Author: bittambatami.com

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न ठाणे : शहापूर तालुक्यातील साठगाव येथील रहिवासी असलेल्या अंजना तानाजी उबाळे या भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त कार्यालयात सळग ३१ वर्षे चतुर्थ श्रेणी पदावरून आपली सेवा करून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साठगाव येथे आयोजित करण्यात आला होता.त्यांनी  उत्तम सेवा बजावली.त्याच्या सेवेच्या कामगिरी बद्दल ठाणे पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मधुकर उबाळे,जेष्ठ पत्रकार  बी.डी. गायकवाड,पत्रकार अविनाश उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मारुती चन्ने,डॉ.  बी.बी. प्रधान,कुमार उबाळे,गोविंद विशे,लक्ष्मण विशे,दीपक गायकवाड,मनोहर गायकवाड,जगन गायकवाड,राज जाधव भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी,साठगावचे पोलीस पाटील सचिन गायकवाड गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भीमाई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे  बौद्धाचार्य  मनोज गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार घनश्याम गायकवाड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

 अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात

अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात मुंबई : मौजे अरुळे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी शारदा मंगल कार्यालय, दादर येथे उत्सहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड उपस्थित होते.  यावेळी व्यासपीठावर मंडळाचे चिटणीस विकास खांबल, सुरेश रावराणे, सुभाष रावराणे, सहचिटणीस प्रकाश करपे, अजय वारीक हे उपस्थित होते. याप्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विजयी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, हळदीकुंकू समारंभ आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे जगदीश भोवड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावात शिक्षण घेऊन मुंबईला आल्यानंतर येथील आव्हाने स्वीकारत, मिळालेल्या संधीचे सोने करीत मी स्वतः जिद्दीने उभा राहिलो. आपल्या गावातील अनेक लोक असेच गरिबीतून पुढे आलेले आणि मोठे झालेले आहेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपण सकारात्मक जीवन जगणे गरजेचे आहे. मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता रावराणे आणि प्रभाकर रावराणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष करपे, विकास खांबल, देवकुमार बोडके, अजय वारीक, अनिल बाणे, मंगेश बाणे, जगदीश रावराणे, मधुकर खांबल, चंद्रकांत रावराणे, माधव काटे, प्रकाश करपे, मधुकर जैतापकर, नारायण खांबल, रमेश मराठे, चंद्रकांत खानविलकर, शांताराम खानविलकर, प्रभाकर रावराणे, नंदकुमार नारकर, प्रमोद नारकर, संतोष माईणकर, सुभाष जाधव, संतोष रावराणे, दिलीप जैतापकर, श्वेता रावराणे यांनी मेहनत घेतली.

परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान

परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे-  मंगळवारपासून राज्यात बारावीच्या तर 20 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, यासाठी रिक्षा चालकांनी कोणतेही भाडे नाकारू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक – मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केले आहे. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद् गाठणे परीक्षार्थीना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करणार आहेत. मात्र, आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत, परीक्षार्थीना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावे, असे आवाहन प्रधान यांनी केले आहे. यासंदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंती केली आहे. चौकट राष्ट्रवादी (श.प.) चे कार्यकर्ते सज्ज वाहतूक कोंडी अथवा इतर कोणत्याही अडचणीमुळे विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मदतीला उभे राहणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजीत पवार, कार्याध्यक्ष राजेश कदम,  श्रीकांत भोईर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहू पाटील ( +918424004747) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते अनुक्रमे कळवा, ठाणे आणि घोडबंदर पट्ट्यात दुचाकीवरून विद्यार्थ्यांना अडचणीच्यावेळी परीक्षा केंद्रावर पोहोचवतील, असेही मनोज प्रधान यांनी सांगितले.

 ठाणे महापालिका आयोजित पर्यावरणपूरक प्रशिक्षणास महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे महापालिका आयोजित पर्यावरणपूरक प्रशिक्षणास महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे : महिला सक्षमीकरणासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी कचरा व्यवस्थापन तसेच सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड या विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शहरी उपजीविका केंद्र, तत्वज्ञान विद्यापीठ येथे करण्यात आले. ठाणे महानगरपालिका गेल्या दहा वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्था (NGO) व महिला बचत गटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे राबवत आहे. समाज विकास विभागामार्फत बचत गटांना अधिकृत मान्यता देण्यात येते. त्यांना ओळखपत्रे, घंटागाड्या, वर्गीकरण शेड आदी सुविधा पुरवण्यात येतात. या माध्यमातून कचरा वेचक महिलांना घराघरातून कचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व प्रशिक्षण देण्यासारख्या विविध रोजगार संधी उपलब्ध होत असल्याचे उपपर्यावरण अध‍िकारी वैशाली पालकर यांनी नमूद केले. उपक्रमात परिसर विकास भगिनी संस्था, स्त्री मुक्ती संघटना, अँटी प्लास्टिक ब्रिगेड, समर्थ भारत व्यासपीठ आदी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. भविष्यात  वृक्षलागवड व संगोपन, कापडी पिशव्या तयार करणे यांसारखी अन्य पर्यावरणपूरक कामेही महिला बचत गटांमार्फत करता येतील, असेही त्यांनी नमूद केले.यानंतर स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर यांनी आपल्या प्रभावी व सोप्या शब्दांत तसेच गीतांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंब व समाजाच्या विकासासाठी महिलांनी अर्थार्जन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत महिलांना प्रेरित केले.कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत ओला व सुका कचरा वर्गीकरणाची आवश्यकता व त्याची योग्य पद्धत उपस्थित महिलांना  परिसर भगिनी विकास मंडळाच्या  कल्पना अंधारे यांनी समजावून सांगितली. तसेच परिसर भगिनी विकास मंडळाच्या निर्मला सावंत यांनी कडधान्ये, तृणधान्ये व गळीत धान्यांपासून सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड कशी करावी, याची सविस्तर माहिती दिली. भाज्या घरच्या घरी तयार करून कुटुंबाला रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) पासून वाचवता येते, असे त्यांनी सांगितले. शिवाय, या लागवडीच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहजपणे उत्पन्नाचे साधन निर्माण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव-संजय केळकर

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव-संजय केळकर ठाणे : ठाणेकरांनी गेली २७ वर्षे उचलुन धरलेल्या या मालवणी महोत्सवातुन केवळ खवय्यांनाच नाही तर, कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक अग्नीहोत्र तसेच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे. असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी ८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी, शिवाईनगर उन्नती मैदान येथे “मालवणी महोत्सव-२०२६” भव्य आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी, ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, उषा वाघ,सुरेश कांबळे, अनिता ठाकुर, दिपक जाधव, अनिता यादव,विमल भोईर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, हरी मेजार, हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, हिंदुराव गळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.आ. केळकर आणि आ. डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच, यंदा प्रथमच उभारलेल्या स्व. कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचेही उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आ. केळकर यांनी, कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कलासंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतुने गेली २७ वर्षे सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असुन आता ते आयोजकावरून नगरसेवक बनल्याचे सांगितले. केवळ खवय्यांसाठी नाही तर, ह्या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचे आ. केळकर म्हणाले. तर,आ.निरंजन डावखरे यांनी, सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातुन गेली २७ वर्षे कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असुन एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुकोद्गार काढले.

जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवाद शाळा संपन्न

जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवाद शाळा संपन्न अनिल ठाणेकर मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  शाखा घाटकोपर यांच्यावतीने, जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवादशाळा हा एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. हा उपक्रम लग्नाळू मुला-मुलींसाठी वाटत असला तरी तो फक्त लग्नाळू व्यक्तिंसाठीच नसून लग्न या विषयाशी संबंधित असणाऱ्या आणि आताच्या काळातील लग्नाविषयीचे बदलते आयाम हे समजू न शकणाऱ्या वयोगट १६ ते पुढील सर्व वयोगटासाठी हा संवाद होता. या कार्यक्रमासाठी घाटकोपर शाखेचे कार्याध्यक्ष शहाजी पाटोदेकर, प्रधान सचिव प्रफुल्ल रणदिवे, संदेश खळे, कैलास बद्रीके, निर्मला माने, संदेश बालगुडे, प्रियांका  सवाखंडे, अनंत जोशी, अरुण सातव, छाया धनवे आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. “जोडीदाराची विवेकी निवड” हा  नात्यातील सहजीवन आणि सहजीवनातील सुरेल संवाद याविषयी केवळ हे व्याख्यान न घेता गेम, व्हिडिओ आणि, केस स्टडी मधून आपण काय आव्हाने, चुकीच्या समजुती टाळू शकलो असतो/शकतो, आवश्यक, अनावश्यक गोष्टी  यावरील तो संवाद यातून हा उपक्रम उलगडत जातो. गेली दहा वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून जन्म झालेला हा उपक्रम तरुणाईला भुरळ पाडतोच पण लग्न संस्थेची संबंधित असलेल्या, सद्य काळात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा जाणीवपूर्वक अभ्यास करता सगळ्यांना विचार करायला आणि तसं वर्तन करायला भाग पाडतो. “विवेकी जोडीदार निवड की जोडीदाराची विवेकी निवड” यातील शब्दाची जागा बदलली की वाक्याचा अर्थ वेगळा निघतो नेमका कोणता दृष्टीकोन बाळगावा आपण हे प्रत्येकाने आपल्या समज, स्व आणि कुटुंब समाज ओळखनुसार ठरवावे.या विषयावरील एक दिवसीय संवाद शाळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा घाटकोपर यांच्यावतीने शिवाजी टेक्निकल स्कूल, पंतनगर, घाटकोपर येथे पूर्ण दिवसभर घेण्यात आली होती. यासाठी मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वयोगटातील  लग्नाळू, लग्न झालेले जोडपी, पालक असे सर्वच प्रकारातील ६० लोक इथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संवादक म्हणून  आरती नाईक, महेंद्र नाईक आणि रुपेश शोभा शंकर यांनी काम पाहिले. चौकट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव विजय परब, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुषमा बसवंत, घाटकोपर शाखेचे अध्यक्ष केतन शहा आणि विविध ठिकाणावरून लोकं पूर्वनोंदणी करून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित लोकांनी कार्यक्रम आवडल्याचे आणि या कार्यक्रमाची ठिकठिकाणी गरज असल्याचे तसेच प्रत्येकाने आपल्या परिवार आणि नातेवाईक यांच्याशी अशा प्रकारचा संवाद घडवून आणला पाहिजे असे सांगितले. या प्रकारे पूर्ण दिवसभर कार्यक्रमाचे शानदारपणे नियोजन करण्यात आले.

सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – रणजित यादव

सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन ७ व ८ फेब्रुवारी लोधा वर्ल्ड स्कूल, ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा सिटी, कल्याण येथे उत्साहात पार पडले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव व आरोग्य विभागातील युवा खेळाडू दशरथ शिंगळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले. या दोन दिवसांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाच्या धावपळीतून वेळ काढून शारीरिक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.क्रीडा महोत्सवात सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीबद्दल शहापूर तालुक्याला सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळाला. विविध स्पर्धांमधील विजेते पुढीलप्रमाणे –कबड्डी पुरुष – शहापूर तालुका, कबड्डी महिला – कल्याण तालुका, खो-खो पुरुष – भिवंडी तालुका, खो-खो महिला – शहापूर तालुका, क्रिकेट पुरुष – मुरबाड तालुका, बॉक्स क्रिकेट महिला – भिवंडी तालुका, लंगडी – शहापूर तालुका, रस्सी खेच पुरुष – शहापूर तालुका, रस्सी खेच महिला – अंबरनाथ तालुका, व्हॉलीबॉल – शहापूर तालुका.विजेते संघांनी हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. या क्रीडा महोत्सवाचे नियोजन पंजाब नॅशनल बँक यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पद्माकर लहाने, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडीत राठोड, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सीखेच, हॉकी, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह महिला व पुरुषांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अधिनस्त जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्या शिर्के व मनोहर मडके यांनी प्रभावीपणे केले. क्रीडा महोत्सवामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 खोणी पलावा परिसरात भटक्या कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर हल्ला

खोणी पलावा परिसरात भटक्या कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर हल्ला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कल्याण: कल्याण–शीळ रोडवरील खोणी पलावा येथील आर्केड सोसायटीमध्ये सकाळी धक्कादायक घटना घडली. शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे मुलीचा जीव वाचला. या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. घडलेला हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये कुत्र्यांचा ४ ते ५ कळप मुलीच्या दिशेने धावत येताना दिसत असून सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने निर्बिजीकरण मोहीम, कुत्र्यांचे स्थलांतर व नियंत्रणासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह: एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.