Month: June 2024

पवईतील ८०० झोपड्यांवर हातोडा

रहिवासी-पोलिसांत संघर्ष घाटकोपरः पवईतील जयभीमनगर झोपडपट्टीतील तब्बल ८०० झोपड्यांवर गुरुवारी  पालिकेने तोडक कारवाई केली. कोणतीही नोटीस न देता मोठा पोलिस फौजफाटा घेऊन पावसाळा तोंडावर असताना ही एकतर्फी कारवाई केल्‍याचा रहिवाशांचा आरोप आहे. ही जागा मोकळी करून एका बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी बोलताना केला.पवईतील जयभीमनगर ही झोपडपट्टी गेल्या २५ वर्षांपासून असून, त्यातील सुमारे ८०० झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना ४८८ अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई झाल्‍याने आम्‍ही जाणार कुठे, असा सवाल रहिवासी विचारत आहेत. तोडक कारवाईसाठी जवळपास २५० ते ३०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रहिवाशांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा पोलिसांचा आरोप आहे; तर कारवाईला न्यायालयाकडून स्‍थगिती आणण्यासाठी वेळ मागूनही आम्‍हाला दिला नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. या भागातील एका विकसकाच्या दबावाखाली पालिका, पोलिस आणि राजकारणी झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत, असा रहिवाशांचा आरोप आहे. आम्‍ही गरीब, असहाय झोपडीधारक एकटे पडलो असून कुणीही साथ देण्यास पुढे सरसावत नाही, अशी खंत त्‍यांनी बोलून दाखवली. पवईची ओळख ही मुंबई शहरात उच्चभ्रू परिसर म्हणून असली, तरी येथे अर्ध्यापर्यंत झोपडपट्टी, चाळकऱ्यांची वस्ती आहे. येथे रमाबाई आंबेडकरनगर, गौतमनगर, इंदिरानगर, महात्मा फुलेनगर, मोरारजीनगर, हरिओमनगर आदी…

खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये

काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले आहेत. बाळ्या मामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांची बाळ्या मामा यांनी पाहणी केली. जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आली आहे. काल्हेर येथे सुमारे २६ एकर शासकीय जागेवर शासकीय तसेच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जागेवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील ,भरत पाटील,नितीन पाटील या बांधकाम व्यावसायिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे.या प्रकरणी आपण स्वतः एमएमआरडीए,तहसीलदार व प्रांत तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले. येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून इन्व्हेस्टर लोकांना व सामान्य घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली आऊन आज शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द डिंक होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले असल्याने आज व्यस्त कार्यक्रम आटोपते घेऊन आज मी या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचेही खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.

सिव्हील रुग्णालयात महिलेच्या जिभेवर कर्करोगाची शस्त्रक्रिया

ठाणे : मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात अथवा मुंबईत टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते; मात्र ज्यांना मौखिक कर्करोग शस्त्रक्रिया करण्याचा खर्च परवडत नाही, अशांसाठी  ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय वरदान ठरत आहे. या ठिकाणी मौखिक कर्करोगावर उपचार केले जात आहेत. एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या सरिता या ५८ वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना आणि जेवताना भरपूर त्रास होत असे. या समस्येचे निदान करण्यासाठी त्यांनी एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. यात त्यांना जिभेचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी होणारा खर्च साधारण अडीच ते तीन लाख रुपये सांगण्यात आला. कौटुंबिक परिस्थिती साधारण असल्याने जिभेवरील कर्करोगाचे उपचार कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. यावर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या जिभेवर कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी माहिती दंतशल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली. प्रथम सरिता यांची रक्तचाचणी करण्यात आली. शारीरिक स्वास्थ्याची तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली गेली. दरम्यान सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑनको सर्जन डॉ. हितेश सिंगवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया दंतशल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. रूपाली यादव, डॉ. संकेत शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. खासगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणे सर्वांना परवडणारे नसते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते; मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या  छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खासगी कर्करोगतज्ज्ञांना बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

पावसाळ्यात मिरा-भाईंदर जलमय होण्याची भीती

भाईंदर : पावसाळ्यात मिरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी होणारा जलभराव उपसण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी शक्तिशाली पंप भाड्याने घेतले जातात. त्यासाठी महापालिकेकडून यावर्षी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती, मात्र त्याचदरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू…

शहापुरात जलजीवनची कामे रखडली

खर्डी : शहापूर तालुक्यात केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजनेतील कामांची मुदत संपली असतानाही कामे रखडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  त्यामुळे जल जीवनच्या कामांना गती न मिळाल्यास १० जून रोजी शहापुरातील शिवतीर्थ याठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशारा वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेने दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन वनश्री संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहे. धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे, परंतु ”धरण उशाला आणी कोरड घशाला” अशी स्थिती तालुक्यातील नागरिकांची आहे. दरवर्षी टंचाई आराखडा तसेच कोट्यवधी रुपये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च होतात. यावर्षी देखील तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण टंचाई सुरू आहे. १९२ गावपाड्यांना ४२ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या सर्व टंचाईग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १८९ योजनांची कामे मुदत संपूनही पूर्ण झालेली नाहीत, तसेच अतिशय धीम्यागतीने कामे सुरू असल्याचा आरोप वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बुधाजी वाढविंदे यांनी निवेदनात केला आहे. तालुक्यात ११० ग्रामपंचायती तसेच तीन लाख ३४ हजार लोकसंख्या आहे, तर जल जीवनच्या १८९ योजना आहेत, मात्र योजनेअंतर्गत जल वाहिन्यांची कामे करणे, चर खोदणे, जलवाहिनी, विहीर व टाक्यांची बांधकामे अपूर्ण असतानादेखील ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांनी कामाची बिल हडप करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप वनश्री संस्थेने केला आहे. ठोस उपाययोजना नाही तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव अंतर्गत येणाऱ्या पेढ्याचीवाडी, कामतवाडी, सोनारशेत आदी गावांसाठी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे, तसेच कामाची मुदत संपल्याने येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संबंधित अधिकारी यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने बहिष्कार मागे घेतला, परंतु त्यानंतर कोणतीही ठोस उपायोजना झाली नसल्याने १० जून रोजी उपोषणाचा इशारा सामाजिक संस्थेने दिला आहे. डोळखांब परिसरातील रोडवहाळ येथील जल जीवन योजनेचे काम अपूर्ण आहेत. तालुक्यातील डोळखांब, खर्डी, गुंडे, कसारा, किन्हवली, टाकीपठार अशा विविध भागातील गावपाड्यांवर जल जीवन योजनेचे एकही काम पूर्ण झालेले नाही. ठिकठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रीट रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तिथे गटार निर्माण होऊन चिखल होण्याची शक्यता आहे.

घोडबंदर मार्ग ठप्प; घाटरस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या रांगा

ठाणे : ठाणे आणि मुंबई अहमदबाद मार्गांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बंदी असतानाही अवजड वाहनांची भरदिवसा घुसखोरी सुरू असल्याने त्याचा परिणाम गुरुवारी वाहतुक व्यवस्थेवर झाला. सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या गायमुख ते वाघबीळ पर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बोरीवली, वसईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल होत आहेत. अवजड वाहनांची वाहतुक सुरू असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असतात. त्यामुळे येथील घाट रस्त्याच्या तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. घोडबंदर मार्ग हा ठाणे तसेच मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडतो. उरण येथील जेएनपीटी येथून जाणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे वसई किंवा गुजरातच्या दिशेने ये-जा करत असतात. राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या (एसटी), महापालिका परिवहन विभागाच्या बसगाड्यांसह हलक्या वाहनांची वाहतुक येथून मोठ्याप्रमाणात होत असते. येथील दुरुस्ती कामामुळे वाहन चालकांना दररोज कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. गुरुवारी घोडबंदर मार्गावर गायमुख घाट, कासारवडवली ते वाघबीळ पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जड अवजड वाहनांना दुरुस्तीच्या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही या मार्गावर अवजड वाहतुक सुरू असल्याचे चित्र होते. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर वार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे पाऊण तास लागत होता.

कल्याणमधील शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी

कल्याण : कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना समाज माध्यमातून आठ गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी बुधवारी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणाने खळबळ उडाली असून महेश यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धमकी देणाऱ्या दीपक कदम नावाच्या इसमाचा शोध सुरू केला आहे. दीपक कदम या इसमाने समाज माध्यमातून धमकी देताना म्हटले आहे की, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तुला चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन. ज्या राजकीय लोकांच्या जीवावर उड्या मारत आहेस, त्यांचे आता राजकारणातील स्थान काय आहे ते समजून जा. तुला आता शंभर टक्के ठार मारणार एवढे लक्षात घे’. गेल्या पाच महिन्यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात स्वताच्या रिव्हाॅल्व्हरमधून गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये महेश यांचे समर्थकही गंभीर जखमी झाले होते. कल्याण पूर्वचा आमदार होण्यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे महेश गायकवाड यांना चढ देत आहेत. यामुळे ते आपल्या प्रत्येक कामात अडथळा आणून आपणास त्रास देत आहेत, असा समज आमदार गायकवाड यांनी केला होता. या त्रासाप्रकरणी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींची कोणीही दखल घेत नव्हते. आता आपणास न्याय मिळणेही कठीण आहे. आणि महेश यांचा गणपत गायकवाड यांच्या विकास कामे, खासगी कामांमध्ये हस्तक्षेप वाढू लागला होता. या सततच्या जाचाने आमदार गणपत गायकवाड त्रस्त होते. अशाच एका जमिनीच्या प्रकरणात समझोता करण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये एकत्र जमले असताना आमदार गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात महेश सुदैवाने बचावले. आता आमदार गायकवाड या गुन्ह्याप्रकरणी तळोजा कारागृहात आहेत.महेश यांच्यावर एका विकासकाने दोन महिन्यापूर्वी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आमदार गायकवाड यांनी तीन महिन्यापूर्वी आपल्यावर गोळीबार केला होता. त्या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्या गु्न्ह्यातील आरोपींचे नाव घेऊन आपणास धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करावी यासाठी आपला पाठपुरावा आहे. या प्रकरणात काही राजकीय दबाव येत आहे. धमकी प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रर केली आहे, असे महेश यांंनी सांगितले. महेश गायकवाड यांची तक्रार प्राप्त झाली आहे. गु्न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.

डोंबिवलीतील अमुदान कंपनी स्फोटातून

दोन मृतदेहांची ओळख बारा दिवसांनी पटली कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा येथील अमुदान कंपनी स्फोटात जळून खाक झालेल्या दोन मृतदेहांची ओळख बारा दिवसांनी पटली आहे. नातेवाईकांच्या डीएनए चाचणीवरून ही ओळख पटविण्यात आली आहे. विशाल पौडवाल (४०), मनीष दास (२२) अशी ओळख पटलेल्या कंपनी कामगारांची नावे आहेत. अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर ते मागील बारा दिवसांपासून बेपत्ता होते. या स्फोटातील मृतदेह पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांंचा कोळसा झाला असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. समोर मृतदेह आहेत पण तो आपल्या नातेवाईकाचा आहे हे कसे समजायचे असे प्रश्न कुटुंबीयांना पडले आहेत. जोपर्यंत आपल्या मयत कामगाराची ओळख पटत नाहीत तोपर्यंत नातेवाईक पोलीस ठाण्यात, पालिका रुग्णालयात फेऱ्या मारत आहेत. स्फोट झाल्यानंतर अनेक मृतदेहांची ओळख पटली नाही. पालिका रुग्णालयात ज्या नातेवाईकांचे कामगार बेपत्ता आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन ते डीएनए चाचणीसाठी फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. असे नुमने घेतलेल्या विशाल पौडवाल, मनीष दास यांचे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच्या रक्ताचे नमुने जुळले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भातची माहिती कल्याण पोलिसांनी या दोन्ही कुटुंबीयांना देण्यात आली. पौडवाल, दास यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आले. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी डीएनए चाचणीवरून दोन मृतदेहांची ओळख पटली असल्याचे सांगितले. विशाल पौडवाल हे बदलापूर येथे पत्नी आणि आपल्या आठ वर्षाच्या मुलासह राहत होते. ते अमुदान कंपनी लगतच्या कॉसमॉस कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होते. मनीष दास हेही कॉसमॉस कंपनीत गेल्या महिन्यापासून कामाला होते. या स्फोटात रोहिणी कदम (२६), रिध्दी खानविलकर (३८), राकेश राजपूत (२७) हे मरण पावले होते. त्यांची ओळख यापूर्वीच पटविण्यात आली आहे. त्यामुळे अमुदान कंपनी स्फोटतील आतापर्यंत पाच मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. अद्याप सात मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात ओळख पटत नसल्याने संंरक्षित करून ठेवण्यात आले आहेत. ज्या कुटुंबीयांचे कामगार सदस्य बेपत्ता आहेत. त्यांच्या रक्त नमुने चाचण्या यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे फोरेन्सिक प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर या सात मृतदेहांची ओळख पटण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कंपनी स्फोटानंतर परिसरात सापडलेले कामगारांचे विविध प्रकारचे २६ अवयव चाचण्यांसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. हे अहवाल आल्यानंतर उर्वरित बेपत्ता कामगार, मृतदेह यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे, असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली शहरांचे विद्रुपीकरण;

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या शुभेच्छा फलकांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना फलक न काढण्यासाठी दमदाटी कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत या राजकीय मंडळींनी शहराचा कोपरा अन कोपरा पालिकेच्या परवानग्या न घेता शुभेच्छा फलकांनी झाकून टाकला आहे. हे फलक काढण्यासाठी जाणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना स्थानिक राजकीय मंडळी दमदाटी करून लावलेले फलक काढू नयेत म्हणून दटावणी करत असल्याचे समजते. या शुभेच्छांच्या फलकांमुळे कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसर, कल्याण शिळफाटा रस्ता, शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते श्रीकांत शिंदे यांना देण्यात येणाऱ्या फलकांनी गजबजून गेले आहेत. काही फलकांंवर शुभेच्छुकांचे गळ्यात सोनेरी साखळदंड, हातात कडे घालून लावलेले फोटो पाहून नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. शुभेच्छा देताना संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन रस्त्यावर कशाला करता, असे प्रश्न नागरिक करत आहेत. कल्याण डोबिवली पालिका हद्द फलक मुक्त करण्यासाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. शहरात एकही बेकायदा फलक दिसता कामा नये, असे आयुक्त डाॅ. जाखड यांचे आदेश आहेत. त्याप्रमाणे पालका साहाय्यक आयुक्त काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्याच्या अगोदरच्या दिवसापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळात श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. हे फलक काढण्यासाठी गेल्यावर स्थानिक राजकीय कार्यकर्ता पालिका अधिकाऱ्यांना चढ्या स्वरात फलक न काढण्याच्या सूचना करत आहेत. यावरून पालिका अधिकारी आणि राजकीय मंडळींमध्ये खटके उडत आहेत. अनेक फलक रिक्षा वाहनतळ पादचाऱ्यांना त्रास होईल अशा पध्दतीन जमिनीपासून काही अंतरावर लावण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ठाण्यातील एका बड्या राजकीय सल्लागाराच्या आशीर्वादाने ९६ फलक शहराच्या विविध भागात झळकत आहेत. या फलकाच्या माध्यमातून मिळणाला मलिदा राजकीय मंडळी परस्पर खात आहेत. यामध्ये पालिकेचे सुमारे २५४ कोटीचे नुकसान होत असल्याचा प्रकार नुकताच याचिकाकर्ते कौस्तुभ गोखलेे यांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणाची पालिका अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असताना आता राजकीय फलक अधिकाऱ्यांची मोठी डोकेदुखी झाली आहे.

कल्याण पूर्वेत काटेमानिवलीत दोन गटांच्या राड्यात घरे आणि वाहनांची तोडफोड

कल्याण : कल्याण पूर्वेत काटेमानिवली महालक्ष्मी शॉपिंग सेंटर भागात बुधवारी रात्री दोन गटात पूर्व वैमनस्यातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका बाजुने दोघे जण तर समोरच्या बाजुने सात जण असे नऊ जण काटेमानिवली भागात एकमेकांंवर दगडफेक करून परस्परांना जखमी करत होते. यावेळी या गटांनी परिसरातील घरांवर, महावितरणच्या रोहित्रावर, परिसरात उभ्या केलेल्या वाहनांंवर दगडी मारून, लाकडी दांडक्याने वाहनांचा काचा फोडून परिसरातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे. या घटनेने या तरूणांना पोलिसांचा धाक आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या नऊ तरूणांनी केलेल्या नुकसानाची भरपाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी पोलिसांकडे केली आहे. देवेंद्र रामजी प्रसाद (४६) या इस्टेट एजंटची इनोव्हा कार तरूणांनी दगडी, लाकडी दांडके मारून फोडून टाकली आहे. त्यामुळे देवेंद्र यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी कल्याण पूर्व कोळसेवाडी भागात राहणारे तुषार वाल्मिकी, अरविंद राजा नायडू, आशीष प्रेमचंद पांडे, आनंद चक्कीवाला, राजा पंडित, टाॅम बच्चू, राहुल गुप्ता, प्रेमगुप्ता उर्फ गुंंडा, अरबाज या तरूणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांंगितले, काटेमानवली भागात राहणारे तुषार, अरविंद राजा हे इतर भागातून बुधवारी रात्री पायी आपल्या घरी येत होते. त्यावेळी त्यांना इतर सात आरोपींनी काटेमानिवली भागातील महालक्ष्मी शाॅपिंग सेंटर येथे अडवले. त्यांना जुन्या भांडणा विषयी जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बोलाचाली होऊन दोन्ही गटांनी एकमेकांना बेदम मारहाण करत, एकमेकांवर दगडफेक करत परिसरातील घरांवर दगडी फेकल्या. अनेकांच्या घरांची कौले फुटली. रस्त्यालगत उभ्या केलेल्या देवेंद्र प्रसाद यांची इनोव्हा, योगेश गावकर यांची प्रवासी वाहतुकीची मोटार, मुस्कान यादव यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले आहे. महावितरणच्या रोहित्राच्या जीवंत वीज वाहिन्या दगडीने तोडून टाकल्या. त्यामुळे परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. या तुफान दगडफेकीने परिसरात दगडांचा पाऊस पडत होता. एखादा दगड लागून आपला जीव जाईल या भीतीने परिसरातील रहिवासी घरात लपून बसले. ही माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या भागात येणारी वाहने दुसऱ्याने मार्गाने वळविण्यात आली. या भागात दहशतीचे वातावरण आरोपींनी निर्माण करून रहिवाशांचे नुकसान केले, म्हणून पोलिसांनी दोन्ही गटांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.