Author: bittambatami.com

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढा – न्या. ए.एस. राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे. विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यामध्ये ५ मेला  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे.

मतदान करण्याचे विद्यार्थ्यांकडून पालकांना आवाहन- चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्या उपस्थितीत पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.१५ दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. येत्या लोकसभा मतदानात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले, मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले असून, हे संकल्प पत्र पालकांनी भरुन द्यावे. मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली, मॅरेथॉन याबरोबरच बोट रॅलीचे आयोजनही करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आलेल्या संकल्पपत्रामध्ये, मी शपथ घेतो, मी भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन. मततदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकारी नसून, ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन. मी अशीही शपथ घेतो, मी धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही प्रलोभास बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडेन, असा मजकूर आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेषत: उपविभागीय अधिकारी, तहसील कार्याल, नगरपरिषद, जिल्हा परिषद यंत्रणा यांच्या माध्यमातून विविध विधानसभा मतदार संघात फ्लेक्स, सेल्फी पॉईंट यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ‘मत आपले द्यायचे, कर्तव्य आपले बजावायचे’, ‘मतदान अधिकार पण, कर्तव्य पण’, ‘मतदान मतदात्याची शान’, ‘मतदानाचे कर्तव्य बजावून महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवू या’, असे संदेश देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मोनोरेल, मेट्रो प्रकल्पात आता अदानीची वीज

टाटाच्या वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रीसिटीकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या मोनोरेल, मेट्रोसाठी टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात आहे. पण टाटा पॉवरने वीजदरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने वीजपुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका आणि मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) सह मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेसाठी सध्या टाटा पॉवर वीजपुरवठादार आहे. टाटा पॉवरकडून मोनोरेल आणि मेट्रोसाठी सध्या, २०२३-२४ साठी ४.९२ रुपये प्रति युनिट असे दर आकारले जातात. परंतु, टाटाच्या वीज दरात सोमवारपासून वाढ झाल्यामुळे २०२४-२५ साठी मोनोरेल आणि मेट्रोसाठी ७.३७ रुपये प्रति युनिट असे दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने टाटा पॉवरऐवजी अदानीची वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केल्याचे समजते. अदानीकडून वीज घेतल्यास एमएमआरडीएला ६.१५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागेल. एकूणच, अदानीची वीज काहीशी स्वस्तात उपलब्ध होणार असल्याने एमएमआरडीएने वीज पुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो २ अ आणि ८ मार्गिकेसाठी दररोज १२ ते १५ मेगावॉट वीज लागते. तर मोनोरेलसाठी प्रतिदिन २ ते ३ मेगावॉट इतक्या विजेचा वापर केला जातो. दरम्यान, मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून मेट्रोतुनही एमएमआरडीएला अपेक्षित महसूल मिळत नाही. अशावेळी वीज दराचा भार वाढल्यास तोटा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, टाटाऐवजी अदानीकडून वीज घेण्यात येणार आहे.

सर्वत्र सुरु असलेल्या कामांमुळे ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नवी मुंबईचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे. त्‍यातच सर्वात जास्त वाहतुकीची वर्दळ असलेल्या ठाणे- बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्‍यामुळे ऐन उकाड्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या मार्गावरून बेलापूरहून ठाण्याकडे जाताना नेरूळ पार केल्‍यानंतर शिरवण्यात गावाकडे जाणाऱ्या आणि पुलावर चढणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यापासून दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तिथून पुढे सानपाडाजवळ वाशीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, त्याच्याच बाजूला एक नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुलावरून वाशीकडे जाता येते. मात्र, तुर्भे रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. येथे पूल उभारण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानकासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाशी मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्थानकाच्या आतील रस्त्याचा पर्यायही खुला करून देण्यात आलेला आहे. शिवाय वाहतूक पोलिसही भर उन्हात उभे असतात. मात्र, तरीदेखील येथील मार्गावरील वाहतूक कोंडी काही कमी होत नसल्‍याचे चित्र आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक पार केल्यावर पुढे असलेल्या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. येथील मार्गावरील महापे जंक्शनवरही मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे अर्धा मार्ग रस्त्याच्या कामामध्ये बंद आहे. महापे जंक्शनवरून अनेकांना शिळफाटा गाठायचे असते. मात्र, येथील वाहतूक कोंडीमुळे जंक्शनवर बराच वेळ वाया जात आहे. एकीकडे आग ओकणाऱ्या सूर्याच्या गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत असताना ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा जीव नकोसा होत आहे.

डोंबिवलीत गोदामे, बेकायदा चाळी भुईसपाट

डोंबिवली : गोदामांचे आगर म्हणून ओळखले जाणाऱ्या, तसेच जिन्सच्या बेकायदा कारखान्यांसाठी प्रसिध्द असलेल्या गोळवली, भाल, वसार भागातील बेकायदा चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. या बेकायदा चाळी निवास, काही चाळी भंगार गोदामांसाठी भूमाफियांनी सरकारी, खासगी जमिनींवर बांधल्या होत्या. गोळवली भागात मोठ्या प्रमाणात भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. पावसाळ्यात भंगार ठेवण्यासाठी भंगार विक्रेते निवासी चाळींचा भाग वापरतात. तर काही भागात भूमाफिया गोदामे उभारून ते भाड्याने भंगार विक्रेत्यांना देतात. भंगार विक्रेत्यांना भाड्याने चाळीतील खोली, गोदाम बांधून दिले की दरमहा आठ ते दहा हजार रूपये भाडे भूमाफियाला मिळते. गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत माळरानांवर गोदामे, चाळी उभारण्यात येत आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यावेळी आठहून अधिक बेकायदा चाळी, भंगारांसाठी गोदामे उभारली जात असल्याचे मुंबरकर यांच्या निदर्शनास आले. या बेकायदा चाळी चौबे नावाचा भूमाफिया बांधत असल्याचे स्थानिकांंनी मुंबरकर यांना सांगितले. चौबे हे कारवाईच्यावेळी प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत. विहित प्रक्रियेचा अवलंंब करून लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथक घेऊन गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत चौेबे भूमाफियाने उभारलेल्या सर्व बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. गोळवली परिसरात गोदाम किंवा निवासासाठी कोणीही बेकायदा बांधकाम करीत असेल तर त्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. या भागातील भंगार विक्रेत्यांची बांधकामे, त्याची अधिकृतता तपासून या भागात तळ ठोकून असलेल्या भंगार विक्रेत्यांवर लवकरच आचारसंहितेचा भंग होणार नाही या चौकटीतून कारवाई केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांंगितले. आय प्रभागात बेकायदा इमारती,चाळी तोडण्याची मोहीम सतत सुरू असल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा

ठाणे : गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही  त्यांच्यासाठी  ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ७ एप्रिल  दुपारी ४.०० वाजता  कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात येणार आहे.  या पालखी उत्सवानिमित्त   पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून, रत्नागिरी व रायगड  या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना  प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्याशी +91 98190 95047; अरूण नागवेकर (वांद्री,ता. संगमेश्वर)  ९४०५०८००८५; प्रमोद चोचे ९१५२०९१७८०, ९८२०७६९९५९  या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विकासकामांची माहिती घेणे हा पाहणी दौऱ्याचा उद्देश- आयुक्त सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील, याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त व प्रशासक सौरभ राव यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली. सोमवारी सायंकाळी झालेल्या या पाहणी दौऱ्यास आनंदनगर, कोपरी येथून सुरूवात झाली. ठाण्याचे प्रवेशद्वार, सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली. दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यानंतर, ठाणे पूर्व सॅटीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली. त्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कला दालने व व्यवस्था यांची माहिती घेतली. महापालिकेने उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांच्या निगा व देखभालीचा खर्च निघेल  अशा पद्धतीने या वास्तूंची भाडे आकारणी केली जावी, अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या. अशा प्रकारच्या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रितसर करारनामा करण्यात यावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तीन हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचेही, तीन हात नाका, मॉडेला मिल नाका येथील वाहतुकीच्या परिचलनाची माहिती घेतल्यावर, आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील चौक आणि रस्ते अरुंद झाले आहेत. ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. त्या दृष्टीकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग  करण्याची आवश्यकता असून त्यांची नोंद घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर, आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली. किसन नगर येथील मिनाताई ठाकरे प्रसूतीगृहाचे बळकटीकरण आणि अत्याधुनिकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच, त्या गर्भवती मातांचा विचार करून येथे लिफ्ट सुविधा देण्यासाठी आराखडा सादर करण्यास बांधकाम विभागाला सांगितले.  वागळे इस्टेट भागात पडवळनगर येथील शौचालय, रोड. नं. २२ येथील सुशोभीत करण्यात आलेले सर्कल यांची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचबरोबर, जयभवानी नगर येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. क्लस्टरसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात सुरू आहे, याचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी महापालिकेकडून जे सहकार्य लागेल ते देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. क्लस्टरबाबत आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा तसेच येथील नागरिकांचे राहणीमान बदलण्यासाठी क्ल्स्टर ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे, या प्रकल्पाच्या कालबद्ध पूर्णत्वासाठी लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांसह बैठकही आयोजित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. वर्तकनगरमधील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली. ग्रंथालय, अभ्यासिका आदी सुविधांची माहिती घेत त्यांनी तेथील प्रशिक्षणार्थी, ग्रंथपाल यांच्याशी संवाद साधला. उपवन येथील घाट, कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली. तेथील सुविधा आणि व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, अनघा कदम, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे संचालक महादेव जगताप, घाणेकर नाट्यगृहाचे व्यवस्थापक अजय क्षत्रिय आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा –  अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. शिनगारे वेळोवेळी आढावा घेत असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून केलेल्या कार्यवाहीची ते नियमितपणे माहिती घेत आहेत. उमेदवारास वैयक्तिक स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घेता येते. निवडणूकसंबंधी कोणत्याही विषयात आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना मिळणार सुट्टी

अनिल ठाणेकर ठाणे :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे. शासनाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानांचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. वर नमूद केल्यानुसार  उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक 202403221710362810 असा आहे.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी…