Month: May 2024

ठाण्यात मतदारांची परवड, जबाबदार संबंधितांवर कारवाई करा – डॉ. संजय मंगला गोपाळ

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघातील  मतदान व्यवस्थेत अव्यवस्था,.ना पिण्याचे पाणी, ना पंखे, मतदारांच्या अंगावरुन वाहत होत्या घामाच्या धारा. मतदारांच्या या प्रचंड परवडीला जबाबदार संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघांतील ठाणे विधानसभा क्षेत्रातीलमतदारसंघात कोलशेत -ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स – बुथ क्र. ११७ ते १२० – उभारले होते. येथे सकाळी ७ः१५ ते ८ः४५ अशी दीड तास रांग लावल्यावर मतदार मतदान करू शकले. सर्व बुथ्सवर प्रचंड रांगा. बॅडमिंटन हॅालमध्ये ४ बुथ्सचे मिळून साधारणतः हजार एक स्त्री – पुरुष मतदार रांगेत उभे होते. तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस व आद्रतेमुळे जाणवत होतं ३९ डिग्री सेल्सियस. सर्व जण रांगेत उभे राहिल्यावर ५ च मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागे पर्यंत तासाभरात घामाची नखशिखांत आंघोळ! ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरीष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय.दुपारी तापमान ३८-३९ पर्यंत गेले होते.म्हणजे जाणवणारं तापमान ४५ डिग्री सेल्सियस होते. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड झाली होती. या परवडीला जबाबदार अधिकार्‍यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करावी अशी मागणी डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

कळवा- मुंब्रा परिसरात मतदान प्रक्रिया संथ, व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची घटना घडल्याचा दावा !

जितेंद्र आव्हाड यांची संबंधितांवर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभा अंतर्गत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्र्यातील बाबाजी पाटील शाळेत अतिशय संथगतीने मतदान सुरु असल्याचे दिसून आले. यामुळे एकाच जागेवर दोन दोन तास रांगेत मतदार उभे असलेले आढळून आले. तर अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटनाही घडल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर मतदारांनी व स्थानिक आमदार डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. कल्याण लोकसभा मतदार संघाअंतर्गत  मुंब्रा – कळवा विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २४३ या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT)  मशीन बंद पडलेल्या आहेत, अशा स्वरुपाच्या सकाळी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेवून अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून खातरजमा केली असता व्हीव्हीपॅट (VVPAT) बंद पडल्याची बाब आढळून आली  नाही. सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच इतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदान सुरळीत सुरू होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली असून सदरच्या रांगा आटोक्यात आणल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू  होते. सर्व झोनल अधिकारी व केंद्राध्यक्षांना मतदानाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या असून १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान व्यवस्थितरित्या सुरू असल्याचे अतिरिक्त सहायक  निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी नमूद  केले.

काजल आणि फहिमला अंतिम जेतेपद

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या फहिम काझीने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ०-२५, २०-१०, २५-११ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तर दुसरीकडे आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लबच्या रिंकी कुमारीचा २५-१, २५-१३ असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्यांना लोकमान्य मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, लोकमान्य नगरचे कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष केतन चिखले, मानद सरचिटणीस अरुण केदार व सहसचिव संजय बर्वे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुष एकेरी गटाचे उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) ५-२३, १८-१७, १९-५ फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ) २५-८, ०-२५, २५-१२ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) २०-२, २५-० रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लब ) वि वि अंबिका हरिथ ( रिझर्व्ह बँक )  ०-२५, १९-१४, २२-०

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप ग्रामपंचायतमधील बोण्डरपाडा, भेरेपाडा, दापूर, माळ कातकरीवाडी येथील मतदारांची नावे इतर वाड्यांमधील केंद्रांवर गेल्याने मतदारांची गैरसोय झाली; मात्र मतदारांनी रखरखत्या उन्हात मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला. मतदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याने पुढील निवडणुकीतही अशीच व्यवस्था असल्यास मतदान करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पुढील निवडणुकीसाठी नवीन सर्वेक्षण करून मतदारयाद्यांची छाननी करावी. मतदार राहत असलेल्या ठिकाणची खात्री करून मतदारयाद्या तयार कराव्यात, अशी मागणी उपसरपंच अजय कथोरे यांनी केली आहे.

मतदान केंद्रावर संस्कृती, परंपरांचा जागर

कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे दर्शन घडवण्यात आले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांनी विविध मतदान केंद्रे तयार केली. मतदानाचा टक्का वाढावा, तसेच मतदारांना आकर्षित केले जाईल, अशी मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्याची संस्कृती, परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला. डहाणूतील मल्याण मतदान केंद्रात वारली चित्र रेखाटन, चिखला येथील शाळेतील मतदान केंद्रात कोळी मतदान केंद्र, गटसदन केंद्र डहाणू येथे युवा व्यवस्थापित केंद्र, मॉडल हायस्कूल मसोली येथे आदिवासी पारंपरिक मतदान केंद्र, तर वाकी ब्राह्मण पाडा येथे सक्षम मतदान केंद्र, नंदारे येथे सखी मतदान केंद्र उभारले होते. यामुळे येथील संस्कृती, परंपरा जपल्या जातील आणि मतदारांना आकर्षित करून मतदानाचा टक्कादेखील वाढला जाईल, यासाठी ही मतदान केंद्रे उभारली आहेत.

जंजिरा किल्‍ला २६ मेपासून बंद

मुरूड :- साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला जंजिरा किल्ला कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गांपैकी एक असून वास्तूशिल्पाचा अजोड नमुना आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्‌यात किल्‍ल्‍यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. यंदा २६…

नालासोपारा मतदारसंघातील तब्बल ‘इतके’ लाख मतदार गायब

निकालावर होणार थेट परिणाम विरार : नालासोपारा व बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. यात नालासोपारा मतदारसंघातून 1,09,069 तर, बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55,332 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. ही नावे जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर वगळण्यात आली आहेत. त्यामुळे 2024 च्या पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक प्रशासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत आहे, असे मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, मतदानापासून वंचित राहिलेल्या शेकडो मतदात्यांनीही याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 2019 साली नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या 5,12,425 इतकी होती. 2024 मध्ये यातील 1,09,069 नावे काढून टाकण्यात आली आहेत. 2024 मध्ये 5,57,547 इतकी मतदारांची नोंद आहे. या वर्षी यात 1,53719 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. बोईसर मतदारसंघात 2019 साली 3,14,213 इतकी मतदारसंख्या होती. त्यापैकी 55,332 इतकी नावे या वर्षी काढून टाकण्यात आलेली आहेत. तर, 2024 मध्ये बोईसर मतदारसंघातील मतदारसंख्या 3,84,201 इतकी नोंदवण्यात आलेली आहे. यात या वर्षी 1,26,245 इतके मतदार वाढलेले आहे, असे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. मात्र, या याद्या मागील वर्षीच्या तुलनेत या वेळी जास्तच सदोष आहेत. त्यामुळे या वर्षी तब्बल दीड लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. याचा थेट प्रभाव मतदान टक्केवारी आणि निकालावर होणार आहे. निवडणूक यंत्रणाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. मतदारयादीत प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जात नाही. त्यांच्या सूचना अथवा मार्गदर्शन घेतले जात नाही. सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सी अथवा शासकीय कर्मचारी यांच्या मार्फत सर्व्हे करून या याद्या तयार केल्या जातात. त्यामुळे मतदाराची निश्चित माहिती त्यांना प्राप्त होत नाही. याचे परिणाम म्हणून त्रोटक माहितीआधारे ही नावे वगळण्यात किंवा काढून टाकण्यात येतात. मतदार याद्या निर्दोष बनवायच्या तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा त्यातील सहभाग वाढविला गेला पाहिजे, असे मतही बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, नालासोपारा व बोईसर मतदारसंघातून गावनिहाय काढून टाकण्यात आलेल्या मतदारांची संख्याही बहुजन विकास आघाडीने समोर आणली आहे. विशेष म्हणजे या मतदारांनी मागील वर्षी मतदान केले होते. मात्र, त्यांची नावे आता या यादीत नाहीत. शिवाय एकाच कुटुंबातील काही व्यक्तींची नावे सापडत असतील तर इतरांची सापडत नसल्याच्या मतदात्यांच्या तक्रारी आहेत. पतीचे नाव असेल; तर त्याच्या पत्नीचे नाव सापडत नव्हते. मृत व्यक्तीचे नाव यादीत सापडत होते; पण जिवंत व्यक्तीचे नाव सापडत नव्हते. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघांतील बहुतांश मतदार मदत कक्षांबाहेर मतदात्यांच्या संतप्त प्रतिक्रया उमटताना दिसत होत्या. या मतदार यादी ज्यांच्यामार्फत व ज्यांच्या माध्यमातून बनविण्यात आल्या; त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या मतदात्यांनी लावून धरली आहे. विशेष करून यात मराठी व्यक्तींची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात आली आहेत, असे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

यादीत नावच सापडत नसल्याने मतदार हैराण

डोंबिवली, : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते; मात्र अनेक ठिकाणी मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.…

मिरा-भाईंदरमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत ३७.५६ टक्के मतदान झाले होते. सकाळी पहिल्या तासात मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली.…

नववधूसारखे सजले मतदान केंद्र

ठाणे : ठाण्यातील सखी मतदान केंद्र हे नववधूसारखे सजविण्यात आले होते. आकर्षक फुग्यांच्या कमानीने तर लाल, हिरवी मॅट अंथरली होती. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढले तसेच इतरांना मतदानासाठी समाजमाध्यमांवरून आवाहन केले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर ‘सुस्वागतम्’ असे लिहिलेल्या कमानी उभारल्या होत्या. महिलांसाठी बैठक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करत होत्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारली होती. त्यावर आम्ही ‘मी मतदान केलं तुम्ही केलं का?’, असे वाक्य ठळकपणे लिहिले गेले होते. सेल्फी काऊंटर फुग्यांनी सजविले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारीदेखील घेण्यात आली होती. तर काही केंद्रांवरील असुविधांबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ३३२ येथे युवा मतदार केंद्रात सेल्फी स्टॅन्ड उपलब्ध नव्हता. तर ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ४३९ या ठिकाणी मतदारांनी गर्दी केली आहे; मात्र पिण्यासाठी पाणी व पंख्याची सोय नसल्याने गर्मीने काही मतदार वैतागून मत न देता मागे फिरल्याचे चित्र दिसले. गुलाबी वस्त्र परिधान महिलांना निर्भय मतदान करता यावे, यासाठी सखी मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होते. सखी या केंद्रावरील कर्मचारी महिलांनी खास गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते.