निष्ठावंत १५ आमदारांना लढण्याचे दिले आदेश
मुंबई : एन निवडणूकीच्या धामधुमीत वैद्यकीय उपचार घेत असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीविषयी विरोधकांकडून अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. आज या सगळ्यांना पुर्णविराम देत उद्धव ठाकरे पुन्हा इनअक्शन आलेत. मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत निष्ठावंत सर्वच्या सर्व १५ आमदरांना आगामी विधानसभेच्या निवडणूकीत लढण्याचे आदेश ठाकरेंनी मातोश्रीवरून दिले. सुत्रांनी दिलेल्या माहीतनुसार या १५ आमदारांना एबीफॉर्मही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत आज उद्धव ठाकरे यांनी बाजी मारत पहिल्या टप्प्यातील उमेदवार आज अप्रत्यक्षरीत्या घोषित केले. आजच्या या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असे म्हणत आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, २२ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करुन उमेदवारांना प्रचारासाठी मैदानात उतरवले जाणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभा निवडणुकांवेळी ज्या काही त्रुटी महाविकास आघाडीतील पक्षांना जाणवल्या, त्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निवारण राज्य निवडणूक आयोगाने करावे, यासाठी ही भेट असल्याचे देखील या बैठकीतील उपस्थित आमदारांकडून समजते.
शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावान १५ आमदार
१) आदित्य ठाकरे, २) अजय चौधरी, ३) राजन साळवी
४) वैभव नाईक, ५) नितीन देशमुख, ६) सुनिल राऊत
७) सुनिल प्रभू, ८) भास्कर जाधव, ९) रमेश कोरगावंकर
१०) प्रकाश फातर्फेकर, ११) कैलास पाटिल, १२) संजय पोतनीस
१३) उदयसिंह राजपूत, १४) राहुल पाटिल, १५) ऋतुजा लटके
