माथेरान : मागील वर्षभर ठेकेदारामार्फत ई रिक्षा सुरू असल्याने ज्या हातरीक्षा चालकांनी एक तपाहून अधिक काळ ई रिक्षा सुरू होऊन स्वतःची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी कठोर संघर्ष केला होता. अनेक आव्हाने आणि काही नेहमीच्या विरोधक मंडळींच्या विरोधाचाही सामना केला होता.अखेरीस आज एकूण वीस हातरीक्षा मालकांना पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा महिने या ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
सायंकाळी चार वाजता शास्त्री हॉल याठिकाणी गावातील काही राजकीय पक्षांची मंडळी त्याचप्रमाणे सर्व ई रिक्षा समर्थक उपस्थित होते. याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, अजय सावंत, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रदीप घावरे, राजेश चौधरी,स्मिता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.
२०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर केला होता.त्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका पार पाडली होती. तर राजकारण बाजुला ठेऊन गावामध्ये ई रिक्षाच्या माध्यमातून पर्यटन क्रांती होणार आहे हा दुरदृष्टिकोन समोर ठेवून कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता मनोज खेडकर, शिवाजी शिंदे यांनी ई रिक्षाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. तर काहींनी मतांच्या राजकारणापायी यातून काढता पाय घेत ई रिक्षाच्या विरोधात असणाऱ्या मंडळींना सहकार्य केले आहे आणि आजही त्यांची तीच भूमिका कायम दिसत आहे. परंतु आता अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार असल्याने हातरीक्षा चालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नव्याने दाखल झालेल्या ई रिक्षांना झेंडा दाखवून पहिल्याच दिवशी संघटनेच्या वतीने मोफत प्रवास देण्यात आला याचा पर्यटकांननी मोठया प्रमाणावर लाभ घेतला.गावात
एकूण ९४ हातरीक्षा असल्याने उर्वरित ७४ हातरीक्षा मालकांना लवकरच टप्प्याटप्प्याने या ई रिक्षा ताब्यात मिळणार आहेत त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
————————————————————————–
हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी या संघर्षाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. 94 हात रिक्षा चालकांपैकी 20 चालकांनी दि.१० पासून ई रिक्षा सुरू केल्या आहेत उर्वरीत 74 हातरिक्षा चालकांना परवानगी मिळे पर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे.
सुनिल शिंदे, याचिकाकर्ते व सचिव श्रमिक रिक्षा संघटना
—————————————————————————–
ई रिक्षा आमच्या ताब्यात मिळाल्यामुळे जे समाधान आम्हा सर्व हातरीक्षा चालक मालक वर्गात आहे ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. आमच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे.या जोखडातून मुक्ती मिळून आमची पुढील पिढी तरी सन्मानाने जीवन जगू शकते.
रुपेश गायकवाड –ई रिक्षा चालक माथेरान
—————————————————————————-
गावात अनेक मुले आजही सुशिक्षित बेकार आहेत. अजूनही उर्वरीत एकूण ७४ ई रिक्षा लवकरच येणार आहेत.त्यामुळे सर्वमिळून ९४ मालकांसह अन्य मुलांना या व्यवसायामुळे आपल्या कुटुंबाला आधार प्राप्त होणार आहे.ई रिक्षामुळे पर्यटन वाढून याच माध्यमातून गावातील सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
संतोष लखन —-हातरीक्षा मालक माथेरान
