Month: April 2024

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा सादर

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत आल्यास देशभर समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक लागू करण्यासोबतच ७० वर्षांच्या सर्व वयोवृद्धांना तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याच्या १० महत्त्वपूर्ण घोषणांची मोदींच्या…

वांगणीत पाण्यासाठी आदिवासींचा आक्रोश

बदलापूर : प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल, हर घर नल अशा अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार गावागावात पोहचवत आहेत; मात्र कासगाव-गोरेगाव या दोन्ही गावात सरकारच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेच्या कामावर ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनीच माती टाकली आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी वांगणीतील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आक्रोश करण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेअंतर्गत कासगाव व गोरेगाव येथील साधारण दोन हजार ग्रामस्थांच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून २०२२ मध्ये या कासगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाण्याच्या टाकीपासून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी एक कोटी ९८ लाख ५८ हजार म्हणजे जवळपास दोन कोटींच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. अंबरनाथ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या माध्यमातून कामाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित कामाचा ठेका हा मे. लीना पांडुरंग पाटील या ठेकेदाराला देण्यात आला. तसेच साहाय्य संस्था म्हणून एम.जे.एस. प्रायव्हेट लिमिटेड इंडिया या कंपनीने सहकार्य केले आहे. हे काम २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरच जुन्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी नवी पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीतून गावागावात नळ योजना देण्यासाठी मोठमोठे पाईप टाकीला जोडून जमिनीच्या आतून गावागावात पोहोचवण्यात आले; मात्र बांधलेली नवीन टाकी आजही अपूर्णावस्थेत असून त्या टाकीचे अजिबात खोलीकरण केलेले नाही. त्यात टाकीवर छप्परच बसवलेले नाही. त्यामुळे मोकळ्या पाण्यात जीवजंतू पडण्याचा धोका आहे; मात्र तरीदेखील पाणी नळातून सोडण्यास सुरुवात झाली; पण असे होऊनही ग्रामस्थांच्या नळाला पाणी काही येत नाही. या सगळ्या कामात संबंधित ठेकेदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अक्षरशः ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांची हेळसांड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कामाची पाहणी करण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शेख आले होते; मात्र त्यांनी यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. अर्ध्या फुटावरच जलवाहिनी काही महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनीच टाकीतून पाणीपुरवठा करणारे पाईप जमिनीतून कशाप्रकारे सोडले आहेत हे पाहण्यासाठी जमीन खोदली. यावेळी गावकऱ्यांच्या असे निदर्शनास आले की हे पाईप जवळपास अर्धा ते एक फूट इतक्याच खोलीवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे टाकीतले पाणी पाईपमधून पुढे जात नाही. साधारण ही जलवाहिनी जमिनीपासून चार ते पाच फूट खोल टाकण्यात येणे आवश्यक होते; मात्र अर्धा ते एक फूट खोल असणाऱ्या या वाहिनीतून पाणी येणार कसे, असा प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाद संबंधित ठेकेदार व प्रशासनाने कानाडोळा केल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांसमोर पाण्यासाठी आक्रोश करत जाब विचारला. यावेळी ठेकेदार व ग्रामस्थांची बाचाबाचीदेखील झाली. हर घर जल योजनेचे काम अपूर्णावस्थेत असल्याने आम्ही पाण्यासाठी असेच तडफडत आयुष्य जगायचं का, असा प्रश्न या ग्रामस्थांनी विचारला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार, राजकीय नेते मतदारसंघातील सामान्य व दुर्लक्षित अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न का करत नाहीत, आमच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सरकार व प्रशासन उदासीन का आहे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. मी कासगाव या गावातील ग्रामस्थ असून मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या हर घर जल, हर घर नल या योजनेचा पाठपुरावा करत आहे. या योजनेअंतर्गत कासगाव या ठिकाणी मोठा घोटाळा झाला आहे. मंजूर झालेल्या दोन कोटींच्या कामांची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, तसेच ही योजना अपूर्णावस्थेत असून जे काम झाले आहे ते दर्जाहीन आहे. अनेकदा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही या कामाच्या संदर्भात, शासकीय कर्मचारी कोणतेही उत्तर देत नाहीत. त्यामुळे आम्ही जाब विचारायचा कोणाला, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. -राकेश टेंबे, ग्रामस्थ, वांगणी

वाडा ग्रामीण रुग्णालयात फळवाटप

वाडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती आज (ता. १४) वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप वाडा तालुका शाखेच्या वतीने वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटण्यात आली. वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, विक्रमगड विधानसभा निवडणूकप्रमुख डॉ.. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, नरेश आक्रे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, सरचिटणीस रोहन पाटील, कुणाल साळवी, हर्षल खांबेकर, प्रसाद सोनटक्के, राम भोईर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडूस नाका येथेही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घोणसई ग्रामपंचायतीत सरपंच शैला जाबर, उपसरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ठाकुर्लीतील सरकते जिने बंद

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत; मात्र स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने उन्हातून थकलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील जिने चढून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून रहिवाशांची संख्या वाढली आहे. डोंबिवली स्थानकात होणारी गर्दी पाहता डोंबिवली, कल्याण पूर्व व ठाकुर्लीतील नागरिक ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. या ठिकाणी पूर्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्याची सोय केली आहे; मात्र हे सरकते जिने अनेकदा बंद असल्याचे दिसून येते. उन्हातून चालून आल्यानंतर अनेकदा जिने चढताना काहींना दम लागतो, श्वास फुलतो तसेच जिने चढून जाण्याची ताकद राहत नसल्याने प्रवासी सरकत्या जिन्याचा वापर करतात; मात्र रेल्वे स्थानकात पाऊल टाकताच हे बंद सरकते जिने त्यांची निराशा करतात. यामुळे नागरिक त्रस्त असून दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवस हे जिने बंद ठेवले जातात असा आरोप प्रवाशी करतात. तसेच स्थानकातील सरकते जिने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

पाण्यासाठी महिला आक्रमक

पाये गावातील जलवाहिनी उखडली वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील पाये, पायगाव परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नसल्याने तीव्रपाणी टंचाई जाणवत असल्याने नुकतीच जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे; मात्र ठेकेदाराने मनमानीपणे व नियमानुसार काम न केल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या चैतीताई चिपाट, भारती धापशी, सुमन टोपले, मुक्ता जाधव, कमला दांडेकर, आंनदीताई आणि महिलांनी नुकतेच आंदोलन केले. या वेळी संतप्त महिलांनी सदर योजनेचा पाईप उखडून फेकून दिला. भिवंडी तालुक्यातील महिलांना एप्रिल, मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदादेखील आलखिवली, चिबिपाडा, पाये, मैदे, चाणे, चावे, डिघाशी, मोहंडूळ, राहूर, मालबिडी आदी दुर्गम भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजल पातळी कमालीची खाली गेल्याने विहिरीचे तळ दिसू लागले आहेत; तर विंधणविहिरीतही खडखडाट झाला आहे. सरकारने ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत; मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या योजनाचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराने पाये गावात केवळ अर्धा फूट टाकलेली जलवाहिनी नुकतीच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्त्यांनी उखडून फेकून दिली आहे. पायेप्रमाणेच संपूर्ण तालुक्यातील या योजनेचे पितळ उघडे पडले आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त महिलांनी भिवंडी तालुक्यातील अपूर्ण पाणी योजनांची शोध मोहीम श्रमजीवीचा नेतृत्वाखाली सुरू केली आहे. अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सागर देसक आणि सुनील लोणे यांनी दिली आहे.

सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचा दोनशेहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

ठाणे-  रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार सुधागड तालुक्यातील कासारवाडी, नवघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी कासारवाडी, जाधववाडी, नवघर, आसरे, फळसुंडे, धोंडिवली, नवघर बौध्दवाडी, आसरे बौद्धवाडी, उंबरवाडी आदिवासी वाडी गावातील सुमारे 208 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेेतला. 208 रुग्णांपैकी 7 रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त आढळले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी ठाण्यात डॉ. बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. सन 2000 सालापासून सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीकडून सेक्रेटरी अमित देशपांडे, युवा व्यवस्थापक मोहन तेलंग, माजी अध्यक्ष संग्राम जोशी, अर्चना जोशी, ठाणे शहरातील नावाजलेले शल्य विशारद व सुधागड भूषण डॉक्टर श्रीपाद बोडस, डॉ. नीता पाटील  व रोटरॅक्ट आणि इंट्रॅक्टर्स यांची टीम, व मेडिकल सर्जिकल नर्सेस सोसायटीमधून प्रिया शिंदे, बाबा कराळे, प्रिया तळगावकर आदींच्या टीमने लहान मुले मुली, तरुण मुले, मुली, महिला व पुरुष, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष यांची आरोग्य तपासणी करून विनामूल्य औषध उपचार करण्यात आले. संग्राम जोशी यांनी रुग्णांना विनामुल्य औषधे  उपलब्ध केली. तसेच या शिबिरासाठी प्रकल्प समन्वयक सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ, ठाणे समन्वयक बळीराम निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत लहाने, प्रचार व प्रसार कमिटी राजेश बामणे, अजय जाधव, भगवान तेलंगे, दत्ता सागळे, जाधववाडी गावचे दिनेश जाधव, कासारवाडी गावचे राजेश मांगले तसेच विशेष सहयोग कासारवाडी, जाधववाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, कासारवाडी, प्राथमिक रा.जि.प. शाळा कासारवाडी आदींचे सहकार्य लाभले.

नेहरू कला दालनात कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई : नेहरू सेंटर सर्क्युलर कलादालनात सहा ललित कलाकारांच्या एकत्रित कलाकृतींचे ‘अनंत’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ॲक्रेलिक व तैलरंगातील रचनात्मक कलाकृती इथे मांडण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास आपल्या कुशल कुंचल्यातून, शिवप्रेमींसाठी आकाश हाडवळे यांनी चितारला आहे. एक अनोखा कलाविष्कार बाबाजी कदम यांच्या चित्रांतून पाहायला मिळेल. निसर्ग व रुद्र अनुभव एका अनोख्या आकृतीबंधात, वेगळ्या पोतात राजय बोंगाळे हे सादर करत आहेत. गुढता हा कलेचा अविभाज्य भाग ही दिशा मिस्त्री हिच्या चित्रांची खासियत असून, ग्रामीण जीवनाची सफर मयूर पालकर यांच्या चित्रांतून घडून येते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित महत्त्वपूर्ण प्रसंग किरण होवाळ यांनी साकारले आहेत. कलादालनात आज  सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

आचारसंहितेच्या कचाट्यात शिष्यवृत्ती

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता लागू झालेल्या आचारसंहितेमुळे नवी मुंबई हद्दीतील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षाची शिष्यवृत्ती आता थेट पावसाळ्यात मिळणार आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका नवी मुंबईतील गरजू आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच चालू २०२४-२५ वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. धिम्या गतीने पडताळणी आणि कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे स्वःखर्चातून शहरातील विविध गरीब आणि गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या हद्दीतील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या रकमेचा लाभ मिळतो. त्याकरिता महापालिकेतर्फे दरवर्षी सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यांत शिष्यवृत्ती योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आणि पुरावे मागवले जातात. मात्र, २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच ऑनलाईन अर्जाद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु हा निर्णय उशिराने झाल्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उशिरा उपलब्ध झाले. त्यामुळे अर्ज उशिरा आल्यामुळे अर्ज भरण्यासही पालक व विद्यार्थ्यांकडून उशीर झाला. उशिरा आलेल्या अर्जांची छानणी व पडताळणी करण्यात वेळ गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना यावर्षी देण्यात येणार होता. महापालिकेकडे शिष्यवृत्तीकरिता ४० हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची अद्याप समाजविकास विभागस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकांकरिता आचारसंहिता घोषित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कर्तव्याकरिता नियुक्त करण्यात आले. समाजविकास विभागाचे बरेचसे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणी धिम्या गतीने सुरू आहे. तसेच आचारसंहितेमध्ये योजनेचा लाभ देता येत नाही, असे प्रशासनाने गृहित धरून ठेवल्यामुळे आता शिष्यवृत्तीचा लाभ थेट पावसाळ्यात होईल, अशी दाट शक्यता आहे. या घटकांना मिळते शिष्यवृत्ती – विधवा अथवा घटस्फोटीत महिलांच्या मुलांना – आर्थिक व दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना – मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना – महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना – महापालिकेतील आस्थापनेवरील व कंत्राटी सफाई कामगारांच्या मुलांना – शहरातील दगड खाण, बांधकाम, रेती आणि नाका कामगारांच्या मुलांना या योजनाही रखडल्या नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे शहरातील नागरिकांना वेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यापैकी कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या विधवा महिलेला २५ हजार रुपये, विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य ६५ हजार, मागासवर्गीय मुलींच्या विवाहासाठी अर्थसाह्य ५० हजार आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना अर्थसाह्य ५० हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, आचारसंहितेच्या आधी आलेल्या अर्जांवर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही न केल्यामुळे योजनेला पात्र असणाऱ्या नागरिकांचे शेकडो अर्ज विभागनिहाय रखडून पडले आहेत.

इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट कप स्पर्धेला श्रीलंकेत सुरुवात

भारतीय पुरुष व पुरुष मास्टर्स संघाची घोषणा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेवर स्पर्धा संचालक म्हणून हिरान डी मेल यांची निवड झाली आहे. हि स्पर्धा इनडोअर अरीना, ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, सिंगापूर असे तीन आशियायी देश व इंग्लंड सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा १८ एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जातील. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी धनुष भास्करची तर उप कर्णधारपदी दैविक रायची (दोघेही कर्नाटक) वर्णी लागली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबई, महाराष्ट्राच्या जयेश साळगावकरची निवड झाली आहे. जयेश साळगावकर याआधी सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. विजय गौडा, सुरज रेड्डी, अफरोज पाशा, कार्तिक सुब्रमनिअयन, एम. मल्लिकार्जुन, वैभव गुरुदत्त, अमरसिंग वर्मा, आशिक ख्रिस्त्य, जश जोशी व अधिराज जोहरी. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी झालेल्या वेगवेगळ्या निवड चाचणी स्पर्धांमधून निवड केले आहेत. पुरुष मास्टर्स गटाच्या (४०+) भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रसन्ना कुमार (कर्नाटक) तर उप कर्णधारपदी प्रशांत कारीया (महाराष्ट्र) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशांत कारीयाच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच भारताचे उपकर्णधार पद वाट्याला आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रकाश राठोड यांची निवड केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. नरेश खुराना, प्रो. चिरंथना नंजप्पा, अंशुल शर्मा, अभिषेक वेस्ली, केशव रेड्डी, समीर शाह, राकेश चव्हाण, गौरव कांबळी, झुबीन हकीम, डॉ. सुनील मूर्थी यांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय संघाची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेश (IISF) चे  अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी केली.

रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन झाले सक्रिय

मतदान जनजागृतीसाठी ठाणे : १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप (Sveep) जनजागृती कार्यक्रमांतर्गत ११ एप्रिलला त्यांच्या दालनात आयोजित बैठकीस नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.  नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनच्या प्रतिनिधींना 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आपल्यामार्फत मतदानासंदर्भात जनजागृती करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच असोसिएशन मार्फत जनजागृती करुन नागरिकांनाही मतदान करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येणार आहे.