Author: bittambatami.com

डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा

 ह प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी     डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील शेवंता हाईट्स या बेकायदा इमारतीवर पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी कारवाई केली. सहा वर्षापूर्वी ही बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली होती. ही इमारत पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत घोषित केली होती. ही बेकायदा इमारत मयत शेवंताबाई जोशी यांच्या नावाने होती. शेवंताबाई यांचे वारस विजय दत्तू जोशी, वंदना प्रकाश जोशी, अरूण दत्तू जोशी आणि विकासक प्रमोद अरूण देसाई, राहुल अरूण मैद यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता ही बेकायदा इमारत उभारली होती. या इमारती विषयी पालिकेत अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांनी ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित केली होती, पण या इमारतीवर तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नव्हती. विद्यमान साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त घेऊन ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. या इमारतीचे पहिले खांब, भिंती तोडण्यात आल्या. नंतर पोकलेन लावून ही इमारत भुर्ईसपाट केली जाईल, असे ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले.ही इमारत पुन्हा बेकायदा पध्दतीने उभारण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला तर त्यांच्या एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सावंत यांनी दिला. ह प्रभागातील बेकायदा बांधकामे ह प्रभागातील बेकायदा म्हणून घोषित केलेल्या जुन्या डोंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांची फशी हाईट्स, गटार तोडून उभारलेली बेकायदा इमारत, उमेशनगर जवळील राहुलनगर मधील सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड, कोपर येथील सखारामनगर काॅम्पलेक्स जवळील रस्त्यात उभारलेली बेकायदा इमारत, कोपरमध्ये बीएमपी गृहसंकुल भागात उभारलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीतील शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, गरीबाचापाडा श्रीधर म्हात्रे चौकातील क्रीडांगण आरक्षणावरील वसंत हेरिटज इमारत, चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील भागातील बेकायदा इमारतीचा पाया, कोपर रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्याचा खुराडा, खंडोबा मंदिराजवळील बेकायदा इमारत. तसेच, देवीचापाडा खाडी किनारी सुरू असलेल्या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी सुरू करावी, अशी मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. 00000

अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या!

जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन     अंबरनाथः अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणारे पिण्यायोग्य पाणी गेल्या दिवसांपासून गढूळ येत असून त्यामुळे नागरिकांनी पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना गढूळ पाण्याबाबत तक्रार करण्याचे आवाहनही प्राधिकरण्याच्या वतीने करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरातील मोठा भाग आणि संपूर्ण बदलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरणाच्या वतीने बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीतून बॅरेज बंधाराय येथे पाणी उचलले जाते. प्राधिकरणाच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात यावर प्रक्रिया करून ते विविध जलकुंभांच्या माध्यमातून वितरीत केले जाते. पावसाळा सुरू होताच नदीत गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी प्रक्रिया केल्यानंतरही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होता. गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. गळक्या जलवाहिन्या शोधा नागरिकांनी आपल्या पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळजोडणी गटार भागातून जात नसल्याची खात्री करावी. तसे आढळल्यास ही जलवाहिनी गटारीतून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. तसेच त्यावर गळती होत नसल्याची खात्री करावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. सोबतच बहुमजली इमारतीतील ग्राहकांनी पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता करावी, असेही आवाहन प्राधिकरणाने केले आहे. इथे नोंदवा तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवर गळती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. अंबरनाथ (पूर्व / पश्चिम) :- ९२२०६०६८५४, ९८६०३२४२३६. तर बदलापूर पूर्व ९८६९७८६१५१, पश्चिम ८९८३२८०२३२ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक तक्रार नोंदवू शकतात.

डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार

वाणगाव : डहाणूतील शेतकरी हा आधुनिक विचारसरणीचा असल्याने शेतात पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीचा परिस्थितीनुसार बदल होत असतो. यंदाही तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने, तर ५० हेक्टरवर एसआरटी पद्धतीने भातलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार आहे. भातशेती हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. डहाणू तालुक्याचे एकूण ९८,५३७.३८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यातील १५,७४३.६० हेक्टरवर भातलागवड आणि २३४.७५ हेक्टरवर नागलीचे पीक घेतले जाते. यंदा तालुक्यात ५० हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने आणि ५० हेक्टर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भातलागवड होणार आहे. डहाणूतील नरेशवाडी येथेही २० एकर क्षेत्रावर यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात येणार आहे. नरेशवाडी, डेहणेपळे, रानशेत, रणकोळ, ऐना, वाघाडी या भागांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. तालुक्यातील सर्व कृषी सहायकांनी आपापल्या सजेतील शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून आधुनिक लागवड पद्धतीचा अवलंब करत आहेत, असे डहाणूचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. नरेशवाडी संस्थेने नुकतेच नवीन भात लागवड यंत्र खरेदी केले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही यंत्राद्वारे लागवड करावी. यासाठी ते यंत्रांचे कमीत कमी भाडे आकारून लागवडीस प्रोत्साहन देणार आहेत. ट्रे तयार करण्याची पद्धती रोपे ट्रे किंवा प्लास्टिक कागदावर चौकट करता येतात. पेरणीच्या सुरुवातीला माती व शेणाचे ७०:३०चे प्रमाण ठेवून ट्रे भरावे. एकरी फक्त आठ किलो बियाणे लागते. पारंपरिक पद्धतीपेक्षा साधारणत: दहा ते बारा किलो बियाण्याची बचत होते. एका ट्रे मध्ये ८० ग्रॅम बियाणे पेरले जाते. एकरीसाठी १०० ट्रे लागवडीसाठी लागतात. रोपवाटिका तयार करताना सर्वप्रथम ६० ते ७० टक्के ट्रे मातीने भरून घ्यावे. त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मिसळून त्यावर एकसमान बियाणे पसरवावे. खरीप हंगामात कृषी विभाग डहाणू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. भातपिकाचे विविध प्रात्यक्षिके, एसआरटी, यंत्राद्वारे भातलागवड, चारसूत्री लागवड पद्धत, ⁠भात व नाचणी पिकासाठी शेतीशाळा, ⁠एक रुपयात पीकविमा, लागवडीनंतर त्यावर येणाऱ्या कीडरोगाबाबत माहिती, क्रॉपसॅपअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मदत करणे आदी कामे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. भात प्रमुख पीक असल्याने त्याचे लागवड क्षेत्र कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहेत.

पदपथांना फेरीवाल्यांचा वेढा, बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची कसरत

मुंबई : कायम वर्दळ असलेल्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका प्रशासन अधूनमधून संबंधित फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र, पदपथांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात पालिका पूर्ण अपयशी ठरली आहे. रस्त्यांवर पसरलेल्या पथाऱ्यांमुळे पादचारी, प्रवाशांना अडथळा ठरत आहेत. बोरिवली पोलीस ठाण्याच्या आसपासच्या परिसरातही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. तसेच, सातत्याने फेरीवाल्यांची संख्या वाढत असून ही समस्या सोडविण्यात यंत्रणा उदासीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एस. व्ही. मार्ग, जांभळी गल्ली आणि आसपासच्या परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांना फेरीवाल्यांचे अडथळे पार करून स्थानक गाठावे लागत आहे. गरोदर स्त्रिया, वृद्ध, अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांच्या समस्येमुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच, यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित ठिकाणच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल होताच काही वेळ रस्ते मोकळे होतात. मात्र, पथक निघून गेल्यानंतर काही वेळात फेरीवाले पुन्हा पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करतात. अनधिकृत फेरीवाल्यांना आता पालिकेप्रमाणेच पोलिसांचीही भीती राहिलेली नाही. बोरिवली स्थानकाबाहेरील पोलीस ठाण्याला लागूनच अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरले आहेत. पादचारी आणि फेरीवाल्यांमध्ये अनेक वेळा वाद होतात. फेरीवाले अर्वाच्च भाषेत पादचाऱ्यांना शिवीगाळ करतात. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही ही समस्या जैसे थे आहे. न्यायालयाने रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. मात्र, बोरिवलीसह विलेपार्ले येथील तेजपाल नगर, मोंघीबाई मार्ग, मालाडमधील आनंद मार्ग, अंधेरीतील एम. ए मार्ग, स्टेशन रोड, एस. बी मार्ग आदी भागात फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. विलेपार्ले स्थानकाबाहेरील रस्त्यांवर थेट अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. दादरमधील सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग, एन. सी केळकर मार्ग, छबिलदास मार्गावरही फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. वांद्रे येथील हिल रोड आणि आसपासच्या परिसरातही अशीच स्थिती आहे. गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आदी परिसरातही फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ‘केवळ विचारमंथन नको’ उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मुंबई पालिकेला अनेकदा खडसावले आहे. मात्र, मुंबईतील पदपथ अद्यापही फेरीवाल्यांच्या कचाट्यातून मोकळे झालेले नाहीत.काही पदपथ अनधिकृत बांधकामांनी गिळंकृत केलेले आहेत. तर, अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथांवर ठाण मांडले आहे. नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच, न्यायालयाने अतिक्रमणाची समस्या सोडवण्याबाबत विचारमंथन करण्यात वेळ खर्ची घालण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. 0000

‘आयडॉल’चे प्रवेशसाठी विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येणाऱ्या पदवीस्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना https:// mu. ac. in/ distance- open- learning या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘आयडॉल’मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. गतवर्षी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’च्या चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी या विभागीय केंद्रांवर प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. तसेच, पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे. ‘ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश घ्यावा’, असे आवाहन ‘आयडॉल’चे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी केले आहे. प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), बी.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. , एम. ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, जनसंपर्क), एम. ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम. कॉम. , एमएमएस, एम.एस. सी. , एम. एस. सी. (संगणकशास्त्र), एमसीए व प्रथम व द्वितीय वर्ष एमएमएस आणि एमसीए प्रथम व द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू होतील. ०००००

घनकचरा विभागाने सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईत

1 क्व‍िंटलहून अधिक प्लॅस्टिक जप्त     ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 38 हजार 450 रु. इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या पथकाने केली. सदर कारवाईअंतर्गत विविध प्रभागसमितीतील दुकाने व आस्थापना यांचेकडून सिंगल युज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण रु. 9 हजार रु. दंड, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार 500 रुपये दंड,  दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 3 हजार 500 रु दंड, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 09 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार रु. दंड, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, लोकमान्य सावरकर प्रभागसमिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 5 हजार 700 रु. दंड, वागळे प्रभाग समिती क्षेत्रातून 13 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार 250 रु. दंड, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 2 हजार 500 रु.दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या 9 प्रभागसमिती क्षेत्रातून एकूण 38 हजार 450 रु. दंड वसूल करण्यात आला असल्याची मा‍हिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सिंगल यूज प्लॅस्टिकबाबतची कारवाई ही  नियमित सुरू राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा व दुकानदारांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकची विक्री करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 0000

माथेरानमध्ये स्वच्छ पाणी व तलाव स्वच्छतेसाठी उपोषण

माथेरान : माथेरानमधील श्री राम मंदिर समोर निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून येथील शार्लोट लेकच्या स्वच्छतेसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून, गेले १० वर्ष पेक्षा अधिक काळ होऊन ही माथेरान मधील पिण्याचा पाण्याचा लेक साफ केला गेला नसून त्यामुळे येथे पावसाळ्यातील दिवसांमध्ये रोगराई वाढत आहे तर अशुद्ध पाण्याचा पुरवठा ही होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने माथेरान नगरपालिकेला अगोदर निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वछ करावा अशी मागणी केली होती व जून 25 पर्यंत स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता परंतु ह्या कालावधी मध्ये काम सुरू न झाल्याने आजपासून संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष कदम हे आमरण उपोषणास बसले आहेत. शार्लेट हा माथेरान नगरपालिकेच्या मालकीचा असून अमृत 2 या कार्यक्रमांतर्गत माथेरान नगर परिषदेकडून माथेरान शार्लेट तलाव सुशोभी करण्याकरता 4:99.82 लक्ष इतके अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते,अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ पनवेल कार्यालयाकडून त्यास 6/2/2023 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती सदर अंदाज पत्रक तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करून टाकने तसेच सदर तलावातील गेट व ब्रिज बाजूची दुरुस्तीकरितांची तरतूद होती त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्याचप्रमाणे माथेरान नगर परिषदेस राज्य शासनाने राज्यसरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माथेरान येथील शार्लेट तलावास पर्यावरण दृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी 7/ 3/ 2007 रोजीच्या शासन निर्णय नुसार362:65लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिशापोटी रुपये 326:38लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मंजूर रकमेपैकी 200 लक्ष इतका निधी आतापर्यंत वितरीत केला असून माथेरान नगर परिषदेच्या 2/3/ 2023 रोजीच्या पत्रानुसार उर्वरित कामे करण्यासाठी 100 लक्ष इतका निधी नगर परिषदेस उपलब्ध करून दिला असल्याने 27/03/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आले आहे.परंतु ह्या निधीचा वापर लेक च्या स्वच्छते व सुशोभीकरणासाठी न होता इतरत्र वापरला गेला का की ह्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे असे उपोषण ठिकाणी चर्चा सुरू होती. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने वारंवार तलाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनविरोधात दंड थोपटले असून ,माथेरान येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना गडूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा तलाव तातडीने स्वच्छ व्हावा ह्याकरता उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यास माथेरान मधील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी संघटनेचे योगेश शिंदे,अविनाश गोरे,सीमा कदम,जगदीश कदम,विजय सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते. 000000

 महाराष्ट्राला दारूबंदी नव्हे तर दारू नीतीची गरज

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन     मुंबई : दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दारूबंदी नव्हे, तर दारू नितीची गरज आहे. दारूबंदीमुळे मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, पण ते शून्य होणार नाही. त्यासाठी दारू नीतीची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. यशवंतराव चव्हाण केंद्र, प्रथम आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे माजी सनदी अधिकारी व यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस शरद काळे यांच्या प्रथम स्मृतीप्रितर्थ्य मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दारू नीतीची अंमलबजावणी करून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण गडचिरोलीत ६८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोलीत राबवण्यात येत असलेला ‘मुक्तिपथ’ हा महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले, ‘प्रथम’च्या संचालिका फरीदा लांबे, शरद काळे यांच्या पत्नी सुनीती काळे, त्यांच्या कन्या डॉ. सुचित्रा काळे-दळवी, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्ष प्रा. विस्पी बालापोरिया, यशवंतराव चव्हाण केंद्राचे विश्वस्त अजित निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले उपस्थित होते. 00000

आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास

ठाणे : आईला भेटण्यासाठी सातासमुद्रापार असलेल्या लेकानं तब्बल १६ देशांचा अनोखा प्रवास केला आहे. विराजित मुंगळे असं या मुलाचं नाव असून त्यांनी लंडन ते मुंबई असा कारने प्रवास केला. विराजित यांना या प्रवासासाठी ५९ दिवस लागले. या काळात जवळपास १८ हजार किलोमीटरचा रस्त्याने प्रवास केला. १६ देशांमधून सुरु झालेला हा प्रवास ठाण्यात येऊन थांबला आहे. विराजित मुंगळे हे एक ब्रिटीश भारतीय आहेत. त्यांनी आईला सरप्राईज देण्यासाठी लंडनहून बाय कारने मुंबई गाठली. विराजित हे फ्लाईटनेही येऊ शकले असते परंतु एक थरारक अनुभव घ्यायची इच्छा असल्याने त्यांनी हा कारने मुंबईत यायचे ठरवले. विराजित यांनी लंडनहून ठाणे यात १८३०० किमी प्रवास कारने केला. या प्रवासात १६ देश, ज्यात जर्मनी, रशिया आणि चीनचाही समावेश आहे. प्रत्येक देशात त्यांनी जेवणाचा, राहण्याचा अनुभव घेतला. विराजित ऐतिहासिक सिल्क रोडशी प्रेरित आहेत. त्यामुळे अशीच रोड ट्रिप करण्याची त्यांची इच्छा होती. या रस्ते प्रवासात विराजित यांनी दिवसाला ४०० ते ६०० किमी अंतर दिवसाला कापले. त्यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीचा प्रवास करणेही टाळले. मात्र इतका मोठा प्रवास करून घरी पोहचताच आईचा ओरडाही विराजित यांना ऐकावा लागला. इतक्या देशातून प्रवास करण्यासाठी विराजित यांनी आधीच सर्व परवानग्या घेऊन ठेवल्या होत्या. सोबतच ट्रिपसाठी ऑफिसहून २ महिन्याची सुट्टीही घेतली परंतु हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. रस्त्यात अनेक ठिकाणी उंच पर्वत, कमी ऑक्सिजन यामुळे त्यांना आजारपणाचाही सामना करावा लागला. ५२०० मीटर उंच आणि खराब वातावरणामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले. त्यानंतर ठाण्यात पोहचून विराजित हे त्यांच्या आईला भेटले. आता ठाण्याहून पुन्हा लंडनाला जाण्यासाठी ते लाँग ड्राईव्ह करत जाणार नाही. आता ते त्यांची चारचाकी लंडनला शिपमधून पाठवतील आणि स्वत: विमानाने लंडनला जाणार आहेत.

ट्रेकिंगला येणाऱ्या पर्यटकांना अनुभव नसल्याने अपघातांमध्ये वाढ

माथेरान : पावसाळा म्हणजे तरुणाईला साद घालणारा निसर्ग, अनेक जण पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असाल व पावसाला सुरुवात होताच वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता कोणतीही माहिती न घेता थेट पोहोचत असतात परंतु या हौशी पर्यटकांना माहिती अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पहिल्याच पावसामध्ये अशा अनेक अपघाती घटना घडल्याने हा प्रश्न आता खंबीर स्वरूप धारण करीत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा भेद करत असाल तर त्या ठिकाणचे सर्व माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्याकरिता माथेरान मध्ये माथेरान पोलिसांनी एक मोहीम सुरू केली असून केव्हाही कुठे माथेरान परिसरात गरज असल्यास पोलीस खाते तत्पर असणार असल्याचे येथील एपीआय अनिल सोनोने यांनी सांगितले. माथेरान  हे मुंबई पुणे ठाणे कल्याण नाशिक यासारख्या मेट्रो सिटी पासून अगदी जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे माथेरानच्या पर्वत रांगांची अनेक पर्यटकांना नेहमीच भुरळ पडलेली आहे, त्यामुळे तरुणाई पाऊस सुरू होण्या अगोदरच माथेरानला येणाऱ्या पर्वतीय पर्वतरांगांमधून ट्रेकिंग द्वारे येण्याचे बेत आखत असतात, व पावसाला सुरुवात होताच माथेरानच्या डोंगररांगा या हौशी ट्रेकर्सने फुलून गेलेल्या दिसतात परंतु या परिसराचे योग्य माहिती नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असते त्यामुळे माथेरानला येण्याअगोदर येथील पर्वतीय रस्ते व त्याच्या सुरक्षिततेची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. माथेरान करिता येणारे सुरक्षित ट्रेकिंगचे रस्ते पनवेल येथून माथेरान करिता धोधानी पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे व तिथून पुढे माथेरान करिता दोन पायवाटा आहेत त्यातील मंकी पॉइंट येथून येणारी वाट ही पावसाळ्यात अती धोकादायक आहे,त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी ही वाट न पकडता येतील सनसेट पॉईंट येथे येणारी कमी धोकादायक वाटेने आल्यास अधिक सोपे जाते , येथील खालापूर तालुक्यातील चौक येथून ही माथेरान करिता दोन रस्ते येतात त्यातील एक थेट वन ट्री हिल पॉइंट येथे येतो तर दुसरा रामबाग पॉइंट येथे येतो . नेरळ येथून पेब किल्ला फिरून माथेरान हा ही एक मार्ग सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे . भिवपुरी येथून येथील गारबट पॉइंट हा ही एक अतिशय अवघड ट्रेक उपलब्ध आहे परंतु जे हौशी पर्यटक आहेत त्यांनी हा टाळलेलाच बरा, अशा अनेक वाटा पावसाळी पर्यटनासाठी हौशी गिर्यारोहक शोधत असतात पण रस्त्यांची संपूर्ण माहिती नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागते त्यात प्रामुख्याने अनेक जण निसरड्या वाटेने जाण्यासाठी लागणारे साहित्य बरोबर नेत नसल्याचे निदर्शनास येत आहे तर काही स्वतःबरोबर प्राथमिक उपचाराचे साहित्य बरोबर ठेवत नाही तर निसरड्या वाटेवरून चालण्यासाठी लागणारे ट्रेकिंग शूज ही न वापरता अशा ठिकाणी गेल्यानंतर अपघातास आमंत्रण देत असतात सर्वात महत्त्वाचे आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणची भौगोलिक माहिती काही आपत्कालीन परिस्थिती तर आवश्यक ते टेलीफोन नंबर त्या ठिकाणी मोबाईल साठी नेटवर्क आहे का की आपण दुसऱ्यांची संपर्क साधू शकतो अशी माहिती न घेताच अनेक जण या ट्रिप टाकत असतात व अपघातास आमंत्रण देतात त्यामुळेच माथेरानला येण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करून ट्रिप आखावी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरान मध्ये  आपत्कालीन स्थिती उद्भाविल्यास खालील नंबर बरोबर संपर्क करावा.