जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टिका
ठाणे : ” यांच्यापेक्षा शिंदे बरे, निदान आपल्या लोकांसाठी भांडत तरी आहेत. काहीतरी मिळवतायत, यांनी काय मिळवलं? पंचपक्वान्नाचं ताट सोडून आज पत्रावळीवर जाऊन बसलेत. भाजपला शरद पवारांना संपवायचंय, त्याशिवाय यांच जातीय राजकारण इथं टिकणार नाही”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांचे वकील बेंबीच्या देठापासून ओरडत होते, त्याला खडसावलं, असं म्हणत नाहीत. मी माझ्या विचारधारेवर ठाम आहे. मी हेडगेवारांच्या मांडीवर जाऊन बसलो नाही. त्यामुळे आता त्यांच्या मुखातून शाहु, फुले, आंबेडकर ही नावं शोभत नाहीत. तुमचा वकील 10 मिनिटं माझ्यावर सर्वोच्च न्यायालयात बोलला. होय, मी काम करतोय म्हणून दिसतोय. आम्ही काही संभ्रम निर्माण करत नाही.
आमचा बाप त्याच्या शेजारी आहे
आम्हाला आमचं चिन्ह मिळालंय, आमचा बाप त्याच्या शेजारी आहे. तुम्हाला जागा किती मिळाल्या? त्या कश्या मिळाल्या?, तरूणांला संधी मिळत नाही म्हणून बाहेर पडलात ना? तुमचे सगळे उमेदवार पंन्नाशीच्या पार आहेत. पक्षाची वाट लावलीत, स्वत: आरामात आहेत. पहिली खासदारकी दिली ती पण, प्रफुल्ल पटेलांना दिली. अडवाणींबाबत आमच्या मनात काही वाद नाही. पण इतरांना भारतरत्न कसे दिले गेले? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मनूनं केलेलं स्त्रीचं वर्णन तुमच्या मनात आजही कायम
राष्ट्रपती उभ्या राहतात आणि पंतप्रधान बसून राहतात. नव्या संसदभवनाच्या उद्घाटनालाही त्यांना बोलावलं नाहीत. मनूनं केलेलं स्त्रीचं वर्णन तुमच्या मनात आजही कायम आहे. त्यात त्या आदिवासी म्हणून..? हा देशाचा अपमान आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
