सुप्रिया सुळे व संजय दिना पाटील यांना निवेदन
अनिल ठाणेकर
ठाणे : जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरती व्हावा याकरिताचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार संजय दिना पाटील यांना देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले व राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी दोन्ही खासदारांची नुकतीच भेट घेऊन हे निवेदन दिले.
जुलै २०२४ मध्ये हातरस येथे एका भोंदू बाबाच्या दरबारात १२४ महिलांच्या दुर्दैव मृत्यूनंतर हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हातरस घटनेनंतर जादूटोणाविरोधी कायद्याची राष्ट्रीय पातळीवर अंमलबजावणी करण्याची भूमिका मांडली. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी महत्त्वाची बाब म्हणून त्याचा स्वीकार केला. महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा व्हावा यासाठी करिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सतत प्रयत्न केले. डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर २०१३ महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने या कायद्याच्या प्रबोधनाचे कार्यक्रम
राबवले. त्याचा परिणाम म्हणून आज पर्यंत एक हजारच्या वर गुन्हे या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत नोंद झालेले आहेत. नंतर महाराष्ट्राच्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायदा केला. मागील महिन्यामध्ये गुजरात सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मंजूर करून राज्यपालांकडे सही करिता पाठवले. आज महाराष्ट्र मध्ये कुठलाही बुवा बापू महाराज उघडपणे चमत्काराचा दावा करून फसवणूक करायला सहजासहजी धजावत नाही अशी स्थिती आहे. बागेश्वरधाम सारख्या महाराजाला महाराष्ट्रातून पळून दुसऱ्या राज्यात जावून आपल्या दाव्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करावा लागतो, हा महाराष्ट्रात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याचा धाक आहे असे मत प्रा प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. असे असले तरी संपूर्ण भारतात सातत्याने घडणाऱ्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या असतात. नुकत्याच हातरस येथे घडलेल्या घटनेने हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज प्रकर्षाने आणि निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा हा संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर देश पातळीवरची व्हावा याबाबतचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सर्व खासदारांना भेटून देत आहेत. आम्ही सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत राहू अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकारिणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केली.
