Month: January 2026

 नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज

नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा तत्परतेने काम करीत असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या ईव्हीएम यंत्रे निवडणूकीसाठी सज्ज करण्याच्या कामकाजाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांनी कोपरखैरणे व तुर्भे येथे पाहणी केली. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीकरिता नुकत्याच रायगड जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणूकीसाठी वापरलेली ३५०० हून अधिक निवडणूक यंत्रे महानगरपालिकेने १३ ठिकाणांहून ताब्यात घेतली असून त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. मध्यप्रदेशातून आणलेल्या या ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात व वाहनांना जीपीएस ट्रॅकर लावून सुरक्षितपणे नवी मुंबईत आणल्यानंतर या ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी बेलापूर येथील वारकरी भवन या ठिकाणी ईव्हीएम मशीन कार्यवाहीचे नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि समन्वय अधिकारी कार्यकारी अभियंता विद्युत  प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली ३५ निवडणूक मास्टर ट्रेनर्स यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रथम स्तरीय तपासणी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समक्ष करण्यात आलेली आहे. हैद्राबाद येथील इलेक्ट्रॉनिक कमिशन ऑफ इंडिया यांच्या ३ तज्ज्ञ अभियंत्यांकडून या प्रत्येक मशीनची सखोल तपासणी करण्यात आली असून या मशीन प्रमाणित करुन घेण्यात आलेल्या आहेत. या प्रमाणित मशीनपैकी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १० याप्रमाणे एकूण ८० ईव्हीएम मशीन ८ विभागांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत व त्यावर सर्व विभागांचे प्रथम प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. ही १५०० हून अधिक कन्ट्रोल युनिट व ३५०० हून अधिक बॅलेट युनिट असलेली मतदान यंत्रे आठही विभागांमधील निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाकडे मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन व त्यामध्ये अधिकच्या २० टक्के मशीन देऊन वितरीत करण्यात आलेली आहेत. या मशीनचे निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतदान केंद्रनिहाय बॅलेट पेपर लावून पुनर्तपासणी करुन  घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सहा. संचालक नगररचना  सोमनाथ केकाण यांच्यासह कोपरखैरणे व तुर्भे येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक यंत्र सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. या प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मास्टर ट्रेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी उद्भवणा-या तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी स्वप्निल देसाई, राजेश पाटील, प्रविण पाटील हे अभियंत्यांचे मास्टर ट्रेनर्स पथक तयार असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे ईसीआयचे ८ तज्ज्ञ  अभियंतेही कार्यरत असणार आहेत. ईव्हीएम मशीनची वाहतूक, तपासणी, वर्गीकरण आणि वितरण या सर्व प्रक्रिया काटेकोरपणे नियमानुसार पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कालबध्द व काटेकोर नियोजनाद्वारे महापालिका प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, सुरक्षा आणि तांत्रिक अचूकतेला प्राधान्य देण्यात येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूटमार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूटमार्च कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पोलिसांच्या वतीने  रूटमार्च काढण्यात आला. कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा रूटमार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये १०० हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून विशेषता संवेदनशील ठिकाणी हा रूटमार्च काढण्यात आला. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्याचे  आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले.

कल्याण पूर्वेत जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती

कल्याण पूर्वेत जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती कल्याण: महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात असून विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. अशातच कल्याण पूर्वेतील जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली. या फेरीला संस्थेच्या कार्यलयापासून सुरवात होऊन ड प्रभाग समिती कार्यालयामार्गे तिसगाव नाका, म्हसोबा चौक ते संस्थेचे कार्यलय कोळसेवाडी येथे सांगता झाली. या अभियानास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कालिदास कदम सचिव डी. आर. उंरकर, उपाध्यक्ष दुधराम सहारे, बाळसाहेब बागुल, कार्याध्यक्ष प्रकाश देसाई, खजिनदार केशव जाधव, सहसचिव वासुदेव वाडे, संस्थापक एम. जी. कवडे, के. एल. वासनकर, शशिकांत आंबेरकर आदींनी परिश्रम घेतले. तर या अभियानास केडीएमसीचे अधिकारी विजय सरकटे यांचे सहकार्य लाभले.

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे : राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्त तथा ‍निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. येत्या १५ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेचे मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या दोन्ही दिवशी निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाणे महापालिकेतील ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रे असून या ठिकाणी राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण ११५०० कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.  ‍विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले हे सर्व कर्मचारी असून त्यांची नावे मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नेरूळ, पनवेल आदी ठिकाणच्या मतदार यादीत नोंदलेली आहे. निवडणूक कर्तव्यामुळे हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने टपाली मतदानाची व्यवस्था केली असून, या सुविधेचा कर्मचारी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतपत्रिकांचा स्वीकार केला आहे.कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील टपाली मतपत्रिका भरुन त्या ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी प्रभाग समितीनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहणार असल्याचे टपाली मतदानाचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त दिनेश तायडे यांनी सांगितले.राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे मतदान इतर महानगरपालिका क्षेत्रात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचेही तायडे यांनी नमूद केले.अद्यापपर्यंत ज्यांनी टपाली मतपत्रिका घेतलेल्या नाहीत, त्यांनी त्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या सुविधेमुळे निवडणूक ड्युटीवर असलेले अधिकारी व कर्मचारी टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

पालिका निवडणुकीच्या शेवटचा रविवार घरोघरी प्रचाराचा धुराळा

पालिका निवडणुकीच्या शेवटचा रविवार घरोघरी प्रचाराचा धुराळा कल्याण:  कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी अवघे दहा दिवसच मिळाले. त्या दहा दिवसात केवळ दोनच रविवार उमेदवारांच्या हाती लागले. आज शेवटचा रविवार असल्याने कल्याण डोंबिवलीत बहुतांश मतदार नोकरदार वर्ग असल्याने नोकरदार मतदारांना रविवारी सुट्टी असल्याने मतदारांना भेटण्यासाठी सर्वच उमेदवारांनी नियोजन केल्याने दिवसभर मतदारांची गाठीभेटी घेण्यावर भर घातला जाणार असल्याने रविवारचा दिवस प्रचाराचा धुमाकुळ घालणारा  सुपर संडे ठरणार आहे. महापालिका निवडणूकीत काही उमेदवारांनी एआयचा आधार घेत त्यांनी केलेल्या प्रचाराच्या कामांचे व्हीडीओ तयार करुन ते सोशल मिडियावर टाकले आहेत. या निवडणूकीत प्रचारासाठी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. त्याचबरोबर फेसबूक, व्हाटसअप ग्रुप आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून प्रचार केला जात आहे. महापालिका निवडणुकीत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन्य प्रचार तंत्रापेक्षा घरोघरी जाऊन भेटी देताना सुट्टीचा दिवस गाठला जात आहे. प्रचाराच्या अंतिम चरणात मतदारांच्या घरी जाऊन उमेदवार आम्हाला निवडून द्या असे आवाहन करीत आहे. प्रचाराचा हा रविवार  सुपर संडे ठरणार आहे. सुट्टीच्या दिवशी मतदार घरी असतात. त्यांना उमेदवार गाठतात. त्यामुळे प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वत्रच प्रचार फेऱ्यानी धुमाकूळ घालणारा असणार आहे.

ठाणे महापालिकेतील ‘बिनविरोध’ प्रभागांमध्ये मतदान बंधनकारक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका -अजय जेया

ठाणे महापालिकेतील ‘बिनविरोध’ प्रभागांमध्ये मतदान बंधनकारक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका -अजय जेया अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा मतदानाचा आणि ‘नोटा’ (NOTA – None of the Above) द्वारे असहमती नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेचा संबंध ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५(अ), १४(अ), १७(ब), १८(ब), १८(क) आणि १८(ड) या सहा प्रभागांशी आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर २ जानेवारी २०२६ रोजी एक वगळता सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, उर्वरित उमेदवारांना कोणतेही मतदान न घेता बिनविरोध निवडून घोषित करण्यात आले. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी ही अनिवार्य प्रक्रिया आहे. मात्र, बिनविरोध निवडीच्या नावाखाली ही संपूर्ण प्रक्रिया टाळली जात असून त्यामुळे मतदारांचा नोटा निवडण्याचा अधिकार संपुष्टात येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नोटा हा मतदाराचा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार असून तो निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकेत पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, नोटा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर ‘बिनविरोध निवडणूक’ ही संकल्पनाच बदलली आहे. एकच उमेदवार रिंगणात असला, तरी मतदार त्या उमेदवारास नाकारण्याचा अधिकार नोटा द्वारे वापरू शकतात. अशा परिस्थितीत नोटाला अधिक मते मिळाल्यास नव्याने निवडणूक घेण्याची गरज भासू शकते, ज्यामुळे लोकशाही उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित उमेदवारांच्या फायद्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव टाकून सामूहिक माघारी घडवून आणल्या जात असल्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दलही याचिकेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारांमुळे मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेला धक्का बसतो आणि लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होतो, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ही याचिका कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या निवडीला थेट आव्हान देत नसून, मतदान न घेता उमेदवार बिनविरोध निवडून घोषित करण्याच्या कायदेशीर आणि घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करते, असे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित प्रभागांमध्ये मतदान घेऊन, उमेदवारांसह नोटा मतांची मोजणी करूनच निकाल जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या जनहित याचिकेची सुनावणी लवकरच बॉम्बे उच्च न्यायालयात होण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे राजकीय तसेच नागरिकांच्या वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पी. वेलरासू

निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पी. वेलरासू अनिल ठाणेकर ठाणे : आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी, यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू तसेच निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी ठाणे महानगरपालिकेतील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच  प्रशासनाच्या निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत, निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश दिले. यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, अनघा कदम, डॉ. मिताली संचेती, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या आढावा बैठकीदरम्यान निवडणुकीशी संबंधित मतदार यादी, मतदान केंद्रांची तयारी, ईव्हीएम व , स्ट्राँग रूम सुरक्षा, निवडणूक कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, टपाली मतदान, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आदी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.निरीक्षकांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत माहिती घेत पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, वेबकास्टिंग, चेकनाके व फ्लाइंग स्क्वॉड्स यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ईव्हीएम मशीनचे कमिशनिंग, सीलिंग व सुरक्षित साठवणूक याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. स्ट्राँग रूमवर २४ तास सुरक्षा, प्रवेश नोंदणी व सीसीटीव्ही निरीक्षण काटेकोरपणे राबवावे, असे निर्देश देण्यात आले. मतमोजणी प्रक्रियेतील नियोजन, मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींची वेळेत चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी ठेवण्यावर निरीक्षकांनी भर दिला.एकूणच ठाणे महानगरपालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याबाबत निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त करीत कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेने(उबाठा)ला जाहीर पाठिंबा – विजय घाटे

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेने(उबाठा)ला जाहीर पाठिंबा – विजय घाटे अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांतील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता ठाण्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना टक्कर देणार आहे. पाठबळ मिळाल्याने ठाणे महानगरपालिका निवडणुकीत निश्चित यश मिळेल असा विश्वास ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला. तर या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, उमेदवारांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रिपब्लिकन बहुजन सेनेचे अध्यक्ष विजय घाटे यांनी दिले. महाराष्ट्रातील २२ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाला एकत्र घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्या रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्या माध्यमातून दलित-बहुजन समाजासाठी सातत्याने समाजकार्य केले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत करण्याचा निर्धार रिपब्लिकन बहुजन सेनेने केला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन बहुजन सेना ताकदीने मैदानात उतरली आहे. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची व विकासाची लढाई असल्याचे विजय घाटे यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार दिव्यातील प्रभाग क्रमांक २८ अ च्या त्यांच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती केली परंतु त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली असल्याने मदत करू शकत नाही परंतु ही लढत मैत्रीपूर्वक करण्यात येईल असे ठरले असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रही देण्यात आले.

काँग्रेसचा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ कलमी जाहिरनामा

काँग्रेसचा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ कलमी जाहिरनामा महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा – हर्षवर्धन सपकाळ अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा संकल्प काँग्रेस (आय) ने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक – २०२६ साठी ठाणे शहर काँग्रेसने आपला १५ कलमी जाहिरनामा शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित केला. या जाहिरनाम्या द्वारे काँग्रेसचे एक प्रकारे सर्वसामान्य ठाणेकरांना साद घातली आहे. यावेळी बोलताना सपकाळ यांनी, सत्ताधारी पक्षांवर चौफेर टीका करीत महायुतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले.ठाणे व उर्वरित महाराष्ट्रात सद्यस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड भाष्य केले. महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असुन हा पैसा चार मार्गाने उकळला जात आहे. यात समृद्धी महामार्ग सारख्या शासकीय योजनांच्या भ्रष्टाचारातून पैसा, बदल्यांमध्ये पैसे उकळणारे देवाभाऊ, भूमाफियांमार्फत शासकीय जमिनी विकून पैसे कमावले, एकनाथ शिंदे भावाच्या माध्यमातून अंमलीपदार्थ सारख्या अवैध धंद्यातुन पैसा कमवित असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. ठाणे महापालिका निवडणुक- २०२६ च्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात काँग्रेसने १५ कलमी उपक्रमांची घोषणा केली आहे. यात खड्डे विरहीत रस्त्यांची सुरक्षित सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, दिवाबत्ती, नियोजनपूर्वक पाठीपुरवठा करताना पाण्याच्या बचती बरोबरच वॉटर ऑडीट करणे, सार्वजनिक स्वच्छता, नुक्कड दवाखान्यांच्या माध्यमातुन आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाची सुरक्षा, स्मशानभूमी – दफनभूमीत मोफत अंत्यसंस्कार, खेळासाठी मैदाने व खेळाडूंना प्राधान्य, कला – साहित्य – वाचन संस्कृतीची जपणुक तसेच, व्यवसाय आणि स्थानिक भुमिपुत्रांकरीता रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन देण्याच्या योजनांचा समावेश केला आहे.विशेष म्हणजे, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे रोखुन आरक्षित भुखंड अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने जाहिरनाम्यात व्यक्त केला आहे.तसेच, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारां समवेत संवाद साधत अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढविणाऱ्या या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपिठावर ठाण्याचे प्रभारी तसेच प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, राजेश जाधव, प्रदीप राव, महेंद्र म्हात्रे, स्मिता वैती, रवींद्र कोळी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चौकट काँग्रेसचे खेड्याकडे चला ठाणे महापालिका निवडणूकीच्या जाहिरनाम्यात काँग्रेसने खेड्याकडे चला… हा महात्मा गांधींचा मार्ग अवलंबला आहे. ग्रामीण धर्तीवर विहिरींचे पुर्नभरण आणि पुर्नजिवीत करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त केला आहे. पालिका शाळांमध्ये सुतारकाम, गवंडीकाम अशा बारा बलुतेदारी कार्याच्या प्रशिक्षणासोबत शाळेत चरखा प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्याचे जाहिर केले आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातुनही ज्येष्ठांना चरखा चालविण्यास शिकवले जाणार आहे. प्राचीन मुलभुत आयुर्वेदाचेही शिक्षण पालिका शाळेतुन दिले जाणार असल्याचे काँग्रेसने नमुद केले आहे.

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ दीवच्‍या खेलो इंडिया मैदानात परभणीच्‍या अक्षय कोटलवारांचे कौतुक दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धा सलग दुसऱ्या वर्षी दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर यशस्‍वी पार पडली. या यशामागे परभणीचा मराठमोळा अक्षय कोटलवारांचे मेहनत दिसून आली. यामुळेच साऱ्या देशभरात कोटलवार यांच्‍या संयोजनाचे कौतुक होत आहे. मूळचे परभणी येथील अक्षय कोटलवार हे सध्या  दीव व दमण शासनामधील युवा क्रीडा अधिकारी आहेत.  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खेलो इंडिया बीच स्‍पर्धेची संकल्‍पना त्‍यांच्‍यासमोर येताच भव्‍य आयोजनात ध्येय पाहिले. आणि ते यशस्‍वी करून दाखवलीही.  कोटलवार हे  राष्ट्रीय टेबलटेनिसचे खेळाडू असून दीव येथे आल्‍यानंतर त्‍यांनी बीच स्‍पर्धेसाठी प्रत्‍यक्ष मैदानात उतरून अनोखे आयोजनाचा अध्याय लिहिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये भारतातील पहिल्या मल्टी-स्पोर्ट्स बीच गेम्ससाठी नोडल अधिकारी म्हणून अक्षय कोटलवार यांनी जबाबदारी यशस्‍वी पेलली. याबाबत बोलताना कोटलवार म्‍हणाले की, पहिल्‍या स्‍पर्धेत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.  या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात केल्यामुळे संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला.पहिल्‍सा यशस्वी आयोजनानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली. दुसऱ्या पर्वातही आम्‍ही यशस्‍वी ठरलो. स्‍पर्धा संयोजनाच्‍या प्रवासात नैसर्गिक वाळूवरील खेळ, बदलते हवामान, समुद्रकिनारी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, खेळाडूंची सुरक्षितता आणि लॉजिस्टिक्स यांसारखी अनेक आव्हाने समोर आली. मात्र, टीमवर्क, योग्य नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे आम्ही ही सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पार केल्‍याचेही सांगून कोटलवार पुढे म्‍हणाले की हा अनुभव केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हता, तर भारतात बीच स्पोर्ट्सच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. गतवर्षीच्‍या स्‍पर्धेत समरोपाच्‍या आधीच्‍या रात्री भरतीमुळे साऱ्या  मैदानात पाणी भरून आले होते. बीच सॉकरचा अंतिम लढत होणार की नाही असो सवाल उपस्‍थित झाला होता.  तेव्‍हा रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत उभे राहून पाणी काढण्यासाठी अक्षय कोटलवार यांच्‍या टीमने शर्थीचे प्रयत्‍न करीत नव्‍याने मैदान तयार केले. सॉकर लढत खेळवून स्‍पर्धा यशस्‍वी करून दाखवली होती. यंदाही स्‍पर्धा काळात  महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून आलेल्‍या खेळाडूंना अक्षय कोटलवार विशेष पाहुणचार देत होते. खेळाडूंची गैरसोय होऊ नये  स्‍वतः  मैदानात उपस्‍थित होते. खेलो इंडिया बीच स्‍पर्धेच्‍या यशानंतर आशियाई बीच स्‍पर्धा दीवमध्ये घेण्यासाठी कोटलवार यांचे प्रयत्‍नशील आहेत.