Month: January 2026

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा रमेश औताडे मुंबई : क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर  मानखुर्द येथे जय लहुजी रिक्षा स्टँड यांच्या  वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी समाजभूषण सुदाम आवाडे यांनी  ध्वजारोहण केले. श्रावण नाटकर सर , नितीन हिवाळे , संदेश सुतार, दत्तात्रय आवाडे , गोपीनाथ पांजगे , भिमा गायकवाड , अँड दिलीप दुनघव , सुरेश उफाडे , दत्ता दुनघव , देविदास उफाडे , सोमनाथ शिंदे   , दादाराव पारवे आधी मान्यवर व जय लहुजी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य व नगरातील समाज बांधव उपस्थित होते.

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिवा : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलिस ठाण्याचे ए. पी.आय वसंत खतेले, ए. पी.आय. अमोल कोळेकर आणि ए. पी.आय राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा,  दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरूत्ववाहिनी  क्र. १, २ व ३ वर वाहिन्याचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार रात्री १,२ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१  चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४  तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा  विभागातर्फे करण्यात आले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित मुकुंद रांजणे माथेरान : माथेरान मधील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याबाबत शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडत असतात. याकामी केंद्रप्रमुख शिक्षक नारायण सोनावणे आणि पत्रकार मुकुंद रांजणे यांच्या संकल्पनेतून यावेळी पहिल्यांदाच तिन्ही शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून प्रमाणपत्र दिल्यास अन्य विद्यार्थी सुध्दा शैक्षणिक क्षेत्रात,त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्यातील कलागुणांना वाव मिळवून देऊ शकतात ज्यामुळे शाळेच्या नावासह गावाचे नावलौकिक सुध्दा वाढू शकते यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळा, गव्हाणकर एज्युकेशन शाळा आणि सेंट झेव्हियर स्कुल मधील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनिंना विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेचे सई उमेश लोखंडे इयत्ता ५ वी,  विरेन पांडुरंग झोरे-इयत्ता ७ वी, सेंट झेव्हीअर्स हायस्कुलचे उमेर अनिस शेख- इयत्ता आठवी व रिचा राजेश दळवी इयत्ता दहावी तसेच प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, या शाळेतील गुणवंत विद्यार्थी कु. सानिया सुखदेव पारधी इयत्ता – १ 0 वी, प्रेम गोविंद दाभाडे इयत्ता १ 0 वी या सर्व गुणवंत  विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी,गव्हाणकर शाळेचे मुख्याध्यापक रमेश ढोले, संघपाल वाठोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, संतोष चाटसे तसेच अन्य शिक्षक वृंद आणि पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

देशभक्तीच्या जयघोषात टिटवाळा पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा

देशभक्तीच्या जयघोषात टिटवाळा पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा कल्याण : भारतीय लोकशाहीचा गौरव, संविधानिक मूल्यांचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची चेतना यांचे प्रतीक असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण तालुका पोलीस स्टेशन, टिटवाळा येथे अत्यंत सन्मान, शिस्तबद्ध वातावरण आणि भावनिक देशभक्तीच्या वातावरणात भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जागर अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमाने परिसरात राष्ट्राभिमानाची एक नवी ऊर्जा निर्माण केली. सकाळी ध्वजारोहणाच्या क्षणी राष्ट्रगीताच्या सूरांमध्ये संपूर्ण परिसर भारावून गेला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तिरंग्याला मानवंदना देताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागृत होताना दिसून आली. राष्ट्रध्वज फडकताना केवळ एक औपचारिक विधी नव्हे, तर देशाच्या स्वातंत्र्य, एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ करणारा क्षण म्हणून हा सोहळा नागरिकांना अनुभवता आला.

संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं

संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं बाबासाहेबांनी सर्व घटकांना समान न्याय व हक्क देणारे संविधान दिले   – आनंद गायकवाड कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय सेंट वाय सी इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पाहता संस्थेने प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्या हस्ते तिरंगी ध्वजारोहण केले. आनंद गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून सतत्याहत्तर वर्षे झाली. शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा अद्यापही मिळत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व घटकांना समान न्याय व  हक्क देणारे संविधान दिले  परंतु आजही देशात गरिबी आणि दारिद्र्य आहे. बिनविरोध निवडणूक करून नागरिकांचा मतांचा अधिकारच काढून घेत आहेत हे लोकशाहीला घातक आहे. संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझा सन्मान केला मी धन्य झालो. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर आकर्षक कवायतीच्या माध्यमातून देशभावना जागृत केल्या.आर. एस. पी. आणि एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी झेंड्यास सलामी दिली. महापुरुषांच्या वेशभूषेवर आलेली लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर के. सीता राममोहन राव, जयश्री पाटणेकर, कुमार सोहोनी, अजित भुरे, ईशा डे ठरले मानकरी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण रविवार, १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. के. सीता राममोहन राव यांना संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार, जयश्री पाटणेकर यांना संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, कुमार सोहोनी यांना उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक, अजित भुरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी तर ईशा डे यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय डॉ. नीती बडवे यांच्या मुशाफिरी या पुस्तकासाठी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा तर तन्वी गोरे यांना संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांनाही कै. ताराबाई दीक्षित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०, ७७००९९४४९५.

पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा – संजय बनसोडे

पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा – संजय बनसोडे अनिल ठाणेकर सांगली: सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा माहोल आहे. निर्भय आणि निपक्षपाती निवडणुका या लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचे आहेत.लोकशाहीच्या या उत्सावास करणी, जादूटोण्याचे अशा अंधश्रद्धाचा आधार घेतला जात आहे ही निषेधार्य बाब आहे. अशा घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारे आहेत. करणी आणि जादूटोणा किंवा तत्सम अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्या तातडीने कारवाई झाली पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे. नुकताच विटा येथे एका पुढाऱ्यांचा घरासमोर असे अंधश्रद्धेचे, करणी चे प्रकार करणाऱ्यास रंगेहात पकडले, संबंधित व्यक्तीला पोलिसाच्या हवाली केले. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी  अशा प्रवृत्तींना वेळी रोखले पाहिजे, संबंधित जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ही असे अनेक करणी, जादूटोणाचे अघोरी प्रकार केल्याचे उघडकीस आले होते,त्या त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यापक प्रबोधन करून लोकांच्या जनजागृती केली होती. विशेषता उमेदवार किंवा नेत्यांच्या घराजवळ असे प्रकार केले गेले होते. आष्टा, इस्लामपूर,कामेरी आदी ठिकाणी संघटनेने प्रबोधन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले होते. काही दिवसापूर्वी येलूर गावातही  हयात नसलेल्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचे उघडकीस आले होते. असे प्रकार करणाऱ्या मांत्रिक,तांत्रिक,बुवाबाबांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, पोलिसांनी या बाबतील सोमोटो गुन्ह्ये दाखल करावेत. आवश्यकता असेल तिथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मदत करतील गावोगाव जाऊन प्रबोधन करतील. पोलीस खात्याने काही  महिन्यापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कक्ष करण्याचा आदेश पारित केला होता मात्र अद्याप सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये असा कक्ष झाल्याचा ऐकिवात नाही. महाराष्ट्राला संत आणि सुधारकांचा बलदंड वारसा आहे. आपल्या संत सुधारकांचा वारसा समजून न घेतल्यामुळे अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याची वेळ आपल्या येत आहे. करणी,जादूटोणा  या बाबी पूर्णपणे भ्रामक आहेत, अवैज्ञानिक आहेत. करणी जादूटोणा किंवा देव घालून कुणाचं चांगलं किंवा वाईट करता येत नाही याची आम्ही खात्री देतो. करणी जादूटोणा किंवा देव घालण्याचे कुणाच्या कडे सामर्थ्य असेल तर त्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे थेट आव्हान आहे.अशा कोणत्याही  चमत्कारिक गोष्टी सिद्ध करणाऱ्यास समितीचे २१ लाख रुपयांचे बक्षीस आहे.आज अखेर ही आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. जादूटोणा किंवा करणी करून कुणाचं बरं वाईट करता येत असते तर  भारताच्या सीमेवरील सैनिकाच्या ऐवजी हे तंत्र मंत्र करणारे लोकच ठेवले असते.निवडून येण्यासाठी उमेदवार काय काय करतात हे आपल्याला ज्ञात आहे, नैतिकतेचा ऱ्हास होताना निवडणुकीत दिसत आहे त्यात अशा अंधश्रद्धांचा आधार ही बाब सुद्धा चिंताजनक आहे. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धाचा आधार घेणे हा ज्ञानाचा विज्ञानाचा माणुसकीचा पराभव आहे. महाराष्ट्राचा सुद्धा निर्मूलन समिती गेली ३६ वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रभावी काम करीत आहे. प्रबोधनाच्या पातळीवर आम्ही नेहमीच सज्ज आहोत,लोकांच्या जागृतीसाठी आम्ही कार्यकर्ते तत्पर आहोत.

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक मुंबई : बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, भारत २0४ 7 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवून आणणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल, आणि एसटी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध आहे.” सध्या एसटीच्या सुमारे ९० टक्के बसगाड्या पारंपरिक डिझेल इंधनावर धावत असल्या, तरी टप्प्याटप्प्याने त्यांचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भविष्यातील नव्या बस खरेदीमध्येही ई-बसेसना प्राधान्य दिले जाणार आहे.याच दृष्टीने, एसटीच्या जागेवर सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून (PPP) उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजीसह ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात एसटीला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याबरोबरच “ एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास, भविष्यातील वाहनव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही केवळ सुविधा नाही, तर पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.या निर्णयामुळे एसटी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर हरित ऊर्जेच्या प्रसारातही अग्रणी भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती-एकनाथ शिंदे

ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती-एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असुन कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे, लवकरच ठाणेकरांना वाहतुक कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या “कार्निव्हल” चे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाणे शहर वाहतुक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रीडासंकुल मैदानात प्रजासत्ताक  दिनापासुन २८ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, वाहतुक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट आणि स्टॅडअप कॉमेडीयन नविन प्रभाकर आदींसह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्याचे सत्कार केले. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते, त्याप्रमाणें प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांची जनजागृती लहानग्यापासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार काढत शिंदे यांनी, कार्निव्हलच्या प्रदर्शनात मांडलेल्या ई दुचाकी तसेच, ई मोटारी चालवण्याची अनुभुती घेतली. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी “रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा” हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. पदपथ नागरीकांना चालण्यासाठी आहेत, ते अबाधित ठेवले पाहिजेत. त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात कमी होण्यास मदत होईल.या अनुषंगाने, महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सर्वांनी नियम पाळले तर, अपघात होणारच नाहीत, ड्रंक एंड ड्राइव्हची मोहिम अधिक तीव्र केल्यामूळे देखील अपघात कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ठाण्याची वाहतूक कोंडी कशी दूर होईल यासाठी प्राधान्य देण्याचे सुतोवाच करून ना. शिंदे यांनी घोडबंदर रोड पूर्ण खड्डेमुक्त करणार असल्याचे सांगितले. या सत्यावर अनेक ठिकाणी थोडे कट आपण बंद केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. त्याचबरोबर कोस्टल रोड, उन्नत मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे, त्यामुळे लवकरच ठाणेकरांना कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिली.