Month: May 2024

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार, 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा

‘मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..’

मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला! डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मतदारांची मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. उन्हाच्या तीव्र झळा, त्यात नाव भेटत नसल्याने नागरिक हैराण होते. मतदान केलं नाही तर पगार कापला जाण्याची भीती, तसेच काहींचे पहिलेच मतदान असून त्यांना ते करता न आल्याने मतदारांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदान केंद्रावर (Dombivli Polling Station) मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदार याद्यांचा घोळ पाहता भर उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडले. नाव सापडत नसल्याने मतदार गोंधळून गेले आहेत. राजकीय पक्ष, नगरसेवक यांनी मतदारांची नावे शोधण्यासाठी बुथ लावले आहेत. दुपारच्या वेळी मतदारसंघात मतदान केंद्राऐवजी राजकीय पक्षाच्या बुथवर मतदारांची झुंबड उडाली होती. मात्र, नाव न सापडत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून 5 वर्षे सतत काम केले पाहिजे. तरच हा गोंधळ पुढे होणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली. पगार कापला जाण्याची भीती विशेष म्हणजे, मतदान न केल्यास तीन दिवसांचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची यादीत नावेच नसल्याने हे मतदार रडकुंडीला आले आहेत. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाहीये इतकं तरी लिहून द्यावं, अशी याचना ते करत आहेत. आमचा हक्क आहे, आम्हाला आजच मतदान करायचं आहे, अन्यथा आमचा पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न नोकरदार करत होते. आमच्या घरात एकूण 9 ते 10 मतदार आहेत. यातील 2 जणांची केवळ नाव मतदार यादीत आली. बाकी सर्वांची नावे नाहीत. आम्हाला के.सी.गांधी येथे जाऊन 17 नंबरचा फॉर्म भरून घेऊन या, मग मतदान करता येईल असं सांगितलं. तिथे गेल्यावर असा कोणता फॉर्म नाही तुम्हाला मतदान करता येणार नाही असं सांगितलं गेलं. माझे वडील 85 वर्षाचे आहेत. दरवेळी ते मतदान करतात. आताच नाव कसे त्यांचे कट झाले. म्हणजे आम्ही मतदान करायचंच नाही का? असा सवाल डोंबिवलीतील राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

मोखाड्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यंत्रणा मात्र संथ; दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला मोखाडा : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोखाड्यात मतदारांनी सकाळ पासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. मात्र, मतदान करताना, मतदान यंत्र संथ गतीने चालत असल्याने, मतदानासाठी ऊशीर होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत होत्या. तर दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मोखाडा तालुक्यात एकुण 77 मतदान केंद्र आहेत. तर 59  हजार 358 मतदार आहेत. सकाळपासून तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी, मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र, यंत्रणा संथ गतीने काम करत असल्याने, एका मतदानासाठी 5 ते 10 मिनिटे लागत असल्याच्या तक्रारी आमदारांकडून आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना केंद्राबाहेर वाट पहावी लागत होती. विशेषतः महिला व वृध्द मतदारांनी वाट पाहून घरची वाट धरली. दुपारनंतर ऊन्हाची तिव्रता कमी झाल्याने, मतदार पुन्हा मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याची दिसून आली आहे. तालुक्यातील वाशिंद – दुधगाव मतदान केंद्रावर मतदानाच्या आकडेवारीत फरक आढळून आल्याने, मतदान अर्धा ते एक तास बंद करण्यात आल्याची माहिती मतदान केंद्राध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे. मात्र, त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे. तर एका मतदानासाठी 10  मिनिटे लागत असल्याने, मतदारांमध्ये नाराजी असल्याचे संजय मांगे या मतदाराने सांगितले.

मतदानाचा हक्क बजावणे झाले शक्य

मतदानाच्या दिवशी नवमतदारांना मिळाले मतदार ओळखपत्र मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात मतदान सुरू झाले. मात्र निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र न मिळाल्याने अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला. परंतु पोस्टमन सोमवारी सकाळी मतदार ओळखपत्र घेऊन घरी पोहोचल्यामुळे बहुसंख्य नवमतदारांना सोमवारी मतदानाचा हक्क बजावता आला. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी बहुसंख्य नवमतदारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या नवमतदारांना निवडणुकीपूर्वी ते मिळू शकले नाही. मतदानाचा दिवस उजाडला तरी ओळखपत्र न मिळाल्याने नवमतदारांचा हिरमोड झाला होता. मात्र अनेक नवमतदारांचे मतदान ओळखपत्र मंगळवारी सकाळी ७ ते ११ च्या सुमारास टपाल कार्यालयामार्फत घरपोच करण्यात आले. त्यामुळे या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावता आला. मतदार ओळखपत्र मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नाव नोंदणी केली होती. काही दिवसांपूर्वी मला माझा ईपीआयसी क्रमांक मिळाला. मात्र मतदार ओळखपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही असेच वाटले होते. परंतु टपाल कार्यालयाने सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मतदान ओळखपत्र घरपोच केले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क बजावता आला, असे नवमतदार आकांक्षा सकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. निवडणूक आयोगाकडून टपाल कार्यालयांना प्राप्त झालेली मतदार ओळखपत्र २० मे रोजी दुपारी १२ पर्यंत मतदारांना सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार टपाल कार्यालयाला उपलब्ध झालेली नवमतदारांची मतदार ओळखपत्रे सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत, असे पोस्टमन दिनेश धाके यांनी सांगितले.

ऐन मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाने

ठाणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने मतदार मतदानासाठी बाहेर उतरला असतानाच मध्य रेल्वेने मतदानाच्या दिवशी रेल्वेची वाहतूक सुट्टीच्या वेळापत्रकाने सुरू केली आहे. पूर्वी मुंबईत राहणारे अनेक रहिवासी ठाणे किंवा त्यापल्याड राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे मतदान मुंबई तसेच उपनगरात असते. परंतु मध्य रेल्वेचे वेळापत्रक रविवारच्या दिवसाचे असल्याने या मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झाले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरीही काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत असते. तसेच गेल्या काही वर्षांपासून मुंबई तसेच उपनगरात राहणारा मतदार पुनर्विकास तसेच राहण्यास स्वस्त पर्याय म्हणून ठाणेपल्याड राहण्यासाठी गेला आहे. यातील अनेकांचे मतदान हे त्यांच्या पूर्वीच्या वास्तव्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे मतदार देखील मतदानाच्या दिवशी बाहेर पडू लागले आहेत. अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना मतदान केल्यानंतर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जावे लागते. असे असतानाच मध्य रेल्वेने सोमवारी सुट्टीच्या म्हणजेच रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू केली आहे. त्याचा परिणाम मतदारांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक होत असल्याने रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा करत या मतदारांना स्टेशन परिसरात थांबावे लागत आहे.

भिवंडीत सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मतदानापासून वंचित

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण शहापूर मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये मतदानाच्या दिवशी घोळ दिसला. भिवंडीतील ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या वडघर येथे ८३ वर्षाचे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांचे नाव मतदार यादीतून गहाळ करण्यात आले आहे. मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यामुळे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. मोतीराम जाणू जाधव असे मतदानापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव असून मतदार यादीत त्यांचे नाव गहाळ झाल्याने आज ते मतदानापासून वंचित राहिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे आज मला मतदानाचा हक्क बजावता आला नाही, मतदार यादीतून अचानक माझे नाव कसे गायब झाले याची चौकशी होऊन यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मोतीराम जाधव यांनी केली आहे.

रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः  धावून गेले. आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटूंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्याना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्याना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ त्याना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.

ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : ठाण्यातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यानेच या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा दावाही त्यांनी केला. सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र विद्यालय येथे मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. मी ज्या शाळेत मतदान करायला आलो त्याच ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे येथील बाजूला असलेल्या सेंट जॉन शाळेत गेलेल्या एका मतदाराने सुध्दा बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. भरत दामजी बव्वा हे आपल्या पत्नी सोबत मतदान करण्यासाठी आले असता त्यांच्या नावा समोर अधिच मतदान झाले असल्याची टिक दिसून आली. म्हणून त्यांनी याचा जाब विचारला असता तुमचे आधीच मतदान झाले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मी त्यांना मतदान ओळखपत्र, आधारकार्ड दाखवले मात्र, तरी सुद्धा तुमचे मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माझ्या नावावर कोणी बोगस मतदान केले असा सवाल त्यांनी केला. ठाण्यात बोगस मतदानाचा सुळसुळाट मतदारांनी मतदार केंद्रावर जाऊन टेंडर वोट करण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर ,धर्मवीर आनंद दिघे व भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन चरई येथील सेंट जॉन शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रावर सकाळी लवकर बोगस मतदान झालेले आहे. मतदार राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळतं की आपल्या नावाचं मतदान दुसऱ्यांनी केलं आहे. यासाठी आपला मतदानाचा हक्क वाया घालवू नका आपले मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने १७ नंबर चा फॉर्म भरून पोस्टल बॅलेट द्वारे टेंडर वोट करून घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजन विचारे यांनी मतदारांना केले आहे. मुख्यमंत्र्याना प्रत्यूत्तर कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो, असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाही. ते 50 जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातून देखील घेतील त्यांचा काय भरोसा,  असं देखील आव्हाड म्हणाले. बोगस मतदान असल्याचा गंभीर आरोप ठाण्यात बोगस मतदान जोरदार सुरू आहे, शासकीय यंत्रणा हाताशी धरलेल्या आहेत, जिथे त्यांना मतदान कमी होणार आहे तिथे मशीन त्यांनी स्लो केल्या जातं आहेत.

कपिल पाटील यांचे कुटुंबियांसह दिवेअंजुर येथे मतदान

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिवेअंजुर गावातील प्राथमिक शाळेतील बूथ क्र. ३१८ मध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिवेअंजुर येथील गावात कपिल पाटील यांनी कुटुंबियांसह सकाळी सव्वासातच्या सुमारास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांचे पत्नी सौ. मीनल यांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी श्री शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. वडील स्व. मोरेश्वर पाटील, भाऊ स्व. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रतिमांना वंदन करून आशीर्वाद घेतले. देशहित व राष्ट्रहितासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता मतदारांनी मतदानाचा हक्क बजाावावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले होते.

पत्रकार संघर्ष  समितीची मागणी

बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवरवर करवाई करण्याची पनवेल : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज  दुर्घटनेची घटना पनवेल महापालिका हद्दीत होऊ नये याकरिता , पनवेल महानगर पालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डींज ,मोबाईल टॉवर तातडीने काढण्याचे  आदेश द्यावेत  अशा आशयाचे निवेदन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल महापालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे दिले आहे. , होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना ,अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे याला मुख्य कारण म्हणजे स्थैर्यता प्रमाण पत्र नसणे , तज्ज्ञांकडून होर्डिंग्ज चे डिझाईन न करणे ,वेळोवेळी त्या होर्डिंग्ज ची  न तपासणी करणे ,स्ट्रॅकचर  ऑडिट न  करणे  तसेच बाह्य जाहिराती करताना उभारलेले होर्डिंग्ज यांचे आकार मर्यादित नसणे त्या भागातील वाहणारे  पावसाळी वादळ वारे यांचा आढावा घेऊन आकार ठरवून न देणे  अशी विविध करणे अपघातास कारणीभूत असून यामुळे  निरपराध नागरिकांचे नाहक बळी जात आहेत . या निवेदनाद्वारे अशी विनंती करणेत येत आहे कि १)  पनवेल महापालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश आपल्या स्तरावर द्यावेत , २) महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मोबाइलला टॉवर तातडीने काढावेत ,३) ब्युरो ऑफ  इंडियन स्टॅंडर्ड या राष्ट्रीयकृत  जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारे परवाना धारक होर्डिंग्ज ची तपासणी करावी त्यात  तफावत   असल्यास ते होर्डिंग्ज हि तातडीने काढण्यात यावेत ,४)स्टॅबिलिटी  सर्टिफिकेट महापालिका अभयंत्याकडून तपासून घेण्यात यावेत अथवा महापालिका अभियंत्यांकडून  फेर तपासणी करावी तसा अहवाल सादर करून ठेवावा दुर्घटना घडल्यास महापालिका अभियंत्यांवर हि कारवाई करावी  ५)ज्या होर्डिंग्ज ला महापालिकेने परवानगी  दिली आहे त्या होर्डिंग्ज ची दरवर्षी / वेळोवेळी डागडुजी करणे परवानाधारकाला बंधनकारक करावे ,कुठे वेल्डिंग निखळली  असेल , कुठे बेसमेंट जवळ अनेक वेळा खोदकाम होते ,सिमेंट निघते ती दुरुस्त करण्याच्या सूचना द्यावेत ,५ ) पनवेल महापालिका हद्दीत डिजिटल  जाहिरात  फलक लावण्यात आले आहेत  असे डिजिटल फलक वाहनधारकांचे आणि नागरिकांचे विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरत आहेत अशा फलकाचे जाहिरात धोरण ठरवुन त्यांना हि यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देष द्यावेत   ६ ) ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारल्या आहेत त्या इसमांवर फोजदारी कारवाई करावी तसेच उभारलेली होर्डिंग काढण्याचा खर्च वसूल  करण्यात यावा . अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेला दिले आहे.