पावसाळ्यापूर्वी नालेसफाई वेळेत करा
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरसेवक सरसावले
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी भांडुप मधील नालेसफाई युध्दपातळीवर करावी. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी तुंबणे, रस्ते जलमय होणे, त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी यंदा वेळेत आणि शास्त्रीय पध्दतीने नालेसाफाई करण्यात यावी, अशा सुचना भांडुप प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी पालिका अधिका-यांना दिल्या आहेत. सकाळी त्यांनी एस विभागाच्या अधिका-यांना सोबत घेऊन भांडुप मधील नाल्याची पाहणी केली.
नगरसेविका राजोल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यांमधील गाळ, बांधकामातील कचरा आणि सांडपाण्यामुळे येणारा इतर कचरा काढण्यासाठी यांत्रिक साधनांचा वापर करावा. मुख्य नाल्यांसोबतच गल्लीबोळात असलेल्या अंतर्गत लहान नाल्यांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम पुर्ण झाल्यानंतर काढलेला गाळ योग्य ठिकाणी टाकण्यात यावा, रस्त्यांवर कचरा साठू नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घरगुती कचरा नाल्यात न टाकता तो कचराकुंडीत टाकावा, तसेच पावसाळ्यापूर्वी या परिसरातील नाल्याची योग्य प्रकारे नागरिकांच्या देखरेखीखाली साफसफाई करण्यात यावी. अशा सुचना राजोल पाटील यांनी पालिका अधिका-यांना दिल्या आहेत. यासाठी भांडुप मधील नाल्यांची पाहणी करण्यासाठी राजोल पाटील यांनी पालिका अधिका-यांना बरोबर घेऊन पाहणी दौरा केला. स्थानिक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मते नाल्यांची सफाई कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात झाली पाहिजे. त्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या कमी होईल. गेले अनेक वर्षे नगरसेवक नसल्याने पालिकेचे अधिकारी मनमानी कारभार करीत होते. तक्रारी करुनही त्यावर कार्यवाही होत नव्हती. मात्र आता पालिकेत नगरसेवक निवडून दिल्याने त्यांनी आता लक्ष दिल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दरवर्षी नाले सफाईचे कामे पूर्ण होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नाले भरतात व त्याचे पाणी जवळपासच्या घरात तसेच रस्त्यांवर जाते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. त्यांना राहते घर सोडून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो. नाल्यातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने हे पाणी रस्त्यांवर जमा होते. परिणामी वाहतुक कोंडी झाल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना, पादचा-यांना होतो. भरलेल्या पाण्यामुळे भांडुप येथे एका पादचा-याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना देखील घडलेली आहे. असा प्रकार होऊ नये म्हणून भांडुप पश्चिम प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी पालिकेच्या एस विभागातील अधिका-यांना सोबत घेऊन सर्व नाल्यांची पाहणी केली. अरुंद नाले, कचरा, मातीचा गाळ असल्याने अनेक नाले तुंबलेले आहेत. या सर्व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात यावी, त्यातील गाळ, कचरा काढून टाकण्यात यावा, जेणे करुन स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. याबाबत योग्य त्या सुचना पालिका अधिका-यांना नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *