Author: bittambatami.com

धारावी सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी १५ टीम होणार तैनात

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डीआरपीपएलकडून गेल्या पंधरा दिवसांपासून घरोघर सर्वेक्षण सुरू आहे. मात्र सर्वेक्षणाचा वेग मंद असल्याने आतापर्यंत केवळ ६०० झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी पंधरा टीम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ सर्व्हेयर आणि ७ नायब तहसीलदार नव्याने घेतले जाणार आहेत. धारावीत एक लाखाहून अधिक झोपड्या असून त्यांचे नंबरिंग आणि सखोल माहिती पुढील सहा-आठ महिन्यात जमा करण्याचे उद्दिष्ट धारावी पुनर्विकास प्राधिकरण लिमिटेडने ठेवले आहे. त्यानुसार १८ मार्चपासून नंबरिंगचे काम माटुंगा येथील कमला रमण येथून सुरू झाली आहे. तसेच १ एप्रिल पासून घरोघर सर्व्हे सुरू झाले. सुरुवातीला पाच टीम होत्या, मात्र एका घराचा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी पाऊण तासाहून अधिक वेळ लागत आहे, तसेच सर्व्हे मशीनला रेंज नसल्याने ओटीपी मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सर्व्हेच्या टीम वाढवल्या आहेत. तरीही सर्व्हेला विलंब लागत असल्याने डीआरपीपीएलने आणखी पंधरा टीम वाढवल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून पंधरा सर्व्हेयर आणि सात नायब तहसिलदार देण्याबाबत मागणी केली असून लवकरच ते मिळतील अशी माहिती डीआरपीपीएलच्या अधिकाऱ्यांने दिली. एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी धरणार धारावीत घरोघर सर्व्हेचा वेग वाढवण्याच्या हलचली सुरू आहेत. त्यासाठी सर्व्हरच्या टीममध्ये भविष्यात वाढ करावी लागल्यास एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व्हेच्या कामाला वेग मिळू शकणार आहे. पावसाळ्यात सर्व्हे मंदावणार धारावीचा बहुतांश सखल भाग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरते, झोपड्यांमध्ये पाणी जात असल्याने पावसाळ्यात सर्व्हेचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत जास्तीतजास्त झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

पोलिसांनी 50 नागरिकांना मोबाईल फोन केले परत 

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या नागरिकांच्या 50 मोबाईल फोनचा शोध घेऊन त्यापैकी 28 नागरिकांना परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते परत केले. यावेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची दखल घेऊन तांत्रिक तपास करुन भारतातील विविध राज्यातून एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यापैकी सोमवारी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते 28 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल फोनच्या तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

 रामनवमीला खबरदारी घ्या!

 उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांमुळे मुंबईत विशेषत: मालाड-मालवणी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले. रामनवमीनिमित्त मालवणी येथील मुस्लीमबहुल परिसरातून काढण्यात येणाऱ्या यात्रेदरम्यान हेतुत: मशिदीसमोर नमाज सुरू असताना मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवले जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. आम्ही कोणालाही सार्वजनिक यात्रा काढण्यापासून किंवा सभा घेण्यापासून रोखू शकत नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणीही नियमांचा भंग केल्यास पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, नियमांचा भंग होणार नाही, या आश्वासनाच्या आधारे आमदार टी. राजा. सिंह यांना मिरा-भाईंदर येथे सभा आयोजित करण्यास आपण परवानगी दिल्याचे न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले. रामनवमीला काढण्यात येणाऱ्या यात्रांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे का ते पाहा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर, रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांदरम्यान अनुचित घटना घडणार नाहीत याबाबत पोलीस अधिक सावध राहतील, असे आश्वासन महाधिवक्ता बिरेद्र सराफ यांनी खंडपीठाला दिले.

 डायघर कचरा प्रश्न पेटणार

मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिकेचा कचरा डायघर येथे आणला जात असल्याने येथील ग्रामस्थांनी आणि गृहसंकुलांतील रहिवाशांनी बैठका घेऊन लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी सुरू केली आहे. भांडार्ली येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर मागील नऊ महिन्यांपासून डायघर येथे ठाणे महापालिकेने कचरा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाविरोधात विविध आंदोलने, निवेदन देऊनही निर्णय होत नसल्याने नाइलाजाने हा निर्णय घेतला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे येथील नागरिकांच्या आरोग्य, शेतीवर परिणाम होत असल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांना लाखो रुपयांची घरे विक्रीला काढण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेने हद्दीबाहेरील भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारला होता. हा कचरा प्रकल्प बंद केल्यानंतर ठाणे महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी डायघर येथे कचरा प्रकल्प सुरू केला आहे. सुमारे पाच एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून प्रकल्पालगत शीळ, डायघर, खिडकाळी, पडले, देसाई, उत्तरशीव, सांगार्ली, अभयनगर यासह काही गावे आहेत. याच परिसरात शिवमंदिर, शाळा, मैदान आहेत. गेल्याकाही वर्षांपासून येथे मोठ्याप्रमाणात उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गृहसंकुलातील रहिवाशांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरापासून जवळ परंतु नैसर्गिक सानिध्यात राहता यावे म्हणून अनेकांनी लाखो रुपये खर्च करून येथे गृह खरेदी केली. आता या गृहसंकुल आणि गावांपासून काही अंतरावर कचरा प्रकल्प उभा राहिल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. दररोज दुर्गंधीचा सामना रहिवाशांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गावातील रहिवाशांनी डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून या प्रकल्पा विरोध करण्यास सुरूवात केली. येथील गृहसंकुलातील नागरिकांनी या संघटनेला पाठिंबा दिला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. परंतु ठोस उपाययोजना होत नाही. दररोज ५० ते ६० डम्पर भरून कचरा परिसरात आणला जातो. मध्यरात्री हा कचरा जमिनीत पुरला जातो. दिवस-रात्र येथे दुर्गंधी निर्माण होत असल्याने विविध गंभीर आजार होत आहे. दुर्गंधीमुळे काहीजण त्यांची घरे विक्रीला काढत आहे. आमच्या शेतीवर देखील याचा परिणाम झाला असून शेतीमध्ये कचरा प्रकल्पातील पाणी शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थ कर आहेत. आमच्या मागण्यांकडे ठाणे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. या संदर्भाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. येथे सुमारे एक लाखाहून अधिक रहिवाशी वास्तव्य करतात. त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डायघर प्रकल्पाविरोधात आंदोलने सुरू आहेत. महापालिका आयुक्त प्रकल्पाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत चर्चेचे आश्वासन देतात. परंतु पुढे काही होत नाही. जोपर्यंत हा प्रकल्प बंद होत नाही. तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल असा निर्णय आम्ही घेतला आहे. गृहसंकुलातील रहिवाशांचा देखील आम्हाला पाठिंबा मिळत आहे. – मंगेश खुटारकर, सदस्य, डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती.

डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी

डोंबिवली : खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात स्थानिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला दिवा बाजूने हरितपट्ट्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील झाडे, हरितपट्टा नष्ट करून या बेकायदा बांधकामांची भूमाफियांनी उभारणी केली आहे. मागील ३० वर्षात कोणीही भूमाफियाने कोपर भागात बेकायदा चाळी, इमारती उभारणीचे धाडस केले नव्हते. पण आता डोंबिवली खाडी किनारची बहुतांशी जागा भूमाफियांनी चाळी, बेकायदा इमारती बांधून हडप केली आहे. आरक्षित भूखंडावर इमले बांधून सज्ज झाले आहेत. आता डोंबिवलीत मोकळ्या जमिनी शिल्लक राहिल्या नसल्याने भूमाफियांनी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मोकळ्या सुमारे ५० ते ६० एकर जमिनीकडे आपल्या नजरा वळविल्या आहेत. या हरितपट्ट्यात शिरकाव करण्यासाठी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून भूमाफिया हरितपट्टयातील झाडे तोडण्यासाठी, तेथील खुरटी झाडे नष्ट करण्यासाठी जेसीबी, पोकलेन या रस्त्यावरून नेत आहेत. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा भूाफियांनी घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये हरितपट्टे विकसित करण्याचे आणि अस्तित्वातील हरितपट्टे संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशाला आव्हान देत कोपर भागात भूमाफियांनी हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम केले आहे. त्यामुळे आयुक्त याविषयी काय भूमिका घेतात याकडे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे लक्ष आहे. हरितपट्ट्यात बांधकामे सुरू झाल्याने निसर्ग छायाचित्रकार, पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांनी हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त कऱण्याची मागणी नागरिक करत आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्याने हे बांधकाम आमच्या हद्दीत नाही. या बांधकामाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कोपर रेल्वे स्थानक भागात हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम कोणी केले असेल तर त्या बांधकामाची पाहणी करतो. ते बांधकाम बेकायदा असल्याचे दिसून आले तर ते तात्काळ जमीनदोस्त केले जाईल. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

 ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार

राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती ठाणे : लोकसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून श्री राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात असतानाच, आता ठाकरे गटाचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात रामाची प्रतिकृतीसह मंदिराचा मोठा देखावा उभारला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साजरा होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून ठाकरे गटाने निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाचे २९ वे वर्ष असून यापूर्वी चरई भागात १२ वर्षे हा उत्सव साजरा होत होता. गेल्या १७ वर्षांपासून मैदानात हा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी देवीच्या दर्शनाला भावीक मोठ्या संख्येने येतात. या उत्सवात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनीही राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराची उंची ७० फूट आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६×१६ फुटाचा आहे. ४०X४०`नऊ’ हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग आहे. याठिकाणी रामाची मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यावरून राजकारण तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभारण्यात आल्याचा मुद्दा भाजपच्या नेत्यांसह महायुतीचे नेते उपस्थित करत आहे. लोकसभा निवडणूक प्रचार मेळाव्यातही महायुतीच्या नेत्यांकडून राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात आहे. भाजपला शह देण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवरात्रोत्सवात राम मंदिर प्रतिकृती उभारल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने राम मंदिराबद्दल आस्था असल्याचे ठाकरे गटाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत गीता दुबे व एस.आर. दुबे,शॉप नं 8,9,10, भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई , हार्दिक सुनिल गोखरू व  प्रेमप्रकाश भवंरलाल शर्मा, शॉप नं 14,15,16, कासा ब्ल्यानका सो,भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केले होते. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1)अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने सदर बांधकामावर निस्कासनाची कारवाई करण्यात आली व त्यापोटी रु.10,000/- एवढी वसूली  करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त तसेच, 08 मजूर, 1 पिकअप व्हॅन, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, 01 गॅस कटर इत्यादी चा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे प्रतिपादन ठाणे: सर्व उमेदवारांना व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि अनुचित पद्धतीच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी आज येथे केले. 24- कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज सकाळी “सीझर कमिटीच्या” नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती सातपुते यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून म्हणजे दि. 16 मार्चपासून फिरत्या निगराणी पथकाचे  काम सुरू झाले आहे. या टीमने आक्षेपार्ह रोकड, दारू,भेटवस्तू इ.सापडल्यास कशा प्रकारे कारवाई करावी याच्या सूचना संबंधित बैठकीतील उपस्थित समन्वय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कार्यवाहीसाठी आयकर विभाग, वस्तू व  सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग या सर्वांचे प्राधिकृत अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. या सर्वांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशाही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावेळी बैठकीत दिल्या. या बैठकीस 144 कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे सह.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर,  24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, नोडल अधिकारी (खर्च) दिलीप सूर्यवंशी, सहा.खर्च निरीक्षक शरद देशमुख, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहिता पथकांचे समन्वय अधिकारी, पोलीस खात्याचे वरिष्ठ प्रतिनिधी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती मोहिम

 ठाणे विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्यावतीने ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने  स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत आज मो.ह विद्यालय, ठाणे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावे. मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे, असे आवाहन स्वीप पथक यांनी केले. स्वीप आराखड्यानुसार मतदार नोंदणी व त्यांचा सहभाग वाढविण्यासांठी प्रचार, प्रसिद्धी, जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत शालेय व्यवस्थापन समिती मार्फत चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी स्वीप कार्यक्रम राबविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदान जनजागृती’ विषयावर स्पर्धा घ्या प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मतदान जनजागृती’ या विषयांवरती माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे दिल्या. सदर कार्यक्रमात मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी  मी मतदान करणारंच…, आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा, या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने तलावपाळी येथे मतदान जनजागृती मोहिम

ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी तलावपाळी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. सुट्टीनिमित्त फिरावयास आलेल्या नागरिकांनी या…