Category: मुंबई

Mumbai news

भाजपा ५०० पार गेला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही

अमोल मिटकरींचा घरचा आहेर मुंबई : भाजपाचे आमदार टी. राजा यांनी भिवंडीत, ४०० पार झालो असतो, तर देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले असते, असे विधान केले आहे. या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाला घरचा…

पावसाची दांडी आणि घशाला कोरड

मुंबई: मॉन्सूनने मुंबई, ठाणेसह महाराष्टात दमदार हजेरी लावली खरी पण आतामात्र पावसाने दांडी मारली असून सध्यातरी मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये आजही काहीच प्रगती झालेली नाही. विशेषता धरण क्षेत्रात पावूस पडला नसल्याने मुंबई आणि ठाणेकरांच्या…

विधानसभेच्या तयारीला लागा – एकनाथ शिंदे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १९ जून रोजी होणाऱ्या…

वायकरांच्या विजयात मोबाईलचा झोल ?

 ईव्हीएम डेटा ऑपरेटर गुरव, वायकरांचा मेव्हणा आणि निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्या फोन कॉलचे गौडबंगाल कायम मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या विजयात…

मुख्यमंत्री पुन्हा ठरले अपघातग्रस्तांसाठी देवदूत

विक्रोळीजवळील अपघातग्रस्त तरुण आणि महिलेला दिला मदतीचा हात    ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल   मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटूंबाची चौकशी केली. यात तरुण आणि मुस्लिम कुटूंबातील महिलेला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन करून जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले. तसेच सोबत आपला अधिकारी देखील मदतीसाठी दिला.रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून मदत केल्याने या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. मात्र यानिमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील स्वभावाचा पुन्हा नव्याने अनुभव आला. 00000

मोदानीच्या महाजमीन घोटाळ्याविरुद्ध संसद व संसदे बाहेरही लढू- वर्षा गायकवाड

धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानींच्या DRPPL ला प्रस्थापित नियम बासनात गुंडाळून जमिनी का दिल्या जात आहेत? Slug २- कुर्ल्यातील जमीन अदानीला देताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष; मोदींच्या मित्रासाठी शासकीय प्रक्रिया डावलल्या मुंबई : मुंबईमध्ये मोदानी अँड कंपनीचा महाजमीन घोटाळा जोमात सुरू आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या मोक्याच्या सार्वजनिक जागा नाममात्र दरावर प्रस्थापित नियमांना आणि प्रक्रियेला बगल देऊन अदानींच्या समूहाला भेट देण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली कुर्ला येथील मदर डेअरीसाठी पूर्वी वापरण्यात येणारी शासकीय जमीन याच महाघोटाळ्याचा एक भाग असून या महाघोटाळ्याच्या विरुद्ध संसदेत, विधानसभेत, कोर्टात आणि रस्त्यावर उतरून लढू पण मुंबईकरांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अदानीसाठी मुंबईतील भूखंड अत्यंत कमी दराने देण्याचा शिंदे भाजपा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून हा एक मोठा जमीन घोटाळा आहे. मदर डेअरीची २१ एकर जमीन अदानीला देताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलेले नाही. जमीन देण्याआधी जाहिरात दिली पाहिजे, कलेक्टर यांनी प्रस्ताव बनवनू तो शासनाला पाठवला पाहिजे व नंतर योग्य त्या प्रक्रिया पार पाडल्या जातात पण या भूखंड हस्तांतरणाप्रकरणी अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही जमीन अदानीला दिल्याचा शासन आदेस १० जूनला जारी केला आहे. अशा प्रकारचा व्यवहार करताना १९७१ च्या कायद्यानुसार होणे अपेक्षित आहे पण अदानी हे पंतप्रधानांचे मित्र असल्याकारणाने बगल देण्यात आली आहे असे गायकवाड म्हणाल्या. सर्व धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे ही तमाम धारावीकरांची भूमिका असताना, धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मिठागरे, जकात नाक्यासाठी वापरण्यात येणारी महापालिकेची जमीन, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमीन किंवा कुर्ला डेअरीची जमीन अदानींच्या DRPPL ला प्रस्थापित नियमांना बासनात गुंडाळून का दिल्या जात आहेत? कुर्ला डेअरीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची ऑर्डर महत्वाची आहे की भाजपच्या मंत्र्यांची?  असे प्रश्न उपस्थित करून कुर्ला येथील नेहरू नगरच्या नागरिकांनी या हिरवळीच्या भूखंड संवर्धनासाठी सार्वजनिक उद्यान निर्माणासाठी लोकचळवळ निर्माण केली आहे. या चळवळीत काँग्रेस पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर राहू व मोदानी अँड कंपनीच्या मुंबई गिळण्याच्या मनसुब्यांना पराभूत करू असेही गायकवाड म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आढावा बैठक घेण्यास शिंदे सरकारला वर्षभरात वेळ मिळाला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना या स्मारकाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात होता. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्यासाठी कार्यरत होती, स्मारकावर हवेचा परिणाम होणार नाही यासाठी विविध भागात जाऊन माहिती घेतली  होती व त्यावर चर्चाही केली होती. बाबासाहेबांच्या स्मारकांप्रमाणेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही दुर्लक्षित आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे जलपूजन केले होते पण अजून या स्मारकाची एक वीटही रचली गेली नाही. भारतीय जनता पक्षाला महापुरुषांची आठवण फक्त निवडणुकीतच होते, असेही गायकवाड म्हणाल्या. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, खजिनदार संदीप शुक्ला, मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, निजामुद्दीन रायीन आदी उपस्थित होते.

संरक्षण आस्थापनांभोवतालच्या बांधकामांना स्थगिती देण्यास पालिकेचा नकार

१० मीटर नियमावली लागू असल्याचे स्पष्ट   मुंबई : संरक्षण विभागाच्या आस्थापनांपासून १०० ते ५०० मीटरपर्यंत सुरु असलेल्या सुमारे शंभरहून अधिक बांधकामांना स्थगिती देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे तूर्तास या पट्ट्यातील बांधकामांना अभय मिळाले असले तरी अद्याप संरक्षण आस्थापनेकडून पालिकेच्या या पत्राला काहीही उत्तर पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे या बांधकामांवरील स्थगितीची टांगती तलवार कायम आहे. मात्र यावेळी पालिकेने संरक्षण आस्थापनेने स्थगिती देण्यास सांगूनही ते आदेश पाळलेले नाहीत, असे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संरक्षण आस्थापनेअंतर्गत कांदिवली व मालाड येथील ऑर्डनन्स डेपो पासून १०० ते ५०० मीटरच्या परिघात परवानगीविना बांधकामे सुरु असून या बांधकामांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी, असे पत्र कांदिवली येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला पाठविले होते. असे पत्र मिळताच पालिका तसेच तत्सम नियोजन प्राधिकरणांकडून तात्काळ स्थगिती आदेश जारी केला जात होता. यावेळी मात्र पालिकेने स्थगिती आदेश जारी करण्याऐवजी संरक्षण आस्थापनेला पत्र पाठवून अशी स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. २१ ऑक्टोबर २०१६ च्या परिपत्रकानुसार, संरक्षण आस्थापनांपासून १० मीटरनंतरच्या बांधकामांना संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे ही स्पष्ट केले आहे. सेंट्रल ऑर्डनन्स डेपोने १५ मे रोजी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला पत्र पाठवून संरक्षण आस्थापनांपासून १०० ते ५०० मीटरपर्यंत असलेल्या बांधकामांना संरक्षण विभागाचे १८ मे २०११ चे परिपत्रक नियमावली लागू असल्याचे म्हटले होते. त्यानुसार या परिघात चार मजली बांधकाम करता येते, याकडे लक्ष वेधले होते. २०१६ च्या परिपत्रकाचा फेरविचार सुरु असल्याचेही त्यात म्हटले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवालाही देण्यात आला होता. मात्र पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने २०१६ चे परिपत्रक लागू असून राज्याच्या नगरविकास विभागानेही त्या अनुषंगाने आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत नगरविकास विभागाकडून स्पष्टीकरण घ्यावे, असेही सुचविले आहे. त्यानुसार या शंभरहून अधिक बांधकामांना परवानगी देण्यात आली असून या बांधकामांना स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. संरक्षण आस्थापनांचा घोळ काय? संरक्षण आस्थापनांभोवतालच्या बांधकामांबाबत १८ मे २०११ चे परिपत्रक लागू होते. त्यानुसार १०० ते ५०० मीटरपर्यंत चार मजली इमारतीला परवानगी होती. त्यामुळे अनेक बांधकामे रखडल्यामुळे २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये परिपत्रक जारी करुन ही मर्यादा १० ते १०० मीटरपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून ती मर्यादा ५० मीटर करण्यात आली. मात्र हे परिपत्रक स्थगित करण्यात आले आहे. या घोळामुळे तूर्तास कांदिवली-मालाड परिसरातील १०० हून अधिक बांधकामांवर टांगती तलवार कायम आहे. 00000

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 434 शाळा…

मुंबईच्या तलावांच्या क्षेत्रात पावसाची एन्ट्री

मुंबईकरांना दिलासा !   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची एन्ट्री झाली आहे. सरासरीने अधूनमधून पाऊस पडू लागला आहे. पावसाने तलावक्षेत्रात हजेरी लावल्याने मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसात सर्वात जास्त १३५ मिमी पाऊस तुळशी तलावात, त्यापाठोपाठ विहार तलावात १३४ मिमी, भातसा तलावात ८८ मिमी, मध्य वैतरणा तलावात ७३ मिमी, मोडक सागर – ६५ मिमी, तानसा – ६४ मिमी आणि अप्पर वैतरणा तलावात सर्वात कमी म्हणजे ४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सातही तलावात गेल्या ९ जूनपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.मुंबईत यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई शहरात दरवर्षी किमान २,२०० ते २,७०० मिमी इतका पाऊस पडतो. मात्र मुंबई महापालिकेकडे या पावसाचे पाणी साठवून ठेवण्याबाबत वेगळे असे नियोजन नाही. तसेच, सन २००६ पासून राज्यात मोठ्या जागेतील इमारतीच्या ठिकाणी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग ‘ योजना राबविण्याबाबत कायदा करण्यात आलेला असताना त्याची अंमलबजावणी करण्यात पालिकेला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच पावसाचे हे पाणी मुंबईतील तुळशी आणि विहार या दोन तलावात त्यांच्या क्षमते एवढेच जमा होते. तर पवई तलावात पावसाचे पाणी काही प्रमाणात साठवले जात असले तरी या तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे त्या पाण्याचा वापर आरे कॉलनी व जवळच्या काही कंपन्यामध्ये पिण्याच्या व्यतिरिक्त पाण्याची गरज भागविण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे मुंबईत पावसाळ्याच्या चार महिन्याच्या मोसमात पडणारे जवळजवळ २२,०० ते २,७०० मिमी इतक्या पावसाचे पाणी विनावापर समुद्रात वाया जात असते. मुंबईची दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतकी आणि ठाणे, भिवंडी महापालिकेची दररोज १५० दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तहान ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा हे प्रमुख ५ तलाव भागवत असतात. त्यामुळे हे ५ प्रमुख तलाव आणि मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव असे एकूण सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरलेले (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) असणे आवश्यक असते. दरम्यान सध्या सात तलावात बुधवारी सकाळी ६ पर्यंत फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर (५.५४ टक्के) इतका म्हणजे पुढील २० दिवस १ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. सध्या सात तलावात फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर ००००

झोमॅटोची डिलिव्हरी आता दिव्यांग ही करु शकतील

स्नेहज्योतने मिळवून दिल्या निओमोशनच्या आधुनिक दुचाकी !   मुंबई : हल्ली घरोघरी झोमॅटो मार्फत डिलिव्हरी व्यवसाय जोरात सुरु असून आता या व्यवसायात दिव्यांग व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहेत. बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगर मध्ये कार्यालय असलेल्या  स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग पुनर्वसन कार्यासाठी समर्पित आहे. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या हिंमतीवर अर्थार्जन करून सक्षमपणे आपले आयुष्य व्यतीत करण्यासाठी दिव्यांगांना विविध कौशल्यामध्ये पारंगत करण्यापासून ते त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टींमध्ये भरभक्कम पाठिंबा उभ्या करण्यापर्यंत सर्व आवश्यक गोष्टी स्नेहज्योत तर्फे करण्यात येतात. चेन्नई स्थित निओमोशन या कंपनीने दिव्यांग व्यक्तींसाठी स्पेशली डिझाईन केलेल्या इलेक्ट्रिकल व्हेईकल वरून झोमॅटो फूड डिलिव्हरी चा व्यवसाय दिव्यांग व्यक्तींनाही करता येऊ शकतो का, याचा प्रयोग वर्षभरापूर्वी स्नेहज्योत संस्थेने केला. ज्यामध्ये निओमोशन चे सीईओ सिद्धार्थ डागा व प्रतिनिधी निरंजन जाधव यांनी मोलाचा वाटा उचलला. या पहिल्या टप्प्यामध्ये हरिशंकर शर्मा, निजामुद्दीन आणि प्रवीण शिंदे या दिव्यांग सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व अडचणींवर मात करीत आपले मासिक उत्पन्न झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून जवळजवळ 25 हजार रुपये पर्यंत नेले. त्यांच्या या स्वयंपूर्ण होण्याच्या प्रवासातून प्रेरणा घेत स्नेहज्योतने मागील आठवड्यात तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना या झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरवले आहे. यामध्ये एक दिव्यांगना शुभांगी मोधले सुद्धा आहे. जवळजवळ  1,20,000 रुपये किंमत असलेल्या या गाडीसाठी एच टी पारीख फाउंडेशनने 1,10,000 रुपयांची मदत केली व उर्वरित दहा हजाराची मदत संस्थेचे शुभचिंतक, विदुला वैद्य, सुरेश मनोहर आणि सुजय अरगडे यांनी केली. हा संपूर्ण कार्यक्रम बोरिवली पूर्व येथील चोगले हायस्कूलमध्ये संपन्न झाला.  ज्यामध्ये चोगले हायस्कूलचे कार्यवाह श्री संजय डहाळे व त्यांचे पुतणे श्री. सुमेध सुनील डहाळे यांनी अनमोल सहकार्य केले. स्नेहज्योत संस्थेच्या पुढाकाराने तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना अर्थार्जन करून स्वयंपूर्ण होण्यासाठी एक नवीन क्षेत्र खुले झाले असल्याचे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या सचिव सुधाताई अनिलकुमार वाघ यांनी सांगितले. मुंबई व्यतिरिक्त राज्यात दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या व्यवसायात यापूर्वीच उतरल्याचेही सुधाताई वाघ यांनी आवर्जून नमूद केले.