Month: January 2026

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी २०० मुलींना मोफत लसीकरण

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी २०० मुलींना मोफत लसीकरण ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणे शतक महोत्सवानिमित्त सखी सावित्री समितीतर्फे, इनर व्हील क्लब्स – झोन ५ यांनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने २०० मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षणासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) सर्वावॅक एचपीव्ही (Cervavac HPV) लस यशस्वीरित्या दिली आहे. या लसीचे दोन डोस मुलींना मोफत देण्यात आले. पहिला डोस २१ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला, तर दुसरा डोस २८ जानेवारी २०२६ रोजी देण्यात आला. हे संपूर्ण लसीकरण वैद्यकीय देखरेखीखाली आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या सहाव्या मजल्यावरील भोळे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इनर व्हील स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाला मोठे सहकार्य केले. हा उपक्रम मुलींच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि गरजू मुलींना मोफत लसीचा लाभ मिळाला आहे.

  पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली

पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली मुलुंड म्हाडा कॉलनीत फेरीवाल्यांमुळे नागरीक त्रस्त पालिका अधिका-यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी मुंबई: निष्पाप लोकांचा जीव गेल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेला जाग येत नाही. हे सर्व श्रुत आहे. भांडुपची दुर्घटना असो वा कुर्ल्यातील मारहाण प्रकरणानंतर फेरीवाल्यांवर युध्द स्तरावर कारवाई करण्यात आली. आता दोन्ही प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी ठाण मांडायला सुरवात केली आहे. याचा सर्वाधीक त्रास मुलुंडकरांना होत असून केवळ फुटपाथच नव्हे तर रस्त्यांवरही त्यांनी आपले बस्तान मांडुन ठेवले आहे. दिखाऊ पणाची कारवाई करणारी पालिका प्रशासन वारंवार कायदा मोडणा-या फेरावाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई का करीत नाही असा प्रश्न नागरीक करीत आहेत. मुलुंड पश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमनाबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारी नंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र दुस-याच दिवशी फेरीवाल्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले. दिखाऊ पणाची कारवाई करणारे पालिका प्रशासन अशा फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल का करीत नाहीत. असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. एम.जी. मार्गावर दुकानदार व फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवली आहे तर रस्तांवर बेकायदेशीर पार्किग मुळे पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे स्टेशनकडे येणा-या बेस्ट बसेसमुळे भांडुप सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत अरुंद रस्त्यातून बेस्ट बसला मार्गक्रमण करावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा भागात फेरीवाल्यांनी व बेकायदेशीर पार्किंगवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरीकांना या भागातून चालणे अवघड होऊन गेले आहे. अशीच परिस्थिती मुलुंड पश्चिम येथील रामरतन त्रीवेदी मार्ग, एस.एल.मार्ग या ठिकाणी दिसून येते. मुलुंड पुर्व पश्चिम येथे तर अनेक ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र अशी पाटी लावण्यात आली आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे फेरीवाले याच पाटीखाली आपला ठेला (दुकान) लावतात. त्यांना आता पालिकेच्या कारवाईची भीती राहिली नसून पालिका व फेरीवाल्यांमधील आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे फेरीवाले व नागरीक सांगतात. मुलुंड पुर्व येथील म्हाडा कॉलनी रिध्दी सिद्धी इमारती मधील दुकानदारांनी त्यांचे विक्रीचे सामान शटर बाहेर काढल्याने नागरीकांना या ठिकाणी चालता येत नाही. त्यातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगमुळे शाळेत जाणा-या लहान मुलांना व पालकांना जीव धोक्यात घालून रस्तांवरुन चालावे लागते. दुकानदारांमुळे बेकायदेशीर पार्किंग ही येथील नागरीकांची डोकेदुखी ठरली असून अशाच पार्किंगमुळे म्हाडा कॉलनीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केली जात असल्याचे नागरीक उघडपणे बोलतात. अनेकांनी तर पालिकेची जागा फेरीवाल्यांना चालविण्यासाठी दिली असून त्याबदल्यात महिना ठराविक रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाते. हा सर्व प्रकार म्हाडा कॉलनीत राजरोसपणे चालतो.  पालिका व पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली चालणा-या या हप्ते वसुलीवर कारवाई मात्र शुन्य असल्याचे नागरीक सांगतात. चाईनीस, पानीपुरी, नारीयळ पाणी व वडापावच्या फेरीवाल्यांकडून ही हप्ते वसूली केली जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालिका व फेरीवाल्यांच्या आर्थिक उलाढाली पाहता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांपासून ते सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आता नागरीक करीत आहेत.

स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन शेत जमीनीची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.

स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन शेत जमीनीची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे. राजीव चंदने मुरबाड : मुरबाड माळशेज मार्गावर असलेल्या सायले गावचे हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन कष्टकरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी नापिक होणार असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन जीवनमानावर परिणाम होणार असल्याने या क्रेशरला सायले ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला असुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये असा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन विरोध दर्शविला असुन जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टोन क्रेशरच्या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतेच शिवाय शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर विपरीत परिणाम होऊन गुणवत्ता ढासळली जाते.त्यातुन निघणाऱ्या धुरळ्यामुळे  परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागते तर काही जणांचे बळी देखील जातात.दरम्यान तो धुरळा शेत जमिनीवर बसला तर ती जमीन नागंरता येत नाही.तसेच त्या जमीनीत खरिब किंवा रब्बी पिक घेता येत नाही.मुरबाड तालुक्यातील कोलठण,माल्हेड,पवाळे,म्हाडस, बांधीवली शिरगाव,गोऱ्याचा पाडा,या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे जमीनीवर व जीवनमानावर त्याचा परिणाम झालेला दिसुन येत आहे.या प्रकारांची आपल्या गावात पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन सायले ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या. ग्रामसभेत बहुमताने ठराव घेऊन या क्रेशरला तिव्र विरोध केला आहे. कोट या स्टोन क्रेशरमुळे गावचे परिसरात प्रदुषण होणार असुन तेथे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावातील नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळणार नाहित त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विरोध करुन तसा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे -जागृती पानसरे, सरपंच ग्रामपंचायत सायले कोट या धोकादायक क्रेशरला सर्व ग्रामस्थांनी विरोध केला असल्याचा ठराव ग्रामसभेत घेतला असुन तो जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केला आहे. -अशोक बांगर, ग्राम पंचायत अधिकारी.सायले.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा काढून अनपेक्षित सत्कार

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा काढून अनपेक्षित सत्कार रमेश औताडे मुंबई: कसारा रेल्वे स्थानकावर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष नारायण बागडे यांचा कार्यकर्त्यांनी अनपेक्षित व उत्स्फूर्त सत्कार केल्याचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उपस्थितीची माहिती कशी मिळाली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. बागडे स्थानकावर आले असल्याची खबर लागताच कार्यकर्त्यांची फोनाफोनी सुरू झाली. काही क्षणांतच हार आणि शाल घेऊन कार्यकर्ते स्थानकावर दाखल झाले.  त्यानंतर  यांच्या गळ्यात पुष्पहार घालून व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने स्थानकावरील प्रवासीही क्षणभर थबकले. कार्यकर्त्यांचे प्रेम, आपुलकी आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा या क्षणातून स्पष्टपणे दिसून आली, असे बागडे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले. हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांनी पाहिलेला एक अविस्मरणीय क्षण ठरला.

 प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली

प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली तुम्हाला अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असे वाटले नव्हते— प्रसाद लाड मुंबई: ‘अशाप्रकारे बारामतीत येऊन, तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, अशी अजूनही कल्पना करवत नाही’ म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांना बारामती येथे वाहिली श्रद्धांजली. यावेळी प्रसाद लाड यांनी शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सोबत आमदार चित्राताई वाघ, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली कल्याण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या असह्य दुःखद प्रसंगी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची, जनतेसाठी केलेल्या कार्याची आणि संघर्षमय वाटचालीची आठवण यावेळी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे दादा आपल्या आज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्ते वल्ली राजन यांनी दिली.

अजित पवारांच्या  विमान अपघाताची चौकशी सुरू

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानतंर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.

युजीसीच्या नव्या नियमास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

 नवी दिल्ली : देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी  कार्यरत असलेल्या युजीसीने लागू केलेल्या नव्या निमयमास सर्वोच्च न्यायालयातकडून  स्थगिती देण्यात आली आहे. देशभरातली अनेक विद्यार्थी संघटना, संस्थांनी विरोध दर्शविला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ युजीसीने एक नवा नियम जारी केला होता. मात्र, आता विद्यापीठ  अनुदान आयोगाच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयातकडून  स्थगिती देण्यात आली आहे. अशाने वेगवेगळ्या प्रवर्गाची वेगेवगळी वसतिगृह तयार होतील, अशी चिंता न्यायाधीशांनी व्यक्त केली. तसेच, केंद्र सरकारकडून नियमांचा मसुद्यावर पुनर्विचार करण्याबाबत सुतोवाचही न्यायालयाकडून करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत, याचिकाकर्त्यांच्यावकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, संविधनाने सर्वांनाच संरक्षण दिलं असून सर्वच नागरिकांचे रक्षण झाले पाहिजे. मात्र, युजीसीचा नवा नियम संभ्रमात टाकणारा असून भेदभाव करणारा आहे. या नियमांत केवळ ओबीसी, एसी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्याच संरक्षणाचा मुद्दा आहे.