Category: ठाणे

Thane news

रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांच्या घरंदाज गायकीने श्रोते मंत्रमुग्ध

पनवेल : देशभरात शास्त्रीय गायनाची छाप पाडणारे रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी दीपसंध्या संगीत महोत्सावात आपल्या सुमधूर  घरंदाज गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सौजन्याने व संगीत कलामंच, डोंबिवली आयोजित दोन दिवसीय कार्यक्रम “दीपसंध्या संगीत महोत्सव” डोंबिवली मधील टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात पार पडला. हा महोत्सव शास्त्रीय संगीतावर आधारित होता. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी प्रथम अम्रीता मोरे यांचे सुश्राव्य सतारवादन झाले. त्यांनी जयजयवंती हा राग सादर केला. त्यानंतर योगेश हुन्सवाडकर यांनी राग पूर्वी सादर केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रूपक पवार यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल तीनताल पेशकारी केली. त्यानंतर पं.  उमेश चौधरी यांनी केदार रागातील ख्याल गायकी सादर केली. त्यांच्या “अबीर गुलाल ” या अभंगाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “त्यांनी “स्वामी कृपा कधी करणार’ या सुंदर भैरवीने पहिल्या दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी महेश कुलकर्णी यांच्या पुरीया कल्याण या रागातील पेशकारीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर हिंदुस्थानी संगीत अकादमीचे संचालक विनायक नाईक यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल तीनताल ची पेशकारी केली. त्यांची विद्यार्थिनी कु. भक्ती जाधव हिने सहवादन केले. विदुषी पंडीता शुभदा पराडकर यांच्या जयजयवंती रागाने कार्यक्रमाची सांगता झाली. ठुमरी, कजरा, टप्पा गायनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शुभदाताईंनी उपस्थित श्रोत्यांच्या आग्रहास्तव शेवटी भैरवी रागातील टप्पा सादर केला. या महोत्सवात तबल्यावर निशाद पवार, नितीन डेगवेकर, गिरीश आठल्ये, प्रवीण करकरे, आणि विनायक नाईक यांनी हार्मोनियमवर वासुदेव रिसबुड, मंदार दिक्षित, या कलाकारांनी साथसंगत दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तनुश्री जोग यांनी केले.

संजय केळकर यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने दिला जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह नुकतीच केळकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्या विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले आहे. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोर गरीब जनेतसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनेतला न्याय देणार खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे अवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बहुजन विकास आघाडीला ‘शिट्टी’ चिन्ह वापरता येणार – मुंबई उच्च न्यायालय

विरार : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी क्रेंद्रिय निवडणूक आयोगाने शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवल्याचे स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायलायत धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित (रिट) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज ४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा निकाल देत बहुजन विकास आघाडीला ‘शिटी’ चिन्ह वापरता येईल असे आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार आहे. बहुजन विकास आघाडीने याचिकेत भारत निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या पत्र व त्यामुळे झालेल्या परिणामांबाबत हरकत घेतली होती. बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच आज हा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून पक्षाचे चिन्ह ‘शिटी’ हे सर्वाना परिचित आहे. मात्र २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीपासून बविआला शिट्टी हे चिन्ह मिळू नये म्हणून विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक मात्र बविआने शिट्टी या चिन्हावर लढवली होती त्यामुळे या निवणुकीतही बविआला शिट्टी चिन्ह मिळेल अशी अपेक्षा होती.

मतविभागणी टाळण्यासाठी नाशिक (पश्चिम) मधून माकपची माघार – डॉ. उदय नारकर

ठाणे : मतविभागणी टाळण्यासाठी, नाशिक पश्चिमची जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक (पश्चिम) मधील उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली. राज्यातील भाजपप्रणित महायुतीचे महाराष्ट्रद्रोही, गोरगरीब जनतेवर घोर अन्याय करणारे महायुतीचे सरकार पदच्युत करून त्याजागी पर्यायी सरकार स्थापन करणे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे. नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात मतविभागणी होऊन ती जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर आणि डॉ. डी. एल. कराड यांच्या सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याआधी डॉ. उदय नारकर, डॉ. डी. एल कराड, डॉ. विवेक माँटेरो, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. तानाजी जयभावे आणि कॉ. दिनेश सातभाई यांच्या शिष्टमंडळाने खा. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली.

दिवाळी पहाट उपक्रमांतर्गत मतदानाचा हक्क बजवण्यासाठी जागरुकता कार्यक्रम – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर रोजी होणा-या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संपूर्ण राज्यात एकाच दिवशी होत असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क कर्तव्य भावनेने बजावावा याकरिता मतदार जागरुकता कार्यक्रम मोठया प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. यामध्ये दिवाळी कालावधीत ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणा-या दिवाळी पहाट सांगितिक उपक्रमांमध्येही १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाशी संबधित अधिका-यांनी तसेच महानगरपालिकेच्या संबधित विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून नागरिकांचे मतदानाविषयी प्रबोधन केले. वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृहात १ व ३ नोव्हेंबर रोजी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित नागरिकांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. तसेही नाटयगृहामध्ये दररोज होणा-या नाटयप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुरुवातीला, मध्यंतरात व कार्यक्रम संपल्यानंतर मतदान करण्याचे आवाहन करणारी ध्वनीफित प्रसारित करण्यात येत आहे. अशाचप्रकारे ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरुळ येथे, करावेगाव येथे तसेच ऐरोली येथे शिवकॉलनी व विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाटच्या सांगितीक कार्यक्रमांप्रसंगी स्वीप पथकाने उपस्थित राहत मतदान करण्याविषयी आवाहन करत जागरुकता निर्माण केली. राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर, रबाळे येथील दिवाळी संध्या उपक्रमातही मतदार जनजागृती करण्यात आली. भाऊबीजेच्या दिवशी स्वीप पथकातील महिला कर्मचा-यांनी ऐरोली येथील अग्निशमन केंद्रामध्ये जाऊन अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांची ओवाळणी केली व त्यांना ओवाळणी म्हणून २० नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे मागील निवडणूकीत कमी मतदान झाले आहे अशा विभागांमध्ये मतदार जनजागृती करण्याबाबत विशेष भर देण्यात येत असून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून यादव नगर ऐरोली परिसरात घराघरात स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली तसेच तेथील रिक्षा स्टँडच्या ठिकाणी रिक्षा चालकांची ओवाळणी करुन मतदानाचे आवाहन करण्यात आले. याशिवाय परिसरात रिक्षाव्दारे आवाहन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील १५० व १५१ विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली १५० ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे व १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून स्वीप पथकांच्या वतीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. अगदी दिवाळी सणातही समुहाने साज-या होणा-या दिवाळी उत्सवात कार्यक्रमांठिकाणी जाऊन मतदार जनजागृती करण्यात आली.

ठाण्यात दिवाळी काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ

चार दिवसांत ३३ ठिकाणी लागली आग ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दिवाळी काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता दिवाळी काळातील चार दिवसांत संपुर्ण शहरात एकूण ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसून त्याचबरोबर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. या आगीची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नसली तरी फटाके तसेच अन्य कारणांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. ठाणे पालिका प्रशासनाकडून दिवाळी काळात हवा गुणवत्तेची तपासणी करण्याबरोबर ध्वनी पातळीचे मापन करण्यात येते. यंदाच्या तपासणीत दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदवली गेली आहे. परंतु यंदा हरित फटाक्यांचा वापर वाढला असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा ध्वनी आणि वायु प्रदुषण कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे. असे असतानाच, दिवाळी काळात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. बुधवार, ३१ ऑक्टोंबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात ११ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर १ नोव्हेंबरला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ९ ठिकाणी, २ नोव्हेंबरला दिपावली पाडव्याच्या दिवशी ७ आणि ३ नोव्हेंबरला भाऊबीजच्या दिवशी ६ अशा एकूण ३३ ठिकाणी आग लागल्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी दिवाळी काळात शहरात ४७ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनेत घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या आगीच्या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नसून काही ठिकाणी मात्र आगीत साहित्य जळून खाक झाले आहे.

 प्रताप सरनाईक यांच्या कॉफी टेबल बुकाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन

प्रताप सरनाईक प्रचंड मतांनी विजयी होणार – एकनाथ शिंदे ठाणे : ओवळा – माजीवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यतत्पर आमदार तसेच लोकप्रिय उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या गेल्या १५ वर्षातील विकासकामांचा आढावा घेणारा कार्य अहवाल व त्याची माहिती देणारे कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आले. ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा चौफेर विकासकामांमुळे आमदार सरनाईक यांनी बदलून टाकला आहे. आमदार सरनाईक हे पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हेही उपस्थित होते. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना आमदार सरनाईक यांनी दीपावलीच्या सहपरिवार शुभेच्छा दिल्या. ओवळा-माजिवाडा विधानसभा क्षेत्रातील गेल्या १५ वर्षांत दिलेल्या वचनांनुसार केलेल्या कामांचा कार्यअहवाल यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला तर विकासकामांची माहिती व पुढील ५ वर्षात मतदारसंघांत राबवायचे विकास प्रकल्प, संकल्प याचे कॉफी टेबल बुक अनावरण करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांना हे कॉफी टेबल बुक दिले जाणार आहे तर कार्य अहवाल मतदारांच्या घरोघर वाटप केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चौफेर विकासकामे ही ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रात झाली आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत ओवळा-माजीवडा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आपल्या मतदारसंघात लोकोपयोगी विकासकामं आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. मीरा-भाईंदर शहरात देखील त्यांनी  विविध लोकोपयोगी कामे करून या शहराचा पूर्णपणे कायापालट केलेला आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या बळावर त्यांचा विजय होणे ही निव्वळ औपचारिकता असून या मतदारसंघातून ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

दहशतीला न घाबरता उत्तर भारतीय नेते पंकज पांडे यांचा राष्ट्रवादीत  प्रवेश – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : कोणत्याही दहशतीला न घाबरता उत्तर भारतीय नेते पंकज पांडे आणि त्यांच्या सहका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी उत्तर भारतीयांचे शोषण केले. कळवा पूर्व परीसरामध्ये स्मशानभूमी उभारु शकले नाहीत. छटपूजा घाटाची निर्मिती करु शकले नाहीत. कायम सनातन धर्माचा अपमान करायचे काम जितेंद्र आव्हाडांनी केला. पंकज पांडे आणि त्यांच्या सहका-यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणखी ताकद वाढली आहे असे मत प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षामधील कळवा (पूर्व) परीसरातील असंख्य उत्तर भारतीय पदाधिका-यांनी रविवारी पंकज पांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंकज पांडे, राजू राजभर, अतुल शेडगे, संतलाल सिंह, अरविंद दुबे, राजेश सिंग, रोहीत यादव, सुरज सहानी, राकेश वर्मा, मिरा पाठक यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. अहंकाराच्या विरोधात आम्ही करीत असलेले काम बघून पंकज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचे मी स्वागत करतो. कळव्यामध्ये आव्हाडांकडून हिंदु मुस्लिम चे राजकारण करुन जातीवाद पसरवला जात असल्याचे देखिल प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यावेळी आव्हाडांचे नाव न घेता म्हणाले.जितेंद्र आव्हाडांना उत्तर भारतीयांची मते पाहीजेत पण उत्तर भारतीय नको, हा कुठला न्याय ? आव्हाडांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेत १५ वर्षे आव्हाडांना साथ दिली पण, त्यांनी उत्तर भारतीय लोकांसाठी काहीही केलेले नाही. १५ वर्षे आमदार असून देखिल कळवा (पूर्व) परीसरामध्ये छठ पूजा घाटाची निर्मिती आव्हाड करु शकले नाहीत. फक्त आम्हांला आश्वासन दिले गेले. १५ वर्षात कळवा पूर्व परिसरासाठी स्मशानभूमीची निर्मिती जितेंद्र आव्हाड करु शकले नाहीत. केवळ भाषणात आणि पुस्तकात आम्हांला आश्वासन दिले गेले. असे वक्तव्य उत्तर भारतीय नेते पंकज पांडे यांनी केले.

कचरा कोंडीवर पालिकेचा तोडगा

२५० मेट्रिक टन मिठाई बॉक्सच्या कचऱ्याची महापालिका लावणार विल्हेवाट   ठाणे : दिवाळी सणांत फराळासोबतच एकमेकांना मिठाईद्वारे शुभेच्छा देण्यात येतात. त्यामुळे दिवाळी सणात सर्वाधिक खप हा मिठाईचा होत असतो. मिठाईच्या…

निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

पनवेल: विधानसभेची निवडणूक जाहीर होताच काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. गेल्या पाच वर्षांपासून अडगळीत पडलेल्या गावागावांतील कार्यकर्त्यांना पुन्हा निवडणूक प्रचारात सक्रिय करण्यासाठी नेत्यांकडून…