Author: bittambatami.com

माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी

माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान : राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या नगरपालिका क्षेत्रात ज्यावेळी विविध विषयांवर महत्वपूर्ण निर्णय अथवा विकासकामे होण्यासाठी सभा आयोजित करण्यात येते त्याबाबत इत्यंभूत माहिती गावातील जनतेला माहीत व्हावी यासाठी  होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात येत असते त्याच धर्तीवर माथेरानमध्ये सुध्दा नगरपरिषदेच्या सभागृहात होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे अशी मागणी येथील उद्योजक भास्कर शिंदे यांनी केली आहे. अनेकदा काही महत्वपूर्ण कामे परस्पर एखाद्या मर्जीतील ठेकेदाराला सुपूर्द केली जातात आणि त्यामागे खुप काही गौडबंगाल दडलेले असते. त्यामुळे होणारी विकासकामे नियोजनशून्य होऊन निधीचा अपव्यय होत असतो. ज्यावेळी सभांचे आयोजन करण्यात येते त्यावेळी चालू सभेत लोकनियुक्त सदस्य अधिकाऱ्यांचे लांगुलचालन तर करीत नाही ना किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कोणता सदस्य नाही ना याची शहानिशा होण्यासाठी जर का सभागृहात होणाऱ्या सभांचे चित्रण प्रदर्शित केल्यास जनतेचा सुध्दा आत्मविश्वास वाढेल की ज्यांना आपण अमूल्य मत देऊन ज्यांना कार्यक्षम सदस्य समजून सभागृहात पाठवले आहे.ती मंडळी नक्कीच या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत का ? सकारात्मक कामांना पाठबळ देत आहेत की नाही हे मतदारांना पाहणे सुध्दा आवश्यक आहे त्यामुळेच आपले मत वाया गेलेले नसून सार्थकी लागले आहे. अशा भावना निश्चितपणे त्यांना पहावयास मिळू शकतात.निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खरोखरच आत्मीयतेने कामे करतात की नाही याचे ज्ञान आणि माहिती प्रत्येक घटका पर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु सत्ताधारी गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रशासकीय राजवटीत कार्यालय आहे की नाही असे चित्र निर्माण झाले होते. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर बंधन नसल्याप्रमाणे सर्व कारभार सुरू होता. जो तो आपल्या सोयीनुसार कार्यालयात हजर राहत होता.दिवसभरात बहुतेक कर्मचारी हे जेमतेम दोन ते तीन तास काम करताना दिसत होते.तर काही इमानेइतबारे कर्तव्य पार पाडत होते.निदान यापुढे तरी सत्ताधारी गटाचा संपूर्ण कार्यालयावर अंकुश राहील का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट काही वर्षांपूर्वीच पालीकेच्या सर्व सभा लाईव्ह केल्या जाव्यात अशी मागणी मी स्वतः तत्कालिन बहुमत असणाऱ्या सत्ताधारी गटाकडे केली होती.नगरपरिषदेच्या सर्व सभा लाईव्ह झाल्या पाहिजेत आजही या मागणीवर आम्ही ठाम आहोत.आपले लोकप्रतिनिधीं काय काम करतात,प्रभागाचे,गावाचा हिताचे निर्णय कसे घेतात हे पाहण्याची संधी लाईव्ह सभेमुळे मतदार नागरिकांना भेटू शकते. भास्कर शिंदे—उद्योजक माथेरान

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन कल्याण: आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन आज कल्याण डोंबिवली महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त वंदना गुळवे, समीर भुमकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक अनिल ठाणेकर मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भांडुप गावातील प्रभाग क्रमांक  १११ मधून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सीएमई विभागातून जून १९९१ साली सेवानिवृत्त झालेले श्री. राजाराम विष्णू (सावंत ) देसाई, चार्जमन, लोको शेड यांचा मुलगा दीपक सावंत हा शिवसेना ( उबाठा ) पक्षातून नगरसेवक  म्हणून निवडून आला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला म्हणून त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली साधारण ३२ वर्षांपूर्वी दीपक सावंत यांना शिवाजी नगर, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी वडाळा या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली होती. पक्षाचा AB अर्ज मिळाला होता. त्यामुळे पोर्ट ट्रस्ट  वसाहतीमधील रहिवाशांना खूप आनंद झाला.  कॉलनीत मिरवणूक, फटाके, ढोल ताशे वाजू लागले. पोर्ट ट्रस्ट कॉलनी मध्ये आनंद पसरला. पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून घराघरात आनंद झाला.घराघरातून ओवाळणी झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. परंतु हा आनंद रहिवाशांना जास्त मिळाला नाही. पक्षात चक्र फिरली. की फिरवली.  दुसऱ्या दिवशी उमेदवारी फिरवली गेली. संपूर्ण वसाहत शोक सागरात बुडाली. जणू काही सुतक पडले. परंतु दीपक सावंत शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. संधी हुकली. परंतु तो निष्ठेने शिवसेनेचे काम करत राहिला. दीपक  सावंतचे वडील राजाराम सावंत मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून  १९९१साली निवृत्त झाले. ते वसाहत सोडुन भांडुप गावात स्थायिक झाले. दीपक सावंत नोकरी बघून शाखेचे काम प्रामाणिक पणे आजतागायत करत आला. भांडुप गावचा तो शिवसैनिक झाला. दरम्यान संघटनेवर अनेक संकटे आली. परंतु दीपक सावंत निष्ठेने कम करत होता. आणि एवढ्या वर्षांनी पक्षाने परत संधी दिली आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भांडुप गावातून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा  मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला.

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण प्रभारी नियुक्त्या रद्द करण्याची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता ठाणे महानगर पालिकेकडून केली जात नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे रवींद्र चांगो शिंदे यांनी ठामपा मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. ठाणे महानगर पालिकेची सुमारे चार वर्षानंतर सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी, कर्मचारी थकीत देणी त्वरीत द्यावी, १०-२०-३० ची ठरावाची त्वरीत अंमल बजावणी करावी, शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभार रद्द करावा,  शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभारी पदे रद्द करावेत, महात्मा फुले खारटन रोड क्रिक रस्त्याचा १० वर्षांचा प्रलंबीत ठराव, तत्काळ मंजुर करावा आदी मागण्यांचे निवेदन रवींद्र शिंदे यांनी ठामपाला दिले.

नाशिककरांवरील करवाढीचे संकट टळले

नाशिककरांवरील करवाढीचे संकट टळले हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड झाली असली तरी शुक्रवारपर्यंत स्थायी समितीची पुनर्रचना न झाल्यामुळे नाशिककरांवर करवाढ यंदा टळली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार २० फेब्रुवारीच्या आत कर व दरवाढीच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात प्रशासनाला कुठलीही कर व दरवाढ लागू करता येणार नाही. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. सातव्या पंचवार्षिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. पाठोपाठ महासभेकडून स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवडही झाली आहे. स्थायीचे सदस्य निवडले गेले असले तरी, सभापतीची निवड अद्याप झालेली नाही. सभापती निवड येत्या बुधवारी होणार आहे. त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती निवडीनंतरच सादर होण्याची शक्यता असल्याने नाशिककरांना नवीन करवाढ लागू होणार नाही. असा आहे नियम महापालिका क्षेत्रात कर व दर ठरवण्याचे अधिकार स्थायी समितीला असतात. महापालिका प्रशासनाकडून अर्थात आयुक्तांकडून करवाढ सुचवल्यास २० फेब्रुवारीच्या आत स्थायी समितीची परवानगी घ्यावी लागते. या कालावधीत मंजुरी मिळणे आवश्यक असते. परंतु, यंदा २० पर्यंत स्थायी समिती अस्तित्वात न आल्याने कर व दरवाढीचा प्रस्ताव अंदाजपत्रकात सादर होण्याची शक्यता मावळली आहे.

 नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी दिवा : दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी, खर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सन्मानीय नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, जयंता वालीकर आणि शक्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सोसायटीतील लहान मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सोसायटीतील वरिष्ठ नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सोसायटी कमिटीच्या वतीने मोहन मांडवकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमा साठी कार्याध्यक्ष संदीप कोकणे, उपाध्यक्ष चिलवेरी, खजिनदार रितेश मिश्रा तसेच राहुल शर्मा, मोहन मांडवकर, जीत शुक्ला, संजीव नारायणकर, सुशील राजपूत, दुर्गेश आणि सतीश गंगातीवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गंगातीवरे यांनी केले. यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी गौतम कदम यांनी उपस्थित सर्व रहिवाशांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार मुंबई : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ नोंदवली असून उपनगरीय आणि गैर-उपनगरीय दोन्ही…

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी.

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी. संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 19 तारखेला महाराष्ट्राचे आद्य आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये जुन्या विविध तिकिटांचे व नाण्यांचे शिवकालीन मुद्रांचे प्रदर्शन प्रमोद नवरे व परब राहणार गोरेगाव यांनी जोपासलेला छंदाचे प्रदर्शन आयोजित केले होते प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. त्या प्रसंगी जुन ते सोन जुना इतिहास नवीन पिढी पुढे येणे गरजेचे आहे. सुरेश पोटे यांनी विचार मांडले, प्रदर्शनाला नगरसेवक सुहास वाडकर व नगरसेवक तुळशीराम शिंदे या नगरसेवकांनी व इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन शिवजयंती निमित्त केलेल्या कार्यक्रमाबाबत खूप कौतुक केले. हे सर्व आयोजन संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर,सचिव सोडा व संदीप परब यांनी चांगल्या रितीने आयोजन करून पार पाडले.