१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम
अनिल ठाणेकर
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे कालपासून सुरू झालेल्या “मालवणी महोत्सव- २०२६” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजित पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे.
महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी,गणपतीचे अथर्वशीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा तसेच दोन दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कवीवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असुन रिल स्पर्धाही आयोजित केली आहे. तर, महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा”मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.कोकणातील शेतकरी, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतुने नगरसेवक सीताराम राणे गेली २७ वर्षे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे भव्य आयोजन करतात. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार,वनमंत्री गणेश नाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर, आ. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत.
चौकट –
रामती येथे नुकतेच अपघाती दुःखद निधन झालेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणुन कोकण ग्रामविकास मंडळाच्या ठाण्यातील उन्नती गार्डन मैदानातील मालवणी महोत्सवासाठी स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी उभारण्यात आली आहे. या मालवणी महोत्सवात एकुण ७५ च्या आसपास व्यावासायिकांचे स्टॉल्स आहेत. प्रवेशद्वारावर कोकणस्थ रेखीव मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन भाविक आणि खवय्यांना घेता येणार असुन या मंदिरात दररोज भजन आणि मालवणी पद्धतीतील आरती केली जाणार आहे.तसेच, श्री स्वामी समर्थाची महती विषद करणारे विशेष भजन कणकवली वाघेरी येथील भजनी मंडळ सादर करणार आहे.
चौकट –
मालवणी महोत्सवात ११ दिवस दररोज अग्निहोत्र विधी होणार असुन विविध लोककलांचा जागर आणि कथा – कविता आदी साहित्यरूची वाढवणारे रंगतदार कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलावर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार असुन राज्यस्तरीय स्त्रोत्र पठण स्पर्धा व काव्यलेखन स्पर्धा होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी, खेळ पैठणीचा व विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत.असे आवाहन मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *