दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन.
दिवा : दिवा शहरातील वाढती अस्वच्छता आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा यासाठी केवळ ठाणे महानगर पालिका जबाबदार असून यापुढे पालिका प्रशासनाचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा देत प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे.
दिवा शहरात मागील काही वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची विक्रमी कामे झाली आहेत. दिवा शहरातील विशेषतः प्रभाग क्रमांक २७ मधील बहुतांशी प्रमुख रस्ते तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे.
परंतु पालिकेतर्फे सदर रस्त्यांची एक दिवसा आड, दोन दिवसा आड, कळस म्हणजे काही रस्त्यांवर तर तीन ते चार दिवसा आड साफसफाई केली जाते. परिणामी सर्व ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते, ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतो. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करून सुद्धा त्याकडे महानगर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे नगरसेवक ऍड.आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
करदात्या दिवेकरांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे, यापुढे पालिकेचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. लवकरच शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी सांगितले आहे.
