Author: bittambatami.com

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन       मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरान : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ माथेरान मधील समस्त महिला वर्गाला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतला असून ह्या महत्वपूर्ण कार्यास येथे सोमवार दि.७ पासून…

मुख्यमंत्री असणाऱ्या भावाकडे आपल्या मागण्या घेऊन आलेल्या आझाद मैदानातील बहिणींची भर पावसात झालेली अवस्था

माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई : मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार नित्याचा झाला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना प्रवास करताना दररोज विलंब होत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या धीम्या रेल्वे मार्गाच्या रुळाला शुक्रवारी दुपारी १.०५ वाजेच्या सुमारास तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल सेवा खोळंबली. या घटनेमुळे लोकलचा वेग मंदावला. संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, लोकल भायखळ्यावरून जलद डाऊन दिशेने वळवण्यात आल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर, माटुंगा येथे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी १.३९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र यामुळे धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे लोकल उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प वादात

घोडबंदरवासियांचा प्रकल्पास विरोध     ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचा निर्णय घेऊन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. परंतु या प्रकल्पामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त करत घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. तसेच सेवा रस्त्याखाली असलेल्या मल, जल, विद्युत आणि महानगर गॅसच्या सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याऐवजी त्यावरच गटारांची उभारणी करण्यात येत असल्याचा दावा करत कोणत्याही नियोजनाविनाच सुरु असलेला या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा, असा सुर रहिवाशांनी लावला आहे. यामुळे हा प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहेत. घोडबंदर मार्गावरून गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गावरूनच वाहतूक करतात. या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असून यामुळे येथेही कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी घोडबंदर मार्गाचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडून चार-चार अशा एकूण आठ मार्गिकांचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही महिन्यांपुर्वी घेतला. या निर्णयानुसार प्राधिकरणाने कंत्राटदार नेमून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. यासाठी घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाघबीळ पासून ते आनंदनगरपर्यंतच्या सेवा रस्त्यावर गटार बांधणीची कामे करण्यात येत आहेत. या कामामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याचबरोबर या गटारांच्या स्लॅबवर वाहने उभी केली जात आहेत. असे असतानाच, घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध करत त्यास स्थगिती देण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात कावेसर येथील ललानी रेसीडेन्सी संकुलातील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. यापूर्वी उबाठाचे ओवळा-माजिवडा विधान सभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ आता नागरिकांनी हा प्रकल्प नकोच असा सुर लावला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादात साडण्याची चिन्हे आहेत. नागरिकांचे काय म्हणतात.. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबविण्यापुर्वी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात आलेले नसून त्याचबरोबर कोणत्याही नियोजनाविनाच हा प्रकल्प राबविला जात आहे. सेवा रस्त्यांवर यापुर्वी विद्युत, मल, जल आणि महानगर गॅसच्या वाहिन्या गेल्या आहेत. सेवा रस्त्यावर गटारांची बांधणी करताना या वाहिन्या स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यावर गटारांची उभारणी केली आहे. यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याबरोबर जल वाहीनीत सांडपाणी जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच मुख्य आणि सेवा रस्ता जोडल्यास अवजड वाहनांना प्रवास वेगाने होईल आणि यामुळे संकुलातून बाहेर पडताना अपघात होतील. त्यामुळे प्रकल्पास आमचा विरोध असून शासनाने या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे ललानी रेसीडेन्सी संकुलाचे अध्यक्ष रामास्वामी यांनी सांगितले. तर, सेवा रस्त्यालगत आमच्यासारखी अनेक गृहसंकुले आहेत. या संकुलाचे प्रवेशद्वार सेवा रस्त्यावर आहेत. या संकुलांमध्ये शेकडो नागरिक राहतात. तसेच या भागात अनेक शाळाही आहेत. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडले तर, अवजड वाहतूकीमुळे अपघात होतील. त्यामुळे या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, असे संकुलातील रहिवाशी वर्षा मुडीया आणि अरुंधती वाधवा यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार महामार्गालगतच्या गृहसंकुलांसमोर सेवा रस्ता बंधनकारक आहे. हा नियम सरळसरळ पायदळी तुडविला जात आहे. तसेच या प्रकल्पात अनेक झाडेही बाधित होणार असून यामुळे पर्यावरणाही बिघडणार आहे. या कामाबाबत पालिका अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही. या प्रकल्पामुळे अपघातांची भिती आहे. त्यामुळे शासनाने याप्रकल्पाबाबत पुनर्विचार करावा, अशी आमची मागणी आहे, असे संकुलातील रहिवाशी प्रविण सिंग यांनी सांगितले. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत. त्यासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामामध्ये तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी केवळ ५४९ वृक्षांचे पुर्नरोपण होणार आहे. उर्वरित १ हजार ६४७ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे महापालिकेला दिला असून या प्रस्तावामुळे घोडबंदर मार्गावरील हरित पट्टा कमी होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वादात सापडला असतानाच, स्थानिक रहिवाशांनी हा प्रकल्प नकोच असा सुर लावल्याचे चित्र आहे. 00000

लोकशाहीविरोधी ‘जनसुरक्षा विधेयक’ मागे घ्या – उदय नारकर

अनिल ठाणेकर       ठाणे : महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ‘जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक सादर केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महायुती सरकारचा तीव्र निषेध करत असून लोकशाही हक्क पायदळी तुडवणारे, लोकशाहीवरोधी हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटी सचिव उदय नारकर यांनी केली आहे. जनतेने निवडून दिलेल्या सभागृहात कसलीही चर्चा न करता सत्राच्या अखेरीस हे विधेयक मांडून भीतीतून आलेल्या उर्मटपणाचे दर्शन सत्ताधारी महायुतीने घडवले आहे. ज्या गोष्टीचा राज्याच्या सुरक्षेला धोका आहे, त्याची चर्चा होऊ नये, यामागील नेमके गौडबंगाल काय आहे? त्यातून सरकारचे पितळ उघडे पडेल, अशी भीती वाटल्यानेच सरकारी पक्षाला कारस्थानी पद्धतीने हा कायदा करायचा आहे. वस्तुतः ‘शहरी नक्षलवाद ‘ हा अस्तित्वात नसलेला बागुलबुवा दाखवत विरोधकांना दडपण्याची तयारी सरकारने चालवली आहे. राजकीय विचारसरणीसाठी कुणी हिंसा करत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वातील कायदे पुरेसे आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या कुणी केल्या हे सर्वश्रुत आहे. हिंसक सनातन संस्थेच्या ‘बाधकां’च्या मुसक्या आवळण्याऐवजी राज्य सरकार बंब सोमेश्वरी पाठवत आहे. मोदी-शहा-योगी यांनी गेली काही वर्षे केलेल्या हुकूमशाहीच्या नंगानाचाबद्दल परवाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना सणसणीत चपराक  दिली आहे. हे नवे हुकूमशाही विधेयक आणणाऱ्याना सुद्धा जनता तसाच प्रसाद देईल यात तिळमात्र शंका नाही. यूएपीए या राक्षसी केंद्रीय कायद्याखाली भीमा कोरेगावचा धादांत खोटा खटला निरपराध व्यक्तींवर भरण्यात मोदी-शहा दुकलीसोबत तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता हे जगजाहीर आहे. या खटल्यात अनेक विचारवंत व मानवाधिकार कार्यकर्त्यांची तीन ते पाच वर्षे तुरुंगात सडून बरबाद झाली आहेत. काही जणांना कोर्टाने जामीन दिला असला तरी त्यापैकी काही जण अजूनही तुरुंगातच आहेत. ८४ वर्षे वयाचे फादर स्टान स्वामी यांचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. अजूनही काही बाबतीत आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेले नाही. हे सर्व असूनही भाजप आणि रा.स्व.संघाचे अजूनही समाधान झालेले दिसत नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे सत्ताधारी त्रिकूट हे नवे  विधेयक आणून आणखी अनेक निरपराध जणांचे जीवन बरबाद करण्याच्या मागे लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पायाखालची वाळू सरकल्याने भयभीत झालेले महायुतीचे सरकार शेवटचे आचके देऊ लागले आहे, हेच    या निर्णयातून दिसून येते. ईडी, सीबीआय, आयटी सारख्या राक्षसी यंत्रणांच्या गैरवापराबद्दल मराठी जनतेने भाजप व त्याच्या मित्रपक्षांना परवाच्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. ती जनता फडणविसांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या शेंदाडशिपायांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्याहून जास्त विदारक दणका देईल, हे निश्चित. मराठी जनतेने महायुती सरकारची ही सुलतानी बिलकुल खपवून घेता कामा नये. या विधेयकाला महाराष्ट्रातील सर्व लोकशाहीवादी पक्ष-संघटनांनी, विशेषतः महाविकास आघाडीने व त्यातील तिन्ही मुख्य घटक पक्षांनी कडाडून विरोध जाहीर करावा, आणि त्याविरुद्ध महाराष्ट्रभर प्रभावी मोहीम उभारावी, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे. 00000

पंढरपुरी वारीत सह्याद्री मानव सेवा मंच अंतर्गत डॉ.राजेश मढवीकडून माऊलींचे सेवाकार्य….

माऊलीच्या चरणी सेवा योग!   मुंबई : महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरिचा वास! चंद्रभागे स्नान! आणिक दर्शन विठोबाचे! या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत;अशी भागवत संप्रदयाची धारणा आहे. अशा या पंढरपुर वारीत यंदा ४० व्या वर्षात डॉ.विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा देतात. सालाबादप्रमाणे यंदाही  डॉ.राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने डॉ.राजेश मढवी यांनी आपल्या चमूसह नातेपुते येथिल आरोग्य शिबीरात माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबीरात हजाराच्यावर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप,अतिसार,उच्च रक्तदाब,जुलाब, अशा विविध आजारांवर औषधोपचार, सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे,पाय दुखी साठी तेलवगैरेने मसाज अशा सेवा देण्यात आल्या.यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉ.विश्वास सापटणेकर डॉ. राजेश मढवी,डॉ. बेके,डॉ. राव, डॉ. बापट, ज्योती हर्डीकर,रवींद्र कराडकर, विनय नाफडे,निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते. ००००

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेत  नागरिकांनी सहभागी व्हावे -सौरभ राव

ठाणे, ’ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक,…

जुनी रद्दी विक्रीसाठी इच्छुक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात – सचिन विधाते

अशोक गायकवाड     रायगड : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या कार्यालयातील जुने कालबाह्य झालेले अभिलेखे निर्लेखित काढण्याच्या दृष्टीने रद्दी म्हणून विक्रीस काढण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खरेदीदारांकडून दि.१० जुलै ते दि.२२ जुलै २०२४ (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) या कालावधीमध्ये निविदा मागविण्यात येत असून पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल सचिन विधाते यांनी केले आहे. मागविण्यात आलेल्या निविदा दि. २३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनेवल, केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल येथे उघडण्यात येतील. निविदेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- शॉप अॅक्ट लायसन्स (अधिकृत व नोंदणीकृत खरेदीदार असल्याचे प्रमाणपत्र), टिन नंबर व जी.एस.टी. भरल्याबाबत रिटर्न, पॅनकार्ड, निविदाधारक हा सरकारमान्य प्रमाणपत्र धारक, अधिकृत रद्दीचा विक्रेता पाहिजे, पेपर मिलचे प्रमाणपत्र (व्यवसाय प्रमाणपत्र), अनामत रक्कम रूपये १० हजार या राष्ट्रीय बँकेचा डी.डी. (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल आरटीओ पनवेल (RTO PANVEL) यांचे नावे, दरपत्रक सादर करताना ते प्रति किलो मध्ये सादर करावेत, बंधपत्र रूपये १००/- (ज्यांचे टेंडर मंजूर करण्यात येईल त्याचे आवश्यक नियमाबाबतचे बंधपत्र लागेल), पेपरमील मालक/व्यवस्थापक हे रद्दी विकत घेत असतील तर पेपरमील त्यांच्या मालकीची आहे. याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच पेपरमील मालक व्यवस्थापक यांना आपण रद्दी पुरवठा करताना याबाबतचा संबंधीत पेपरमीलचा दाखला आणणे आवश्यक आहे,. प्राप्त झालेल्या निविदा मान्य करण्याचे वा रद्द करण्याचे सर्व अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी राखून ठेवले आहेत, मागविण्यात आलेल्या निविदा या आधीच्या अटी व शर्तीची पूर्तता करीत नसल्यामुळे रद्द समजण्यात याव्यात. दि.२२ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत कार्यालयास प्राप्त झालेल्या निविदांचाच विचार करण्यात येईल. त्यानंतर उशिराने प्राप्त होणाऱ्या निविदांचा कोणताही विचार केला जाणार नाही. निविदा दि.२३ जुलै २०२४ रोजी रोजी, दुपारी ३.०० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचे कक्षात उपस्थित निविदाधारकां समक्ष उघडण्यात येतील. दरपत्रक निविदा सादर करण्याचा पत्ता :-प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल. केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला, लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल. 00000

 जिल्हा रुग्णालयात “जागतिक लोकसंख्या दिन” साजरा

कुटुंब नियोजनाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे-डॉ.अंबादास देवमाने  अशोक गायकवाड     रायगड :अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यामतून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत, त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने,यांनी सांगितले. कुटुंब नियोजन पद्धतीचा तसेच विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करून जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ११ जुलै हा दिवस “जागतिक लोकसंख्या दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीम. रेश्मा संकपाळ, वैद्यकीय पर्यवेक्षक राजेंद्र भिसे, अधिसेविका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिसेविका श्रीम.अनिता भोपी, पी.एच.एन. नंदिनी चव्हाण, परिसेविका श्रीम.उषा वावरे, श्रीम.मोकल, सुविधा दवटे आदि उपस्थित होते.जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यामतून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत, त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले. संयुक्त राष्ट्र संघाने १९८९ साली जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. व पहिला लोकसंख्या दिन ११ जुलै १९९० रोजी साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने सूचित केल्यानुसार नियोजित उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असून २७ जून ते १० जुलै या दरम्यान “दांम्पत्य संपर्क पंधरवडा” साजरा करण्यात आला व ११ जुलै ते २४ जुलै दरम्यान “लोकसंख्या स्थिरता पंधरवडा” साजरा करण्यात येणार असल्याबाबत प्रास्ताविक करताना निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे यांनी सांगितले. तर प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन यांनी २०२४ च्या लोकसंख्या दिनाचे शीर्षक (थीम) “माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा” व घोषवाक्य “ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दांपत्याची” हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. तसेच अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे या करिता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी अलिबाग शहरामध्ये जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले तर समारोप प्रसंगी श्रीम.सारिखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनीनी पथनाट्यातून जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केल तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधिका गावंड, काजल भोईर, कांचन खारकर, मयूर हांडे व निलेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. 00000