Author: bittambatami.com

 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा भाजपा सरकारकडून राज्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी – सुरेशचंद्र राजहंस मुंबई : भाजपा महायुती सरकारने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास केला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाची काळजी व्यक्त करत आहेत, हा केवळ दिखाऊपणा  आहे. पर्यावरण आठवडा सारख्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक महत्त्वाची असते. पर्यावरण हा केवळ परिषदांचा विषय नाही, तर तो जनतेच्या श्वासाचा, भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. पर्यावरणावर बोलताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मुंबईतील ‘पर्यावरण आठवडा’ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यांच्याच सरकारने राज्यात पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. आरे मधील झाडांची कत्तल, चंद्रपूर ताडोबा– अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगलांवर वाढता ताण आहे, वेताळ टेकडी येथील झाडांवर घाला घालण्यात आला, मुंबई तील मँग्रोव्ह्स आणि सॉल्ट पॅन जमिनींवर विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. तपोवन मध्ये वृक्ष तोड चाललेली आहे. या सर्व घटनांनी सरकारची “विकास” ही संकल्पना नेमकी कोणासाठी आहे, हा प्रश्न निर्माण केला आहे. सरकारला खरोखरच पर्यावरणपूरक विकास हवा असेल तर, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पारदर्शक पर्यावरणीय परिणाम अहवाल जाहीर करावेत. झाडतोडी ऐवजी पर्यायी आराखडे तयार करावेत. मँग्रोव्ह, टेकड्या आणि जंगलांचे कायदेशीर संरक्षण अधिक मजबूत करावे. स्थानिक नागरिक व पर्यावरणतज्ज्ञांचा सल्ला बंधनकारक करावा. केवळ शब्दांमध्ये शाश्वत आणि प्रत्यक्षात वेगळीच कृती ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता ओळखते. पर्यावरण वाचवायचे असेल, तर घोषणांपेक्षा ठोस कृती हवी. अन्यथा पर्यावरण आठवडा हा फक्त प्रतिमानिर्मितीचा कार्यक्रम ठरेल, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. तद्नंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी  अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहायक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न

मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद कल्याण : डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर हा विशेष करून बंगल्यांचा परिसर असून कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील, शासकीय, खाजगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी इत्यादी उच्चभ्रू लोकांची वस्ती येथे आहे. याठिकाणी एका बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला असून हे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. महाशिवरात्री दिवशी रात्री अडीच वाजता दरम्यान मिलापनगर, एमआयडीसी मधील अभिनव सहकारी बँकेच्या समोरील एका बंगल्यात एक वृद्ध स्त्री घरात एकटीच असताना बंगल्याचे खिडकीचे ग्रील तोडून तीन दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी एका दरोडेखोराने त्याच रात्री १.२५ वाजता या बंगल्यात रेकी करून गेल्याचे सीसी कॅमेरात दिसत आहे. दरोडेखोरांचा हातात कोयते व इतर हत्यारे होती. बंगल्यात कोणीतरी असल्याचे व सदर वृद्ध स्त्री जागी झाल्याचे समजताच त्या तीन दरोडेखोरांनी भागो बोलत पलायन केले. यानंतर त्या वृद्ध स्त्रीने शेजारी राहणाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता त्यानी मदतीसाठी प्रत्यक्ष येऊन पोलिसांना कळविले. काहीवेळातच मानपाडा पोलीस घटनास्थळी येऊन त्यानी चौकशी करून दरोडेखोरांना पकडण्यासाठी एक पथक रवाना केले. परंतु दरोडेखोर तोपर्यंत पसार झाल्याने मानपाडा पोलीस या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सीसी कॅमेराद्वारे त्यांचा तपास करीत आहेत. यापूर्वीही मिलापनगर परिसरात अशा घरफोड्या झाल्या असल्याने येथील रहिवाशांत घबराट पसरली असून रात्री/पहाटे पोलीस गस्ती वाढवावी आणि या दरोडेखोरांना जेरबंद करावे अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेलफेअर असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली. महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अति.आयुक्त हर्षल गायकवाड, अति.शहर अभियंता (विदयुत/यांत्रिकी)  प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास महापौर हर्षाली चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवलीतही राज्यगीताचे गायन करुन महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास आणि मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास उपमहापौर राहुल दामले यांनी पुष्पहार अभिवादन केले. यावेळी उपस्थित उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर, भारत पवार, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्र.६८, धाकटे शहाड येथील शाळा क्र.३३ व उंबर्डे येथील शाळा क्र.१२  मधील चिमुकल्या विदयार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू ६ विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्हाने गौरवणार; ४ एप्रिल रोजी पुण्यात वितरण पुणे : उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या…

एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा

एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा मुंबई / रमेश औताडे जग जसे वेगाने बदलत आहे तसेच एल आय सी ने पण बदलत कात टाकली असून सामान्य ग्राहकाला अजून मोठ्या प्रमाणात जोडता येण्यासाठी रोज १०० रुपये बचत योजना जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या निधीत गुंतवणूक करण्यासाठी दैनंदिन गुंतवणूक रु. १००, मासिक गुंतवणूक रु. २०० आणि तिमाही गुंतवणूक रु. १,००० ने करता येईल.  किमान रक्कम रु. १,००० आहे. हा निधी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा केंद्र, डिजिटल व्यासपीठ आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी होईल आणि ६ मार्च २०२६ रोजी संपेल. नंतर लोक या निधीत पैसे जमा किंवा काढू शकतात. व्यवस्थापक कारण दोशी आणि जयप्रकाश तोष्णीवाल आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा म्हणाले की सरकारने सेमीकंडक्टर आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा गुंतवणूकचा संकल्प केला आहे. मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील म्हणाले की या निधीत अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात ज्या सतत वाढत राहतात, चांगला नफा करतात.

तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामाविरुद्ध तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त…

 जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद

जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद नगरसेविका नम्रता कोळी यांचे आयोजन ठाणे : टेंभीनाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या पारशी बांधवांच्या अगियारी कंपाऊंडमध्ये आयोजित केलेल्या जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले होते. पारशी समुदाय वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहत आहे. या समाजातील नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष जन आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड व ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. त्यात ७० वर्षांवरील ९० स्त्री-पुरुष नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून देण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी १०८ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या नागरिकांना लवकरच कार्डचे वाटप केले जाईल, असे नम्रता कोळी यांनी सांगितले. या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नगरसेविका नम्रता कोळी व जयेंद्र कोळी यांनी आभार मानले आहेत.

 मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ महाअंतिम फेरीत एसएसटीची दमदार भरारी

मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ महाअंतिम फेरीत एसएसटीची दमदार भरारी पोवाडा गायनात तृतीय क्रमांक कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या जीवन शिक्षण आणि विस्तार  विभागातर्फे आयोजित ‘उडान’ मेगा फायनल राऊंडमध्ये एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने पोवाडा गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने पार पडलेल्या ‘शिव शौर्यगाथा’ पोवाडा गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी आणि दमदार सादरीकरणाची उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेतली. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद करांदे, डीएलएलई संचालक डॉ. बळीराम गायकवाड, प्रा. डॉ. कुणाल जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम गायक नंदेश उमप यांची उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी सहाय्यक डीएलएलइचे फिल्ड कॉर्डिनेटर प्रा. दिलीप आहुजा, प्रा.सुदर्शन पाटील, सदान जावरे यांनी मार्गदर्शन केले.

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे, मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय – आनंद परांजपे

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे, मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय – आनंद परांजपे मुंबई दि. १९ फेब्रुवारी – आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. शरदचंद्र पवार गटाकडून वारंवार विलिनीकरणाची वक्तव्य येत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या ‘माझा दादा गेला’ त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या आता गौण आहेत असे बोलत आहेत तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे हे पडद्याआडून सातत्याने विलिनीकरणाचा मुद्दा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणारे वातावरण करत आहेत असाही थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला. आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दूर्देवी मृत्यू झाला याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. विमान अपघातासाठी जबाबदार असलेली व्हीएसआर कंपनी असेल, पायलट किंवा ट्रॅक रेकॉर्ड असेल या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले. केंद्रीय उड्डाणमंत्री के रामा नायडू व मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे चौकशी सुरू केली असून ब्लॅक बॉक्सचा डाटा रिकव्हर होणारच. सुप्रिया सुळे यांनी  ब्लॅकबॉक्सचा डेटा जात नाही तो रिकव्हर होतो असे वक्तव्य पुण्यात केले आहे. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लॅकबॉक्स आगीत न जळता तो राजकीय आगीत गेला अशाप्रकारे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले याबद्दलही नाराजी आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. खासदार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत. पण राजकारणातील तांत्रिक बाबी त्यांना कळत नसाव्यात. त्यांनी एबी फॉर्मचा मुद्दा उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती असेल किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत या दोन ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे काही उमेदवार हे आमचा एबी फॉर्म घेऊन लढले. एबी फॉर्ममध्ये दोन भाग असतात. ‘ए’ फॉर्ममध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी तीन लोकांना त्यामध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार संजय खोडके यांच्याकडे अमरावती व नागपूर विभाग आणि माझ्याकडे कोकण आणि मराठवाडा विभाग याठिकाणी फॉर्म ‘बी’ वर सही करण्याची जबाबदारी दिली होती. आमच्या सहीचा बी फॉर्म उमेदवाराला दिला जातो. जेणेकरून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ दिले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. खरंतर अमोल कोल्हे यांनी आम्हाला विचारण्याऐवजी त्यांनी स्वतः चे आमदार बापू पठारे यांना त्यांची दोन्ही मुले पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजप तिकीटावर लढले त्यांना विचारले पाहिजे. मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार हे शिवसेना उबाठाची मशाल घेऊन लढलेले आहेत. मग उबाठा गटात शरद पवार गटाचे विलिनीकरण झाले आहे असे म्हणायचे का असा सवाल करत आनंद परांजपे यांनी अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत मात्र त्यांना राजकारणातील तांत्रिक बाबी कळत नाहीत असा टोला लगावला. विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही. सध्या आमच्यासमोर आमचं दैवत गेल्यानंतर आमची मायमाऊली राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि ताकदीने त्यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणे आणि दादांचे जे व्हिजन होते त्या व्हिजनवर आमचे आमदार महायुतीमध्ये काम करतील ही प्राथमिकता आहे. त्यामुळे कायम पडद्यामागून एक एक वक्तव्य करून राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करु नये असा मोलाचा सल्ला आनंद परांजपे यांनी शरद पवार गटाला दिला आहे.