Author: bittambatami.com

 नवीन इमारतींमध्ये ५० टक्के घरे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा – ॲड अनिल परब

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक परब यांनी विधानभवन सचिवालयाकडे अशासकीय विधेयक सादर केले   मुंबई : घरे नाकारल्यामुळे मराठी लोकांचे मुंबईतून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केले आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के आरक्षित ठेवली पाहिजेत त्यामुळे मुंबईतील मराठी लोकांची टक्केवारी आणखी कमी होणार नाही, असे परब म्हणाले. परब यांनी या विधेयकाद्वारे मुंबईतील नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के आरक्षणासह घरे उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. घरे आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहील. विकासकाने तसे न केल्यास विकासकाला सहा महिने तुरुंगवास किंवा १० लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केली आहे. या विधेयकामागील उद्देश स्पष्ट करताना परब म्हणाले की, खाण्याचे प्राधान्य किंवा धर्माच्या नावाखाली मराठी लोकांना घरे नाकारण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विकासकांकडून मराठी लोकांना जाणीवपूर्वक घरे नाकारली जात असल्याचे दिसून आले आहे. धर्म किंवा खाण्याचे प्राधान्य यावर आधारित कोणताही भेदभाव हा घटनाबाह्य आहे, असे परब म्हणाले. परब यांनी पुढे विलेपार्ले येथील एका बांधकाम व्यावसायिकाने मराठी लोकांना मांसाहार करत असल्यामुळे घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भ दिला. विलेपार्ले येथील मराठी लोकांनी बिल्डरच्या विरोधात निदर्शने केली. परंतु, सरकारने या समस्येची दखल घेतली नाही. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केल्यानंतरच विकासकाने माफी मागितली, असे परब पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुंबईतील मराठी लोकांचा टक्का दिवसेंदिवस कमी होत आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मात्र आता मराठी माणसांना मुंबईत घरे नाकारली जात आहेत. मराठी माणसांना भाड्याने घरे मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे राज्यात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांसाठी ५० टक्के घरे आरक्षित करण्यात यावीत. याबाबत तातडीने कायदा करण्याची गरज आहे, असे परब म्हणाले. राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मविआचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. 00000

शाळेच्या प्रवेशव्दारावरील झाड तोडल्याने कल्याणमधील सेंट थॉमस शाळेला नोटीस

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता कल्याण पूर्व विजयनगर भागातील सेंट थॉमस शाळेने शाळेेच्या प्रवेशव्दारावरील बदामाचे जुनाट झाड तोडले. या नियमबाह्य कृतीबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाने शाळा व्यवस्थापनाला कारवाईची नोटीस पाठवून सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी पालिका प्रशासनाचे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उपक्रम सुरू आहेत. शहर, परिसरात हरितपट्टे विकसित करण्यासाठी पालिका प्रशासना बरोबर, सामाजिक, पर्यावरण संवर्धन संस्थांनी पुढाकार घ्यावा म्हणून आयुक्त डाॅ. जाखड प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत कल्याणमधील एका शिक्षण संस्थेने पालिकेच्या परवानग्या न घेता झाड तोडल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत. सेंट थॉमस शाळेला शाळेच्या प्रवेशव्दारावर एक प्रवेशव्दार उभारायचे आहे. या कामासाठी शाळेच्या प्रवेशवद्रारावरील बदामाचे २५ वर्ष जुने २५ फूट उंचीचे बदामाचे झाड अडथळा येत होते. हा अडथळा हटविण्यासाठी हे झाड धोकादायक नसताना ते तोडल्याने नागरिक, पालक नाराज झाले होते. उन्हाळ्यात शाळेच्या प्रवेशव्दारावर सावलीसाठी हे झाड मोठा दिलासा होते, असे पालक सांगतात. याप्रकरणी या भागातील काही जागरूक नागरिकांनी हा विषय पालिका आयुक्त, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या निदर्शनास आणला. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सेंट थॉमस शाळा प्रशासनाला महाराष्ट्र क्षेत्र झाडांच जतन व संरक्षण अधिनियमान्वये नोटीस पाठवली. आणि सात दिवसात याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विहित वेळेत शाळेने खुलासा केला नाहीतर या कलामन्वये शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत दिला आहे. दोन दिवसापूर्वी ठाणे पालिका हद्दीतील देसई-तांबडीपाडा गावातील एका रहिवाशावर घरासमोरील कडुनिंबाचे झाड तोडले म्हणून पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारची कारवाई सेंट थॉमससह बेकायदा झाडे तोडणाऱ्यांंवर करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

मतदार यादी नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी राजकीय पक्षांनी केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावेत- अशोक शिनगारे

ठाणे : पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींचे अद्ययावतीकरण, नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच प्रारुप व अंतिम मतदार यादीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमावेत. तसेच मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येईल, हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 1.7.2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) जाहीर केला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. शिनगारे यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देऊन म्हणाले की, मतदारांपर्यंत मतदार यादीची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षाची मोठी मदत होणार आहे. निवडणूक प्रशासनाकडून केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आले आहेत. येत्या 25 जुलै 2024 रोजी एकत्रित प्रारुप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळी बीएलओंबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समन्वय साधून नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांचे नाव यादीत आहे का तपासणे, यादी नाव नसेल अथवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्यासाठी मतदारांकडून अर्ज भरून घेणे ही कामे करावीत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन मतदान केंद्रे उभारणे व सध्याच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरणासाठीही राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. मतदार यादींचे अद्ययावतीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदान यादीत नाव असेल तरच नागरिकांना मतदान करता येणार आहे. निवडणूक ओळखपत्र असेल आणि यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यामध्ये आपले नाव आहे की नाही याची सहनिशा करावी. नाव नसेल तर किंवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर तातडीने अर्ज करून नाव नोंदणी/दुरुस्ती करावी, यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही श्री. शिनगारे यांनी यावेळी केले. 00000

‘बायकांना पुढे करून जमिनी लाटल्या; धक्काबुक्कीसह शिवीगाळ करताना जिभाच घसरल्या’

माहेरवाशीण असलेल्या निता विचारेंनी मंत्रालय सचिवालयाची धमकी देवून सावंतांना मारहाणीसाठी केले प्रोत्साहित   राज भंडारी   रायगड : म्हसळा तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदेरी येथील विचारे कुटुंबियांच्या चुलतीच्या नावे असलेल्या जमिनीचे मूळ वारसदार असलेल्या रामचंद्र किसन विचारे व अन्य चार भाऊ असे वारस असून त्यांच्या मालकीच्या या जागेत रमेश व संदीप सावंत यांच्या वडिलांना ४०० स्क्वेअर फूट जागा घर बांधून राहण्यासाठी सन १९६२ साली तोंडी व्यवहाराने देण्यात आली होती. याबाबत आता रामचंद्र विचारे आणि बंधूंची कोणत्याही प्रकारची हरकत नव्हती. मात्र कालांतराने रमेश व संदीप सावंत यांचे वडील श्रीधर सावंत यांनी सदर घराभोवती पुढील बाजूस पडवी तसेच मागील बाजूस एक पडवी बांधून अतिक्रमण करून जागा लाटली. त्यानंतर त्यांची मुले यावरच न थांबता ग्रामपंचायतीने बांधकामास मज्जाव घातलेला असताना देखील त्यांनी आता तर घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवरही बेकायदेशीर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करून चक्क पाच फूट उंचीची संरक्षक भिंतच उभारली. त्यानंतर रामचंद्र किसन विचारे यांनी या प्रकाराला विरोध केला असता सावंत कुटुंबातील संदीप श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत आणि निता यशवंत विचारे यांनी ६८ वर्षीय रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करीत आपल्या जिभेवरील ताबा सोडत अर्वाच्च शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यातच माहेरवाशीण असलेल्या निता यशवंत विचारे यांनी तर कहर केला, स्नेहा सावंत यांना अंगावर धावून जाण्यासाठी प्रोत्साहन करताना त्यांनी जिभेवरील ताबा सोडत “मी मंत्रालयात सचिवालयात कामाला आहे, तुझे कोण काहीही करू शकणार नाही. मी सर्व बघून घेईन” असे बोलून खतपाणी घातले. अखेर विचारे बंधूंनी पोलीसात दाद मागितल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. तसेच सदर प्रकारावर येथील लोकप्रतिनिधी यांनी हस्तक्षेप करून रविवारी (दि.२३ जून) रोजी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक लावली. मात्र सदर बैठकीला सावंत कुटुंबीयांनी पुन्हा जैसे थे भूमिका घेत आपला गोंधळ घालण्यास सुरुवात करून सदरची बैठक धुडकारून लावली. यावेळी उपस्थितांनी त्यांना न्यायालयीन दणका देण्याची गरज असल्याचे सुचाविल्यामुळे रामचंद्र विचारे यांच्यासह पाचही बंधूंनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रामचंद्र किसन विचारे यांनी बोलताना सांगितले की, गेली अडीच वर्षे सदर प्रकार सुरू आहे. आम्ही सर्व भाऊ हे नोकरीनिमित्त मुबई परिसरात राहतो. अडीच वर्षांपूर्वी आम्ही आमच्या जागेत लावलेली झाडे तसेच इतर पूर्वजांच्या काळातील दोन आंब्याची झाडे व एक नारळाचे झाड रमेश आणि संदीप सावंत यांनी कोणाचीही परवानगी न घेता तोडले व ते चोरुन विक्री केले. याबाबत पोलीसात तक्रार दिली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास विरोध करताना आपले वारस दाखले दाखवा असे सांगितले. त्यानुसार सदर वारस दाखल्यांचे काम सुरू होते. साधारण दीड महिन्यापूर्वी आम्हाला वारस दाखले मिळाले. पुन्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे नव्याने आलेले सुर्वे या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपली तक्रार घेता येणार नाही असे उत्तर दिले. या प्रकारामुळे संदीप आणि रमेश सावंत यांची हिम्मत अधिकच फोफावली. त्यानंतर त्यांनी आमच्या मोकळ्या जागेवर त्यांचीच जागा असल्याचे भासविण्यासाठी गेल्यावर्षी एका बाजूला संरक्षक भिंत बांधली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये तशी तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम थांबविले आणि विना परवानगी आपण बांधकाम करू शकत नसल्याची त्यांना नोटीस दिली. मात्र मुजोरीचा कळस गाठलेल्या सावंत बंधूंनी मात्र प्रशासनाला केराची टोपली दाखवून दुसऱ्या बाजूला याच आठवड्यात दुसरी संरक्षक भिंत बांधून संपूर्ण जागा आपलीच असल्याचे भासवित बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच पाचही विचारे बंधू हे दिनांक ९ जून रोजी याठिकाणी आले. यातील मोठे बंधू रामचंद्र किसन विचारे यांनी त्यांना बांधकाम करताना अडविले असता रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत आणि माहेरवाशीण असलेली निता यशवंत विचारे हे याठिकाणी येवून ६८ वर्षीय वृद्ध असलेल्या रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करून परत अडवाल तर जिवंत राहणार नाही अशी धमकी देण्यास सुरुवात करू लागले. हे सर्व होत असताना याचा आवाज बाजूलाच असलेल्या विचारे बंधूंच्या कानावर गेल्यानंतर हे सर्व बाहेर आले. यावेळी माहेरवाशीण असलेली निता विचारे ही स्नेहा संदीप सावंत हिला पुढे करून “तू मार त्याला, मी मंत्रालय सचिवालयात कामाला आहे, तुझे कोणीही काहीही करू शकणार नाही. मी बघते सर्व” असे बोलून मारहाणीसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे सर्व बंधूंनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे सर्व चित्रफीत पोलिसांना दाखविल्यानंतर देखील पोलिसांनी सदर बाब ही सिव्हील मॅटर असल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. सरळ आणि साधेपणाने वागणाऱ्या विचारे कुटुंबाला न्याय तरी कोण देणार अशी स्थिती उद्भवली आहे. सावंत कुटुंबाच्या पाठीमागे कोणाचे हात दडले आहेत ? ते का प्रशासनाला जुमानत नाहीत ? पोलिसांचे देखील ते का ऐकत नाहीत ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील अशीच एक चॅप्टर केस २०२२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये संदीप श्रीधर सावंत, रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत, निता यशवंत विचारे आणि प्रसाद महादेव विचारे यांचा समावेश होता. त्या चॅप्टर केसनुसार एक वर्षे सावंत कुटुंब शांत राहिले आणि चॅप्टर केसची मुदत संपताच त्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. दिनांक ९ जून रोजी घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी तक्रार घेतली नसल्यामुळे रामचंद्र किसन सावंत यांनी गोरेगाव पोलिसांसह संदेरी ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग, गृहमंत्रालयाच्या सचिवांना तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना एक पत्र तयार करून पाहिली प्रत गोरेगाव पोलिसांना शनिवार दिनांक २२ जून रोजी दिली. यावेळी सदर तक्रार अर्ज पोलिसांनी वाचल्यानंतर तत्काळ त्यांनी संदीप सावंत, स्नेहा सावंत, ऋतुजा सावंत आणि निता विचारे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलाम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी विचारे कुटुंब आणि सावंत कुटुंबांची बैठक लावण्याचे प्रयत्न केले. रविवारी (२३ जून) रोजी सदरची बैठक देखील पार पडली. या बैठकीला काही राजकीय पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी देखील ग्रामस्थांसह उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीमध्ये चर्चा सुरळीतपणे सुरू झाली मात्र काही वेळाने रमेश सावंत आणि अनेक गुन्हे दाखल असलेला प्रसाद विचारे यांनी याठिकाणी येऊन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असलेल्या मध्यस्थांनी दिलेला पर्याय हा सावंत बंधूंनी धुडकावला. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे प्रसाद विचारे याचे काम हे बिघडविण्याचे काम असल्याचे ग्रामस्थांमधून नेहमीच बोलले जात असते त्याची प्रचिती देखील या बैठकीमध्ये ग्रामस्थांना अनुभवण्यास मिळाली. मुळातच सावंत कुटुंबाची ही जागा नसताना देखील कामानिमित्त आपण बाहेर राहत असल्यामुळे त्यातील अर्धी जागा देऊन मार्ग काढण्यासाठी विचारे कुटुंबांनी एक पाऊल मागे घेतले होते. मात्र जागा बळजबरी करून लाटण्याचा घाट घालणाऱ्या सावंत बंधूंना हे मान्य नसल्यामुळे अखेर विचारे बंधूंनी आपण न्यायालयीन लढाई लढून सत्याचा विजय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. 00000

ठामपा वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागातील बेजबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करा – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर   ठाणे : पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई कर अशी मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे स्वत:चे वृक्ष प्राधिकरण विभाग व उद्यान विभाग असून या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधीत अधिकारी बसलेले आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यामध्ये पावसाच्या पहिल्याच तडाख्याने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी अपघात झाले असून, काही ठिकाणी मोटार गाड्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रीडापट्टूना अपघात झाल्याची बातमी मला मीरा-भाइर्दर मधील एका कार्यक्रमादरम्यान रात्री १० वाजता कळली. बातमी कळल्यानंतर मी तातडीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावरून बेथनी हॉस्पिटलकडे येत असताना माझ्या समोरच ८ ते ९ मोठ-मोठी झाडे कोसळली. त्याचबरोबर शहराच्या इतरही भागामध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याचे समजले. त्या दिवशीच्या घटनेवरून असे लक्षात आले की, ह्या सर्व झाडांच्या फाद्यांची छाटणी पावसाळ्यापुर्वी योग्य प्रकारे न झाल्याने त्या फाद्यांचे वजन व सोसाट्याच्या वार्यामुळे ही सर्व झाडे उन्मळून पडल्याचे दिसून येते. माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिकेबरोबरच मीरा-भाइर्दर महानगरपालिकेचा भाग येत असून त्या ठिकाणी झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे झाल्यामुळे तेथे झाडे पडल्याच्या तुरळक घटना दिसून येतात. परंतू, ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना या घटनाना सामोरे जावे लागत आहे. झालेल्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही भयंकर घटना घडलेली नाही. तरी पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशो मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 000000

प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा

ठाणे : सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे; बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे  सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी सोमवारी नायगावनजीकच्या सर्व्हीस सेंटरवर जाऊन आपल्या 100 हून अधिक बसगाड्या जमा केल्या. विशेष म्हणजे, या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भरपावसात धरणे आंदोलन केले. खासगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रूपये खर्च करून अशोक लेलँडने बाजारात आणलेल्या 13. 5  मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र, या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 13 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे  फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच-  प्रेशर प्लेट, रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वाॅरंटी प्रदान केली जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या सुमारे 100  बस मालकांनी आज थेट सर्व्हीस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या. दरम्यान, या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही. किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बसमालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बसमालकांनी तेथील चिखलातच बसून धरणे आंदोलन केले. 00000

शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज’ – अभिजीत कांबळे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : शिक्षणामुळेच माणसाचा उत्कर्ष होतो हा ठाम विश्वास ठेवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याचाच विस्तार सर्वदूर झालेला असून छत्रपती शाहू महाराजांचा हा शैक्षणिक दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे व त्यांनी आखून दिलेली पायवाट अधिक व्यापक केली पाहिजे असे मत व्याख्याते, संपादक अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून से.१५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेमध्ये ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे दूरदृष्टीचे शैक्षणिक विचार’ या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक तथा व्याख्याते अभिजीत कांबळे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे महत्व विशद केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, वाचन, माहिती व ज्ञान यांना महत्व देणाऱ्या विचारांवर आधारित नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने ज्ञानस्मारक असून येथील अतिशय संपन्न ग्रंथालय अभ्यासकांसाठी तसेच बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत अभिजीत कांबळे यांनी नोंदविले. आपले महाराष्ट्र राज्य पुरोगामी असण्याचे मूळ शिक्षणात असून महात्मा फुले यांनी शिक्षणाला महत्व देत शाळा सुरु केल्या, शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तशी तरतूद केली हा आपला समृध्द वारसाच प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास करताना पाच महत्वाचे मुद्दे जाणवले असे सांगत त्यांनी शाहू महाराजांनी राबविलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा, स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेले उपक्रम व कायदे, तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम व कायदे, संस्थानाच्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चाला सहा टक्के इतके दिलेले प्राधान्य तसेच वसतीगृहाच्या चळवळीमुळे गरजू व होतकरु मुलांना खुली झालेली शिक्षणाची दारे या पाच मुद्दयांच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टीकोन विविध उदाहरणे देत मांडला. शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे असून त्यांनी राबविलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रम हे आजच्या काळालाही सुसंगत असून त्यांच्या शैक्षणिक विचारांचा उपयोग आजच्या काळात कसा करुन घेता येऊ शकतो या दृष्टीने विचारमंथन व्हायला हवे असे ते म्हणाले. शिक्षणामुळे सुजाण व चांगला माणूस घडू शकतो आणि शिक्षण हे समाजाला परस्परांशी सद्भावनेने रहायला शिकवते त्यामुळे शिक्षणाला सर्वाधिक महत्व देण्याची गरज असून त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विकासाच्या नजरेतून पहायला हवे असे अभिजीत कांबळे यांनी स्पष्ट केले. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी व मान्यवरांनी स्मारकाला भेट देत येथील सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली असल्याचा आनंद व्यक्त करीत ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेच्या माध्यमातून महानगरपालिका सांस्कृतिक व वैचारिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेत दिग्गज व्याख्यात्यांनी मौलिक विचारधन दिलेले असून व्याख्यानांना श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतो याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सदर व्याख्यानाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व किसनराव पलांडे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख प्रफुल्ल वानखेडे, सुधाकर सोनवणे, श्रीम.हेमांगी व अंकुश सोनावणे व इतर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केले – सुप्रिया सुळे

मुंबई : घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा अशी कटकारस्थाने करीत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात…

राज्यात १ जुलै पासून कर्जमुक्ती आंदोलन – शेट्टी

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार…