Author: bittambatami.com

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या बैठकीत   मुंबई : राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील अनेक पुनर्वसित गावठाणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. त्याचबरोबर दरड कोसळून तसेच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडले गेलेल्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, गावांतील बाधितांनासुध्दा प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहातील समिती कक्षात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्राधिकरणाचे सहअध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल व वने विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव बुशरा सय्यद, रस्ते सचिव संजय दशपुते उपस्थित होते. राज्याच्या विकासात विविध प्रकल्पांचे मोठे योगदान आहे. या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यात ठिकठिकाणी पुनर्वसित गावठाणे उभारण्यात आली आहेत. मात्र अनेक पुनर्वसित गावठाणे अद्यापि ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरित झाली नसल्याने त्यांच्या विकासासाठी निधीची तरतुद करण्यात अडचणी येतात, त्यामुळे त्यांचा विकास रखडतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ त्यांच्या ताब्यात घ्यावीत. या गावठाणांना १८ नागरी सुविधांसह विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्याचबरोबर पुनर्वसित गावठाणात अनेक वर्षापासून वाटपाविना रिक्त असलेले भूखंड संबंधित प्रकल्पातील बाधितांना द्यावेत, त्यानंतर सदर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना द्यावेत, त्यानंतरही शिल्लक राहिले तर राज्यातील इतर प्रकल्पग्रस्तांना या प्राधान्य क्रमानुसार देण्यात यावेत, अथवा कोणी हे भूखंड घ्यायला तयार नसतील तर नियमाप्रमाणे त्यांचे लिलाव करावेत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोयना धरण प्रकल्पबाधीत गोकुळ, रासाटी, हेळवाकमधील जलविद्युत प्रकल्पामुळे बाधीत शिवनदेश्वर प्रकल्पबाधीत गावांसाठी कोयना भूंकप पुनर्वसन निधीतून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा. सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पामध्ये शंभर टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यांमध्ये चारशे रुपयांवरून दरमहा एका कुटूंबाला एका वर्षासाठी तीन हजार रुपये वाढ करणे, तसेच याच प्रकल्पातील सावरघर येथील २९ कुटूंबाची खास बाब म्हणून रोख रक्कम देवून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. बीड जिल्ह्यातील गुणवंती पाटबंधारे प्रकल्पातील सुकळी (ता.धारूर) येथील प्रकल्पग्रस्तांचे खास बाब म्हणून पुनर्वसन तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अमडापूर लघू पाटबंधारे प्रकल्पातील कुरळी व घामापूर (ता.उमरखेड) गावातील पात्र प्रकल्पग्रस्त कुटूंबाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्याचा‍ निर्णय घेण्यात आला. घेण्यात आलेला निर्णय खालीलप्रमाणे – *राज्यातील पुनर्वसित गावठाणे ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत;पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी देणार *दरडीने, भूस्खलनाने संपूर्ण गाडलेल्या गावातील बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा;राज्यातील अनेक वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, गावांतील बाधितांना न्याय मिळणार *कोयनेतील जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित गावांना विशेष निधी;सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ *यवतमाळ जिल्ह्यातील अमडापूरसह बीड जिल्ह्यातील गुणवंती प्रकल्पातील पात्र बाधितांचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय 0000

 वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस

 मुंबईत काँग्रेसला नवी ताकद व उर्जा देण्याचे वर्षा गायकवाड यांचे काम.   मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत प्रा. वर्षा गायकवाड यांनी एका वर्षात पक्ष मजूबत करण्याचे काम केले आहे. वर्षा गायकवाड यांनी मुंबईकरांचे प्रश्न घेऊन विधिमंडळासह रस्त्यावरही दोन हात करत सत्ताधारी पक्षाला जाब विचारला. शहरातील झोपडपट्टीवासियांचे प्रश्नी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांच्याबरोबरीने सरकारशी लढा दिला व आजही तो लढा सुरुच आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतही मुंबईतील सहा पैकी चार जागांवर विजय संपादन करून काँग्रेसची विजयी पताका फडवली असल्याचे काँग्रेस प्रवक्ते आणि मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. खासदार राहुलजी गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा काढून देशातील वातावरण बदलवले. या यात्रेला मुंबईत विशेषतः धारावीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशाभरतीला इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर न्याय यात्रेची प्रचंड मोठी सांगता सभा झाली. मुंबईत १८ वर्षानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची एवढी प्रचंड सभा झाली, त्या सभेच्या नियोजनातही वर्षा गायकवाड यांचे योगदान मोठे होते. मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून मुंबईकरांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. नीट परिक्षेच्या पेपरफुटीनंतर मुंबईत रस्त्यावर उतरून भाजपा सरकारचा निषेध नोंदवला. जनतेसाठी सदैव तत्पर असे वर्षा गायकवाड यांचे नेतृत्व आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड यांनी अनेक अडचणींचा सामना करत तानाशाही सत्ताधाऱ्यांशी दोन हात केले. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विचार मुंबईत घराघरात पोहचवण्याचे काम झाले. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या प्रमाणेच लोकांच्या मदतीसाठी त्या धावून जातात. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्या रुपाने दलित, वंचित, मागासवर्गीय समाजाला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कामाचा सपाटा सुरु असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला आहे. ०००००

 ‘बार्टी’ मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   ठाणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत सन 2024-25 या वर्षाकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना www.barti.in या संकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दि. 3 जुलै पर्यंत अर्ज सादर करता येणार असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या दि. 30 ऑक्टोबर 2023 शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार बार्टी मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग (IBPS), रेल्वे. एलआयसी, इ.व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण या विविध स्पर्धा परीक्षांचे खाजगी नामांकित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.13,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.10,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे. बँकिंग (IBPS), रेल्वे, एलआयसी, इ. व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड ही ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे होणार असल्याचेही बार्टीचे महासंचालक श्री. वारे यांनी सांगितले.

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून स्वच्छततेचा आढावा

उल्हासनगर : महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी प्रभाग क्रं-१९ मधील ४ कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. लेंगरेकर यांच्या आढाव्याने सफाई कामगारांसह विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागातील स्वच्छता कामगार कामाच्या ठिकाणी गैरहजर तर काही सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यात खाजगी बदली माणसे काम करीत असल्याच्या तक्रारी या अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारींचे निवारण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी काही प्रभागात स्वच्छता आढावा घेतला. यावेळी प्रभाग क्रं-१९ (ब) मध्ये काम करणारे तब्बल ४ सफाई कामगार गैरहजर होते. याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्वच्छता निरीक्षक व मुकादम तसेच संबधित कर्मचाऱ्यास नोटीसा देऊन खुलासा मागितला. अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्या स्वच्छता आढाव्याने सफाई कामगार व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महापालिका सफाई कामगार हे मुकादम, स्वच्छता निरीक्षक आदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, त्याच्या बदल्यात खाजगी कामगार बदली देत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. यापूर्वी बदली कामगार ठेवण्याचा भांडाफोड होऊन, काही कामगारांना महापालिकेने बडतर्फ केले. बदली कामगार ठेवून वर्षानुवर्षे गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांसह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. लेंगरेकर यांच्या स्वच्छता आढाव्याने बदली कामगारांचे भिंग फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुचाकी चालवताय, सावधान!

ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी   ठाणे : गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या ठाणे, घोडबंदर आणि खारेगाव भागांतील महामार्गासह उड्डाणपुलांवर यंदा पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले. यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहराकडे शासनाच्या संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यात ठाणे महालिका प्रशासन टीकेची धनी ठरली आहे. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला ६०५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनामार्फत दिला. यातून शहराच्या अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहराअंतर्गत रस्ते सुस्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असले तरी दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गासह उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत. या मार्गावर गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खड्डे पडले होते. या खड्डे प्रवासाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर या मार्गाची डागडुजी करण्यात आल्याने यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरून खड्डेमुक्त प्रवास होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. महापालिका क्षेत्रातील कोपरी उड्डाणपुल, तीनहात नाका उड्डाणपुल हे एमएमआरडीए, नितीन कंपनी उड्डाणपुल एमएसआरडीसी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, वाघबीळ उड्डाणपुल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. या सर्वच विभागांनी गेल्यावर्षी रस्त्यांची डागडुजी केली होती. या रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. माजिवाडा, कॅडबरी आणि नितीन कंपनी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या पुलांवर खड्डे पडले आहेत. या मार्गांवर अवजड, हलक्या तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगावर परिणाम होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ते चालकांना दिसत नाहीत. यामुळे वाहन आदळते. तसेच काही ठिकाणी मोठे खड्डे आहेत. तिथे स्कूटरचे चाक अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कोंडीची कारणे मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. हा रस्ता काँक्रीटचा केला जात आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. सेवा रस्ता किंवा मुख्य रस्त्या लगतच्या रुंदीकरणातील भागात काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे मुख्य रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता उंच-सखल झाला आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच वाहतुकही या भागात संथ होऊ लागली आहे. उरण जेएनपीटी बंदरातून येणारी हजारो अवजड वाहने मुंबई नाशिकच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्गाने वाहतुक करतात. खारेगाव टोल नाका येथे खड्डे पडल्यामुळे येथे वाहतुक काहीवेळ थांबवून टप्प्याटप्प्याने सोडली जात आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा मुंब्रा बाह्यवळण मार्गापर्यंत जात आहेत. वाहतूक संथगती सोमवारी मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहने बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव, मुंब्रा बाह्यवळण महामार्ग, पिंपळास भागात वाहतूक कोंडी झाली होती. या भागात मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे देखील वाहतूक संथ सुरू होती. तसेच माजिवाडा आणि कापूरबावडी भागातही कोंडी झाली होती. 00000

राष्ट्रवादी काँग्रेस राजर्षी शाहू महाराजांची जयंती राज्यभर विविध उपक्रमांनी साजरी करणार – सुनिल तटकरे

मुंबई दि. २५ जून – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांनी राज्यभर साजरी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत आला असून या युगपुरुषांचे सामाजिक सलोखा आणि लोकशाही विचार या मूलमंत्राने दिनांक २६ जून ते १ जुलै या दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे. ३० जून रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‘सामाजिक सलोखा परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक, व्याख्याते व विचारवंत यांचा सहभाग असणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर ‘कृषी दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिनी’ त्या – त्या जिल्हयातील व तालुक्यातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालयात ‘तंत्रज्ञानयुक्त शेती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अशीही माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. 000

बेस्ट कामगार परळ वसाहतीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठयात उत्सवात संपन्न

लोकमाता अहिल्यामाई होळकर यांची २९९ वी जयंती   मुंबई :  बेस्ट कामगार अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने माता अहिल्यामाई होळकर यांची २९९ वी जयंती बेस्ट कामगार परळ वसाहतीत विविध सांस्कृतिक भरगच्च सुत्यउपक्रम राबवून मोठया उत्साहात जयंती उत्सवाचे अध्यक्ष श्री सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न केली. सर्व प्रथमतः माता अहिल्यामाई होळकर यांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण सन्मानीय स्थानिक आमदार श्री अजय चौधरी यांनी करून प्रमुख वक्ते समाजभूषण सो ना काबळे, प्रा.दादा धडस सर,बी जी गायकवाड गुरूजी, यांच्या शुभ हस्ते समई दिप प्रज्वलित करून जयंती उत्सव सोहळ्याचे उद्घाटन झाले, प्रतिमा पुजन जयंती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष श्री आंनदा जरग, सचिव श्रीअनिल कोळपे, खजिनदार दत्तात्रेय पुळके, श्री यशवंत मदने,सुरेश धायगुडे आदि सन्मानीय मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.सदर प्रंसगी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून बेस्ट कामगार सेवानिवृत्त बस निरीक्षक श्री रमेश कोळपे, बस चालक श्री शिवाजी कोळपे,यांचा पुष्पगुच्छ,शाल,फेटा, बेस्ट बस स्मृतीचिन्ह देऊन उपस्थितीत मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. उपस्थितीत मान्यवरांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत झाले, प्रमुख पाहुणे आमदार श्री अजय चौधरी यांनी जयंती निमित्त शुभेच्छा देवून आपल्या भाषणात म्हणाले की,  ३१ मे २० २४ ला जयंती माता अहिल्यामाई होळकर होती, लोकसभा निवडणुकी काळ असल्याने व पावसाळ्यात शेतीचे कामे व बेस्ट उपक्रमातील आपले नौकरी दिवस संभाळून जवळपास आपण बेस्ट कामगारानी एक महिन्यानी ती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन कौतुक केले, पुढे आमदार चौधरी म्हणाले की, माता अहिल्यामाई होळकर यांची जयंती वर्ष भर ही साजरी केली तर ही अहिल्यामाई होळकरच्या थोर कर्तबगारी उपकाराची परतफेड करू शकत नाही,असे ते आवर्जुन म्हणाले. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त बेस्ट कामगार बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप.क्रेडीट सोसा.मुंबई अध्यक्ष समाजभूषण सो ना कांबळे यांनी सविस्तर भाषणात माता अहिल्यामाई होळकर यांचा जीता जागता क्रांतीकारक इतिहास जयंती उत्सव सोहळ्यात प्रदीर्घ भाषणात वर्णन करताना म्हणाले की, इ.स.जन्म ३१ मे १७२५ पुण्यश्लोक माता अहिल्यामाई होळकर ग्रामीण दुर्गम खेडेगांव चौंडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर येथे वडील माणकोजी शिदे व आई सुशिला शिदे, माणकोंजी शिंदे हे गावचे पाटील होते,मल्हारराव होळकर यांच्या मागणीनुसार आठ वर्षांची मुलगी अहिल्यामाई  यांचे लग्न शनिवार वाडा पुणे येथे २० मे १७३३ मध्ये फक्त बारा वर्षांच्या खंडेराव होळकर होवून त्या सासरी इंदूरला जावून होळकराची सुन म्हणून क्रांतीकारक इतिहास घडविला तो पुढील आपणास सविस्तरपणे आपणास थोडक्यात सांगतो, कांबळे म्हणाले की, माता अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या समभावाचा आदर्श मिरवीत हिंदु मंदिरे,मशिद,चर्च,बौद्ध विहारे,आदि धर्मियांचे बांधली व देशभरातील मंदीराचा जीर्णोद्धार केला, विहिरी पानवटे, रस्ते,महारस्ते बांधून पर्यटनाला प्रोत्साहन देऊन मजुरांना काम मिळाले, विश्रामगृह, महिला साठी खास स्नानगृह त्यांच्या मुलाबाळांची काळजी घेवून निर्माण केली, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण करून आपल्या राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या शूरवीर यशवंत फणसे या आदिवासी बहादूरा आपल्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला तडा दिला, धर्मातील रूढी पंरपंराचा आंधळेपणा कधीही स्वीकारला नाही,  पती खंडेराव याना वीरमरण आले असता आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या विनंतीवरून सती गेल्या नाहीत त्या तरुण वयात विधवा २९ व्या वर्षी होवून पती खंडेराव १७५४, मल्हारराव  सासरे १७६६, मुलगा मालेराव १७६७ च्या निधनानंतर त्यांच्या जीवनातील उत्तम राज्यकारभाराचे २९ वर्ष राघोबा पेशवाईचा पन्नास हजार फौज फाट्याला नामोहरम करून शरणार्थी आणून कंकण व महिला फौजेचा दणका देवून युक्तिवादाने लढाई जिंकून लाभल्याची जागतिक पुस्तकात नोंद असून आपला नातू नथाबा, त्यानंतर एकच वर्षात जावई यशवंत फणसे यांचे निधन व मुलगी मुक्ताबाई या १७९१ला आपल्या पती बरोबर सती गेल्या, त्यांनी इंदूरवरून राजधानी नर्मदा नदी च्या महेशवर हे वसाहत स्थापन केल्या ठिकाणी त्यांचे वृध्दापकाळाने ७० व्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ निधन झाले!एका खडतर जीवनाचा अंत झाला पण इतिहास रूपाने अहिल्यामाई होळकर आपल्यात जिवंत असल्याचा भास होतोय! त्यांनी एकच धर्म पाळला तो म्हणजे मानता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लावता राज्याचा कोष समृध्द लोककल्याणसाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्याचे प्रदीर्घ आपल्या घणाघाती भाषणात प्रमुख वक्ते समाजभूषण सो ना कांबळे यांनी ठणकावून सांगुन उपस्थितीत सर्व समाजातील व खास करुन धनगर समाजातील बंधूभगिनी अहिल्यामाई होळकर यांचा आदर्श घेतला तरच अहिल्यामाई होळकर जयंतीचा जल्लोष जागर सार्थकी होईल असे गौरवोद्गार काबळे यांनी काढून माता अहिल्यामाई होळकरच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन केले आमदार अजय चौधरी, प्रा. दादा धडस, श्री बी जी गायकवाड गुरूजीआदिने यांनी आपले विचार थोडक्यात प्रगट करून माता अहिल्यामाई होळकर यांचा संपूर्ण इतिहास प्रमुख वक्ते सो ना कांबळे यांच्या तोंडून ऐकल्याचे समाधान व्यक्त केले सदर वेळेस महिलांचा हळदी कुंकूसंमारभ मुलांच्या सांस्कृतिक भरगच्च विविध सुत्यउपक्रम कार्यक्रम राबवून बेस्ट कामगार परळ वसाहतीत माता अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव सोहळ्या मोठया उत्साहात संपन्न झाल्याचे बेस्ट कामगार नेते मुक्त पत्रकार समाजभूषण सो ना कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

 शौचालय नूतनीकरणाच्या कामात थुकपट्टी 

कंत्राटदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा मनविसेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांचे आयुक्तांना पत्र   ठाणे : शौचालय नूतनीकरणाच्या २ कोटींच्या कामात शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन केली आहे. माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत मागासवर्गीय निधी तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शौचालय नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या संदर्भात पत्र दि. 21 मार्च 2024 रोजी माजिवाडा – मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनाही दिले आहे. पत्र देऊन तीन महिने होत आले तरी अद्याप कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका परिमंडळ 3 च्या उपायुक्तांना तीन वेळा भेटूनही सदर विषय सांगितला असता त्यांनी आमच्यासमोर तीन वेळा फोन करुन कार्यकारी अभियंता संजय कदम यांना सदर विषयात लक्ष घालण्याचे सांगितले परंतू संजय कदम यांनी उपायुक्त यांना देखील जुमानले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार भेटून, फोन करुन निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत माहिती दिली होती परंतु त्यांनी देखिल दुर्लक्ष केले. अशा प्रकरणांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा सतत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांसोबत मैत्रीचे संबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे हेमंत मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. कंत्राटदारांने फक्त बाहेरुन रंगरंगोटी करून शौचालय नूतनीकरण झाल्याचे भासवले आहे. निविदेत दिलेली बरीचशी कामे कंत्राटदाराकडून करण्यात आलेली नाहीत. जुन्या दरवाजांना अर्धवट रंग देऊन नविन दरवाजे असल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढी थूकपट्टी करुन अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, त्यामागचे कारण काय? तरी आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी केली आहे. 00000

 ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी होणार

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत. ‘ते ३३ जाहिरात फलक काढून घ्यावेत’ महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्या इमारतींवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले आहेत. पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. त्यास, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत सांगितले. अतिधोकादायक इमारतीबाबत दक्ष राहावे अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ०७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. इतर प्रभागातील ०८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 00000

प्रोजेक्ट आत्मनिर्भर’ क्रांतीकारी ठरणार-संदीप माळवी

अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या छत्र्यांची विक्री सुरु   ठाणे : रस्त्यावर निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचे काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल. सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार, असा आत्मविश्वास ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी येथे व्यक्त केला. समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल. प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी केले. जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, ऍड. ईश्वर सूर्यवंशी,  ऍड. प्रदीप टिल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील विविध सिग्नलवर वस्तू विकून चरितार्थ चलविणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड इंटरप्राइजेसच्या अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेसकोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील करण्यात येत आहे. अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे. ही उत्पादने सिग्नल शाळा व तीन हात नका सिग्नल येथे उपलब्ध असतील. 000000