Month: February 2026

महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत कुरुक्षेत्रच्या थीम पार्क मैदानावर वेग, चपळाई आणि डावपेचांचा महाउत्सव हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरु असलेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ साकारत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. थीम पार्क मैदानावर उपउपांत्य फेरीतील सामन्यांत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता वेगवान आक्रमण, भक्कम संरक्षण आणि अचूक डावपेचांचा प्रत्यय दिला. उपांत्य फेरीत किशोर गटात महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा, कोल्हापूर विरुद्ध उत्तरप्रदेश, तर किशोरी गटात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब, राजस्थान विरुद्ध हरयाणा अशी थरारक लढती रंगणार आहे. किशोर गट : महाराष्ट्राची मणिपूरवर दणदणीत सरशी उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने मणिपूरचा ३०–२१ असा ५.३५ मि. राखून ९ गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.५०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाडे (१.१०, १.५५ मि. संरक्षण), प्रफुल्ल वसावे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), विक्रम राठोड (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मणिपूरकडून एल. सिंग (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), पी. पोहिंबा (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी झुंज दिली. किशोरी गट : महाराष्ट्राचा विदर्भावर एकतर्फी डावाने विजय किशोरी गटात महाराष्ट्राने विदर्भावर एक डाव आणि १२ गुण राखून (२८–१६) विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अनुषा तामखडे (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), अपर्णा वर्दे (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), राही पाटील (२.१० मि. संरक्षण), कार्तिकी यलमार (१.५० मि. संरक्षण), ऋतुजा सुरवसे (१.३० मि. संरक्षण), पियुशा पानमळकर (नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी सलग दमदार कामगिरी केली. विदर्भकडून नव्या दुग्गा (१ मि. संरक्षण), मनवी राजू (१ मि. संरक्षण व ४ गुण), कोमल ठाकरे (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. किशोर गट : ओडिसाची तामिळनाडूवर एकतर्फी धडक ओडिसाने तामिळनाडूचा २३ गुणांनी (४८–२५) पराभव केला. ओडिसाकडून सत्या (२.३०, २ मि. संरक्षण व १२ गुण), अमरज्योत (१.२०, १ मि. संरक्षण व १० गुण), धनंजय दास (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ साकारला. तामिळनाडूकडून कौशिक (१.५० मि. संरक्षण व २ गुण) याने किल्ला लढवला. किशोर गट : उत्तरप्रदेशची विदर्भवर दणदणीत बाजी उत्तरप्रदेशने विदर्भवर २९ गुणांनी (५३–२४) मात केली. उत्तरप्रदेशकडून देव कुमार (१.४० मि. संरक्षण व ८ गुण), बिट्टु यादव (१.४५, १.१० मि. संरक्षण व ६ गुण), इशान (१, २ मि. संरक्षण व ८ गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली. विदर्भकडून रोशन पालटे (१ मि. संरक्षण व ४ गुण) याने प्रतिकार केला.…

रस्ते अपघात पीडितांसाठीच्या `कॅशलेस उपचार योजने’तील उपचाराची रक्कम ५ लाखापर्यंत वाढवावी – नरेश म्हस्के

रस्ते अपघात पीडितांसाठीच्या `कॅशलेस उपचार योजने’तील उपचाराची रक्कम ५ लाखापर्यंत वाढवावी – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली, रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘कॅशलेस उपचार योजना’ सुरु केली केली आहे. या योजनेतील आईसीयूची मर्यादा किमान २५ दिवसांपर्यंत वाढवावी तसेच उपचाराची रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी आज लोकसभेत केली. कॅशलेस उपचार योजनेमध्ये या दोन सुधारणा केल्यास गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी कॅशलेस उपचार योजनेत करावयाच्या बदलांविषयी लोकसभा अध्यक्षांसमोर ठळक मुद्दे मांडले. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १६२ अंतर्गत रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना २०२५ ही दिनांक ५ मे २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आली आहे. आज देशभरात रस्त्यावर होणाऱ्या  अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे. कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला की त्यांच्या उपचारासाठी कुटुंबावर आर्थिक संकट ओढावतं. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेली ‘कॅशलेस ट्रीटमेंट योजना’ ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. ‘गोल्डन ऑवर’ म्हणजे अपघातानंतरचे पहिले काही तास, या काळात उपचार मिळाला तर अनेकांचा जीव वाचू शकतो, ही संकल्पना लक्षात घेऊन सरकारने सुरु केलेली ही योजना नक्कीच दिलासादायक असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. योजना आणखी प्रभावी आणि उपयुक्त ठरण्यासाठी काही सुधारणांची आवश्यकता असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. देशातील एम्स (AIIMS) तसेच इतर नामांकित रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार, मस्तिष्काला (ब्रेन) झालेली गंभीर दुखापत आणि पाठीच्या कण्याला (स्पायनल कॉर्ड) झालेली इजा अत्यंत गंभीर असते. अशा रुग्णांना धोका टळेपर्यंत सरासरी १८ ते २५ दिवस ICU मध्ये ठेवणं आवश्यक असतं. सध्याच्या कॅशलेस ट्रीटमेंट योजनेत फक्त १.५ लाख रुपये आणि ७ दिवसांपर्यंतच आयसीयू उपचारांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. अपघात झाल्यावर रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण सात दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतो, पण सात दिवसांनंतरही तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर पुढील उपचारांसाठी खर्चही खूप असतो. गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च परवडणारा नसतो. म्हणून, काही कुटुंबं उपचार थांबवतात, काही कर्ज काढतात, तर काहींच्या आयुष्यभराची कमाई उपचारामध्ये संपून जाते. अशा वेळी, रुग्णाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.आजच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एका दिवसाचा आयसीयू खर्च अनेक हजार ते लाखो रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे या योजनेतील आर्थिक कव्हरेज वाढवणं ही काळाची गरज आहे. जर ही रक्कम किमान ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली, तर गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना आवश्यक ते उपचार पूर्ण करता येतील आणि कुटुंबांवरचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर आईसीयूची मर्यादा किमान २५ दिवसांपर्यंत वाढवली आणि कव्हरेज ५ लाख रुपये केले, तर असंख्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. अनेक जीव वाचतील, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. ही मागणी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही, तर मानवतेच्या दृष्टीने आहे. गरीब, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या वेदना समजून घेऊन सरकारने हा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली.

 डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष

डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष पाणीपुरवठा नियमित करण्याची प्रकाश भोईर यांची  मागणी कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याकडे भारतीय जनता पार्टीने लक्ष वेधले आहे. माजी नगरसेवक तथा भाजपाचे प्रकाश भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन जास्त दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. डोंबीवली पश्चिमेतील प्रभाग क्र २२ सहयाद्री नगर, राजूनगर, सरोवर नगर, गरिबाचा वाडा, साई नगर, शंकेश्वर नगर तसेच महालक्ष्मी चौक, या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणावर पाणी पुरवठा कमी दाबाने येत असून काही ठिकाणी दिवसातून एका तासापेक्षा कमी पाण्याचा वेळ मिळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. तसेच केडीएमसीचा टैंकर पुरवठा वेळेवर व पुरेसा होत नसल्याने दोन-अडीच हजार रु. देऊन खाजगी टैंकर आणावे लागतात. काही ठिकाणी दुपारच्या वेळेत पाणी असल्याने गृहिनींना घरची काम आटपून मुलांना शाळेत सोडणे तसेच बाकीच्या दैनंदीन कामातून वेळ काढणे कठीण होते. शासनाच्या माध्यमातून अमृत योजनेतून राजू नगर व गरिबाचा वाडा या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम अत्यंत प्रकाश धिम्या गतिने सुरू असल्याने भविष्यात हे काम कधी होईल हे सांगता येत नाही. तसेच हे झाले तरी डोबिंवली पश्चिमेला ह्या टाक्या भरण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे तशी वितरण व्यवस्थेला डोंबिवली पश्चिमेला अधिकची व्यवस्था करण्यासाठी जल वाहिन्यांची वितरण व्यवस्था दिसून येत नाही. तरी या  परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थित होई पर्यंत नागरिकांना त्यांच्या मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर जास्त वाढवून नियमित व महापालिकेच्या दरात देण्याची व्यवस्था करावी शक्य असल्यास मोफत देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे.

कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही –  एकनाथ शिंदे

कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही –  एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर चिपळूण, कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि जनतेच्या श्वासावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट रणशिंग फुंकलं! चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीत इटलीतून हद्दपार करण्यात आलेली मितेनी कंपनी अप्रत्यक्षपणे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या नावाने कार्यरत आहे. ‘अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोकणात थारा देणार नाही! जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!’ असे सांगत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. विकासाच्या नावाखाली कोकणचा निसर्ग आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या शक्तींविरोधात सरकार कठोरात कठोर भूमिका घेईल, असा निर्धार त्यांनी यावेळी जनतेसमोर मांडला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेऐवजी जणू विकासाचा रणसंग्रामच उघडला. हजारोंच्या जन समुदायासमोर त्यांनी कार्यकर्त्यांची ताकद, कोकणाशी शिवसेनेचं ऐतिहासिक नातं, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या योजना, केंद्र-राज्य सरकारची “डबल इंजिन” शक्ती आणि रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार एका श्वासात मांडला. सभेच्या सुरुवातीलाच शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर श्रद्धांजली अर्पण करत वातावरण भावनिक केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की ही केवळ उमेदवारांची नाही, तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक विकासाच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे.शिंदेंनी ठामपणे सांगितलं की पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता आहे. या पक्षात कोणी मालक नाही, कुणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि संपूर्ण पक्षाचा डोलारा हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे, असा थेट संदेश त्यांनी शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.कोकणाच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेना आणि कोकणाचं भावनिक नातं उलगडलं. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणात पुरलेली आहे, बाळासाहेबांनी कोकणावर भरभरून प्रेम केलं आणि कोकणानेही शिवसेनेवर तेवढंच प्रेम केलं, असं सांगत त्यांनी नारळी-पोफळी, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि निसर्गसंपन्न कोकणाच्या विकासाची गरज अधोरेखित केली.विधानसभेतील महायुतीच्या २३२ आमदारांच्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख करत शिंदेंनी, हा विजय माझ्या लाडक्या बहिणींच्या भावाने घडवलेला चमत्कार असल्याचं सांगितलं आणि महिलांच्या मतदानशक्तीचं खुलेपणाने कौतुक केलं. लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं की ही योजना कधीही बंद होणार नाही. दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च करून अडीच ते पावणेतीन कोटी महिलांना थेट लाभ दिला जात आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या नावावर पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, समाजात सन्मान वाढला आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी शेतकरी सन्मान योजना, पिक विमा सुलभ योजना, कर्जमाफीसाठी समिती स्थापन आणि अतिवृष्टीसाठी ३२ हजार कोटींच्या पॅकेजचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांनाही न्याय दिला जाईल आणि शेतकऱ्यांना सरकार कधीही सोडणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून कोट्यवधी रुपयांची मदत दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की ७० ते ८० हजार रुग्णांना थेट लाभ झाला असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. माझ्या एका सहीमुळे लोकांचे जीव वाचत असतील तर त्याहून मोठं समाधान काहीच नाही, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं. ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सरकारी कार्यालयांचे फेरे थांबले असून जवळपास पाच कोटी लोकांपर्यंत सेवा पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. ही महाराष्ट्राच्या प्रशासनातील मोठी उपलब्धी असल्याचं त्यांनी नमूद केलं.कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विकासाचा मास्टर प्लॅन मांडला. मुंबई ते अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण, काजू, आंबा आणि मत्स्य व्यवसायाला चालना, ३० लाख कोटींचे उद्योग करार, रस्ते आणि रेल्वेला प्राधान्य, तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण या सर्व बाबी त्यांनी सविस्तर मांडल्या.महिलांसाठी बचत गट, प्रशिक्षण केंद्रे आणि ‘लखपती दीदी’ योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा केला जाईल, असं सांगत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला.मितेनी – लक्ष्मी ऑरगॅनिक या प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांबाबत बोलताना त्यांनी लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे आणि जे कारखाने लोकांच्या आरोग्याला घातक ठरतील त्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले. चिपळूण तालुक्यातील भूस्खलनग्रस्त भागांसाठी संरक्षण भिंत उभारण्याचा आणि कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचा ठाम शब्द देत त्यांनी लोकजीवन धोक्यात येऊ देणार नाही, ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगितलं.ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमध्ये सवलत, तीर्थदर्शन योजना, तसेच महिलांसाठी व्यावसायिक केंद्रे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.केंद्र सरकारच्या बजेटचं कौतुक करत शिंदेंनी सांगितलं की भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि हे बजेट त्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसाचा विचार करून काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.राजकारणात शब्दाला किंमत असते, असा ठाम संदेश देत त्यांनी आपली त्रिसूत्री मांडली. उपलब्धता, साधेपणा आणि विश्वासार्हता. शब्द दिला की तो पाळणं हीच माझी ओळख आहे, असं त्यांनी सांगितलं.शेवटी त्यांनी थेट आवाहन केलं की 7 तारखेला धनुष्यबाण आणि कमळाच्या निशाणावर बटण दाबा, सर्व उमेदवारांना विजयी करा आणि रत्नागिरी जिल्ह्यावर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. ही केवळ मतदानाची नाही, तर तुमच्या आणि कोकणाच्या भवितव्याची निवडणूक आहे, असा ठाम एल्गार त्यांनी केला.सभागृहात आणि सभोवतालच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर, महिलांचा, युवकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही सभा केवळ प्रचारसभा नव्हती, तर चिपळूण आणि कोकणाच्या विकासासाठी दिलेली राजकीय घोषणा ठरली.यावेळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि चिपळूणमधील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले

केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले अखेर ६ वर्षाची प्रतीक्षा संपली कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवड झाली असून ६ वर्षापासून असलेली राजकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी – थवील आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी थविल  आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीच होती. मात्र आजच्या महासभेत मुंबई जिल्हाधिकारी आचल गोयल या पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या, त्यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके उपस्थित होते. कोरोना काळात नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने राजकीय राजवट सुरु झाली होती. कोरोना तसेच विविध कारणांमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. गेल्या महिन्यात निवडणुका संपुष्टात येऊन अखेर ६ वर्षानंतर प्रतीक्षा संपली आहे. आज महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली आहे. १९८३ नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता संपुष्टात आली आहे. १९८३ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल १९९५ पर्यंत म्हणजेच तब्बल १२ वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे २०२० मध्ये कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या ६ वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सभागृहाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान या महापौर आणि उपमहापौर पद निवडीच्या विशेष सभेमध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली. आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोटी केलेली पाहायला मिळाली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

 राज्यात मैत्री, नाशिकमध्ये कुस्ती!

राज्यात मैत्री, नाशिकमध्ये कुस्ती! उपमहापौरपदासाठी शिंदे गट भाजपला भिडला हरिभाऊ लाखे नाशिक –महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना नाशिकच्या महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गट आणि उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात उतरल्याने ही…

 महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात ‘हुतात्मा दिन’ संपन्न महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे अनिल ठाणेकर ठाणे : महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, ३० जानेवारीला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.’धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, वंदना शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख  उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधी हत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील  एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

जागतिक कर्करोग दिन

जागतिक कर्करोग दिन ‘जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र’ अनिल ठाणेकर ठाणे-दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे तसेच वेळेवर निदान व उपचारांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे…

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा रमेश औताडे मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवा वापर करा व इंधन वाचवा असे आवाहन करत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरित ऊर्जा वापरण्याचे व पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन सक्षम २०२५ – २६ (संरक्षण क्षमता महोत्सव ) या देशातील ऑइल  कंपन्याच्या जनजागृती कार्यक्रमात रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे केले. या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील बाडता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२५-२६ हे १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातील, संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाइन “कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन” अशी असेल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या (ओएमसी) राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक दिपक वाघ यांनी सांगितले. उमेश विलास कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू), महाराष्ट्र, थॉमस जेम्स, प्रमुख रिटेल (पश्चिम), बीपीसीएल, मिहिर जोशी, राज्य प्रमुख (रिटेल), एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएल, वरुण कुमार, उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन्स पश्चिम विभाग, एचपीसीएल, देवांशु मिश्रा महाव्यवस्थापक ल्युब्स, आयओसीएल, जितेंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक (विपणन), गेल इंडिया लिमिटेड यांचा समावेश होता.

फेसबुकचा वाढदिवस!

विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे लहानपणी ऐकले होते ; पण याची खरी प्रचिती फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटमुळेच आली. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आज म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी…