्युकेशनुसार नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ग्रीन स्कूल, डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब सुरु करणार, जिल्हानिहाय स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय, संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार, राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. तसेच मतदान करताना बॅलेटपेपरवर होणाऱ्या मतदानात, ‘डावखरे निरंजन वसंत’ या नावासमोरील व छायाचित्रासमोरील रिकाम्या चौकटीत, चौकटीला स्पर्श न करता एक उभी रेष (౹) मारुन बॅलेटपेपरला उभी घडी मारावी, असे आवाहन आ. निरंजन डावखरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाला केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी कल्याण शहरातील, श्री वाणी विद्यालय-कल्याण पश्चिम, गुरुनानक स्कूल-कल्याण पश्चिम, नूतन हायस्कूल-कल्याण पश्चिम, ओक हायस्कूल- कल्याण पश्चिम अचीवर्स कॉलेज-कल्याण पश्चिम, नूतन ज्ञान मंदिर-कल्याण पूर्व, आयडियल स्कूल अँड कॉलेज-कल्याण पूर्व आदी शाळा-काॅलेजमधून प्रचार दौरा केला. या दोऱ्याच्या निमित्ताने झालेल्या सभांमध्ये मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने आपला पाठींबा निरंजन डावखरे यांना व्यक्त केला. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, कल्याण पुर्व भाजपा शहराध्यक्ष संजय मोरे,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन.एम.भामरे, शिक्षक आघाडी कल्याण डोंबिवली महानगर संयोजक सुभाष सरोदे, सहसंयोजक अनिरुद्ध चव्हाण, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष प्रशांत भामरे, देसले, अर्जुन उगलमुगले, चंद्रकांत ठाकूर, भास्कर नारखडे, बाळकृष्ण जगे, दीपक राजपूत, सुधाकर ठोके, प्रमोद चौधरी, गोकुळ गवळे, सचिन निकम, तेजनारायान सिंह, वीरेंद्र तिवारी, नितीन मुंडे आदी भाजप शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.