सर्वेक्षणातून माहिती उघडकीस

मुंबई : मसाल्यांमध्ये कर्करोग होणारे घटक असल्याचा दावा करीत सिंगापूर आणि हाँगकाँगने भारतीय कंपन्यांच्या काही मसाल्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. यावरून देशातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात देशातील अन्न सुरक्षा संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांनी अविश्वास दर्शविल्याचे उघडकीस आले आहे.

भारतीय कंपन्यांच्या मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळून आले असून, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचा दावा करीत हाँगकाँग आणि सिंगापूरने या मसाल्यांवर बंदी घातली आहे. खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आणि अन्न नियामक संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत सर्वसामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी एका खासगी संस्थेने महाराष्ट्रासह देशभरात ऑनलाईन सर्व्हेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील २४ हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातील ३ हजार ६४४ नागरिकांचा समावेश होता. एकूण सहभागी नागरिकांपैकी ३६ टक्के ग्राहकांनी त्यांचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर विश्वास नसल्याचे म्हटले. तर ३७ टक्के नागरिकांनी फारच कमी विश्वास असल्याचे, तर २४ टक्के नागरिकांनी या संस्थांच्या कार्यप्रणालीवर ५० टक्के विश्वास असल्याचे सांगितले. मात्र तीन टक्के नागरिकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनावर पूर्णपणे विश्वास दर्शविला.

हाँगकाँग आणि सिंगापूरमधील घटनेबाबत नागरिकांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्रातील १ हजार ८२९, तर देशातील १२ हजार ३६१ नागरिकांनी चिंता व्यक्त केली. १८ टक्के नागरिकांनी ही घटना माहीत आहे, परंतु त्याबाबत चिंता व्यक्त केली नाही. १० टक्के नागरिकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या कंपनीचे मसाले आपण वापरत नाही असे स्पष्ट करीत १० टक्के नागरिकांनी या प्रकराबाबत चिंता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *