Author: bittambatami.com

 जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर कुणाल खरात सीए परीक्षेत उत्तीर्ण

 पनवेलमधील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव   राज भंडारी पनवेल : लहानपणापासूनच एखादी जिद्द आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कशी पोहोचवू शकते, याचे द्योतक उदाहरणं म्हणजे नवीन पनवेल येथील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात. कुणाल याने आपल्या जिद्दीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे. त्याच्या या यशानंतर परिसरातील नागरिकांनी कुणाल याला भेटून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुणालचे पिता सिद्धार्थ खरात हे वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहत होते. ते पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार शेडमध्ये शासकीय सेवेत होते. सन 1994 साली ते पनवेलमध्ये राहण्यास आले. त्यांना एकूण 3 मुलगे आहेत. मोठा शशांक आणि त्याच्या पाठीमागे कुणाल आणि मृणाल ही जुळी भावंडे असा त्यांचा परिवार. कुणाल आणि मृणालचा जन्म सन 1998 साली पनवेलमध्येच झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार असणारा कुणाल हा नक्कीच उच्च स्थानी जाईल असा विश्वास घरातील सर्वांनाच होता. सुरुवातीचे शिक्षण हे नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर येथून सुरु केले आणि दहावीपर्यंत कुणाल एकाच शाळेत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्याने पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला. कुणाल याला लहानपणापासूनच सीए बनण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगितली होती. घरातील संस्कार आणि कुणालची जिद्द त्याला सीए च्या पदापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. कुणालने आपली जिद्द खरी करण्यासाठी त्याने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच सीएच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये तो साईटीची परीक्षा देऊन उत्तीर्ण देखील झाला. यानंतर त्याने पोतदार महाविद्यालयातील आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि 3 वर्षांसाठी नवीन पनवेल येथील जैन अँड सन्स या फर्ममध्ये त्याने प्रशिक्षण (एंटरशिप) घेतले. नुकत्याच पार पडलेल्या सीएच्या परीक्षेत त्यांनी प्रयत्न केले. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सीएच्या परीक्षेतील आपल्या सहाव्या प्रयत्नाचे सातत्य राखत त्याने यश संपादित करून तो उत्तीर्ण झाला. कुणालच्या या यशामध्ये त्याचे आई – वडील, भाऊ, मित्र परिवार, तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जैन अँड सन्स मधील सहकाऱ्यांचा मोठा हातभार लागला असल्याचे त्याने बोलताना सांगितले. कुणालच्या या नेत्रदिपक यशानंतर त्याच्यावर नातेवाईक, मित्र परिवारासह पनवेलमधील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ००००००

 सिंहस्थ कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची गरज

 सुजाता सौनिक यांची सूचना   हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या कामांचे सुक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, प्रयागराजला भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करावा, शहरातील गोदावरीचा काठ हरित करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा विविध सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. मुंबईत मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा तयारी आणि नाशिकशी संबंधित विविध विषयांवर बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यास आता केवळ दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. सरकारने कुंभमेळा नियोजनासाठी जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत समित्या स्थापन केल्या आहेत. नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर पालिकेसह अन्य विभागांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आराखडे तयार केले आहेत. सिंहस्थासाठी आवश्यक कामांचे सुक्ष्म नियोजन करून कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी  दरम्यान कुंभमेळा होत आहे. काही विभागातील अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन अभ्यास करावा, असे सौनिक यांनी सूचित केले. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवन परिसरात ३१८ एकर जागा निश्चित केलेली आहे. सिंहस्थ कालावधी वगळता उर्वरित ११ वर्षात या जागेचा कुठलाही वापर होत नाही. या जागेचा उपरोक्त काळात कसा वापर करता येईल याचा विचार करण्यास सौनिक यांनी सांगितले. गोदावरीचा नदीकाठ परिसर हिरवागार कसा करता येईल, यावर लक्ष देण्यास सांगण्यात आले. महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारकडून त्याचा पाठपुरावा करण्याचे मान्य करण्यात आले. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासंबंधीच्या नियोजनावर चर्चा झाली. शहरात मेट्रोनिओसह इलेक्ट्रिक मेट्रोवर चर्चा होत आहे. शहराच्या दृष्टीने कोणता प्रकल्प योग्य ठरू शकतो, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले. ०००००

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, पाटकर रस्ता, नेहरू रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे भाग म्हणून ओळखले जातात. या भागातील रस्ते, चौक वाहने, नागरिकांसाठी…

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम, प्रभागांमधील पाणी पुरवठा वितरण वाहिन्यांमधील गळती दुरुस्तीची कामे गुरुवारी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत पालिका…

नववर्षाच्या स्वागतानिमित्त अंनिसचा ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ उपक्रम

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा, घाटकोपर व रोटरी क्लब ऑफ मुंबई, घाटकोपर यांनी ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ (Don’t Drink & Drive) असा मजकूर असणारे पत्रके घाटकोपर येथील…

ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय स्थलांतरित

ठाणे : बेलापूर येथील कोकण भवनात असलेले ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता खारेगाव कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे स्थलांतरीत झाले आहे. अर्जदार यांनी…

 माथेरान घाटात ईनोव्हाकारला अपघात

 चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात प्रवाशी सुखरूप.   माथेरान : सगळीकडे थर्टीफस्टची धामधूम सुरू असताना नेरळ माथेरान घाटात पर्यटकाच्या वाहनाला भीषण अपघात घडला.सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैवबलवत्तर म्हणून यातील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा कठड्यावरून आदळून खालच्या रस्त्यावर येवून आपटली.यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. कार रस्त्यातच मध्ये असल्याने येणाऱ्या वाहनांना काही काळ अडथळा निर्माण झाला होता. पुणे नंबर पासिंग असलेली एम एच 12 बी बी 3333 क्रमांकाची ईनोवा कार मधील पर्यटक हे माथेरान फिरून परतीच्या प्रवासाला नेरळ दिशेने निघाले होते.कारचालक माथेरान घाट उतरत असताना कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रक रस्त्याच्या 134 या क्रमांकावर वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून सुरक्षा कठडा असणारा कठडा चढून खालच्या वळणा वरील रस्त्यात आदळली.यामध्ये कारचे नुकसान झाले होते,परतू कार मधील पर्यटक सुखरूप होते.दैवबलवत्तर म्हणून यावेळी समोरून कुठलेही वाहन आले नव्हते तर खोल दरी देखील बाजूला नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.दरम्यान वाहनातील पर्यटक घाबरून दुसऱ्या वाहनात बसून कार तिथेच सोडण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान पर्यटकांच्या बाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नसून या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात देखील कुठली तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे. एकूणच थर्टीफर्स्टची धामधूम सुरू असताना माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

 रस्त्यांची स्वच्छता व रस्ते धुणे याव्दारे हवा गुणवत्तेत सुधारणा   

 सखोल स्वच्छता मोहीमेत नवी मुंबई : शहरातील प्रदुषणाला आळा बसावा व हवा गुणवत्ता चांगली राहावी यादृष्टीने सखोल स्वच्छता मोहीमांचा पंधरवडा महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार 13 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असून 30 डिसेंबर पासून या मोहीमांना प्रभावी रितीने सुरुवात करण्यात आलेली आहे. यामध्ये ब्रशझाडू, फ्लीपर मशीन यांच्या सहाय्याने रस्ते, पदपथ, दुभाजक या ठिकाणी साचलेली धूळ, माती यांची सखोल सफाई करण्यात येत असून त्यानंतर फॉगर्स मशीनव्दारे मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द झालेले प्रक्रियाकृत पाणी वापरुन स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे रस्ते स्वच्छतेप्रमाणेच हवेतील धूळीचे प्रमाण कमी होउुन हवा गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत आहे. नागरिकांकडून या डीप क्लीनिंग मोहीमेचे मोठया प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी बेलापूर विभागात पारसिक हिल या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांनी स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगातून सखोल स्वच्छता केली. विशेष म्हणजे या मोहीमेत एसआयइएस महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. नेरुळ विभागात सहा.आयुक्त  जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्रशांत कॉर्नर ते राजीव गांधी उड्डाणपूल ते वझीराणी स्पोर्टस्‍ क्लब पर्यंत रस्ते सफाई करण्यात आली. तुर्भे विभागात सहा.आयुक्त प्रबोधन मवाडे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली कोपरी तलाव परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मुख्य रस्ते, त्याबाजूचे पदपथ व त्यामधील दुभाजक यांच्या कडेला जमिनीशी घट्ट झालेली माती व धूळ यांची ब्रश झाडूने स्वच्छता मित्रांनी सखोल स्वच्छता केली व त्यानंतर फॉगींग मशीनाव्दारे प्रक्रियाकृत पाणी मारुन रस्ते व पदपथ स्वच्छ करण्यात आले. उदयाही सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले असून यामुळे वातावरणातील धूळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून या मोहीमेचे नवी मुंबईकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 00000

३ आठवडे चाललेल्या करंजाडे महोत्सवाची लावणी नृत्याच्या कार्यक्रमांनी सांगता

राज भंडारी पनवेल : गेली 7 वर्षे करंजाडेमधील नागरिकांसाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्यावतीने करंजाडे महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षीही जवळपास तीन आठवडे हा महोत्सव विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला. करंजाडे वासियांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देत आपली हजेरी नोंदविली. करंजाडे महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच मिस करंजाडे ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करंजाडे येथील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सिने तारका लावणी नर्तिका राधा पाटील मुंबईकर हिच्या दिलखेचक अदांनी करंजाडे महोत्सवाची सांगता पार पडली. आपल्या दिलखेचक अदा आणि नृत्यांनी तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण आता गौतमी पाटीलला टक्कर देण्यासाठी राधा पाटील मुंबईकर ही मैदानात उतरली आहे. अवघ्या 4 महिन्यापूर्वी प्रकाश झोतात आलेल्या राधा पाटील मुंबईकर हिने आपल्या नृत्याने तरुणांना वेड लावलं आहे. करंजाडे महोत्सवाच्या सांगता समारंभातील तिच्या मनमोहक आणि दिलखेचक अदांनी करंजाडे सह पनवेलमधील तरुणांना देखील वेडं केलंय. करंजाडेचे माजी सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवात तरुणाईने अख्ख मैदान तुडुंब भरून गेलं होतं. कातिलोंकी कातिल आणि राधा पाटील असा सुर यावेळी तरुणांच्या तोंडी घुमताना दिसला. तब्बल 3 आठवडे चाललेल्या या महोत्सवामध्ये करंजाडे वासियांसाठी दर्जेदार मेजवानीसह विविध वस्तूंच्या खरेदीचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच बच्चे कंपनीसाठी याठिकाणी बालनगरी उभारून यामध्ये मुलांच्या हौशी मौजीचे खेळ ठेवण्यात आल्यामुळे करंजाडेसह पनवेलमधील नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला. एकूण 23 दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उवस्थिती दाखविली होती. ०००००

 ठाणे महापालिकेच्या पाणी बिलाची थकबाकी असलेल्या २६०६ नळ जोडण्या खंडित

 २३३० थकबाकीदारांना पाठवल्या नोटीसा   ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर, २३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची बील वसुली करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत. बील न भरल्यास पाणी पुरवठा खंडित होणार पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. …तर कारवाई होणार प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि मीटर रिडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे. थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. 000000