वीज दरवाढ टळली
मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. महावितरणच्या याचिकेवर आयोगाने गेल्या वर्षी मार्च अखेरीस एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती.
महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनुसार आयोगाने जून २०२५ मध्ये एक आदेश दिला होता. त्या आदेशाला काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर बोट ठेऊन जूनचा आदेश रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करून व तांत्रिक बाबी पूर्ण करून आदेश देण्याची सूचना नोव्हेंबरमध्ये केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या पुनर्विचार याचिकेवर जनसुनावणी करून, नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन करून व सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून आता आदेश दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले आहे.
