Category: मुंबई

Mumbai news

देशातील कर दहशतवाद थांबवणार- उद्धव ठाकरे

मुंबई – इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येताच देशात जीएसटीच्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद आम्ही थांबवू. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. हा कर दहशतवाद आम्ही थांबवणारच असे…

सुट्टीत गावी गेलेल्या मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत २० मे रोजी पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुटीत गावी गेलेल्या मुंबईकरांनी मुंबईत येऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते आर. जी. हुले आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अलका हुले यांनी ग्रामीण भागातून ‘चलो मुंबई’चे बॅनर लावत मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. मे महिन्याच्या सुटीत अनेक मुंबईकर कुटुंबासहित गावी जात असतात. काही जण मतदान असतानादेखील मुंबईत येऊन आपले कर्तव्य बजावत नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी रायगडमधील आंबेगाव गावात ‘मतदानासाठी मुंबईत चला’, असे आवाहन बॅनरद्वारे केल्याचे आर. जी. हुले यांनी सांगितले.

मुंबईत १७ हजार आरोपींची तपासणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष मोहिम मुंबईः निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून नये, यासाठी फरार व विविध गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम मुंबईत राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी करण्यात आली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय यावर्षी ९,५९३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सराईत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्या अंतर्गत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे ३२० जामीनपात्र व ६७४ अजामिनपात्र वॉरंट असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी संवेदनशील ठिकाणे, हॉटेल याठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणी तपासणी कक्षही उभे करण्यात आले आहेत. यावर्षी प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही वाढ करण्यात आली असून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सीआरपीसी १०७ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६,२०१ कारवाया करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीकडून शांतता भंग होण्याची भीती असल्यास संबंधीत व्यक्तीवर सीआरपीसी १०७ अंतर्गत कारवाई केली जाते. याशिवाय सीआरपीसी कलम ११० व १५१(३) अंतर्गत अनुक्रमे २१५४ व ९१६ कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (एमपी) कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत अनुक्रमे ३३, १९३ व ९० कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय एपीडीए कायद्यांतर्गत सहा जणांवर कारवाई केली आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा (पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा) ५५, ५६, ५७ अन्वये तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. यानुसार संबंधित व्यक्ती आदेशात नमूद केलेल्या जिल्ह्यात वा परिसरात दिलेल्या कालावधीसाठी प्रवेश करू शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा ६८, ६९ तसेच १५१, दंड प्रक्रिया संहिता १०७, १०९,११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून केली जाते.

मुंबईतील मिठागरांवर पुनर्वसन करताना फक्त अदानीचा विचार नको –  वॉचडॉग फाउंडेशन

रमेश औताडे मुंबई : मुंबईचा विकास व ग्लोबल वॉर्मिगचा धोका पाहता भविष्यात मुंबईला पूर आणि मोठ्या वादळांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करताना फक्त अदानीचा विचार करू नका. मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर झोपडपट्टीचे संभाव्य पुनर्वसन  हे तर महाधोकादायक आहे. अशी भीती  वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुंबईला समुद्र पातळीचा धोकासमुद्र पातळीत वाढ होत असल्याचा सर्वाधिक धोका मुंबई किनारपट्टीला बसणार आहे. २०५० पर्यंत समुद्र पातळीच्या संभाव्य वाढीमुळे सुमारे ९९८ इमारती आणि २४ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित होणार आहे. तर भरतीच्या वेळी समुद्र पातळी वाढल्याने अंदाजे २ हजार ४९० इमारती आणि १२६ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित होण्याचा इशारा आरएमएसआय या संस्थेने काही वर्षांपूर्वी दिला होता. यामुळे हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी-लिंक आणि मरीन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस पाण्याखाली जाणार असल्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे. धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून अदानी कंपनीची निवड धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने केली आहे. धारावीतील प्रत्येक झोपडीधारकांना घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे धारावीतील झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. धारावी पुनर्विकासात अपात्र ठरणाऱ्या नागरिकांना भाडेतत्वावरील घरे देण्यात येणार आहेत. भाडेतत्वावरील घरे उभारण्यासाठी वडाळा येथील मिठागराची जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुलुंड मधील डम्पिंग ग्राउंडच्या जवळील जमिनीवर धारावीतील नागरिकांना घरे देण्याची योजना होती. या योजनेला मुलुंडकरांनी विरोध दर्शविला आहे. तर  निवडणुकीत मतांच्या जोग्व्यासाठी धारावीतील नागरिकांना वडाळा मिठागरांच्या जमिनीवर घरे देणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. या निर्णयाला वॉचडॉग या संस्थेने विरोध केला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होणार असल्याने मुंबईसह जगभरातील समुद्र किनारी असणाऱ्या शहरांना धोका आहे असे पर्यावरण तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे अनियोजित विकास मुंबईकरांची सुरक्षितता पाहता हानिकारक ठरू शकतो. मिठागरांच्या जमिनीवर इमारती उभारल्यास भविष्यात मुंबईला धोका निर्णय होऊ शकतो. त्यामुळे धारावीकरांचे पुनर्वसन धारावी किंवा पर्यायी ठिकाणी करावे, अशी मागणी वॉचडॉग संघटनेचे पदाधिकारी गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची

हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित हिन्दुस्थानी ख्याल गायन स्पर्धा  शनिवार दिनांक १५ जून २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता वय वर्षे १६ ते ३० वयोगटांसाठी होणार आहे. सर्व स्पर्धक अव्यावसायिक हौशी कलाकारच असावेत. पहिले पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १३ जून २०२४ आहे . अर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच फेसबुक, ट्विटर आणि संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre. org या वेब साईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी – ०२२-२४३०४१५०, ७७००९९४४९५ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील मोदींच्या सभेला यशस्वी करणे महायुती म्हणून आमची जबाबदारी…- – सुनिल तटकरे

मुंबई : राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुंबई प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या विजयाचीही खात्री सांगितली.विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल असेही सुनिल तटकरे म्हणाले. महायुतीची लाट आहे असे ते म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले असावे यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार यांना फार मोठी आघाडी म्हणजे २०१९ मध्ये भाजपला मिळाली होती त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. बारामतीमध्ये निकाल काय लागणार आहे याची रोहित पवार यांनी पराजयाची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ट्वीट करत कबुली दिली आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने

मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मानले आभार मुंबई :- १० राज्ये आणि ९६ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी…

फ्लॅश मॉबव्दारे मॉलमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा अधिकार असणा-या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये नुकताच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले पहिल्यांदाच मतदान करणारे 18 वर्षावरील युवक व युवती यांना मतदान करण्याकरीता प्रोत्साहित केले जात असून महाविद्यालयांमध्ये तसेच युवक संघटनांमध्येही मतदार जनजागृती विषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे. या अनुषंगाने शनिवार व रविवारी होणारी मॉलमध्ये येणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाशी येथील इनॉर्बीट मॉल तसेच सीवूड येथील ग्रॅंड सेंट्रल मॉल या दोन ठिकाणी लोकांना चटकन आकर्षित करुन घेणा-या फ्लॅश मॉब सारख्या संगीतमय कलाप्रकाराचा मतदार जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला. मॉलमधील वातावरण खरेदीसाठी उत्साही असताना व तशा प्रकारची लगबग मॉलमधील प्रत्येक दुकानातून सुरु असताना अचानक मोठया आवाजात गीत – संगीत वाजायला सुरुवात होते. गाणे कुठे वाजते आहे याचा कानोसा घेत लोक आवाजाच्या दिशेने सूरांचा शोध घेण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी त्यांना मॉलच्या तळमजल्यावर मधल्या मोकळया पॅसेजमध्ये संगीत वाजायला सुरुवात झाल्याचे लक्षात येते व त्या तालावर नृत्यासाठी सज्ज असलेले तरुण, तरुणी दिसतात. गाणे वाजायला सुरुवात होते आणि त्या तालावर ते तरुण – तरुणी समुहनृत्य सुरू करतात. बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवतालची गर्दी वाढत जाते. सुरूवातीच्या गाण्यानंतर चक्क मतदान विषयक जनजागृती करणारे गाणे सुरू होते. मग मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारी गाणी एकापाठोपाठ एक नृत्यासह सादर होत जातात. तळमजल्यावरच नव्हे तर मॉलमधल्या प्रत्येक मजल्याच्या कठडयाजवळ येऊन नागरिक तळमजल्यावर नृत्य करणा-या कलावंताकडे आकर्षित होऊन गर्दी करतात. नृत्याविष्काराच्या अखेरीस 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत केले जाते. नागरिकही या तरुणाईला प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याचे कौतुक करतात व लोकसभा निवडणूकीत आम्ही मतदान करणार आहोत अशी ग्वाही देखील देतात. वर्दळीच्या ठिकाणी अचानक सुरु होणारा गीतसंगीतमय फ्लॅश मॉब हा नागरिकांना आकर्षित करणारा व त्याच वेळी मतदानाविषयी जनजागृती करणारा असल्याने हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला.

महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 26 मतदारसंघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आहे. या चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 7,384 एवढ्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचलन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार असून त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला अधिकारी व कर्मचारी संचलित एकूण 26, तरुण अधिकारी व कर्मचारी संचलित 26, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचारी (सक्षम केंद्र) संचलित एकूण 26 मतदान केंद्र असतील, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

निवडणूक कामासाठी नऊ हजार एसटीचे बुकिंग

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून, राज्यातील पाच टप्प्यांतील मतदानासाठी सुमारे नऊ हजार एसटी बस धावत आहेत. राज्यातील अनेक मतदार मतदान करण्यासाठी शहरातून आपापल्या मतदारसंघात बसने प्रवास करत आहेत. अनेकांनी यासाठी तिकिटाचे आरक्षणदेखील केले. यापैकी अनेक बस स्थानकात आलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आगार व्यवस्थापनाकडून बस मतदानाच्या कामाला गेल्याचे सांगितले जात आहे. आरक्षण केल्यानंतर बस रद्द करणे हे मतदान करायला जाणाऱ्या प्रवाशांची थट्टा करण्यासारखे आहे, अशा शब्दात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. सध्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या कामकाजासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.