कल्याण : महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने गणेश घाट आगार या ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात सत्यनारायणाची महापूजा तसेच आरोग्य शिबिर आणि छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी परिवहन कर्मचारी ज्ञानेश्वर रहाणे यांच्या संकल्पनेतून पंचवीस किलोचा केक केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते कापण्यात आला. याप्रसंगी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहनचे अधिकारी कार्यालय अधीक्षक प्रिया निगडे, किशोर घाडी, तृषार्त मुळीक, प्रमोद बागुल, दीपक चौधरी, भारत सांगळे, मच्छिंद्र कणसे, संदीप दलाल, प्रशांत जावळे, गंगाधर राठोड, गौरख पवार तसेच सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
