महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
रमेश औताडे
मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत उपाध्यक्ष बंडू हिरवे यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान सांगितले. याबाबतचा निवेदनपत्र ४ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मानधन प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निधीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.असे सचिन जाधव व संदीप पाटील यांनी सांगितले.
या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे राज्यातील हजारो गावे ओ डी एफ प्लस घोषित झाली असून हजारो गावे ‘हर घर जल’ म्हणून प्रमाणित झाली आहेत. मात्र, इतके महत्त्वाचे काम करूनही कर्मचाऱ्यांना मानधन, आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
