शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होते. त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत असेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिपणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी येथे केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केली. यावेळी उमेदवार दरेकर यांना शुभेच्छा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवा नेते सरदेसाई यांनी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी सरदेसाई यांनी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले.

खासदार डाॅ. शिंदे यांची उमेदवारी घोषित का केली जात नाही हे त्यांच्या पक्षाला विचारावे. पण एकंदर परिस्थिती पाहता शिंदे गटातील खासदारांची उमेदवारीसाठी नावे जाहीर होऊनही नंतर ती उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. अशा खासदारांच्या बाबतीत मतदारसंघात जे नकारात्मक वातावरण आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणातून पुढे आली असेल, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यास माघार घेतली जात असेल. असे होऊ नये, असे वाटते, अशी सूचक टिपणी सरदेसाई यांनी केली.

नियतीचा खेळ योग्यवेळी बदला घेतोच, असे सांगून सरदेसाई म्हणाले, शिवसेनेतील फुटीनंतर तेरा खासदार शिंदे गटा सोबत गेले. त्यांच्यामुळे सत्ता गेली. पक्षात फूट पडली. त्या तेरापैकी पाच खासदारांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापली आहे. आता या खासदारांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आठवण येत असेल. खासदारांच्या उमेदवारी जाहीर झाली की त्यांना सन्मानाने मातोश्रीवर बोलवले जायाचे. २०१४, २०१९ मध्ये या खासदारांनी त्याचा अनुभव घेतला आहे. या उमेदवार खासदारांचे ठाकरे कुटुंबियांकडून साग्रसंगीत स्वागत केले जात होते. रश्मी ठाकरे या खासदारांना विजयासाठी औक्षण करून त्यांना आशीर्वाद द्यायच्या. मग सन्मानाने निश्चित उमेदवारांंना एबी अर्ज दिले जायाचे. आता याच खासदारांना परिस्थिती बदलल्याने शिंदे यांच्या समोर उमेदवारीसाठी दहा दहा तास प्रतीक्षा करावी लागते. आपली उमेदवारी जाहीर होते की नाही याची धाकधूक या खासदारांना आहे. मातोश्रीवरचा मान आणि शिंदे यांच्या समोरील स्थान याची अनुभती आता हे इच्छुक खासदार घेत असतील. शिवसेना आम्ही जोमाने पुढे नेणार असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारीसाठी दोन आकडी उमेदवारीसाठी जागा मिळवता येत नाहीत. उमेदवारांची घोषणा करताना, जागा मिळविताना त्यांची होणारी तगमग आता जनता पाहत आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणताही विचार न करता २१ उमेदवारांची घोषणा केली आहे, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपशहर संघटक हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, शरद पाटील, विवेक खामकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *