खोणी पलावा परिसरात भटक्या कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर हल्ला
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण: कल्याण–शीळ रोडवरील खोणी पलावा येथील आर्केड सोसायटीमध्ये सकाळी धक्कादायक घटना घडली. शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे मुलीचा जीव वाचला.
या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. घडलेला हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये कुत्र्यांचा ४ ते ५ कळप मुलीच्या दिशेने धावत येताना दिसत असून सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने निर्बिजीकरण मोहीम, कुत्र्यांचे स्थलांतर व नियंत्रणासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
