हे असंस्कृत वर्तन कोण सहन करेल ?
अमृता फडणवीस यांच्या विरोधातील चिथावणीचा शत:दा निषेध !
दिवाकर शेजवळ
बेताल गायिका अंजली भारती हीची द्वेषपूर्ण गीते, बीभत्स अभिनय, चिथावणीखोर वक्तव्ये ही प्रबुद्ध आंबेडकरी समाजाची अभिरुची, संस्कृती, भूमिका कदापिही असू शकत नाही. बलात्काराच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृताजी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा शत:दा निषेध !
बाबासाहेब दुर्गम ग्रामीण भागात कधी पोचतील, याची वाट न पाहता त्यांच्या आधी तिथे ‘ आंबेडकर ‘ पोहचवण्याचे काम शाहिरांनी, कलावंतांनी एकेकाळी उपाशी तपाशी केले होते. ‘ माझ्या अनेक सभा या कलावंतांच्या एका कार्यक्रमाची बरोबरी कधीही करू शकणार नाहीत ‘ अशा शब्दांत बाबासाहेबांनी त्या कलावंतांचा कृतज्ञतेने गौरव केलेला आहे. ‘ जलसा’ कार भीमराव कर्डक, महाकवी वामनदादा कर्डक, श्रीधर ओहोळ, गोविंद म्हाशिलकर, श्रावणदादा यशवंते, विठ्ठल उमप, नवनीत खरे,प्रल्हाद शिंदे, भिकू भंडारे, प्रतापसिंग बोदडे, प्रभाकर पोखरीकर, विष्णू शिंदे, शांता भोसले, सुमन रोहम, रंजना शिंदे, शिलादेवी, शकीला पूनवी, निशा भगत, वैशाली शिंदे,अशी महान परंपरा प्रतिभा संपन्न आंबेडकरी कलावंतांची आहे. अंजली भारतीसारख्या गायिकेची परधर्म द्वेष पसरविणारी, लाखोली वाहणारी गीते ही आंबेडकरी कलावंतांच्या त्या अभिमानास्पद परंपरेला काळीमा फासणारी आहेत.
