Month: March 2026

बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण :  शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला ही अत्यंत महत्त्वाची आहे. कला विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना देते. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि सर्जनशीलता वाढते. विद्यार्थ्यांच्या जन्मजात प्रतिभांना वाव मिळावा या उद्देशाने, कल्याणमधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने गेल्या नऊ वर्षांपासून ही जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली आहे. आणि हे वर्ष स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. नेहमीप्रमाणे, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुतेक शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावर्षी या स्पर्धेला सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सर्व शाळांमधील सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले. या वर्षीच्या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी या स्पर्धांमध्ये दोन नाविन्यपूर्ण स्पर्धा जोडण्यात आल्या आहेत: एकपात्री अभिनय आणि समूह गायन. या दोन्ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने, सहभागींची संख्या तुलनेने कमी होती, परंतु प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. सुमारे २०० स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. तसेच, स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शाळांनी आयोजक म्हणून काम करणाऱ्या आमच्या बालक मंदिर संस्थेबद्दल स्पर्धकांनी खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, २८ फेब्रुवारीला कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  निखिल राणे (स्मायलिंग व्हिसलर), सुधीर चित्ते (रंगकर्मी) आणि रमेश गोरे, बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष उपस्थित होते.

 किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत

किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत कल्याण: कल्याणमधील किडनी पेशन्टला  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रामबाग शाखेतर्फे रूपये ५० हजार रुपयांची  मदत करण्यात आली.  शिवसेना रामबाग शाखेचे निष्ठावंत शिवसैनिक व ओम कबड्डी संघाचे खेळाडू मंगेश नेटावटे यांना किडनीचा मोठा आजार झाला. त्यांना आता डायलीसच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना मीरा हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस उपचार घ्यावे लागले, मीरा हॉस्पिटल ने त्यांना बिल कमी करून भरपुर सहकार्य केले. त्यांचा डायलीसीसच्या मोठ्या खर्चाचा विचार करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी  मार्गदर्शनाखाली  रामबाग शाखेने तसेच  शिवजयंती उत्सवात तर्फे रू.५० हजरांचा धनादेश देऊन सहकार्य केले.

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे, राज्याच्या परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना, ‘हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,’ असे प्रतिपादन केले. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना नाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ‘अपघात मुक्त प्रवास’ हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे! ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध  वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. ‘आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,’ असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असे – परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन रमेश औताडे मुंबई : बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडी  प्रदेशाध्यक्ष लीनाताई अहिर यांनी आझाद मैदानात २१ जानेवारी पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अद्याप सुरू केले आहे. कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी यासाठी त्यांनी  ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन दिले. मागणी मान्य नाही झाली तर आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे. कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, संबंधित चालक व जागा मालकांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी लीनाताई अहिर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात अवैध धंद्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारून महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. लीनाताई अहिर यांनी प्रशासनाला ठोस कारवाईसाठी निश्चित कालमर्यादा द्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावकीची होळी होळीच्या एक दिवस आधी रविवार, १ मार्चला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सुमारे ८४ वर्षापूर्वी खंडीत झालेली ही परंपरा २०१५ साली जमात ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी सुरु केली. यंदा या उत्सवाचे १२ वे वर्ष होते, त्यामुळे एक गाव एक होळी या संकल्पनेची तपपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी केली. सुरुवातीला परंपरेनुसार होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदांपत्याला देण्यात आला. त्यानुसार जमात ट्रस्टचे विश्वस्त जमीर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री प्रियंका विहंग कोळी, प्रांजल भावेश ठाणेकर, प्रभुती कैवल्य ठाणेकर, केतकी वैभव ठाणेकर, स्मिता रोहित कोळी, अमृता धीरज पाटील, अक्षता तन्मय कोळी, जागृती जित बारांगुळ, कोमल सन्मान कोळी या दांपत्यांनी होळी मातेची रितसर विधिवत पूजा केली. त्यानंतर कोळी गाण्यांच्या गजरात जमात ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी होळीला अग्नी दिला. चेंदणी कोळीवाड्याचा १२ वा गावकीचा होलिकोत्सव यावर्षी पूर्व ठाण्यात कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात साजरा करण्यात आला. याआधीचे सात पूर्वेत आणि पाच उत्सव पश्चिम भागात साजरे झाले. गावकीची ही परंपरा पुन्हा सुरु करण्यात जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी विरोध सहन करून पुढाकार घेतला होता. यासंदर्भात चंद्रकांत नाखवा म्हणाले, चेंदणी कोळीवाड्यात एक गाव एक होळी ही परंपरा खूप आधी सुरु होती. पण ८५ वर्षापूर्वी ही परंपरा खंडित झाली. २०१५ साली  जमात ट्रस्टचा अध्यक्ष असताना पुन्हा एक गाव एक होळी ही संकल्पना पुढे आली. मी आणि माझ्या कार्यकलरिणीतील सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा देत सुरुवात केली. त्यावेळी काही लोकांनी त्यास विरोध केला, पण त्यांची समजूत घालण्यात आली. त्यावेळी हरियाली तलावाचा काही भाग सुकला जायचा. त्याठिकाणी होळी लावली जात असे. २०१५ साली हा उत्सव साजरा करताना गावकऱ्यांनी एक अट टाकली. होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर लागणारी कुटुंबीयांची होळीही दारात लागणार. माझ्या कार्यकारीकरिणीसह सर्वांनी गावकीची ही अट मान्य केली. २०१५ साली गावाचा पाटील म्हणून मला होळी पेटवण्याचा मान देण्यात आला.  पश्चिम विभागात होळी लावण्यासाठी लागणारा गाडा मी उपलब्ध करुन देतो. होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदाम्पत्याला देण्याची प्रथा आजही पाळली जाते. तरुण वर्गानेही सक्रिय होत या उत्सवात काळाप्रमाणे बदल केलेत. होळीसाठी म्हणून दरवर्षी ड्रेसकोड असतो. त्यालाही गावकीचा चांगला प्रतिसाद असतो. उत्सव साजरा करताना बदल पाहिजेत. आतापर्यंत तन,मन, धनाने माझा सहभाग असतोच तो नेहमीच असेल.

मुरबाड मध्ये महास्वच्छता अभियान

मुरबाड मध्ये महास्वच्छता अभियान डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम राजीव चंदने मुरबाड : महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त व पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छता दुत आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १ मार्चला  संपूर्ण देशात भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी जनकल्याण, लोकसेवा व आदर्श नागरिक घडावा या उद्देशाने श्रीमतदासबोधा सारख्या महान ग्रंथाच्या निरूपणाच्या माध्यमातून समाजसुधारणेचा वृक्ष ९३ वर्षापुर्वी लावला त्याचे वटवृक्ष झाल्याचे आपण पाहत आहोत.बैठकिच्या माध्यमातून संपूर्ण राज्य, देश,व परदेशात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य अविरतपणे आजही सुरु आहे.निरूपणाच्या माध्यमातून मानवाच्या भौतिक स्वच्छते बरोबरच अंतर्मनातील स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत.यामुळे देश विदेशातही कार्याचा गौरव होत आहे.प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान,रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, वृक्ष संवर्धन यासारख्या अनेक समाजपयोगी कार्यातून कार्याचा ठसा उमटविला आहे.बैठकीच्या माध्यमातून निरूपणाद्वारे  मानसिक स्थिती हरवलेल्या माणसाला सुस्थित आणण्याचे महत्वपूर्ण काम होत आहे. मुरबाड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात म्हसा, धसई, टोकावडे, सरळगाव, किन्हवली या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्या पासून श्रीसदस्यांनी स्वच्छतेला सुरवात केली.मुरबाड शहरातील सार्वजनिक ठिकाणे  ग्रामीण रूग्णालय मुरबाड, पंचायत समिती कार्यालय, मुरबाड पोलीस स्टेशन,तहसिलदार कार्यालय,शास्त्रीनगर तलाव, कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेत शहरातील मुख्य रस्त्यांची साप सफाई यावेळी करण्यात आली. या अभियानात १९५५ श्रीसदस्यांनी  सहभाग घेऊन एकुण ११ टन ओला कचरा व ३६ टन सुका कचरा जमा केला. हा जमा केलेला कचरा ट्रक्टर, टेंम्पोच्या व घंटागाडीच्या साह्याने शहरा बाहेर टाकण्यात आला. यावेळी श्रीसदस्यांना प्रतिष्ठानच्या वतीने मास्क,हॅन्डग्लोज, पाणी,चहा बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती.

 दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा

दहिसर येथील पूर्णप्रज्ञा शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा अनेक नवनवीन प्रकल्पांचे प्रदर्शन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ . चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकल्प सादर केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा व मार्गदर्शनपर भाषणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील प्राचार्यांपासून सर्व शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील उल्लेख अवमानजनक

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील उल्लेख अवमानजनक तत्काळ दुरुस्ती करण्याची पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी. मुंबई, दि. (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा उल्लेख उठाव असा केलेला असून यात स्वातंत्र्य योद्धे म्हणून गौरवण्यात आलेले नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रभृतींचा उल्लेख एकेरीत करण्यात आला आहे. या मुद्याकडे लक्ष वेधत या अवमान जनक नोंदी विश्वकोशाच्या पुढील खंडांमध्ये तसेच संकेतस्थळावर दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका राज्य विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत काही व्यक्तींनी दाखल केली आहे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांच्या पुढाकाराने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर अविनाश पाठक, विनोद देशमुख, श्रुती देशपांडे, महेश आंबोकर, विजय आडे, चारुदत्त कहू, उदय अंधारे, संजय लोखंडे, दीपक देशपांडे, कार्तिक लोखंडे, अरविंद मराठे, मेजर जनरल अच्युत देव, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरु, नितीन केळकर, ॲड. लखनसिंह कटरे आणि शशिकांत सुरंगळीकर प्रभृतींनी सह्या केल्या असून या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मराठी विश्वकोशाच्या खंड एक आणि खंड अठरा मध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव असल्याचा उल्लेख केला असून काही लोक याला बंड म्हणतात, तर काहींनी स्वातंत्र्ययुद्ध म्हणून उल्लेख केला आहे, असे नमूद केले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १८५७ चे स्वातंत्र्य युद्धच होते, याबाबत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या विषयावर ग्रंथलेखन देखील केले आहे, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे या स्वातंत्र्य योद्ध्यांचा उल्लेख  विश्वकोशाच्या खंडांमध्ये एकेरीत केला असून तो अवमानजनक असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यरक्षणासाठी तटावरून घोडा फेकून देशासाठी आहुती दिली, तर तात्या टोपे हे फासावर चढले. त्यांच्या बलिदानावरच वसंत वरखेडकरांची  सत्तावन्नचा सेनानी ही कादंबरी देखील प्रसिद्ध आहे, हे देखील याचिकेत नमूद केले आहे, आणि या महनीय योद्ध्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख विश्वकोशात करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे ही पत्रे पाठवली असून त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही या संदर्भात पत्रे पाठवली आहेत. सर्व पत्रांसोबत विश्वकोशातील संबंधित पृष्ठांच्या झेरॉक्स प्रतीही जोडलेल्या आहेत.

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांना भीमराव धुळप यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या धगधगती मुंबईतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक पाटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून संपादक भीमराव धुळप यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. कुठेतरी अंधारामध्ये असलेल्या वंचित घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते गेली सोळा वर्षे करीत आहेत. हेच कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले. साप्ताहिक धगधगती मुंबईच्या सोळाव्या वर्धापनदिना निमित्त आयोजित केलेल्या नवी मुंबई, कोपरखैरणे येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृहातील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापौर सुजाता पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, ॲड. स्मिता चिपळूणकर, उद्योजक हनुमंत रांजणे, के. के. शेलार व लोक कलावंत योगेश चिकटगावकर व धगधगती मुंबई संपादक भीमराव धुळप, सरपंच रमेश धनावडे यांच्यासह मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे हितचिंतक मित्र परिवार व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील घोगाव ता. कराड येथील श्री धुळप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली १६ वर्ष महाराष्ट्रात लेखणी धगधगती ठेवली . भीमराव धुळप व त्यांचे चिरंजीव ओमकार धुळप यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये चांगली टीम तयार केलेली आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने उपेक्षितांची बाजू मांडणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वृत्तपत्रातही स्पर्धा असली तरी आपल्या उत्पन्नातील वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या पत्रकारांबद्दल समाज सुद्धा जागृत असल्याचे दिसून आले आहे. अशा शुभेच्छा देऊन अशा कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक व नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांच्यासह मान्यवरांनी आश्वासन देऊन सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा मोठा गौरव होत असतो. परंतु सामान्य माणसांसाठी पुरस्कार देऊन  त्यांना उत्साहित करणे. हे काम खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारी वाढवणारी आहे. सर्व स्तरातील लोकांचा बहुमान ही अद्भुत शक्ती सर्वांच्या पाठीशी कायम राहणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी  ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार व रमेश कदम (समाज रत्न) वसंत जाधव (समाज गौरव)  राजन किणे (दलित मित्र) रमेश धनावडे (आदर्श सरपंच) प्रताप महाडिक (शिक्षण रत्न) संगम प्रतिष्ठान व नरेंद्र छाया कम्प्युटर इन्स्टिट्यूट (उत्कृष्ट संस्था पुरस्कार) नंदकुमार काटकर (सहकार रत्न) डॉक्टर शांताराम कारंडे (साहित्यरत्न) सचिन वरखडे वैद्यरत्न ( वैद्यकीय) अँड .मनीषा चव्हाण (कायदा रत्न) डॉक्टर सुरज पाटील (वैद्यकीय रत्न) विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी (अध्यात्मिक) अनुजा दांडगे (उद्योजिका) के.के शेलार (उद्योग रत्न) हनुमंत रांजणे (समाजभूषण) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.