कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राजकीय संमेलनातील ठराव
मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, शेतकरी,जनता व देश विरोधी सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात नुकताच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले. त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. इंटक,आयटक, एसएमएस,सिटू, एआयसीसीटीयू, बीकेएस एम, राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते, डॉ.कैलास कदम, डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी, निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, आमदार सचिन अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदाराचे हित जोपासत आहे. भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनांनी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी ४ श्रम संहिता आणल्या आहेत. हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार!अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे. कामगार कर्मचारी कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डी . एल. कराड ठरावावर भाषण करताना म्हणाले की, आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबिय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधीl सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असे डॉ. कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले. महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कैलास कदम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले, येणारा १ मे कामगार दिन केंद्र सरकार विरोधी कामगार निषेध दिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले, अंगणवाडी, आशा कामगार पासून गिरणी कामगारांपर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या केंद्र सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे कॉ. मिलिंद रानडे, कॉ.उदय भट, कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. कॉ.उदय चौधरी, साथी निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात केंद्र सरकारला महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा देऊन कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.
