अनिल ठाणेकर
ठाणे : जर असाच रूपया पडायला लागला तर भारत कर्जबाजारी होईल. वरून दिसायला कितीही सुंदर असले तरी अर्थव्यवस्था आतून पोखरली जाईल अन् अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, विधीमंडळ गटनेते आमदार डॉ जीतेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
८ जानेवारीला एका डाॅलरची किमंत ८५ रूपये ८७ पैसे होती. तीच १४ जानेवारीला ८६ रूपये ८८ पैसे झाली आणि आज ५ फेब्रुवारीला तीच किंमत ८७ रूपये ३० पैसे आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर रूपया कधीच एवढा पडला नव्हता. एकीकडे ५ ट्रिलीयनची इकॉनॉमी आम्ही करू, असे म्हणत भारताच्या लोकांना वेड्यात मोजणाऱ्यांना पडणाऱ्या रूपयाची चिंताच दिसत नाही. पडणाऱ्या रूपयाचा जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो, हे कसे कळत नाही. नरेंद्र मोदी असो अगर सुषमा स्वराज असो; त्यांचे वाक्य मला आजही आठवते, “जब डाॅलर की तुलना मे रूपया गिरता है, तब वो रूपया नही, देश की इज्जत गिर जाती है. देश की प्रतिष्ठा मिट्टी में मिल जाती है.” त्यांच्याच भाषणातील ही वाक्ये आज त्यांच्यासमोर प्रश्न म्हणून उभी करायला हवीत. जर असाच रूपया पडायला लागला तर भारत कर्जबाजारी होईल. वरून दिसायला कितीही सुंदर असले तरी अर्थव्यवस्था आतून पोखरली जाईल अन् अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल ! ज्या पद्धतीने ट्रम्प आपले पत्ते फेकत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत आपण आधीच मागे पडलो आहोत. आपली उत्पादन साखळी (प्रोडक्शन चैन) जवळपास संपुष्टात आली आहे. मी ठाण्यात राहतो, लहानपणापासून पाहतोय की, जगातील सर्वात मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट कोणता, असा प्रश्न विचारल्यावर साहजिकच उत्तर यायचे ते म्हणजे बेलापूर पट्टा ! आज त्या बेलापूर पट्ट्यात पाच टक्केही उद्योग जीवंत नाहीत. इथे सगळेच प्रोडक्शन युनिट्स होते. प्रोडक्शन युनिट्स गेल्याने रोजगार बंद झाले. रोजगार बंद झाल्याने त्याचे एकंदरीतच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाले. आता आपण जीवंत आहोत, ते सर्व्हीस इंडस्ट्रीवर आणि सर्व्हीस इंडस्ट्री जीवंत आहे ती आयातीवर! जर भारत आयातीवर जीवंत राहिला तर प्रोडक्शन होणारच नाही आणि आयातीवर जीवंत असलेला कुठलाही देश प्रगती करू शकत नाही, हे सत्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, विधीमंडळ गटनेते आमदार डॉ जीतेंद्र आव्हाड यांनी केले.