Category: होम

शाळांमधून मतदानाविषयी जनजागृतीपर उपक्रमांचे उत्साही आयोजन

ठाणे : 25 ठाणे सार्वत्रिक लोकसभा २०२४ ची निवडणूक 20 मे रोजी होत असून या निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासोबतच मुलांमार्फत पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये – आईबाबांस मतदान करण्याविषयीचे पत्रलेखन, मतदानाचा संदेश प्रसारित करणारी चित्रकला आणि रांगोळी रेखाटन, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंधलेखन, गायन, प्रभातफेरी, पथनाटय असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय शाळांमध्ये पालकसभा आयोजित करून त्याठिकाणीही पालकांना मतदानाचे महत्व विशद करीत लोकसभा निवडणूकीत मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा आणि त्यालगतच्या परिसरातील नागरिकांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळाशाळांतील विद्यार्थ्यांनी केला. हे नानाविध उपक्रम महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी श्रीम अरूणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील 174 शाळा आणि 39 कनिष्ठ महाविद्यालये याठिकाणी बेलापूर, शिरवणे, तुर्भे आणि वाशी या केंद्रांचे केंद्र समन्वयक श्रीम.रेखा पाटील, श्री.सागरनाथ भंडारी, श्रीम. जयमाला पाटील आणि श्री.प्रशांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

सह्याद्रीच्या अंतरंगाची वेगळी ओळख करून देणा-या सदाशिव टेटविलकर लिखित ‘सह्याद्री परिक्रमा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

ठाणे : सह्याद्रीचे अभेद्य कवच असल्यामुळेच इथल्या पर्यावरणाची जपणूक झाली व निसर्गसंपन्नता वाढली. सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारण्यात बहुमोल योगदान दिले. अशा सह्याद्रीचे विलक्षण आकर्षण माझ्यासह प्रत्येकाला वाटते. त्यामुळे इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या 4 मित्रांसह 40 वर्षांपूर्वी केलेली सह्याद्री पदभ्रमणाची पुस्तकरूपात प्रकाशित होत असलेली मोहीम सह्याद्रीच्या अंतरंगाची अधिक माहिती करून देणारी व त्याच्याविषयीची ओढ अधिकच वाढविणारी असल्याचे मत उद्योजक रविंद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित व श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित ‘सह्याद्री परिक्रमा’ या पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रविंद्र प्रभुदेसाई बोलत होते. याप्रसंगी शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक प्रदीप केळकर, ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ, आनंद विश्व गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते. लेखणीतील सातत्य हे टेटविलकरांचे वैशिष्ट्य असून त्यांची 13 पुस्तके इतिहासाच्या अनेक दुर्लक्षित घटकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात असे सांगत रविंद्र प्रभुदेसाई यांनी विविध उत्पादनांतून पितांबरी उद्योगसमुह कार्यरत  असताना त्यात सेवाभावी दृष्टीकोन जपण्यामुळे समाजाचे ऋणमुक्त होण्याचे समाधान लाभते असे मत मांडले. विक्रमवीर गिर्यारोहक प्रदीप केळकर यांनी सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य कर्तृत्व गाजविणारे सदाशिव टेटविलकरांचे व्यक्तिमत्व आम्हां दुर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत सह्याद्रीची परिक्रमा हे त्यांचे पुस्तक भटक्यांचा मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले. सह्याद्रीने आम्हाला माणुसकी शिकवली असे सांगून त्यांनी आपण निसर्ग वाचवायला शिकले पाहीजे हे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ यांनी साध्यासोप्या शैलीत इतिहास मांडणा-या टेटविलकरांच्या लेखनशैलीचे कौतुक करीत स्थानिक इतिहास जपण्यासाठी डॉ. दाऊद दळवी, सदाशिव टेटविलकर अशा व्यक्तींनी केलेल्या ठोस स्वरूपाच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. ठाण्यात वस्तुसंग्रहालय उभे राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने आपण प्रयत्नरत असल्याचे सांगत नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी असून त्यांनी मुलांना मॉलऐवजी म्युझियमची सफर घडवावी असा पर्याय त्यांनी सांगितला. आनंद विश्व गुरूकुलचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी 50 वर्षांपासूनच्या टेटविलकरांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणींचा पट खुला करीत साधेपणा आणि सहनशीलता हा त्यांचा महत्वाचा गुण असल्याचे सांगितले. लेखक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात 1983 मध्ये 4 मित्रांसह केलेल्या सह्याद्री परिक्रमेच्या आठवणी सांगताना दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रोत्साहक वरदहस्त याचा विशेष उल्लेख केला. 40 वर्षांपूर्वी प्रवासाची वा संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी परिक्रमा करताना द-या, खो-या, जंगल, डोंगरवाटा पार करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याच्या चित्तथरारक आठवणी त्यांनी सांगितल्या. सह्याद्रीच्या द-याखो-यातील माणसांनी ‘अतिथी देवो भव’ म्हणत केलेल्या सहकार्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सीमा टेटविलकर – कोंडे यांनी भावना व्यक्त करताना आपल्या वडिलांनी केलेल्या साधेपणाच्या संस्कारांचा आवर्जून उल्लेख करीत त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपसुक तयार झाला आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जडणघडण होत गेली असे सांगितले. लहानपणापासून वडिलांनी फिरायला नेले ते किल्ल्यांवरच हे सांगताना त्यांनी सह्याद्री भ्रमणासाठी मित्रांसह बाहेर पडलेल्या वडिलांनी तिथून पाठवलेल्या खुशालीचे पत्र आल्यानंतर आईला झालेल्या आनंदाचे वर्णन केले. महेंद्र कोंडे यांनी ओघवते सूत्रसंचालन केलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी लेखक सदाशिव टेटविलकरांसोबत सह्याद्री परिक्रमेत सहभागी झालेले त्यांचे मित्र सुभाष मांडले तसेच पुस्तक निर्मितीत सहकार्य करणारे पद्माकर शिरवाडकर व सरिता जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कोकण इतिहास परिषदेच्या सचिव विद्या प्रभू व पदाधिकारी भारती जोशी तसेच रसिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मुंबई उत्तर मतदासंघाकरीता

दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे…

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता

राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे.…

‘आरटीई’त मिळणारे मोफत शिक्षण खासगी इंग्रजी शाळांमधून बंद

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी वेधले लक्ष ठाणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधून गरीब मुलांना मिळणारे मोफत शिक्षण यंदाच्या वर्षापासून बंद झाले आहे. या निर्णयामुळे गरीब मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमधून मिळणाऱ्या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नाची दखल घेऊन भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तसेच खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. या वेळी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २००९ पासून मुलांना मोफत शिक्षण दिले जात होते. मात्र, या वर्षी बदललेल्या नियमानुसार `आरटीई’मध्ये महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. तर खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्यात आल्या आहेत. त्याचा फटका इंग्रजी शिक्षणासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या प्रश्नावर पालकांच्या भावना तीव्र असून, राज्य सरकारने पूर्वीच्या नियमांप्रमाणेच `आरटीई’मधून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण द्यावे, अशी मागणी अनेक पालकांनी माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निर्णयामुळे राज्यभरात शेकडो गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना इंग्रजी शिक्षण मिळण्यास अडचणी येणार आहेत. काही जणांना नाईलाजाने इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, याकडे श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नावर निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा-राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड नवी मुंबई : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत. या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी रविवार येथे केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी  बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दोन शतकांमध्ये लसीकरण, बधिरीकरण, मेडिकल इमेजिंग, प्रतिजैविके, अवयव प्रत्यारोपण, स्टेम सेल थेरपी इत्यादी महत्वपूर्ण स्थित्यंतरे झाली आहेत . कृत्रिम प्रज्ञा हे क्रांतिकारी तंत्रज्ञान देखील वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारे असेल असे सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावे, असे राज्यपालांनी सांगितले. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने व्हावा तसेच रुग्णाच्या आजाराबाबत योग्य ती गोपनीयता जपली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ बी के गोयल व डॉ एल एच हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ केवल तलवार, डॉ पी व्ही देसाई, डॉ बी एस सिंघल, डॉ सरोज गोपाल, डॉ अशोक गुप्ता डॉ देवेन तनेजा, डॉ नादीर भरुचा, डॉ सुनील पंड्या, डॉ सतीश खाडिलकर डॉ अरुण जामकर डॉ अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले. चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ शिव कुमार सरीन, नियोजित अध्यक्ष डॉ दिगंबर बेहरा, चर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ सतीश खाडिलकर, सहाध्यक्ष डॉ अशोक गुप्ता, बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ राजकुमार पाटील, हृदयविकार विभाग प्रमुख डॉ अनिल शर्मा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.

रेल्वे स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या….

मुंबई : उन्हाळ्याचे महिने सुरू झाले आहेत. घामाच्या घटने शरीर ओलेचिंब होत आहे असा उन्हाचा पारा चढला आहे. सूर्य आग ओकत असताना रेल्वे प्रवासी  स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या असल्याने खिष्याला चाट देत बिसलेरी पाणी बाटली घेऊन पित आहे. काही रेलवेस्तोल वर थंड पाणी बाटली मिळत नाही तर काही ठिकाणी बोगस कंपनी ची बाटली मिळत आहे. सरकारने एक रुपयात बिसलेरी पाणी बॉटल भरून देण्याचे स्वयंचलित मशीन स्टॉल सुरू केले होते. कंत्राट दराचे खिसे भरल्यानंतर हे पाणी गायब झाले व कालांतराने स्टॉल ही गायब झाले. त्या ठिकाणी नवीन कंत्राटदार नेमणूक करून टेंडर घोटाळा झाल्यानंतर तेही बंद झाले. पूर्वी गुजराती जैन समाज देणगी म्हणून रेल्वे स्टेशन वर संगमरवरी लाद्या बसवत साखळी लावलेले ग्लास बांधून पाण्याची सोय मोफत करत होते. चाकरमानी घामाच्या घरा तोंड धुवत ओंजळीने पाणी पिऊन तृप्त ढेकर देत असत. आता खिशात हात घातल्याशिवाय बिसलेरी ची तहान भागत नाही व ढेकर ही येत नाही. सरकार कोणाचेही असो सामान्य जनता आजही त्रस्त आहे. अच्छा दिन चे कमळ किंव्हा गरिबो के साथ वाला हात कोणीही गरिबांना मोफत पाणी पाजणार नाही असे प्रवासी बोलत आहेत.

‘प्रिय मतदार’ म्हणून मतदारांची  झोपमोड….

मतांचा जोगव्यासाठी उमेदवार कोणत्याही थराला… रमेश औताडे मुंबई : पूर्वी भिंतीवर चुना घेऊन कार्यकर्ते भिंती रंगवायचे. ” ताई माई आक्का … चिन्हावर मारा शिक्का ”  ,  ” बोटावर शाई लावली का आज्जी ” , ” घरातला हक्काचा माणूस ” अशी वाक्य लिहिलेल्या भिंती असायच्या.आता उमेदवारांनी मतदारांची झोप उडवली आहे. आता व्हॉटसअप , इंस्ट्रा, फेसबुक , चिमणी एक्स , आणि सर्वात म्हणजे मोबाईल फोन वरून रात्री अपरात्री झोपमोड करणारे फोन त्रास देऊ लागले आहेत. कोणी दवाखान्यात असतो, कोणी स्मशान भूमीत असतो तर कोणी तणावात असतो. धावपळीच्या जमान्यात नोकरी करत असताना साहेबांचा फोन आला की काय असे म्हणून सेव्ह नसलेला फोन उचलला तर .. प्रिय मतदार म्हणत डोक्याची ऐसी तैसी करणारे फोन त्रास देऊ लागले आहेत. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी सोशल मध्यम सुधारण्यासाठी कडक नियमावली केली आहे. मोदी सरकारबद्दल काही आक्षेप घेणारे लिखाण कुणी प्रसिद्ध केले तर त्यांचे काही खरे नाही. काही टिव्ही वाहिन्या व वृत्तपत्र या कारवाईचे शिकार झाले आहेत. मग आम्हा मतदारांच्या झोपेचे काय ? असा सवाल मतदार करत आहेत. मतदार राजा नाही तर मतदार त्रासलेले राजा झाला असून यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. मोबाईल कंपन्या व दूरसंचार विभाग यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

सरकारी बाबूंचा मनमानी कारभार …..

मुख्यमंत्री कार्यालयाने दिले कारवाईचे आदेश…. इर्शाळवाडी भूस्खलनसारख्या दुर्घटनेची भीती…. रमेश औताडे मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून तक्रार करूनही टेकडीवरील अतिक्रमणांकडे सिडको अधिका-यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेकडो मानवी जीव व वन्य जीव यांची मृत्यूची वेळ आली आहे. इर्शाळवाडी भूस्खलन सारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा हे सिडको सरकारी बाबू घेत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सिडको अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाविरोधात स्थानिक रहिवासी,विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींनी जेव्हा मूक मानवी साखळी तयार केली तेव्हा सरकारने दखल घ्यावी यासारखे दुर्दैवी बाब कुठेच नसेल अशी चिंता पर्यावरण, डोंगर, वन्यजीव वाचवा या आंतरराष्ट्रीय दखल प्राप्त सामाजिक संस्थेचे ” नॅटकनेक्ट फाऊंडेशन ” चे संचालक बी एन कुमार यांनी चिंता व्यक्त केली. ‘सेव्ह बेलापूर हिल्स’ आणि ‘स्टॉप मर्डर ऑफ ट्रीज’ अशा घोषणा देणारे बॅनर घेऊन रहिवासी, विद्यार्थ्यांनी, जेष्ठ नागरिकांना भर उन्हात मानवी साखळी केली व सरकारी बाबूंच्या मनमानी विरोधात मुक निदर्शने केली. यावेळी नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षां पूर्वी पत्रव्यवहार करून  इशारा देऊनही  कोणतीही कारवाई झालेली नसल्याने  नॅटकनेक्टने माहिती अधिकार अस्त्राचा वापर केला असता,   मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला या समस्येची चौकशी करण्यास सांगितले आहे.  कुमार म्हणाले की इमारतींमुळे टेकडी कमकुवत होऊ शकते आणि आगामी पावसाळ्यात भूस्खलन होऊ शकते, परंतु सिडकोने अद्याप निर्णायकपणे कार्यवाही केलेली नाही. नॅटकनेक्टने आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून टेकडी वाचवण्यासाठी कोणती पावले उचलली याची माहिती मागितली असता नऊ वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालय जागे झाले आहे. कुमार यांनी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यालाही याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितला आहे. यापूर्वी एक समिती या गंभीर समस्येकडे लक्ष देत असल्याचे थातुर मातुर माहिती दिली मात्र अद्यापही कारवाई सुरू केली नाही. सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याची खंत स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सर्व टेकडी  वनजमीन सिडकोच्या ताब्यात आहे. गोरगरीब जनतेला एक न्याय व श्रीमंत नागरिकांना वेगळा न्याय हे योग्य नाही असे स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी सांगितले. हिमांशू काटकर म्हणाले, “बेकायदेशीर बांधकामांना पाणी आणि वीज जोडणी मिळते हे धक्कादायक आहे. हिल व्ह्यू रो-हाऊस सोसायटीतील दशरथ भुजबळ म्हणाले की, टेकडीच्या चौफेर अतिक्रमणांमुळे वन्य जीवांचे प्रचंड नुकसान होत आहे आणि  दरडी कोसळण्याची भीती तर आहेच. अनेक गृहिणी आणि मुले या सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारविरोधात  मूक आवाज देण्यासाठी वेळ काढत आहेत हे कौतुकास्पद आहे. हे संकट २०१५ चे आहे तेव्हा सिडकोचे तत्कालीन एमडी संजय भाटिया यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. जेव्हा मंदिराचे बांधकाम नुकतेच सुरू झाले होते. मात्र अद्याप काही कारवाई झाली नाही असे कुलकर्णी म्हणाले. आता आपण टेकडीवर किमान 20 मंदिरे पाहू शकतो. या प्रकरणी उच्च अधिकारी सतत दुर्लक्ष्य करत आहेत.  इर्शाळवाडी भूस्खलनासारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा हे अधिकारी घेत नाहीत अशी खंत खारघर टेकडी आणि वेटलँड समूहाच्या ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

‘स्वच्छ सर्वेक्षणमधील उद्दिष्टपूर्ती साधणे हे सगळ्यांचे कर्तव्य’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करण्याचे निर्देश ठाणे : स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत साध्य करायची सगळी उद्दिष्ट ही महापालिका म्हणून आपली प्राथमिक कर्तव्य आहेत. त्यामुळे ती साध्य करण्यासाठी संपूर्ण महापालिकेने एक टीम बनून योग्य रणनीती आखून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. त्याची माहिती देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्यांचे क्षमता वृध्दी सत्र महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये, ठाणे महापालिकेने २०२३मध्ये केलेली कामगिरी, त्यातील त्रुटी, सुधारणा यांची माहिती देण्यात आली. तसेच, २०२४साठी अपेक्षित असलेली उद्दिष्ट, त्यासाठी तयारी, जनजागृती आणि लोक सहभाग याबद्दल सविस्तर सादरीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले. प्रास्ताविक उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला केंद्र सरकारने शास्त्रोक्त स्वरूप दिले आहे. इंदोर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड आदी ठिकाणी त्यांचे सकारात्मक परिमाण दिसले आहेत. तेथील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्या महापालिका क्षेत्रात त्यातील कोणत्या गोष्टी घेता येतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना या सत्रात आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. या अभियानात चांगले गुण मिळवणे हे एक प्रमुख साध्य आहेच, परंतु, या सगळ्या गोष्टी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याशी निगडित आहे. महापालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे तीच या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. सहायक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्या टीमने काम करावे. मुख्यालयातून त्यासाठी आवश्यक धोरण ठरवले जाईल. त्याशिवाय, स्थानिक पातळीवर नावीन्यपूर्ण उपक्रम करावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यासाठीच, प्रभाग समिती स्तरावर स्वच्छ वॉर्ड ही स्पर्धाही आयोजित केली जात असल्याची घोषणा यावेळी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, दिनेश तायडे, वर्षा दीक्षित, सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.