Author: bittambatami.com

मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले

२४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा मुंबई : उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. येत्या २ मे पासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार असून त्यासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्याची लिंक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यान्वित केली जाईल. तसेच, प्रशिक्षणाचे दुसरे सत्र २३ मे पासून सुरु होईल. जलतरण हा क्रीडा प्रकार असण्यासोबतच एक उत्तम व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना जलतरण या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे १० तरण तलाव कार्यान्वित आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने इच्छुकांना या क्रीडा प्रकारापासून लांब राहावे लागते. पोहण्याची कला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात महानगरपालिकेने प्रशिक्षण वर्गांची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे प्रशिक्षणवर्ग महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आले आहेत. या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी ठेवण्यात आली असून पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी २ हजार १०० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. जलतरण प्रशिक्षण दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये दिले जाणार आहे. या विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीने २४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठीच्या जलतरण तलावांची यादी महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम) जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व) सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान,मालाड (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा

ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा

पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा ठाणे : येथील कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. यानिमित्ताने सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ हे उद्यान विकसित करून घेतले आहे. या उद्यानाला विविध प्रकारची ३ हजार ५०० हून अधिक रोपे, फुल झाडे आहेत. मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला जागा, ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्यानाचे ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले असून याठिकाणी ठाणे शहरासह मुंबई महानगरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजार ६२ अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये ३ लाख ८२ हजार ४२२ प्रौढांचा, २२ हजार ८७१ ज्येष्ठ नागरिकांचा तर, ७९ हजार ७६९ लहान मुलांचा समावेश आहे. या उद्यानातून पालिकेला आतापर्यंत १ कोटी १६ लाख ९७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणीदर आकारणी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जुन्या दरानेच पाणी दर आकारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला शासनाने मंजुरी दिल्याने प्रशासनाने १ एप्रिलपासून जुनेच पाणी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी पाणी पुरवठा विभागाकडून पालिकेचा महसूल वाढ करण्याच्या दृष्टीने पाणी दर वाढीचे प्रस्ताव आयुक्तांंकडे दाखल केले जातात. नवीन वाढीव दर लागू केले तर नागरिकांकडून ओरड सुरू होते. आणि त्याचा परिणाम मग राजकीय मंडळींकडून दबाव येण्याकडे होतो. आगामी पालिका निवडणुकींचा विचार करून या राजकीय दबावापोटीच प्रशासनाने नागरिकांवर पाणी दर वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या नवीन दर प्रणालीप्रमाणे गेल्या वर्षी ज्या दराने नागरिकांनी पाणी दराची देयके भरली त्याच दराने आगामी आर्थिक वर्षात नागरिकांंना पाणी दराची देयके भरावी लागणार आहेत. ही दरवाढ न केल्याने पालिकेला मिळणाऱ्या वाढीव महसुलावर पाणी सोडावे लागते. पालिकेला दरवर्षी पाणी देयक वसुलीतून सुमारे ८० कोटी महसूल मिळणे अपेक्षित असते. या पाणी दर वसुलीतील सुमारे २० ते ३० कोटी वसुलीवर पालिकेला पाणी सोडावे लागले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशाप्रमाणे मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांंनी १ एप्रिलपासून प्रशासकीय ठरावाप्रमाणे जुने पाणी दर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारीमध्ये जुने पाणी दर लागू करण्याचा ठराव प्रशासनाने केला होता. आगामी आर्थिक वर्षासाठी पालिकेने पाणी देयकाच्या माध्यमातून ९० कोटी ६० लाख रुपये वसुलीचा लक्ष्यांंक पालिका अर्थसंकल्पात निश्चित केला आहे. पाणी दर आकारणी सर्व प्रकारच्या घरगुती पाणी वापरासाठी प्रति घनमीटर ७ रुपये आकारणी. धार्मिक स्थळे, शिक्षण संस्था प्रति घनमीटर १५ रुपये. सर्व प्रकारची व्यापारी दुकाने प्रति घनमीटर ३० रुपये. १५ खाटांच्या रुग्णालयांना प्रति घनमीटर ३० रुपये. १५ हून अधिक खाटांच्या रुग्णालयांसाठी प्रति घनमीटर ५० रुपये. उपहारगृहे, मंगल कार्यालये, व्यापारी निवासी संकुल प्रति घनमीटर ६० रुपये. कारखाने, तबेले, गॅरेज प्रति घनमीटर ६० रुपये.

‘आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्या’

महापालिका आयुक्त  डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता पालन केली जात असल्याबद्दल विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतच्या आढावा बैठकीत दिले. आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचार फलक यांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डींग, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खाजगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वत: पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटी बसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसार माध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षाव्दारे नागरिकांना मतदानाविषयी, त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्र आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योगसमुह याठिकाणी भेटी देऊन मतदान करणेविषयी जनजागृती करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. लोकसभा निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, रूग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध  माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप अशा समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे सूचित करण्यात आले. प्रचार, प्रसिध्दीप्रमाणेच मतदान केंद्रांची सर्व आवश्यक सुविधांसह सिध्दता करून ठेवण्याचेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. ही केंद्रे मा.निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळमजल्यावर असावीत असे सूचित करीत या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच या निवडणूकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांचे विभागप्रमुख व सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले.

‘राजगती’ नाटकाची ५ मेला शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रस्तुती !

अनिल ठाणेकर ठाणे : देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानाच्या राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, मंजुल भारद्वाज रचित ‘राजगती’ हे नाटक, रविवारी ५ मेला सकाळी ११ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे. लोकशाही आणि संविधान कायम ठेवायचे असेल तर जनतेचा विवेक जागृत करणे आवश्यक आहे. लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विकारी प्रवृत्तींनी संविधान उद्ध्वस्त करण्याची घोषणा केली आहे. आम्ही संविधान बदलू असे उघडपणे जाहीर केले आहे. अशा विनाशाच्या काळात ही निवडणूक केवळ सरकार निवडण्यासाठी नाही तर संविधानाची  मूल्य जपणारे लोकशाहीचे शिलेदार निवडण्यासाठी आहे. लक्षात ठेवा २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रथमच सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला. समतेने वर्णव्यवस्थेतून मुक्तीचा बिगुल फुंकला आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला व महिलांना समानतेचा अधिकार मिळाला. विचार करा, आपल्याकडून या समानता आणि मतदानाचा हक्क काढून घेतला तर आपल्याला कसे वाटेल? मणिपूरप्रमाणे भारतभर महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर आपल्याला काय वाटेल ? अस्मिता आणि प्रतिष्ठा या शब्दांनी भ्रमाचे जाळे पसरवले जात आहे. पण त्याऐवजी ‘सत्य, अहिंसा आणि संविधान’ हा भारताचा वैचारिक आणि तर्कशुद्ध कणा म्हणजे भारतीयता आहे. हे भारताच्या लोकांनो, जागे होऊया आणि संविधान जपुया. राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे, निवडणुका घेणे किंवा संसदेत वाद-विवाद करणे नव्हे, तर मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची चेतना जागृत करण्याची प्रक्रिया आहे. ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स शुभचिंतक आणि अभ्यासक’ रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित नाटक  ‘राजगती’ रविवारी ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे प्रस्तुत करणार आहेत. राजकारण म्हणजे घाणेरडे, राजकारण हे केवळ राजकीय पक्षांपुर्ते मर्यादित आहे, याचा भ्रम मोडीत काढून देशाच्या जनतेला नागरिक करण्याची प्रक्रिया आहे हे नाटक. देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानानुसार राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, ‘राजगती’ हे नाटक ! संविधानाने आपल्याला मालक होण्याचा हक्क दिला आहे आणि तो हक्क म्हणजे मताधिकार. आपण आपला मताधिकार निभवत नाही आणि मग दरवेळी राजनीतीला नावं ठेवतो.आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती ‘वाईट’ आहे,चिखल आहे. राजनीतिशी आमचं काहीही घेणं देणं नाही. आपले आयुष्य  दर क्षणी ‘राजनीती’ ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक ‘सभ्य’ नागरिक होऊन आपण केवळ आपल्या ‘मताचे दान’ करतो किंवा आपले मत मोफत धान्य,पैसा, दारू किंवा साडीसाठी विकतो. जेव्हा तुम्ही तुमचे मत विकता, तेव्हा लक्षात घ्या तुम्ही तुमचा देश ही विकता. ही आपल्या राजनैतिक भूमिकेपासूनची पळवाट आहे. एक क्षण विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत ? आणि जेव्हा देशाचे नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि आज तेच घडतं आहे. नाटक राजगति जनतेला आपल्या राजनैतिक मुक्तिसाठी चार सूत्र देते सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति. सत्ता नेहमीच भ्रष्ट राहणार, मग ती कोणतीही असो किंवा कोणाचीही असो, व्यवस्था आपल्या जडत्वातून कोणत्याही परिवर्तनाला प्रभावहीन बनवते, राजनैतिक चरित्र घडवल्याशिवाय संपूर्ण राजनैतिक प्रक्रिया पाखंडाची शिकार होते. म्हणूनच सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति या चारही आयामांना एकत्र समजणे अनिवार्य आहे. नाटक राजगति ‘राजनीति’ ला पवित्र नीती मानते. जनतेकडून राजनीति मध्ये विवेकपूर्ण सहभागितेची अपेक्षा करते. राजनीति सत्ता, व्यवस्था आणि राजनैतिक चरित्राला स्वच्छ करणारी पवित्र नीती आहे. प्रत्येक भारतवासीयांत राजनीतिची विवेकी मशाल पेटवून आपल्या स्वतंत्रता सेनानींनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण काही  सत्तालोलुपांनी, सत्तेच्या दलालांनी‘राजनीति घाण आहे या कलंकाला सुनियोजित षडयंत्राने १४२ करोड देशवासियांच्या मेंदूत रुजवले. ज्याच्या मूळे जनता राजनैतिक प्रक्रियेत सहभागी नाही होत. कोणी सहभागी होत आहे तर ते फक्त सत्तालोलुप जे भांडवलदारांच्या बळावर वोट विकत घेऊन प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचे हनन करत आहेत. नाटक ‘राजगती’! हुकूमशाही सत्ता आणि राजकीय परिदृश्याला बदलण्याचे राजकीय सूत्र आहे.

हातरिक्षा चालकांच्या हाती येणार ई-रिक्षाचे स्टीयरिंग

माथेरान : मागील एका तपापासून पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू होऊन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी गावातील त्याचप्रमाणे अन्य मंडळींच्या विरोधाचा सामना करत अनेकांच्या कडव्या संघर्षाला सामोरे जात आपला लढा कायम ठेवून अखेरीस आपली ई- रिक्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे हातरीक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. सुप्रीम कोर्टाने वीस ई- रिक्षांना परवानगी दिली असून यापुढे हातरिक्षा चालकांच्या हाती लवकरच ई-रिक्षाचे स्टीयरिंग येणार असून या कष्टकरी श्रमिकांच्या संघर्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश असल्याचे ई-रिक्षा प्रेमी बोलत आहेत. सुप्रीम कोर्टांने दि 10 जानेवारीला ई- रिक्षा हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता.त्याचवेळी सनियंत्रण समितीला ई रिक्षाची संख्या निश्चित करणे व ई-रिक्षाची मार्गिका ठरविण्यास सांगितले होते त्यानुसार सनियंत्रण समितीने 6 मार्चला झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 20 ई-रिक्षांची परवानगी दिली व अहवाल कोर्टाला सादर केला मात्र सनियंत्रण समितीच्या मिनिट्स मध्ये 20 ई रिक्षांचे वर्गीकरण 15 विद्यार्थ्यांना व 5 स्थानिकांना असे करून प्रामुख्याने या ई-रिक्षाच्या सेवेत पर्यटकांचा उल्लेख न केल्याने तर्क वितर्क सुरू झाले होते श्रमिक रिक्षा संघटनेचे वकील ऍड ललित मोहन यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना देखिल देण्याची मागणी केली पर्यटन हाच येथील प्रमुख उद्योग असून दरवर्षी दहा लाख पर्यटक माथेरानला भेट देतात कायद्यात समानता आहे वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोणत्याही समूहाला डावलता येत नाही तसेच वीस हात रिक्षा चालकांनी ई रिक्षा खरेदी केल्या असून पर्यटकांना सेवा दिली तरच त्यांना उत्पन्न मिळू शकते ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. न्या बी आर गवई व न्या संदीप मेहता यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना दिली जाईल असा स्पष्ट आदेश दिला आहे तसेच जे परवानाधारक हातरिक्षा चालक आहेत यांनाच परवानगी द्यावी या चालकांचा  सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत कोर्टाला सादर करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच हात रिक्षा चालकांच्या ई रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.  कोर्टामध्ये ऍड ललित मोहन सोबत ऍड विधे वैश्य व ऍड आकांक्षा यांनी युक्तिवाद केला तर अश्वपाल संघटनेसाठी श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला होता. पहिल्या टप्यात वीस ई रिक्षांना मिळालेली परवानगी ही हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तीची सुरवात आहे व लवकरच उर्वरित  74 हात रिक्षा चालकांना देखील ई रिक्षाची…

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सन्मान

ठाणे:ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दैनिक पुढारीचे ठाण्याचे ब्युरो चीफ दिलीप शिंदे, जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी ,छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस आदीं उपस्थित होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या  ३० मार्चला आयोजित पत्रकार मेळाव्याचे  ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे प्रमुख पाहुणे होते. मात्र अचानक केंद्रिय निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या कामासाठी त्यांना  कल्याणला जायचे होते.  ते  सकाळी १०.३० वाजता पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले, मात्र त्यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार  ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या नियोजित सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेनंतर पत्रकार मेळावा असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर  जिल्हाधिकारी  शुभेच्छा संदेश देऊन  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामासाठी कल्याणला गेले होते.  त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काल त्यांची भेट घेऊन त्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

कोपरी गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी

ठाणे :कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यावर विविध थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुने अंजनी पुत्र हनुमान मंदिर असून, वर्षभर अंजनी पुत्र हनुमान सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरात  मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी करण्यात आले. सोबतच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील माजी नगरसेविका मालती पाटील अणि रमाकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते.  या आरोग्य शिबिरात रुग्णांना कोणत्या व्याधीची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले होते. पेसमेकर, एनजिओग्राफी, केमोथेरेपी अशा महागडे उपचार यामध्ये समाविष्ट होते.

महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली

रमेश औताडे मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान…