Month: June 2024

योग दररोज करा, निरोगी रहा-गोविंद बोडके

पालघर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शुभेच्छा देऊन योग एक दिवस न करता दररोज करा व निरोगी रहा असा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी, लायन्स क्लब ऑफ पालघरच्या सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र) संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो यामुळे त्यांना प्रेरणा मिळते नेमकी ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित साधत जिल्ह्यातील साधारण अडीच ते तीन हजार पेक्षा अधिक शाळांमधील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी योग दिना मध्ये उत्साहात सहभाग घेतला . असे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर, इनरव्हील क्लब ऑफ पालघर व प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील लायन्स क्लब सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामधील शाळा,महाविद्यालय विविध कंपन्या व विविध संघटनांमार्फत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली योगाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे शालेय विद्यार्थी करतील आणि त्यांच्या पालकांना सुद्धा योगासनाचे धडे देतील हा या मागच्या उद्देश होता.

राजकीय नेत्यांशी संबंध जपवणूक करणे  राजनीती नाही, ‘वसंत निती’ -प्रबोध डावखरे

ठाणे : सध्या ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकी  पूर्वीपासूनच वातावरण राजकीय झालेले होते. लोकसभा निवडणुकीचा  निकाल लागल्यानंतर लगेच पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली  आहे.  राजनीतीमय वादळात स्व. वसंत डावखरे यांचे…

मज्जा मानसशास्त्र यशाचा पाया आहे-रमेश पानसे

ठाणे : १९५२ ते १९६२ या शाळकरी वयात मी ‘ठाणेकर’ होतो. पण आज आयुष्याचा ८५ व्या वर्षी सिंहावलीकन करताना माझ्या शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि शिक्षण म्हणून यशाची पायाभरणी श्री. हुनुमान व्यायामशाळेच्या या सोनेरी दशकातच झाली. बुध्दीला खेळाने उर्जा देता येते आणि ८ तासा झाेप ही बुध्दीमत्तेची सख्खी बहिण आहे. असा माझा विष्कर्ष आहे. पण त्यासाठी क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा बुहुविध आघड्यांवर एकाचवेळी कार्यरत असणाऱ्या शताब्दीपूर्ती करणाऱ्या श्री. हनुमान व्यायामशाळांसारख्या संस्थांनी मज्जा मानसशास्त्र अभ्यासायला हवे करण मज्जा मानसशास्त्र हा यशाचा पाया आहे. असे बोध्ाप्रज विचार प्रा. रमेश पानसे यांनी व्यक्त केले. श्री. समर्थ  सेवक मंडळ, ठाणे संचालित श्री. हनुमान व्यायामशाळेच्या शिव दौलत सभाग्रहात संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ सोहळा शनिवारी सायंकाळी संप्ान्न झाला. त्या प्रसंगी बालशिक्षण महर्षी प्रा. रमेश पानसे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. प्रारंभी ध्वजवंदन करण्यांत आले तर बाल भवनाच्या चिमुरड्यांनी स्वागत केले. ४२ ते ८४ वर्षे वयोगटाच्या जेष्ठांनी मार्च पास्ट सादर केला. श्री. हनुमान व्यायामशाळा शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष पुंडलिक खामकर यांनी प्रास्ताविक केले. शताब्दी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष उल्हास प्रधान, कार्याध्यक्ष संजीव हजारे, समिती कार्यवाहक सविता कळसे व्यासपीठावर उपस्थित होते. मिलिंद वैद्य यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दिलीप वाघोलीकर व ८५ वर्षीय विलास शिरोडकर यांनी कविता सादर केल्या. विख्यात खो-खो प्रशिक्षक राजेंद्र साप्ते व शातायुषी सेवाभावी श्री आनंद भारती समाज ठाणे यांच्या शुभसंदेशांचे वाचन करण्यांत आले. महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष गिरीश लेले यांनी ऋणनिर्देश केले तर समितीचे खजिनदार डॉ. चैतन्य साठे यांनी नेटके सुत्रसंचालन केले.

रायगडच्या लिफ्टर गायत्री, अमृताचे यश

मुंबई : पटियाला (पंजाब ) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय इक्विप स्पर्धेत रायगडच्या युवा लिफ्टर गायत्री महेश बडेकर आणि अमृता ज्ञानेश्वर भगत या दोघींनी शानदार कामगिरी केली. सब ज्युनिअर महिला ४३ किलो वजनी गटात गायत्रीने स्कॉट, बेंच प्रेस व डेडलिफ्ट या प्रकारात २५५ किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले. त्याचबरोबर स्कॉट व डेडलीफ्ट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले. कर्जत येथील  जे. व्हीं. आर. जिममध्ये गायत्री सराव करते. तिला हनुमंत खरात यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच राष्ट्रीय  ज्युनिअर इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या अमृताने रौप्य पदक मिळवले. तिने स्कॉट, बेंचप्रेस आणि डेडलीफ्ट या प्रकारात एकूण ३१७.५ किलो वजन उचलले. या अगोदर राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत देखील अमृता ला रौप्य पदक मिळाले होते. पॉवर हाऊस क्लबचे (खोपोली) संचालक विक्रांत गायकवाड आणि अरुण पाटकर या दोघांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे. गायत्री आणि अमृताने मिळवलेल्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या दोघींचे खास अभिनंदन केले असून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ००००

ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगकडून ऑलिम्पिक पदकाचे पूजन

पुणे ः पुण्यातील ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगच्या वतीने ऑलिम्पिक पदक पूजन व परिसंवादव्दारे  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाणेर ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रात 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये पुण्याचे बाबू निमल यांनी जिंकलेल्या ऑलिम्पिक पदक पूजन करून ऑलिम्पिक दिन समारंभाची सुरूवात झाली. याप्रसंगी भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांनी आपली ऑलिम्पिक यशोगाथा सांगितली.  खेळाडूंसाठी मनाच्या शक्तीसाठी राजयोग ध्यान व सकारात्मक विचार या विषयावर बीके रितू ठक्कर, माऊटआबू येथील स्पोर्ट्स विंगचे बीके आदिती, बीके जगबीर यांची खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी उपसंचालक सुहास पाटील, भाग्यश्री बिले, क्रीडा संघटक अजीत निमल,  दत्तात्रय कळमकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मनाची शक्तीव्दारे खेळाडूंना यशाकडे मार्गस्थ कसे व्हावे याचे राजयोग ध्यानाव्दारे मार्गदर्शन करीत बीके आदिती म्हणाले की, सकारात्मक जीवनशैली खेळाडूना यशाचा राजमार्ग गवसेल. ध्यानाच्या मनाच्या शक्तीव्दारे आपले खेळाडू राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील. पुण्यातील 210 राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पदकविजेत्यांसह शिवछत्रपती क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू सहभागी घेतला होता. कार्यक्रमात जिम्नॉस्टिक्सची प्रात्यक्षिके उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रीय पदक विेजेते क्रीडापटू काजल माने, अक्षय जाधव, क्रीडा मार्गदर्शक संजोग ढोले, धीरज मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले. ऑलिम्पिक दिननिमित्त पुण्यात खेळाडूंसाठी प्रथमच निशुल्क ध्यान व मोटिव्हिशनल कॉन्सलिंग केंद्राचे उद्घाटन   ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ुण्यातील खेळाडूंना रोज संध्याकाळी 6 ते 8 यावेळात या केंद्रात मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक ब्रम्हाकुमारीज बाणेर केंद्राच्या प्रमुख बीके त्रिवेणी यांनी केले. सूत्रसंचालनाचे काम बीके शुभांगी यांनी केले. 0000

ज्यांचे महाराष्ट्राने प्रत्येक निवडणुकीत कपडे उतरवले आहेत, ते उद्धव साहेबांचे कपडे काय उतरवणार ? –  संजय घाडीगावकर

ठाणे : ज्यांचे महाराष्ट्राने प्रत्येक निवडणुकीत कपडे उतरवले आहेत ते उद्धव साहेबांचे कपडे काय उतरवणार ? असा सणसणीत  टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी ठाणे मनसेच्या नेत्यांना लगावला आहे. ठाणे मनसेच्या नेत्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांचे विरोधात बॅनर लावल्यानंतर संजय घाडीगावकर आक्रमक झाले असून त्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. यामध्ये घाडीगावकर यांनी म्हटले आहे की,मनसे स्थापन झाल्यापासून त्यांचा रडीचा डाव सुरू आहे. उद्धव साहेबांवर खार खाऊन केवळ उद्धव ठाकरेंना  राजकारणात टार्गेट करण्यासाठीच हा पक्ष स्थापन झाला आहे का अशी शंका येते. बिन शर्ट पाठिंबा देणारे महाराष्ट्रावर आक्रमण होताना गप्प राहतात  आणि उद्धव साहेबांना मात्र टार्गेट करतात… भाजप मिंधे गट ही गिधाडे बनून जेव्हा मातोश्रीवर हल्लाबोल करतात तेव्हा दुर्दैवाने बिनशर्ट  वाले सुद्धा त्या गिधाडांच्या टोळीत सामील होतात. ज्यांचे बाळासाहेबांनी हयात असताना नकली म्हणून कपडे उतरवले आहेत… ते उद्धव साहेबांचे कपडे या निवडणुकीत काय उतरवणार ?महाराष्ट्राने प्रत्येक निवडणुकीत बिनशर्ट वाल्यांना उघडे पाडले आहे. तुमच्याकडे पक्ष होता, चिन्ह होत तरी तुम्ही एकही उमेदवार उभा केला नाही केवळ उद्धव साहेबांचे उमेदवार पाडण्यासाठी मिंधे आणि भाजपला बिनशर्ट पाठिंबा दिला. उद्धव साहेबांचा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलेले असतानाही त्यांनी 9 खासदार निवडून आणले… खरं तर त्यांनी भाजप आणि टोळीच्या नाकी नऊ आणले आहेत… ओरिजनल ठाकरे ब्रँड उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे घाडीगावकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. –0000

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ठाण्यात सुरु करणार 21 मोफत अभ्यासिका

जिजाऊ परिवारातील सदस्य काश्वी पडवळे हिच्या वाढदिवसानिमित्त  स्तुत्य उपक्रम   ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने ठाणे शहर विभाग अंतर्गत गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने मोफत अभ्यासिका विविध ठिकाणी चालवल्या जात आहेत . ठाणे येथील येऊर या ठिकाणी तसेच ठाणे येथील कोपरी परिसरात असणार्‍या कचर्‍याच्या भल्यामोठ्या डोंगराच्या पायथ्याशी दुर्गावाडी या नावाने कचरा वेचकांची वस्ती वसलेली या ठिकाणी देखील ही मोफत अभ्यासिका चालवली जाते. ठाण्यात या आधीच संस्थेच्या  एकूण 11 ठिकाणी अभ्यासिका चालू करण्यात आल्या होत्या. अशाच प्रकारच्या 21 मोफत अभ्यासिका यावर्षी देखील ठाणे शहरात विविध ठिकाणी चालू करण्यात येणार आहेत. जिजाऊ परिवारातील सदस्य काश्वी पडवळे हिच्या वाढदिवसानिमित्त  जिजाऊ संस्था हा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याची माहिती जिजाऊ संस्थेच्या वतीने देण्यात आली. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली 15 वर्ष शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या मुद्यांवर  ठाणे, पालघर,  रायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात कार्य करत आहे.  जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्व:खर्चाने संस्थेचे सर्व  उपक्रम समाजासाठी अगदी मोफत राबवत आहेत.  मोफत अभ्यासिका हा जिजाऊ संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकीच एक उपक्रम असून ठाणे शहरातील सर्व झोपडपट्टी विभागात राहणार्‍या गरीब विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासाचा जास्तीत जास्त सराव  करून घेऊन  व त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी  संस्थेच्यावतीने प्रयत्न केले जातात.  या वस्तीत असणार्‍या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास तसेच भविष्यात होणार्‍या शालेय स्तरीय व पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी होणार्‍या स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आतापासून आवश्यक त्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरवात करावी त्यांची गुणवत्ता वाढीस लागावी जेणेकरून ही आर्थिक दुर्बल, दुर्लक्षित घटकातील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात मागे पडणार नाही या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था विविध शैक्षणिक उपक्रमही राबवत आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे  तसेच संस्थेचे संपूर्ण सहकारी अगदी तळमळीने या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांच्या उज्वल भविष्याच्या आशा नव्याने पल्लवीत झाल्या आहेत. यांसह इतर अनेक मुलांच्या शिक्षणाची पाऊलवाट जिजाऊ संस्था सुखकर करत आहे.  इथे दहावीपर्यंतचे शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथील सीबीएसई शाळेत  नेण्याचे नियोजन देखील संस्थेच्या वतीने चालू आहेत. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांना भविष्यात अधिकारी बनवण्याचे संस्थेचे स्वप्न आहे . कचर्‍यावरच्या शाळेतल्या होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना जेईई-नीट  व इतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एक चांगल्या करिअरचा ग्राफ निर्माण करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत . या आधी मागील वर्षी संस्थेच्या वतीने  ठाण्यातील डम्पिंग ग्राऊंड, महात्मा फुले नगर, परेरा नगर, भीम नगर, येऊर, कौसा मुंब्रा, दिवा, इंदिरानगर, भोला नगर अश्या 11 ठिकाणी अभ्यासिका चालू करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी  21 अभ्यासिका नव्याने ठाणे शहरात सुरु होत आहेत. झोपडपट्टीत राहणार्‍या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने सक्षम करण्याचा ध्यास जिजाऊ संस्थेने घेतला आहे.

फाउंटन हॉटेल ते गायमुख रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण- प्रताप सरनाईक

ठाणे, मीरा भाईंदर हद्दीवरील ‘फाउंटन हॉटेल ते गायमुख’ पर्यंत भविष्याचा विचार करून रस्ता दुप्पट रुंद होणार आहे. हा रस्ता ६० मीटर रुंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्य केली आहे. त्यानुसार काल या रस्त्याच्या साईट वर जाऊन आमदार सरनाईक , मीरा भाईंदर आयुक्त व एम एम आर डी ए अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. एम. एम. आर. डी. ए. च्या माध्यमातून हा रस्ता विकसित केला जाणार असून पाहणी नंतर मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अहवाल दिला जाणार असून सर्व प्रक्रिया करून पावसाळ्या नंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हे रस्ता रुंदीकरण होत असताना त्याच्या मधोमध डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. गायमुख ते फाउंटन हॉटेल म्हणजेच काशीमीरा पर्यंत मेट्रो आधीच मंजूर झाली आहे. त्यामुळे या मार्गावर डबलडेकर पूल असेल आणि वरून मेट्रो धावेल आणि खालून वाहने जाण्यासाठीचा पूल असणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. ठाणे घोडबंदर भाईंदर या रस्त्यावर ट्राफिकचे प्रमाण वाढत असून भविष्याची गरज लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. फाऊंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत रस्ता सध्या ३० मीटर इतका आहे. सध्याची व भविष्याची गरज ओळखून हा रास्ता दुप्पट म्हणजे ६० मीटर इतका रुंद केला जावा अशी आमदार सरनाईक यांची मागणी आहे. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करून mmrda ने हे रस्ता रुंदीकरणाचे काम करावे , पाहणी करून रस्त्याच्या कामाचे खर्चाचे अंदाजपत्रक आणि अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. याबाबत आमदार सरनाईक यांची एम एम आर डी ए चे आयुक्त डॉ संजय मुखर्जी , अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा ही झाली होती. हा रस्ता रुंद करण्याचे काम सुरु करण्यासाठी त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. काल आमदार सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जागेवर जाऊन पाहणी केली. मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त  संजय  काटकर , नगररचना विभागाचे पुरुषोत्तम शिंदे, महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबीत , एमएमआरडीएचे विनायक सुर्वे व इतर अधिकारी सोबत होते , त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि एकूणच आढावा घेतला. फाउंटन हॉटेल ते गायमुख रस्ता रुंद करण्याच्या कामाची पाहणी झाल्यांनतर आता याबाबतचा अहवाल mmrda आयुक्तांना दिला जाईल.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही अंतिम मंजुरी घेतली जाईल ,  व खर्चाचे अंदाजपञक तयार केले जाईल. मंजुरी व एकूणच प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरु होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. गायमुख ते फाउंटन हॉटेल हा जवळपास ६ किमी लांबीचा रस्ता आहे. सध्या ३० मीटर रुंद असलेला रस्ता भविष्याची गरज लक्षात घेता ६० मीटर होणे आवश्यक आहे. गायमुख ते काशिमीरा या मार्गावर मेट्रो मार्ग ही मंजूर झाला आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करून रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे काम ही केले जाणार आहे. भविष्याची गरज ओळखून रस्ता रुंदीकरण करून रस्त्याच्या मधोमध मेट्रो मार्ग उभारणीही केली जाणार आहे. त्या दृष्टीने आमदार प्रताप सरनाईक यांचा पाठपुरावा व कामाचे एकूणच नियोजन सुरु आहे. फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याचे झाल्यास येथे रस्त्यासाठी जमीन संपादित करावी लागेल. त्यात ९० टक्के खासगी जमीन आहे. ही खासगी जमीन मोबदला देऊन संपादित करावी लागणार आहे तर १० टक्के जमीन वन खात्याची जमीन असून ही सर्व आवश्यक जमीन संपादित केल्यास ६० मीटर रास्ता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे असेही आमदार सरनाईक पाहणी दरम्यान म्हणाले. ठाणे , मीरा भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या , येथील रस्त्यांवर वाढत चाललेली ट्राफिक , रस्त्यांवर येणारा ताण , अनेकदा तासनतास होणारी वाहतूक कोंडी पाहता भविष्याची गरज ओळखून रुंद रस्त्याची आवश्यकता आहे. फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत सध्या  चार पदरी रस्ता आहे तो भविष्यात रुंदीकरण झाल्यावर 8 पदरी होणार आणि त्याचा लोकांना मोठा फायदा होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून रस्त्याचे काम जेव्हा कधी प्रत्यक्षात सुरु होईल तेव्हा रुंदीकरणाच्या कामामुळे मूळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊन त्या दृष्टीने आतापासून नियोजन केले जावे असेही आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे. चौकट ठाण्याच्या कापूरबावडी पासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. तेथून गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या कडेला ३ मीटर जागेत सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. ठाणे ते फाउंटन हॉटेल दरम्यान असा हा जवळपास १० किलोमीटरचा सायकल ट्रॅक रास्ता रुंदीकरणा दरम्यान बनवला जाणार आहे अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली.

आदेशाची अंमलबजावणीत न झाल्यास ‘आव्हान याचिका’

धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांचा ठामपा आयुक्तांना इशारा !   ठाणे, मासुंदा तलावाभोवती कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यासंदर्भातील, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास, ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात ‘आव्हान याचिका’ दाखल करावी लागेल, असा इशारा धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दिला आहे. ठाणे शहरातील काही जागृत नागरिकांनी, वर्ष-१९९७ मध्ये मासुंदा तलावाला पडलेल्या समाजकंटकांच्या विळख्याबाबत, ठाणे सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सदर खटला ठाण्यातील सुप्रसिद्ध वकील प्रशांत पंचाक्षरी यांनी लढला होता. त्यावर, १९ डिसेंबर १९९८ रोजी, न्या. व्ही.डी. देशमुख यांनी, मासुंदा तलावाभोवती सहा महिन्यांच्या आत, कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यात यावेत, याबाबतचा आदेश, ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिला होता. तसा ठरावदेखील ठाणे महापालिकेच्या तत्कालीन महासभेत संमत करण्यात आला होता. मात्र न्यायालयीन आदेशाकडे २६ वर्षानंतरही महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे नागरिकीकरण प्रचंड वाढल्यामुळे, ठाणे शहर मोठ्याप्रमाणात फोफावले. परिणामी, ठाण्यात झपाट्याने विकासकामे सुरु झाली, जी अद्यापही सुरुच आहेत. यामुळे आपसूकच सोयी-सुविधांच्या बाबतीत प्रशासनावर ताण पडून, मूळ ठाणे शहरातील महत्त्वाच्या बाबींकडे ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले. शेजारच्या तरण तलावातील पाणी, मासुंदा तलावात सोडले जात असल्याने ते दुषित तर होतेच, त्याचबरोबर जेल तलावाच्या शेजारील पाण्याच्या टाकीतील पाणीदेखील, त्याच तलावात सोडले जाते. शिवाय घोसाळे तलावाच्या काठावर काही अर्धनग्न अवस्थेतील नागरिक झोपलेले असतात. अस्वच्छतेसोबतच आता, तलाव परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्यामुळे, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फक्त मासुंदा तलावच नव्हे तर ठाणे शहरातील इतरही तलाव धोकादायक अवस्थेत आहेत. मासुंदा तलावाची गर्दुल्ल्यांपासून सुटका होणे हे गरजेचे आहेच; पण, त्याचसोबत तलावाची जैवविविधता जपण्यासाठी देखील, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत. मासुंदा तलावाचा परिसर हा, स्वच्छ रहावा यासाठी, आतापर्यंत अनेकदा तलावाचे सुशोभिकरण करण्यात येऊन, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. यामुळे मासुंदा तलावाभोवती कायमस्वरुपी सुरक्षा-रक्षक नेमण्यासंदर्भातील, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास, नाईलाजास्तव ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात ‘आव्हान याचिका’ दाखल करावी लागेल, असा इशारा नितीन देशपांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. ०००००

 कोट्यावधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी अनैतिक संबंधातून शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचा झाला खून !

सागर शिवाजीराव जोंधळे यांची पोलीसांकडील तक्रारीत कारवाईची मागणी अनिल ठाणेकर   ठाणे : गीता खरे व चार साथीदारांनी मिळून शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची कोट्यवधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी आणि अनैतिक संबंधांतून खून केल्याची तक्रार शिवाजीराव जोंधळे यांचे सुपुत्र सागर शिवाजीराव जोंधळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे, डोंबिवली (पश्चिम) येथे दाखल केली आहे. हत्या करण्यापूर्वी  शिवाजीराव जोंथळे यांना, कथीत ब्लु फील्म व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच उपचारात ढिलाई करुन त्यांचा गीता खरे, वर्षा प्रीतम देशमुख,  प्रीतम अनिल देशमुख, हर्षकुमार राजेश खरे, स्नेहा हर्षकुमार खरे यांनी मिळून शारिरीक व मानसिक छळ केल्याचाही आरोप सागर शिवाजीराव जोंधळे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. डोंबिवली, कल्याण, आसनगाव परिसरात व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाॅलिटेक्निकल काॅलेज उघडून कमर्शियल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे नुकतेच यकृताच्या कर्करोगाने मृत्यु झाला होता. पण आता हा मृत्यु नैसर्गिक नसून त्यांचा गीता खरे व त्यांचे चार साथीदार वर्षा प्रीतम देशमुख,  प्रीतम अनिल देशमुख, हर्षकुमार राजेश खरे, स्नेहा हर्षकुमार खरे यांनी मिळून हत्या केल्याची तक्रार पोलीस उपायुक्तांकडे सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केल्याने शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्युप्रकरणात नवीनच ट्विस्ट आला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे आपल्या तक्रारीत म्हणतात की, शिवाजीराव जोंथळे यांचा विवाह वैशाली जोंधळे यांच्याशी झाला. त्यांना सागर, देवेंद्र, वैष्णवी व श्वेतांबरी अशी चार अपत्ये आहेत. सागर जोंधळे यांचे आजोबा सखाराम जोंधळे यांनी डोंबिवली येथे समर्थ समाज ट्रस्टच्या माध्यमाने शैक्षणिक संस्था सुरु केली. याचे कामकाज आपले वडील शिवाजीराव जोंधळे हे पहात होते. गीता खरे ही विवाहिता जोंधळे यांच्या संस्थेत शिक्षिका म्हणून  रुजू झाली. त्यावेळी त्यांना हर्षकुमार खरे नावाचे अपत्य होते. कालांतराने गीता खरे व शिवाजीराव जोंधळे यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले व या संबंधातुन त्यांना वर्षा देशमुख हे अपत्य झाले. अनैतिक संबंधामुळे शिवाजीराव यांची पत्नी व मुले आणि शिवाजीराव यांच्यात वादविवाद होऊन हे प्रकरण फौजदारी व दिवाणी न्यायालयात गेले. पण शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर वाद बाजुला ठेऊन पत्नी व मुलांनी शिवाजीरावांना नामवंत वैद्यकीय इस्पितळात दाखल करुन, शस्त्रक्रियेनंतर ओषधोपचार करुन काळजी घेतली.पण शिवाजीरावांचा उपचार सुरु असतानाच जबरदस्तीने डिस्चार्ज घेऊन गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी शिवाजीरावांना आपल्याकडे नेले आणि पत्नी व मुलांना भेटण्यास मज्जाव केला. याच काळात शिवाजीराव जोंधळे हे आजारपणामुळे मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याचा गैरफायदा घेऊन, त्यांची कथीत ब्लु फील्म व्हायरल करण्याची त्यांना धमकी देऊन शिवाजीराव यांच्याकडून आसनगाव व इतर ठिकाणच्या कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनींचे बनावट, बेकायदेशीर बश्रीसनत्रे व खरेदीखत करुन घेतले. तसेच प्रत्येकी २०० किलो सोन्याच्या वीटा, ५०० किलो चांदीच्या वीटा व चांदीचे देव, ७५ लाख रुपयांचे हिरे, १ कोटी रुपयांची घड्याळे, २५ लाख रुपयांचे महागातले पेन, ५ लाख रुपयांचे गाॅगल, १० ते १५ लाख  रुपयांच्या दारुच्या बाटल्या, २० ते २५ कोटी रुपयांची रोकड आदी करोडो रुपयांची संपत्ती गिळंकृत केली. गीता खरे व त्यांचे चार साथीदार आपल्या उपचाराबद्दल जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करीत असल्याचे शिवाजीराव हे सागर गोंधळे यांना सांगत असत. डाॅक्टरांनी शिवाजीरावांना यकृताचे प्रत्यारोपन करण्याचा सल्ला दिला होता. आणि यासाठी सागर जोंधळे यांनी यकृताचा काही भाग दान करण्याची तयारी दाखविली होती. यामुळे शिवाजीराव आनंदी झाले होते. तसेच सागर जोंधळे यांना आसनगाव येथील काॅलेजच्या विघ्नहर्ता ट्रस्टचे अध्यक्ष बनविण्याचे कबूल केले होते. मात्र हे सारे गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांना कळताच शिवाजीराव यांची करोडो रुपयांची संपत्ती गिळंकृत करता येणार नाही व आपले मनसुबे साध्य होणार नाहीत हे ओळखून डाॅक्टरांचा सल्ला न जुमानता, शिवाजीरावावर यकृत ट्रान्स्फर करण्याची शस्त्रक्रिया त्यांनी होऊ दिली नाही. तसेच उच्च दर्जाच्या रुग्णालयात दाखल न करता त्यांना घरी डांबून ठेवले आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच कुटूंबिय, नातेवाईक व शाळेतील कर्मचारी यांनी शिवाजीराव यांना भेटू न देता शिवाजीरावांचा मृत्यु घडून यावा, असा सापळा रचला आणि गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी रचलेल्या कटाप्रमाणे अखेर उपचाराअभावी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यु झाला. यामुळे गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांनी शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची कोट्यवधींची संपत्ती गिळंकृत करण्यासाठी आणि अनैतिक संबंधांतून खून केल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे येथे सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दाखल केली आहे. गीता खरे व त्यांच्या चार साथीदारांवर भा.द.वि. कलम ३०४, ३४७, ३८३, ३८४, ३८७, ४२० अन्वये व सह कलम ३४, १२० (ब) प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत त्यांनी केली आहे. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन ३ कल्याण यांनाही या तक्रारीच्या प्रती पाठविलेल्या आहेत, अशी माहिती सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दिली आहे. 0000